Wednesday, 20 August 2014

श्रवणाची सार्थकता प्रत्यंतर घेण्यातच असते!

श्रावण मासी हर्ष मानसी!!!!
'जें जें काहीं श्रवणी पडिलें । तितुकें समजोन विवरलें ।
तरी च कांहीं सार्थक जालें । निरूपणी  ।।'

समर्थ म्हणतात की  आपण जे काही चांगले श्रवण करतो, चांगले ऐकतो,  ते सर्व आपण नीट  समजून घेतले पाहिजे.  आणि फक्त समजूनच  घ्यायचं नाही,  तर त्याचे आपल्या आयुष्यात प्रत्यंतर  करावे, शिकून घ्यावे, आत्मसात करावे. तेंव्हाच त्या निरुपणाचे सार्थक झाले असे होईल.
म्हणजे कुणी काही चांगले सांगितले, तर  ते फक्त ऐकले आणि सोडून दिले  असे केल्याने  त्या सांगण्याचा काहीच उपयोग होत नाही. तेंव्हा उत्तम गोष्टींचे किंवा तुम्हाला उपयोग होईल असे ज्ञान जर कुणी तुम्हाला दिले, तर त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या  कल्याणासाठी करून घेतला म्हणजे सांगितल्याचे सार्थक होते .

पावसाळा आला, श्रावण सुरु   झाला आहे, आणि  चातुर्मास सुरु झाला आहे . अनेकविध  सण वार, व्रतवैकल्य  आहेत. त्या निमित्ताने गोड धोड पदार्थ होतात,  भाज्या, फळ  वापरून अनेक पदार्थ करून देवाला नैवेद्य   दाखवला जातो.  मला परवाच माझ्या काही मैत्रिणी म्हणाल्या की तु केलेल्या  केळ्याच्या पुऱ्या छान झाल्या  होत्या, तर आम्हाला त्याची रेसिपी दे. म्हणून त्या सर्व मैत्रिणीं साठी ही केळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी…
केळ्याच्या  पुऱ्या


पिकलेली केळी  घेऊन,कुस्करून  घ्यावीत.  १ वाटी गर असेल तर १/२ वाटी  साखर,किंवा गूळ जे आवडेल ते  घालून, शिजवून घ्यावे. gas  वर तर करता  येतेच,पण  microwave मध्ये १०० % वर ३ ते ४ मिनिटे शिजवले की मिश्रण तयार होते. हे मिश्रण थंड करून , त्यात  मावेल एवढी कणिक आणि तांदूळ पिठी निम्मी निम्मी घ्यावी, (अंदाजाने १ वाटी पीठ लागेल.) त्यात थोडे मीठ, थोडे गरम तूप घालून पीठ हलक्या हाताने मऊसर भिजवून ,लगेच  पुऱ्या  करून त्या तळून घ्याव्यात. पुऱ्या थोड्या तुपाच्या हाताने प्लास्टिक पेपर वर थापाव्यात.
 ह्या पुऱ्या  नैवेद्याला पण करता येतात.

 असो, असेच सणवार येत राहतील, आणि छान  छान  पदार्थ बनत राहतील!