Thursday, 25 April 2019


                               चौकटीतले रंग                                                   

“तू शक्ति दे, तू तेज दे |
जे सत्य सुंदर सर्वथा, त्याचा आम्हाला ध्यास दे!”
डिसेम्बर २०१८ मध्ये आई आणि बाबांनी आपल्या सहजीवनाची ६१ वर्ष पूर्ण केली! ६१ वर्षांचे सहजीवन ? विश्वासच नाही बसत!! किती वेगळं वाटतं ऐकायला? किती अनोखं आणि रोमांचक सुद्धा! ६१ वर्षं प्रेम आणि  तपश्चर्येची,परीक्षेची आणि आव्हानांची, भीती आणि वैफल्याची, आशा-निराशा, मिलन आणि वियोगाच्या मध्ये हिंदकळत असतांना देखील आपल्या सद्सदविवेक बुध्दीला  जागृत ठेऊन हिमतीने पुढे चालत राहण्याची, एकमेकातला एकोपा आणि जोश कायम ठेऊन, अतिशय खंबीरपणे एकमेकांची साथ देण्याची, प्रेम, जिव्हाळ आणि आत्मियता जपण्याची, दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती आणि क्षमता ठेऊन सर्वांना सोबत घेत नात्यांची एक घट्ट वीण विणून आयुष्याची एक सुंदर नक्षी बनवल्याचे समाधान देणारी! जे तत्वतः आपलं आहे ते मिळवण्यासाठी झगडा करीत स्वतःचे वेगळे असे अस्तित्व निर्माण करत आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करून तोच  वारसा पुढे चालावा ह्या दृष्टीने पुढची पिढी घडवण्याची!
हे सर्व मनात येत असतांना माझेही मन गतकाळाच्या हिंदोळ्यावर कधी बसले कळलेच नाही आणि बघता बघता स्वतःच्या जन्मा पासूनचा हा माझा ५६ वर्षांचा  प्रवास मनाच्या गाभाऱ्यातील अनेकानेक आंबट गोड आठवणींनी उजळून निघाला! ह्या संपूर्ण प्रवासाचे साक्षीदार माझे आई बाबा आहेत, पण त्यांच्या ह्या सहजीवनाची माझ्या वयाच्या चौथ्या वर्षा पासून मी साक्षीदार आहे!
मी माझी गोष्ट लिहून काढावी असे नुकतेच भानुप्रियानी सुचवले होते, त्यावर विचार करतच होते, तोवर ह्या सुंदर क्षणाची गाठ पडली, आणि योगायोग जुळून आला! सगळ्या प्राणिमात्रां मध्ये फक्त माणसाला स्मरणशक्तीची देणगी भगवंताने दिली आहे. ही शक्ति म्हणजे बहु आयामी शस्त्र आहे, ज्यात माणसाला चांगली कामगिरी करून आपला उत्कर्ष साधून आनंद आणि समाधान मिळवण्याची प्रेरणा आहे, तर, दुसरीकडे भिती आणि नकारात्मक विचार बळकट होऊन दुःख आणि यातना भोगण्याची पण वेळ येऊ शकते. थोडीशी स्मरणशक्ती कमी होणे कधी कधी चांगलेच ठरते, पण शक्ति आणि माहितीच्या ह्या खजिन्याला कोणताही आघात झाला तर संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होऊ शकतं.... माणसाचे चारित्र्य घडवण्यात ह्या शक्तीचा सर्वात मोठा हात असतो. माणूस कसा वागतो, बोलतो, त्याचे आचार, विचार, त्याची तत्व, त्याच्या आवडी निवडी, त्याची बलस्थानं आणि कमतरता ह्या आणि अशा अनेक बारकाव्यांनी परिपूर्ण त्याचा स्वभाव बनतो आणि ह्यातूनच त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते.
हा विचार मनात आला आणि साहजिकच मग मी कशी घडले, माझे व्यक्तिमत्व कसे घडत गेले ह्याचा मागोवा घेत घेत खूप मागे पर्यंत पोहोचले! आपण सगळेच एकमेकांपासून वेगळे का असतो? म्हणजे आपली व्यक्तिमत्व वेगळी वेगळी का असतात?
आपल्या जडण घडणीत अनेक गोष्टींचा वाटा असतो.... माता आपल्या रक्ताचे अक्षरशः पाणी करून आपल्याला ह्या जगात आणते! मातेकडून गर्भावस्थेपासुनच आपल्याला मिळणारे पोषण, आपली जनुकीय संरचना, माता पित्या कडून मिळालेला जीवशास्त्रीय वारसा, त्यांच्या कडून गर्भावस्थेत झालेले आचार, विचारांचे संस्कार, त्यांची आपल्या लालन पालनाविषयी आणि एकूणच आयुष्याविषयीची   मानसिकता ह्यातून देखील आपण अप्रत्यक्षपणे बरेच काही ग्रहण करीत असतो, आणि हेच सगळे संस्कार आपल्या व्य्क्तीमात्वातून दिसतात. सुरुवातीचा स्वभाव हा असा अधोरेखित होतो. जन्मानंतर, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, तिथल्या विविध घडामोडी आपल्यावर परिणाम करायला लागतात आणि शालेय शिक्षण सुरु झाले कि मग तर आपल्या मनावर, इंद्रियांवर, अनेक प्रकारच्या कल्पनांचा, आचार विचारांचा, भाषांचा, मानसिकतेचा प्रभाव पडायला सुरुवात होते. तिथून पुढे आपले व्यक्तिमत्व घडायला खऱ्या अर्थाने सुरुवात होते, आणि साधारणपणे स्वभाव तोच राहिला तरी वाढते वय, अनुभवातून वेळो वेळी बदलतच रहाते. हे मी आता माझ्या अनुभवावरून सांगते आहे. असे असले तरी, माणसाला  बदलत्या जमान्य बरोबर, बदलत्या काळाबरोबर, बदलत्या वेळेबरोबर स्वतः मध्ये परिपक्वता आणता आली आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करून आयुष्यातल्या चढ उतारांना झेलून जास्तीत जास्त समतोल राखता आला तर त्याला आयुष्यात जास्तीत जास्त सुख आणि समाधान प्राप्त होऊ शकतं! जास्तीत जास्त ह्यासाठी कारण आजवर ह्या जगात कुणालाच सर्वकाही मिळालेलं नाहीये, आणि मिळणारही नाही.... ह्यालाच  प्रारब्ध, नशीब, प्राक्तन असे म्हणतात! ‘आपल्यात हिम्मत असेल तर नशीब बदलते’, ‘नशीब हे आपल्याच हातात आहे’, ‘तुम्ही  नशिबाचे  चक्र तुमच्या इच्छेप्रमाणे फिरवू शकता’ वगैरे वगैरे बरेच वेळा म्हटले जाते, पण माझ्या मते, ते अंशतः खरे असू शकते. कारण नशीब म्हणजे माझ्या मते भगवंताने प्रत्येकाला दिलेला एक ठराविक  चौकोन आहे, आणि तो त्याने स्वतःच  अंशतः भरलेलाच  आहे, त्यात भोग यातना आहेत, सुख दुःख आहेत म्हणजे काही गोष्टी त्याने लिहून ठेवलेल्या आहेतच. पण तुम्ही तुमच्या कार्याने, तुमच्या श्रम आणि मेहनतीने त्यात आणखीन सुख समाधानचे सुखद रंग कसे भरता, त्यावर त्या चौकोनाची शोभा अवलंबून आहे! तर, आपण जस जसे आयुष्य जगायला लागतो, तस तसे आपले इतरांसोबतचे वर्तन, आपले विचार, आपली ध्येय आणि त्याकडे होणारी आपली वाटचाल ह्या सर्वांतून आपले नशीब घडत असते. जसे पेराल, तसे उगवेल! आणि, आधी जे पेरले असेल त्याप्रमाणे आज उगवेल! दुःख, अवहेलना, अपमान, चिंता, भ्रांत, पराजय ह्या गोष्टी तर येतातच, पण आयुष्यात फक्त एवढच मिळत का? नाही. आयुष्याकडे नीट डोळसपणे बघितलं तर आपल्याला खूप सारे आनंदाचे, सुखाचे, हसण्याचे, तृप्ती आणि समाधानाचे क्षण उपभोगायला मिळतातच की! सारखं तक्रार करीत राहिलं, तर हे सारे क्षण निसटून जातात आणि आपल्याला कळत पण नाही!
अशी ही क्षणांची मालिका चालू असते. आयुष्याकडून मिळालेले चांगले, वाईट, भले, बुरे सर्व काही घेत  असतांना त्यांचा मुकाबला करण्यासाठी आपले मन बुद्धीच्या पातळीवर स्वतःची एक यंत्रणा विकसित करीत जाते....  आणि ह्या सर्व भावभावनांचे विष्लेषण करून आपल्याला आवडतील, रुचतील, पटतील असे निष्कर्ष काढून पुढची मोहीम आखत असते. ज्यातून आपला स्वभाव तयार होतो!  आणि ह्या सर्व बारकाव्यांनी वरील म्हटलेली नशिबाची चौकट भरत राहते. त्यामुळे ह्या चौकटीत आनंदाचे, उल्हासाचे, प्रेमाचे, पूर्णत्वाचे रंग भरायचे, का दुःख, वैफल्य, मत्सर, सूड, अनुत्साह आणि निराशेचे रंग भरून ही चौकात तशी अपूर्णच ठेवायची, हे आपणच ठरवायचे.... कारण हे सर्व काही आपणच करणार आणि आपणच भरणार!
आयुष्याच्या ५० वर्षांच्या प्रवासाकडे वळून पाहतांना, आयुष्याच्या वजाबाकीचा हिशोब आणि नफातोट्यांचे गणित मांडतांना, मला जाणवते आहे की, खूप काही गमावले, पण त्याहून कितीतरी  जास्त कमावले आहे!
अगदी लहान होते तेंव्हा मथुरेला राहिल्याचे चांगले स्मरते! नंतर शनिवार पेठेतील परांजपेंच्या वाड्यात राहायला आल्यापासून सर्वकाही काल घडल्यासारखं आठवतयं! हा वाडा म्हणजे आठवणींचा खजिनाच आहे! ह्या वाड्यातल्या सर्व बिऱ्हाडांमध्ये त्या काळच्या सर्वसामान्य मध्यम वर्गामध्ये असलेला सलोखा, प्रेम आणि  आपलेपणा होताच  पण एकमेकांना सोबत घेऊन आनंदाने, गुण्यागोविंदाने हसत खेळत जगण्यातला आनंद मनमुराद लुटण्याचे कौशल्य होते!  ह्या वाड्याने हे सर्व चांगले जसे शिकवले, तसेच काही विघ्नसंतोषी मंडळींच्या सूडभावनेतून  मानहानी कारक कृत्य आणि प्रसंगी घातक कारवायांमुळे झालेल्या अपरिमित नुकसानीचा इतर सर्व मंडळींच्या एकमुखी सहकार्य आणि आधारामुळे आई बाबांनी केलेला सामना, आणि त्यांच्या दोघांच्या कणखर आणि बाणेदार स्वभावामुळे  त्या मंडळींचा पुरता बिमोड  हे सर्वकाही मी पाहिले आणि अनुभवले आहे! सचिन नितीन तर जेमतेम १ वर्षाचे असतील, आणि प्रमोदिनी २ वर्षांची!
विजू आत्या, लीला आत्या, भाऊकाका ह्या सर्वांचे वाडे देखील माझ्यासाठी आनंदाची ठिकाणं तर होतीच, पण इथे घालवलेल्या क्षणांनी माझे व्यक्तिमत्व फुलायला, त्याला पैलू पडायला मदत झाली हे नक्की!
विजू आत्याच्या वाड्यात पहिले समोरच्या घरात माई दादा पण रहायचे. नंतर तिथे आत्या राहायला लागली. साने काकांना मी फार आवडायची! मी तिकडे राह्यला गेले की सकाळी सकाळी ते माझ्यासाठी जवळच्याच बेकरीतून कागदात गुंडाळलेली गरम गरम पावाची न कापलेली लादी आणायचे, आणि मी खुश! चहा बरोबर खाल्लेल्या त्या लादीपावाची सर आणि चव त्यानंतर आजवर खाललेल्या उत्तमोत्तम breads ना नाही येणार! आत्याच्या गुपापडीच्या वड्यांची चव आजही जिभेवर जशीच्या तशी आहे! ते स्वयंपाकघर, तिथला तो वड्यांचा मोठा डबा, आणि मला त्यातून हव्या तेवढ्या वड्या हव्या तेंव्हा खाण्याची मुभा इतर कुणाला नव्हती!
लीला आत्याच्या वाड्यातल्या माझ्या आठवणी खूपच वेगळ्या आहेत! तिथे मी भालोमामांच्या आईंना पहिले आहे आणि ‘आलवण’ नेसायचं किंबहुना ‘आलवण लावायचं’ म्हणजे काय असतं हे मी बघितलंय.... त्या स्वभावानं खूप कडक होत्या आणि त्यांची तशी भितीच वाटायची सगळ्यांना पण मी नाही कधी घाबरले त्यांना! मागच्या पिढीच्या काही परंपरा जपत असतांनाच कर्मठ विचारांना झुगारून देत पुढची पिढी  स्वतःची अशी एक नवी ओळख कशी करते हे मी आत्याला बघून अनुभव घेतलाय... हे  सगळे मी तेंव्हा अनुभवले होते, पण ते कळले मात्र नंतर!
भाऊकाकांचे घर म्हणजे तर आठवणींचा खजिना आहे खरतरं....माई, दादा, काका, काकू, आई बाबा  आणि आम्ही सर्व भावंडं... खूप आठवणी आहेत.... म्हणजे अगदी ओसरी, पडवी, माजघर, स्वयंपाकघर, नाहणीघर, बाहेर छोटी मोरी.... अगदी परंपरागत, बाळबोध वळणाचं, शेणानं सारवलेलं जुनं घर जे आजकाल मालिकांमध्ये बघायला मिळतं ना.. अगदी तसचं होतं हे घर!!! कमी उंचीवर असलेल्या खिडक्या, तिथे बसून बाहेर रस्त्यावरची मजा बघायची... आता फक्त आठवणी उरल्यात.. बस... पण हात पाय धुतल्या शिवाय घरात प्रवेश करायचा नाही हे इतके मनात बिंबले आहे की, आज घराच्या बाहेर मोरी नसली तरी घरात आल्यावर पाय धुवायची सवय तशीच आहे!
नागावचं घर पण असचं...  एसटीतून उतरलं की शुक्लंच्या गल्लीत चालत निघायचं, की आलं आजी आजोबांचं घर! कोकणातलं कौलारू घर... ऐसपैस,प्रशस्त! सदैव स्वागताला तयार! इथल्या  लोकांसारखचं! इथे तर खाली बसून स्वयंपाक करायची शकुंतलामामी आजी! ते पण चुलीवर! वीज नव्हती तेंव्हा अंधार पडला की घरात बसायचं! पहाटे लवकर उठून समोर महाजन आजोबांकडे जायचं, गाईचं धारोष्ण दूध प्यायचं आणि मग हुंदडायला मोकळे! परसबागेत आंबा, केळी, सुपारी, चिंच, नारळ पोफळीच्या बागा, मागे विहीरीतून रहाटाचं पाणी उपसून, लाकडांच्या चुलीवर छान कढत पाणी अंघोळीला घ्यायचं! ह्याच विहिरीतून पाणी पत्र्यांच्या नळ्यांमधून बागेतल्या झाडांना सोडायचं... मोट पण होती एका जमान्यात... पुढे मोटर आली आणि हे काम विजेवर व्हायला लागलं! तिथे सारवलेल्या जमिनीवर बसून, केळीच्या पानावर  खाल्लेल्या आंबोळ्या, साधासाच पण रुचकर स्वयंपाक, दुपारी बाहेर बसून शहाळी तोडून प्यायलेलं गोड पाणी आणि त्याहूनही गोड मालाईदर नारळाचे तुकडे आठवतात! आता बाजारात तीस तीस रुपयांचे शहाळे घेतांना ह्या घरच्या शहाळ्याची आठवण झाल्या शिवाय रहात नाही! माळ्याच्या जागेचं मला फार अप्रूप होतं.... छोटासा जिना होता... वरती  अंधारी जागा होती, अडगळीच्या वस्तू ठेवलेल्या होत्या तिथे... अडगळीची खोली म्हणायचे तिला! म्हणजे ह्यासाठी पण वेगळी खोली! नंतर नंतर बरेच बदल झाले... ओटा आला, gas आला, मागे चांगले बाथरूम झाले वगैरे वगैरे...  वसंतामामा आजोबा पण मजेशीर होते... खूप चेष्टा करायचे! मला नेहमी म्हणायचे..” हेमे.. तुझ्या बापसाकडून तुझे बिल घेणार हो” ... मला मुंबईची मंडळी आज पण ‘हेमे’ असचं हाक मारतात! आठवले आजोबा त्याकाळी डॉक्टर होते आणि एसटी थांब्यजवळ त्यांचा छोटेखानी  दवाखाना होता... ह्याचा मला खूप अभिमान वाटायचा, कारण त्यामुळे आमच्याकडे तिथले लोक आदराने बघायचे! म्हणजे आजोबांची सचोटी आणि पुण्याई आपल्याला उपयोगी पडली!  समुद्रावर फिरायला जायचं, वाळूत खेळायचं, घर बांधायचं, किल्ला करायचा, किती मजा होती साध्या साध्या गोष्टीत तेंव्हा!
आईचा सदाशिव पेठेतील वाडा हे तर अजब रसायन म्हणावे लागेल! तेंव्हा हे जाणवले नाही, पण आता कळतंय की जातीय सलोखा, सामाजिक बांधिलकी, बंधुप्रेम, एकोपा, विविधतेत एकता वगैरे शब्द जे आज नुसते तोंडपाटिलकी करण्यासाठी वापरले जातात, ते सर्व आम्ही त्या वाड्यात अनुभवले आणि जगले आहेत! तेंव्हा जात, पात, धर्म, उच्च नीच वर्ण, काही काही माहित नव्हते.... माहित होते ते फक्त सर्वांशी एकदिलाने आणि प्रेमाने वागणे, एकमेकांच्या मदतीला धावून जाणे, एकमेकांच्या सुख दुःखात सामील होणे, एकमेकांत रुसवेफुगवे झाले तरी पुन्हा एक होऊन, आनंदात दिवस घालवणे!
वाड्यातला हा एकोपा आमच्या सर्वांना जोडणारा बळकट धागा होता, आणि ह्यातून निर्माण झालेल्या नात्यांनी मला मानसिक आणि भावनिक स्तरावर  सशक्त, सुदृढ, आणि बळकट बनवलं! ह्या अनुभवांनी समृध्द होऊन पुढे बऱ्याच गोष्टींना लीलया पेलण्याचे सामर्थ्य मिळाले. काळच्या ओघात माणसं दूर गेली आहेत, पण मनाने अजूनही जवळच आहोत हे अनेकदा स्पष्ट होते!
वाड्यातून शहा बिल्डींग मध्ये रहायला गेल्यावर एका अनोख्या आणि वेगळ्याच संस्कृतीचा परिचय झाला! ही ‘बंद दरवाजा’ संस्कृती नवीन नवीनच रूढ व्हायला लागली होती, आणि वाड्यातल्या ‘खुल्या दरवाजा’ संस्कृतीच्या एकदम विरुध्द होती! पण flat मध्ये रहायला आलेली बहुतेक मंडळी ही वाड्यातूनच स्थलांतरित झाली असल्याने, त्यांना अजून ही नवीन पध्दत पूर्णपणे अंगवळणी पडली नव्हती, त्यामुळे जुन्या रीतीरीवाजांत अजूनही रमत होती. पण, ह्यातूनच पुढे विभक्त कुटुंब पध्दती रुजली आणि privacy वाढल्याने ‘मला शेजाऱ्याशी काय घेणे?’ अशी मानसिकता निर्माण झाली.... पण गम्मत बघा, आज हीच मंडळी आपल्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे का होईना, पुन्हा एकत्र यायला लागली आहेत... किटी पार्टी, सांस्कृतिक कार्यक्रम, सणसमारंभातून स्नेहमिलन अशा गोष्टींनी ह्या धकाधकीच्या  जीवनात आपल्याला आलेल्या एकाकीपणावर, असुरक्षिततेवर मात करण्याचे साधन व्हायला लागले आहे!  शेवटी काय... दुनिया गोल आहे!!
शहा बिल्डींग मधून पुढे बाबा NCC मध्ये ऑफिसर झाल्यामुळे तिरुचिरापल्ली (थोडक्यात त्रिची) ला पोस्टिंग झाली आणि पुण्याच्या बाहेर पडलेल्या आमच्या पावलांना एक नवीन आणि अनोखी दिशा सापडली! विविध माणसे, त्यांच्या विविध भाषा, रंगढंग, सण वार, त्यांच्या संस्कृतीचे अनेक पैलू, आणि विशेष म्हणजे त्यांची खाद्यसंस्कृती जवळून बघायला आणि अनुभवायला मिळाली ! नवीन शाळा, नवीन शिक्षक, नवीन सवंगडी, नवीन घरं, नवीन शेजार!! खूप मजा वाटायची सगळ्याची! काही मंडळी मनमिळाऊ, काही अतिउत्साही, काही शिष्ट, काही आगाऊ, आणि काही अलिप्त सुध्दा! तिथल्या लोकांची भाषा वेगळी आणि त्यातून उद्भवणारे गमतीशीर प्रसंग! रस्त्यात कुणी काही विचारले तर कळायचे नाही, म्हणून मित्रांकडून ‘आम्हाला तामिळ येत नाही’ हे वाक्य आम्ही शिकलो खरे, पण जेंव्हा ते वाक्य कुणालातरी म्हणायचो, तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव वाचण्यासाठी कुठल्याही भाषेची गरज नसायचीच!! अनेकविध जातीधर्माच्या, विविध चालीरीतींच्या  विविध विचारांच्या आणि विविध प्रांतातल्या लोकांना भेटत गेलो, त्यामुळे धीटपणा, आणि निर्भीडपणा अंगी बाणला, पण त्याही पुढे जाऊन, आपल्या मनाची आणि हृदयाची कवाड उघडून येतील ते नवे अनुभव घेऊन त्यातून स्वतःला समृध्द करीत गेलो!  हे सगळं होत असतांना ते अगदी सहज सोपं आणि अलगदपणे घडलं, तेंव्हा काही जाणवलेही नाही,पण ह्या सर्व अनुभवांचा फायदा पुढे आयुष्यभर मिळत राहिला... कळत... नकळत.... माझ्या आयुष्यात अनेक संकटात, अवघड वेळी, आणि इतर वेळी देखील ह्या संपत्तीच्या गाठोड्यातून अनेक मोती वेळोवेळी काढून त्यांचा उपयोग केला आहे!
आर्मी ऑफिसरशी लग्न झाल्यानंतर मात्र ह्या काही जुन्या गोष्टींचे संदर्भ एकदम बदलले! आत्तापर्यंत बाबांबरोबर भेटणाऱ्या ऑफिसर्सना आम्ही अंकल आणि आंटी म्हणायचो! आता प्रादेशिक सेनेच्या  गोटातली एक झाल्यामुळे, मला सगळी मुलं आंटी म्हणायला लागली, हा सर्वात पहिला जाणवलेला बदल! आणि, इतर ऑफिसर्सना त्यांचा हुद्दा आणि मग त्यांच्या नावाने उद्देशायची नवीन पध्दत अंगवळणी पडायला लागली! आणि त्यांच्या पत्नीला मिसेस!  मला पण wife of maj. Petkar  असे ऐकण्याची सवय लागली! आधीचे सर्व अनुभव मला इथे लगेच उपयोगाला यायला सुरुवात झाली! ह्यात आणखीन नवीन नवीन भाषांची, संस्कृतींची, आणि पदार्थांची भरच पडत गेली! मला ह्या नवीन वाटचालीचा अजिबात धक्का बसला नाही, उलट मी पहिल्या दिवसा पासून हे सर्व एन्जॉय करायला सुरुवात केली! आताची जीवनपध्दती थोडी वेगळी, थोडी क्लिष्ट होती, पण खूप थ्रिल होतं! मला फारशी अडचण नाही आली आणि मी खूप लवकर ह्या नवीन आयुष्यात रुळले... स्थिरावले! वेळेचे नियोजन, पध्दतशीर काम करणे, आणि नेहमी हसतमुख राहून, सर्वतोपरी सर्वांगीण विकास करण्याचा माझा खटाटोप असायचा! थोडी विनोदबुद्धी पण कधी कधी वेळ तारून नेते, किंवा आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पडण्यासाठी उपयोगी पडते!
भानुप्रिया हेच सर्व शिकली... लहान मुलं अनुकरणातून आणि सरावातून शिकतात. त्यांची मनं ओल्या sponge सारखी असतात... जे जे ऐकणार, बघणार, ते ते शिकणार! ह्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडत जाते. भानुप्रिया अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ आहे. हुशार आणि बुद्धीमाण तर आहेच, पण आकलन शक्ति जबरदस्त आहे. ज्ञानाचा योग्य वेळी, योग्य पध्दतीने उपयोग करण्याची हातोटी आहे. इच्छाशक्ति जबरदस्त आहे, आणि आव्हानांपुढे डगमगत नाही. हे सर्व गुण माझ्यात आलेत, ते आई बाबांच्या कृपेनेच! त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, आलेल्या अनेक समस्या, आणि  कुणालाही न दुखावता, कुणाचेहि नुकसान होणार नाही ह्याची दक्षता घेऊन त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनंत अडचणींना, समस्यांना संयमाने, गांभीर्याने, निर्भयपणे, खंबीरपणे, सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घेत केलेला सामना मी जवळून, अगदी जवळून पाहिलाय आणि अनुभवलाय सुध्दा! अनेकांनी अनेक प्रकारांनी त्यांना मानसिक, शारीरिक त्रास देऊन त्यांचे खच्चीकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांची, त्यांच्या सच्चेपणाची नेहमीच जीत झालेली लोकांनी पहिली आहे, कारण त्यांच्या मागे अनेक समविचारी मंडळी खंबीरपणे उभी होती!
भानुप्रिया मदत करायला तयार असते. प्राणिमात्रांसाठी आपुलकी पण आहे. त्यांची मदत नाही करू शकलो तर निदान त्यांना इजा पोहोचवू नये हे ती शिकली आहे. मुळात ती मृदुभाषी आहे,त्यामुळे झगड्याचे प्रसंग येत नाहीत. मी स्पष्ट बोलणारी आहे, आणि असे बोलणे अनेकांना आवडत नाही. असं नाही की मी शिष्टाचार पाळत नाही, पण मला गोड बोलून, शिष्टाई करून कुणाकडून काम करून घेता येत नाही... ही माझी कमतरता मला माहित आहे. कुणाला गोड बोलून, माझ्या पध्दतीचं काम करून घेण्याची हातोटी माझ्यात नाही. हां, कुणी माझं ऐकणार असेल, माझ्या सल्ल्याची कदर करणार  असेल, तर मी त्याच्यासाठी वाट्टेल ती मदत करायला तयार असते. पण मला शक्यतो एकट्यानेच काम करायला आवडते, किंवा असे काम करायला आवडते, ज्याची संपूर्ण जबाबदारी एकहाती माझ्याकडे असेल. असे काम मी उत्तमरित्या पार पडते... मला कुणाच्यात लुडबुड, ढवळाढवळ करायला आवडत नाही. मी माझ्यात मस्त राहू शकते, आनंदात राहू शकते... अनेकदा एखाद्या पार्टीत, कार्यक्रमात मी जर एकटीच असले, तरी मी कितीतरी वेळ शांतपणे, विचलीत न होता, मस्त मजेत बसू शकते!
संकटांना दूर लोटून, त्यांच्याकडे कानाडोळा करून आपण काहीच साध्य करीत नाही. उलट संकटांशी दोन हात केले, तर संकट लवकर शमते. पण जितक संकट किंवा परिस्थिती बिकट, तितक मन शांत आणि  संयमित ठेवणं गरजेचं होतं, कारण मन शांत आणि संयमित राहिलं, तर प्रसंगातून, अडचणीतून, संकटातून मार्ग नक्की सापडू शकतो! अशांत, गोंधळलेल्या मनःस्थितीत योग्य अयोग्य, सारासार विचारशक्ती नाहीशी होते, आणि योग्य निर्णयाप्रत नाही पोहोचू शकत हा माझा अनुभव आहे.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण माझा अनुभव म्हणून सांगते.... जेंव्हा परिस्थिती किंवा माणसं प्रतिकूल होतात, तेंव्हा त्यांच्याकडे सहानुभूतीने पहायला हवं... आपण बहुतेक वेळा अशा परिस्थितीत माणसां विरुध्द किंवा परिस्थिती विरुध्द आक्रमक बनतो, आणि आपल्याला राग येतो. पण सवयीने ही सहानुभूती आत्मसात होते.... अवघड आहे, पण अशक्य नाही खचितच... झालेल्या, केलेल्या काही चुकांमधून, आत्मपरीक्षणातून हे  कळले आहे. पण मनात अकारण अहंभाव असेल, तर मग हे शक्य नाही. अहंभाव बाजूला केला तर लक्षात येतं की जशा दुसऱ्याच्या चुका आहेत, तश्या आपल्याकडे पण चुका आहेत... तर आधी आपल्यात त्रुटी आहेत, कमतरता आहेत हे पाहिलं मान्य करा... मग सर्वकाही शक्य आहे. स्वतःच स्वतःचे परीक्षण करीत राहिलं, म्हणजे वेळोवेळी सुधारणा करता येतात आणि आपण माणूस म्हणून आणखीन उत्तम होत जातो ... मग एकमेकांतल्या विचारांच्या तफावतीतून बसलेल्या गाठी सुटतात!
मला मनोविश्लेष्ण करून, उद्भवलेल्या परिस्थितीचा कार्यकारण भाव जाणून घेऊन, कोणताही तिढा सोडवायला आवडते.  तसे केल्याने एक परिपूर्ण आणि  समाधानकारक मार्ग मिळतो, ज्याने बहुतेक सर्व घटक पक्षांचे हेतू साध्य होतात. प्रत्येकाची मानसिक जडण घडण लक्षात घेऊन, प्रोब्लेमच्या मुळाशी जाऊन विचार केला तर उपाय नक्की सापडतो. भानुप्रियाला पण असं प्रोब्लेम सोडवतांना बघते, तेंव्हा समाधान होते. आर्मी मध्ये राहून तिची जडण घडण चांगली झाली आहे. वेळेचं महत्व आणि नियोजन, स्वच्छता आणि व्यवस्थितपणा शिकली, शब्द आणि मैत्रीची जाण ठेवते. मला कधी तिला ओरडावं नाही लागलं. एक इशाऱ्याने समजून जाते. एकदा ती NCC च्या  युनिफोर्म मध्ये शाळेच्या बाहेर, मैत्रिणींसोबत मस्त, हिरवी कंच कैरीची तिखट मीठ लावलेली फोड खाण्यात मश्गुल होती. तिचे बाबा तिला घ्यायला आले होते, आणि ती तशीच मोटरसायकलवर बसली आणि घरी आली. घरी आल्यावर, तिला बाबांनी चांगलंच फैलावर घेतलं कारण दोघेही युनिफोर्म मध्ये असतांना तिने असं कैरी खात खात आलेलं अजिबात चांगलं दिसत नव्हतं असं त्यांनी सांगितलं...तेंव्हा पासून तिला युनिफोर्मची महती खऱ्या अर्थानी कळली, आणि मनात तो अभिमान बिंबला की कोणत्याही युनिफोर्मची शान आणि आदर राखलाच पाहिजे! manners, ettiquettes हे सर्व तिला आर्मी सर्कल मध्ये राहून शिकायला मिळाले, पण ती हे सर्व शिकली हे तिचं credit... नक्की.
एकदा लखनौच्या APS मध्ये मुलींसाठी लेक्चर होतं आणि मुलींच्या आयांना पण बोलावलं होतं. लेक्चर झाल्यावर, सर्व मुलींना चर्चा झालेल्या विषयावर आपल्या आईला एक छोटसं पत्र लिहायला सांगितलं गेलं. त्यानंतर आमच्यापैकी कुणी पुढे येऊन आपल्या मुलीचे पत्र वाचणार का म्हणून विचारल्यावर संकोचामुळे असेल किंवा आपल्या मुलीचे विचार, तिची भाषा ह्या गोष्टींची चेष्टा होईल अशी भीती वाटल्यामुळे असेल कदाचित, पण कुणीच पुढे आले नाही. मी उठले आणि तिनं हे पत्र मराठीत लिहिलं होतं, म्हणून मी त्याचा गोषवारा इंग्लिश मध्ये सांगितला, आणि त्याकाळी वर्ज समजल्या जाणाऱ्या विषयावर तिनं किती स्पष्टपणे आपले विचार मांडलेत हेही आवर्जून नमूद केलं आणि जागेवर बसले. आता भानुप्रियाला हे वाटत होतं की, शी... आपण उगीचच मराठीत पत्र लिहील... आईला किती embarassing झालं असणार! पण माझ्या तर हे लक्षात देखील आलं नाही! तिने मान्यतेप्रमाणे इंग्लिश मध्ये न लिहिता मराठीत हे पत्र लिहिल्याचा जबरदस्त अभिमान वाटत होता तेंव्हा! कारण हीच भाषा आहे ज्यातून आम्हा दोघींमध्ये खरा संवाद होतो, आणि हे नातं निर्माण होतं! हा मातृभाषेचा अभिमान मी तिच्या अंगी बाणला आहे, आणि त्याची पाळंमूळ आई बाबांनी दिलेल्या बाळकडू मध्ये आहेत. आपली मातृभाषा ही आपली जीवन संजीवनी आहे, आपली खरी ओळख आहे, तिचा अनादर कधी करू नये. कितीही भाषा शिका, पण आपल्या मातृभाषेतील माहितीचा खजिना आपल्यला लुटता आला पाहिजे. आपल्या भाषेचा रास्त अभिमान बाळगायलाच हवा. मातृभाषेत लिहिण्याची, वाचण्याची किंवा बोलण्याची कधीही लाज वाटता कामा नये. मातृभाषेचा वापर न करावा ह्यासाठी अनेकदा दडपण आणलं जातं, त्याला बळी पडू नका. आणि ह्यासोबतच आपल्या देशाचा अभिमान बाळगा!  आणि हो, आपल्या सशस्त्र सेनांचा अभिमान तर जरूरच हवा, कारण त्यांच्या अविरत, अविश्रांत आणि खड्या पहाऱ्यामुळेच संपूर्ण जगात आपली एक मजबूत आणि कणखर देश म्हणून ओळख आहे!
आणि हो ह्यावरून आठवलं... आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सशस्त्र सैनिकच व्हायला हवे असं नाही... स्वच्छता ठेवा, सरकारचे, ह्या देशाचे कायदे पाळा, नेहमी सतर्क आणि सावध राहा,कोणत्याही आपत्ती मध्ये शक्य तेवढी मदत करा, कोणतेही समाजविघातक कृत्य करून आपल्या स्वतःला, आपल्या परिवाराला आणि पर्यायाने आपल्या देशाला मान खाली घालायला लाऊ नका, सरकारला कर भरून सहकार्य करा, स्वतःचे आर्थिक आणि कायदेशीर व्यवहार पारदर्शी आणि भ्रष्टाचार विरहित ठेवा. ह्याने तुमची आर्थिक उन्नती तर होईलच शिवाय उत्तम आयुष्य जगायला मिळेल! स्वतःला कुठल्या अनैतिक मोहापासून दूर ठेवा... पैसा, सत्ता, ऐशोआराम आणि लालसा हे मायाजाल आहेत. त्यांच्या पासून दूर राहून देखील उत्तम आयुष्य जगता येतं. ‘सर्वोत्तम’  म्हणजे ‘Perfect’ असे जगात काहीही नसते कारण त्याचे मापदंड सतत बदलत असतात. म्हणून आपलं स्वतः चं सर्वोत्तम लक्ष्य निर्धारित करा आणि ते प्राप्त करण्यासाठी झटत राहा, यश आपोआप मिळेल! यशाकडे वाटचाल करीत असतांना येणाऱ्या अडचणींना, अपयशाला घाबरू नका. कारण, एका ठिकाणी अपयश हे दुसऱ्या ठिकाणच्या यशाचे द्योतक असू शकते. ‘त्याने’ म्हणजे विधात्याने तुमच्यासाठी काहीतरी वेगळे प्रयोजन केले असेल... तो तुमची परीक्षा बघतो, तुमची सचोटी, प्रामाणिकपणा, शक्ति, तुमच्या मनाची अंतरीची ओढ किती आहे हे तो बघत असतो, आणि मगच तुमच्या उद्दिष्टांपर्यंत तुम्हाला नेण्याचा निर्णय तो घेत असतो. त्याच्या कुठल्याही प्रयोजनाविषयी कधीही कोणतीही शंका घेऊ नका, त्याच्या करुणेवर, त्याच्या अशिर्वादांवर कधीही संदेह करू नका... आपल्यापरीने सर्वोत्तम काम करा आणि बाकी सर्व त्याच्यावर सोडून द्या....त्यच्या आदेशांचे आकलन करण्याची क्षमता ठेवा म्हणजे मग तो देतोय ते सर्व चांगलेच देतोय असे वाटेल, आणि नेहमी त्याचे आभार माना! ह्याच कारण असं की, जर का आपण असमाधानी राहिलो, आणि भगवंताकडे सतत तक्रार करीत राहिलो, तर तो पुढे असे काही वाढून ठेवतो कि तुमची परीक्षा आणखीन अवघड होऊन जाते, आणि मग आधीचंच संकट किंवा दुःख बरं होतं म्हणायची वेळ येते! आपल्या मनाच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा ह्या न संपणाऱ्या असतात... सफलतेच्या गगनभराऱ्या घेता घेता आपल्याला कुठे ‘थांबायचे’ आहे ह्याचाच विसर पडतो आणि ध्येयासक्तीने पछाडलेले आपण ‘आयुष्य जगायचे’ सोडून पळतच राहतो...पळतच राहतो....कुठेतरी ‘आता पुरे झाले धावणे..’ असे म्हणायला शिकले पाहिजे... त्यासाठी बऱ्याच गोष्टींना ‘नाही’ म्हणायला शिकले पाहिजे... जे आपलं आहे ते आपल्याला मिळतंच आणि जे आपलं नाही ते प्राप्त होत नाही हे  सत्य  नाकारता येत नाही... “kay sera sera”... पण म्हणून, ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असा विघातक दृष्टीकोन न ठेवता प्रयत्न, मेहनत आणि चिकाटीने यश प्राप्त केले पाहिजे.
आणि कसं आहे स्पर्धा ही दुसऱ्यांशी ठेवण्यापेक्षा स्वतःशीच ठेवा, कारण आपला स्वतःवरचा विश्वास हाच आपल्याला यशाप्रत घेऊन जाऊ शकतो... स्वतःचे वेळोवेळी अवलोकन केले, तर आपल्यातल्या खऱ्या ताकदीची ओळख होते, उणिवांची कल्पना येते, आपल्या बलस्थानांची जाणीव होते, आणि आपणच आपली खरी किंमत ठरवू शकतो! आपल्याला काय प्राप्त होऊ शकते आणि काय नाही ह्याचे भान आले, म्हणजे आयुष्याला नवी भरारी मिळते. पण म्हणतात ना...
“कभी किसीको मुकम्मील जहां नहीं मिलता|
कहीं जमीं तो कहीं आसमां नहीं मिलता |”
म्हणून आयुष्य सोपं, सुटसुटीत ठेवायचं आणि खऱ्या जगण्याकडे लक्ष द्यायचं!
मला ह्या विचाराचा आता फायदा होतांना दिसतो आहे! आयुष्यात जे जे मिळालं ते ते घेत गेले, आणि असं लक्षात आलं की सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट हे सम प्रमाणातच वाट्याला येत असतात. पण आपल्या स्वाभाविक मानसिकतेतून आलेल्या आकलनाने आपल्याला सुख आणि चांगला काळ भुर्कन संपून जातो आणि  दुःख जास्त काळ रेंगाळतं असं वाटतं .... दुःखात आणि वाईट काळात आपण आपले मानसिक संतुलन ढळू न देता कणखरपणे परिस्थितीशी दोन हात केले, तर प्रतिकूल वेळ देखील पटकन निघून गेली असे वाटेल! हे मी माझ्या अनुभवातून शिकले आहे. आर्मी मध्ये म्हणतातच...”When the going gets tough, the tough get going!”
ह्या अशा अनेक सकारात्मक विचारांच्या साखळीतून आपले व्यक्तिमत्व घडत असते. आजकाल ह्या आणि अशा अनेक जीवन पध्दती किंवा soft skills शिकवण्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. पण हे आयुष्याचे धडे मला घरीच, आई बाबांकडून आपसूकच मिळाले! ह्यातून माझे जे काही व्यक्तिमत्व घडले ते माझ्या दृष्टीने उत्तमच आहे आणि मुख्य म्हणजे ते माझे स्वतःचे आहे असा माझा ठाम विश्वास आहे. आणि अर्थात त्रुटी ह्या असणारच, कारण आपण कोणीच perfect नाही... आणि after all, perfection is also an illusion... correct?
आता मी पाहते आहे, रुद्रांशला वाढवतांना भानुप्रिया ह्या आणि अशाच तत्वांवर भरोसा ठेऊन आहे. त्यामुळे असे वाटते... ‘ह्याच साठी केला होतं अट्टाहास!’ माझी धडपड, मेहनत, माझी चिकाटी माझा अट्टाहास... सर्वांचे फळ मला मिळाले आहे! आणि किती गोड फळ आहे हे! आज मी स्वतःला धन्य समजते, आणि त्यामुळे खूप शांत आणि समाधानी वाटते आहे. ‘Life seems to have come full circle!’
मी आज ज्या परिसरात रहाते, तिथे मी रुळायचा खूप प्रयत्न केला, पण यश आलेले नाही, कारण इथली मंडळी आणि माझ्या विचारांमध्ये इतकी तफावत आहे, कि ती कधीच भरून निघणार नाही. सर्व मंडळी जात पात, धर्म, प्रांत, प्रदेश, ह्या आणि अशा असंख्य बंधनात अडकून पडलेली दिसतात.  मनाचा कोतेपणा इतका पराकोटीचा आहे की ‘मी आणि माझी विचारधारा’ ह्यापुढेही जग आहे हे  ते स्वीकारतच नाहीत असं सारखं वाटतं. आपल्या स्वतःच्या धार्मिक बैठकीतून निर्माण केलेल्या देवधर्माच्या निमित्ताने केलेले पर्यटन (ह्याला पर्यटन म्हणावे काय?) आणि त्याला अनुसरून मान्य केलेल्या चालीरीती ह्यापलीकडे जगात अनेक धर्म, धार्मिक विचारप्रणाली आणि विविध संस्कृती आणि त्याप्रमाणे जीवन जगणारे अनेक लोक आहेत हे ते स्वीकारतच नाहीत. त्यांच्या मतप्रणाली विरुध्द जो कुणी असेल, त्याला प्रचंड विरोध, उपहास, अवहेलना सोसावी लागतेच, पण त्याला ते आपल्यात स्वीकारतच नाहीत... काही मोजकीच कुटुंब सोडली तर माझ्या विचारांची, मतप्रणालीशी साधर्म्य असणारी मंडळी इथे नाहीतच...आयुष्याकडे समाधानी मनाने बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवणारे असे कुणीच नाही ज्याच्याशी माझी मैत्री व्हावी. त्यांच्या पेक्षा उत्तम कोणी आहे म्हटल्यावर तर त्याचा दुःस्वास करणं आलंच, त्याला आपल्या गोटात घ्यायचे नाही हे आपोआपच आले....त्यामुळे महिलांमध्ये मला एक होता आलेलं नाही. अर्थात मी कधीच ह्या गोष्टीची चिंता बाळगली नाही... न पूर्वी, न आर्मी मधल्या कालावधीत,आणि ना इथून पुढे... मी मस्त असते, माझ्या हृदयाच्या आणि मनाच्या इशाऱ्याप्रमाणे वागते म्हणजे आपली वागणूक बहुतांशी बरोबरच होते. कोण बरोबर पेक्षा काय बरोबर हे तत्व मी पाळायचा आटोकाट प्रयत्न करते आणि  बहुतेक वेळा माझा निर्णय चुकल्याचे स्मरत नाही. कारण निर्णय मी घेतच नाही, तो दुसऱ्यांवर सोपवते. कारण सर्वांना आणि सर्व वेळी आपण खुश ठेऊ शकत नाही. तसा प्रयत्न देखील करू नये, कारण आपण सुखी व्हायचे कि दुःखी राहायचे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. जेंव्हा यश मिळते तेंव्हा हुरळून जाऊ नये किंवा गर्व करू नये, कारण ह्याहून अनेक पटींनी जास्त यश संपादन केलेली मंडळी आपल्या आजूबाजूला दिसतीलच... आणि अपयशात खचून जाऊ नये... हि पुस्तकातली वाक्य असतील, पण मला ह्याचे पूर्ण प्रत्यंतर आलेले आहे. त्याच बरोबर कोणतीही चूक झाली कि त्याचे विश्लेषण करते, कारणमीमांसा करते, म्हणजे चुकांचे प्रमाण कमी रहाते. आयुष्य सुखाने जगावे, दुसऱ्यांना पण जगू द्यावे हा लाइफचा फंडा आहे माझा... नेहमी मदतीचा हात पुढे करावा, प्रेमाने राहावे, आपली आणि दुसऱ्यांची काळजी घ्यावी...आयुष्य साधंसुध, कमी गुंतागुंतीचं ठेवण्याचा प्रयत्न करावा. जे आवडतं ते काम करा, किंवा जे काम करताय ते आवडीने करा... मग कुणी गृहिणी असेल, कामगार असेल, व्यावसायिक असेल... कोणतंही काम कमी लेखू नये कारण कामाची प्रतिष्ठा ही काम करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर, त्याच्या प्रयत्नांवर आणि त्याच्या निष्ठेवर अवलंबून असते. आपले उद्दिष्ट व्यापक ठेवा आणि ते साध्य करण्याची क्षमता मिळवा. “Into Battle with resolve!’ दुसऱ्याच्या यशाचे मापदंड बघून स्वतःचे यश मोजू नका कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याच्या क्षमता, त्याच्या गरजा, त्याच्या अपेक्षा, इच्छा आकांक्षा, त्याच्यापाशी असलेली साधनसामग्री वेगवेगळी आहे... आपले मापदंड स्वतःचं ठरवा आणि त्यांना साध्य करा! मी कालच्या पेक्षा आज काहीतरी चांगले मिळवले आणि माणूस म्हणून मानसिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक पातळीवर  आणखीन चांगली झाले तर मी यशस्वी आहे! त्या दृष्टीकोनातून बघितलं तर मी आज यशस्वी आहे असं मी नक्की म्हणेन. हे होण्यासाठी आपल्याला अनेक लोकांची, आजूबाजूच्या प्रत्येक घटकाची साथ लागते. ह्यातूनच एक मानवी साखळी तयार होते ज्याला आपण ‘समाज’ म्हणतो.
हे सर्व समजण्याची क्षमता मला ज्या शाळेनी दिली ती St. Mira’s School... त्याचे संस्थापक दादा वासवानी आणि आमचे गुरु दादा जे पी वासवानी ह्यांच्या साहित्याचा अनमोल वारसा मिळाला. त्यातून माझ्या व्यक्तीमत्वात बऱ्याच गोष्टी भिनल्या... जसे भूतदया ... अर्थात हे तर बाबांनी पण शिकवले कि मुक्या प्राण्यांना मारू नये, काही मदत नाही करता आली तरी त्रास देऊ नये. दोन घास अन्न देता आले तर जरूर द्यावे. कुणी मदत मागितली, किंवा त्याला गरज आहे हे कळले तर न संकोचता मदत करावी, आणि यथा शक्ति यथा मति  त्याची गरज भागवावी..
आज आयुष्याची पन्नास पेक्षा जास्त वर्ष पार केल्यानंतर मागे वळून पाहतांना आयुष्याचे गणित मांडायला बसले. आयुष्य कसे जगले, माझ्या चुका, माझे यश, हाती काय गवसले, काय हरवले ह्याची गोळाबेरीज करायला बसले... मध्यंतरी भानुप्रियानी मला माझी कहाणी लिहिण्याचा आग्रह केला, आणि विचार करता करता मला वाटलं की लिहिण्यासारखं खुप काही आहे... आणि घेतलं लिहायला...
भानुप्रियाच्या लग्नानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. तिला तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट सापडलं ह्याचा मला खूपखूप आनंद आहे.. पण त्याच बरोबर तिचं माझ्या घरातलं हसतं खेळतं अस्तित्व हरवलंय ... तिच्या सोबत घालवलेले दिवस, त्या आठवणी... आम्ही खूप बोलायचो, खूप हसायचो, गप्पा मारायचो... आम्हाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता... आणि हसायला कोणतही कारण पुरेसं असायचं...  कोणतही छोटंमोठं कारण पुरेसं असायचं सेलिब्रेशन करायला! जितका मोठं आनंद, तितकं मोठं सेलिब्रेशन!!! पण मनाचा आनंद हेच खरं सेलिब्रेशन!!!
दुसरं म्हणजे आता स्वयंपाकाचा उत्साह नाही राहिला कारण दाद देणारा खंदा कार्यकर्ता होता... भानुप्रियामुळे स्वयंपाक करायचा उत्साह वाटायचा आणि आनंद यायचा...  आता उदरभरण असे झाले आहे... असो...
तिसरं हरवलं होतं ते माझं हसू.... पण आता रुद्रांशमुळे माझं हसू परत आलंय!! ज्या दिवशी नर्सच्या सोबत, पाळण्यातून एक छोटसं, गोंडस हसरं पार्सल खोलीत आलं, तेंव्हाचा  आनंद अवर्णनीय आहे! तेंव्हा पासून माझ्या आयुष्यात एकही कंटाळवाणा क्षण नाही!  त्याच्याच गप्पा, त्याचेच कौतुक, त्याचेच विचार आणि त्याच्याच येण्याची वाट पाहणे...बस...
आणि चौथं मोठं स्थित्यंतर म्हणजे  हळूहळू मी सर्व गोष्टींपासून अलिप्त होत चालली आहे. ज्या गोष्टींचे आता काही संदर्भच उरले नाहीत अशा अनेक गोष्टीं मधून मी मन काढून घेतलं आहे... माझं मन हळू हळू रिकामं करत्ये... अनावश्यक भावभावनांचा कचरा काढायला सुरुवात केली आहे ... ज्याने मानसिक त्रास होईल आणि शक्तींचा अनावश्यक ऱ्हास होईल अशा गोष्टींमध्ये गुंतून रहात नाही... अवघड होतं हे सगळं सुरुवातीला, पण माझ्या निग्रही वृत्तीमुळे हे सहज शक्य झालेलं आहे.
माझ्या लग्नानंतर माझ्या आयुष्यात  घडलेल्या अनेक अप्रिय गोष्टींच्या आठवणी मागे पडल्यात, त्यांचं ओझं मी फेकून दिलंय...  पण त्या वेळी खचून न जाता, न डगमगता धीराने आणि खंबीरपणानं उभी राहिले ते आई बाबांच्या संस्कारांमुळे आणि शारीरिक मानसिक छळाला संयमाने तोंड देता आलं, सामना करता आला, तो फक्त भानुप्रियामुळे जी माझ्या अस्तित्वाचा गाभा होती...
सन २००० मध्ये आयुष्याला अचानक वेगळे वळण लागले... ह्या घडामोडींमुळे  माझं सासरच्यांशी असलेलं जेमतेम टिकलेलं नातं कायमचं विसकटलं... तेंव्हा आमचं पुण्यात पोस्टिंग होतं.. त्या   दिवशी गोष्टी पूर्णपणे माझ्या हाताबाहेर गेल्यामुळे मी हडपसरला जायचं ठरवलं.. भानुप्रियाला तिच्या बाबांकडे सुपूर्द करून मी हडपसरला आले. पण ह्यानंतर जे काही अकल्पित आणि  विपरीत घडलं, त्यानं आमच्या दोघींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.. तिच्या बाबांची पोस्टिंग लखनऊला झाली होती, आणि त्यांनी तिला अशा धूर्त, कपटी आणि नालायक नातेवाईकांकडे सोडली, ज्यांच्या तावडीतून भानुप्रियाला सुखरूप सोडवण्यासाठी ८ ते १० दिवस कोर्टाच्या पायऱ्या चढले, हिमतीने तिला परत मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले... त्या मंडळींनी शाळेत प्रिन्सिपलना भेटून, खोटा अर्ज करून मला भानुप्रियाला भेटण्यास प्रतिबंध केला होता हे मला शाळेत त्यांना भेटायला गेले तेंव्हा कळले... त्या अर्जाप्रमाणे, मी माझ्या मुलीला वाळीत टाकून गेले होते...abandoned my daughter... आणि ही सर्व मंडळी तिच्या वडिलांच्या गैरहजेरीत तिची काळजी घेत होते म्हणे... नीचपणाची कमाल मर्यादा होती ती... सर्व एकजात ढोंगी, दांभिक.... खोटारडे आणि निर्लज्ज... त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचा कुटुंबप्रमुख माझा द्वेषच करायचा आणि माझा पाणउतारा करण्यासाठी नेहमी टपलेला असायचा... माझा प्रामाणिकपणा, स्वतःच्या मताप्रमाणे वागण्या- बोलण्याचा निर्भीडपणा, आणि माझ्या हिमतीवर जगायची माझी धमक त्याने पहिल्या भेटीतच ओळखली होती, आणि माझे स्थळ नाकारावे असे सुचवले देखील होते...मुलगी तुम्हाला जड जाईल असे सुध्दा सुचवले होते... पण पेटकरांनी ऐकले नाही, आणि शिवाय लग्नाची जबाबदारी पण मोठ्या पेटकरांनी उचलल्यामुळे त्यांचा इतक्या वर्षांचा वचक आणि दरारा संपतो कि काय अशी भीती त्यांना वाटली, आणि त्यांनी माझ्यावर काटच धरला... उभे वैर धरले...त्यांच्या हुकुमशाहीला मी कधीच जुमानलं नाही ... मी कशाला त्यांचे ऐकायचे होते? हा तऱ्हेवाईकपणा आई बाबाबांच्या पण लक्षात आला होता, पण त्ते म्हणाले कि तुला कुठे त्यांच्या घरात राहायचे आहे? तू आपली जुजबी संबंध ठेऊन वाग. मला हे पटले, आणि त्या दिवसापर्यंत मी माझ्याकडून चांगले म्हणजे जुजबी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा दिलेला शब्द पाळला... त्यांच्याकडचे वाढदिवस, सणवार, समारंभ वगैरेंना हजेरी लावून, योग्य ते करीत गेले.... हे मी आजही मानते की कायद्याने किंवा प्रस्थापित तत्वांप्रमाणे योग्य तो निर्णय घ्यावा. प्रत्येक ठिकाणी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नये, ते हितकारक नसते... हे मी भानुप्रियाला शिकवून दिले आणि त्याचा वापर करून तिला तिच्या आयुष्यात अनेकदा फायदा झाला आहे हे नक्की!
असो. तर तिच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळाला! तिच्या मैत्रिणीची आई हे काम करायला लगेच तयार झाली! त्या क्षणी त्य माझ्यासाठी प्रत्यक्ष देवच होत्या, आणि देवदूतासारखे काम त्यांनी केले आणि माझा पुढे मार्ग मोकळा झाला! पण ह्या कठीण समयी त्यांची ही साथ खूप मोलाची होती, आणि त्याचं मूळ आमच्या काही वर्षांपासूनच्या मैत्रीत होतं! म्हणजे आमच्यात मैत्री होणं हा देखील एक दैवी संकेत होता असचं म्हणायला लागेल! झालं काय की भानुप्रियाला St. Helena’s मध्ये प्रवेश मिळाला म्हणून मी तिच्या युनिफोर्मसाठी रांगेत उभी होते, त्याप्रमाणे त्या पण माझ्या मागेच उभ्या होत्या त्यांच्या मुलीच्या युनिफोर्मसाठी. त्यांची मुलगी KG मध्ये होती. सहज गप्पा सुरु झाल्या आणि मग भेटता भेटता आमची चौघींची चांगलीच गट्टी जमली.. त्यांना भानुप्रियाच्या वह्या, तिचं अक्षर खूप आवडायचं... म्हणून मग त्यांनी दर वर्षी तिच्या वह्या आणि पुस्तकं न्यायला सुरुवात केली, ज्यावरून त्यांची मुलगी अभ्यास करायची... आणि त्यांची धारणा झाली की त्यामुळेच त्यांच्या मुलीला खूप चांगले मार्क्स मिळतात! तर त्यांना खूप कौतुक होतं भानूचं! त्यांची मुलगी पण खूप गोड आणि सुस्वभावी होती, त्यामुळे त्या दोघींची पण मैत्री झाली होती.. एकमेकींच्या घरी आम्ही विश्वासाने पाठवत असू. हे सत्र भानुप्रिया लखनौला जाईपर्यंत सुरु राहिलं! त्यांनीच भानुप्रियाला भेटून सर्व सांगितलं  आणि तिला धीर दिला. आई तुझ्यासाठी काहीतरी प्रयत्न करते आहे आणि तुला विसरलेली नाही हा विश्वास त्यांनी दिला.
ह्या सर्व प्रसंगातून भानुप्रिया आणि मला सावरायला खूप वेळ लागला, पण ह्याचा मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे... प्रत्येक घटनेवर सविस्तर चर्चा करून करून, ते सर्व मनातून बाहेर काढून त्या दुखऱ्या क्षणांवर पांघरूण घातले आहे.  आम्ही स्वतःला सावरलं आहे...  आजही ते व्रण आणि त्यांच्या जखमा कधी कधी डोकं वर काढतात...पण रेकीच्या अभ्यासामुळे सगळ्या गोष्टींना आणि त्या माणसांना आम्ही माफ केलंय आणि सर्वकाही  विसरून पुढे  गेलोय... दोघींना ह्या प्रसंगानं खूप काही शिकवलं... मनाने अतिशय बळकट, आणि खंबीर झालो आहोत हे नक्की!
मनावरचे आघात आणि त्या प्रसंगातून आमची केलेली मानहानी.... आघात असं की ज्या घराच्या उंबरठ्यावर मला माप ओलांडायला लावलं... हो माझा गृहप्रवेश त्यांच्या घरात झाला, कारण नाशिकला जायला वेळ होता दोन दिवस म्हणून...मला थोडं अजब वाटलं, पण मी काही त्याचं एवढं विशेष मनावर घेतलं नाही, कारण मला पहिल्याच दिवशी भांडण होईल असं करायचं नव्हतं... तर... त्याच उंबरठ्यावरून मला आणि बाबांना त्या रात्री परतून लावलं होतं ह्या लोकांनी... तिच्या बाबांनीच फोनवर सांगितलं होतं की तिला हडपसरला घेऊन या, म्हणून रिक्षानी गेलो होतो दोघं...तिला आणायला... माझी तर मानहानी झाली, पण माझ्या बाबांची मानहानी झाल्याचं शल्य आजही मनात आहे, आणि जेंव्हा जेंव्हा विचार येतो, तेंव्हा तेंव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही..
तिला घेऊन येण्यासाठी मला जे दिव्य करावं लागलं, त्याच्याबद्दल काय सांगायचं? कोर्टात केस चालू होती आणि त्या माणसानं चुकून सुध्दा विचारलं नाही फोन करून, म्हणजे किती कमाल आहे न? म्हणून मी लखनौला आर्मीच्या फोनवर फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली तरी त्याला काही फरक नाही...त्याचा हा निष्काळजीपणा आणि आमच्या दोघींबाबतचं कर्तव्य तो विसरून गेला होतं असं वाटत होतं....  मग मी ‘न भूतो न भविष्यती’ अशा शिव्यांची लाखोली वाहिली त्या माणसाला आणि त्यांच्या त्या नातेवाईकांना.... हे सर्व संभाषण बूथ बाहेरच्या मंडळींना पण दिसत होतं, आणि सगळे विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते, आणि हे सर्व  army exchange मधून जात होतं, त्यामुळे साहजिकच तिथे operators ना सगळं ऐकू जात होतं....  पण मला कशाचीच भीती किंवा काळजी वाटत नव्हती...मी रागाने बेभान झाले होते... आयुष्यात त्याआधी आणि त्यानंतर कधी ना मी अशी बेभान झाले ना मी अशा शिव्या दिल्या ....(नंतर लक्षात आलं माझ्या की अशा अविर्भावात शिव्या देतांना मी लोकांना वाड्या मध्ये ऐकलं आणि बघितलं होतं... त्या चित्रफितींचा बहुधा उपयोग झाला असावा..)असो..  ही  सर्व बातमी ताबडतोब आमच्या group commander कडे गेली आणि त्यांनी पेटकर साहेबांना बोलावून खडी सुनावली..काय प्रोब्लेम आहे ते विचारले.. आणि म्हणाले की तुमच्या जाण्याने ऑफिस काही बंद पडणार नाहीये..(त्यांचा स्वतःचा असं समाज आहे की मी नसलो, तर आर्मीच बंद पडेल!) आणि आर्मी तर नाहीच नाही... तेंव्हा ताबडतोब घरी जा, प्रोब्लेम सोडवा, बायको मुलीला सुखरूपपणे सुरक्षितपणे घरी ठेवून मगच ऑफिसला या....
ह्या कुटुंबातल्या मुलींना फाजील आत्मविश्वास होतं, आणि तो त्यांच्या वडिलांनी त्यांच्या डोक्यात भरवला होता... तुम्ही माझ्यासाठी मुलगेच आहात आणि मुलांसारखंच वागा... ह्या फाजील लाडापायी, ह्या मुलींनी अनेक होतकरू मुलांची स्थळ नाकारली कारण काय तर म्हणे... हा ३० वर्षांचा ‘घोडा’ आहे... आणि ह्या असल्या वागणुकीला त्यांच्या वडिलांचा पूर्ण पाठींबा होता... तो माणूस होताच तसा... आणि मुलींच्या आईचा काहीच उपयोग नाही कारण त्यांचं स्थान तर नोकरापेक्षा खालचं होतं... फक्त ‘होय बा’ करायचं...  एवढं मोठं खटलं बघायचं, घरकाम, सणवार, वाढदिवस, आला-गेला, पै-पाव्हणा ह्यातच वेळ घालवायचा... आणि कुठल्याही गोष्टीत त्यांचे मत घेण्याचे काहीच कारण नाही... अर्थात त्यांना स्वतः ला तरी मत होतं कुठे द्यायला? आणि कोण विचारत होतं त्यांच्या मताला?
तर ह्या मुलींना चुकीच्या मार्गाला लावल्याने, त्यांचे ना शिक्षण, ना कोणताही उद्योग.. हां एक उद्योग होतं त्या सर्वांचा.. कोर्टात लोकांना खेचायचं, खोटे दावे लावायचे, आणि पैसे मिळवायचे.. त्यामुळे त्या मुलींना आपण खूप हुशार आणि बुद्धिमान असल्याचा वृथा अभिमान वाटायला लागला.. आणि तरी राहणीमान उंची हवे बरं... शौक महागडे, फोन महागडे... मग ह्यासाठी पैसा असाच येणार ना? आजही त्यांची लग्न झाली नाहीत, व्यवसाय नाही, कोणतीही ओळख नाही... त्यातून त्यांच्या संपूर्ण घरात आत्महत्या, आर्थिक गैरप्रकार, कुणी पसार झाले, अटक वगैरे झाले आहेत.... माझ्यासोबत एवढं होऊन देखील मला ह्या गोष्टीचे खूप वाईट वाटते.. कीव येते... असं तर शत्रूवर देखील वेळ येऊ नये...
तर मी आणि बाबा त्यांच्या घरी गेलो भानूला आणायला, तेंव्हा त्यांच्या अतिशिष्ट मुलीने बाबांना सांगितले...’तुम्ही आमच्या बाबांची appointment घेऊन मगच या...’ निर्लज्ज मुलगी...तिचं वय काय, बाबांचं वय काय... माझ्या बाबांची समाजातली उंची तिच्या वडिलांना कधीच गाठता आली नसती... पण ह्यालाच तर कोतेपणा म्हणतात... फाजील आत्मविश्वास... करंटेपणा... मी बाबांचा झालेला हा अपमान आजपर्यंत विसरू शकलेली नाही... जेंव्हा जेंव्हा आठवण होते डोळे भरून येतात... माझा अपमान झाला, मला काही नाही त्याचं, पण त्या मुलीने निर्लज्जपणाने केलेला बाबांचा अपमान....संस्कारांची भाषा बोलणारे हे लोक... मी ऐकलय हे सर्व... दांभिक माणसं... भानूच्या बाबांचा फोन आल्यानंतरच आम्ही तिला घ्यायला गेलो होतो....पण आम्हाला घरी परतण्यावाचून काहीच गत्यंतर नव्हतं.... भानुप्रिया आतून हे सर्व काही ऐकत होती... तिनं मला नंतर बरंच काही सांगितलं... तिला खूप रडू आलं होतं त्यादिवशी... जड मनानं आणि डोळ्यातले अश्रू परतवून लावत, धीर करून घरी आलो दोघे...
त्यानंतर खूप विचारांती आणि विषादाने मन घट्ट करून  मला ह्या नवरा बायकोवर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागला....माझ्या मुलीला माझ्या परवानगी आणि संमती शिवाय जबरदस्ती घरात डांबून ठेवल्याबद्दल...ह्याचा शेवट काय होणार माहित नव्हतं... काहीच अंदाज नव्हता... अंधारात उडी घेतली होती मी.. गणपती बाप्पा नी सद्बुद्धी दिली आणि पुढे ३ ते ४ दिवसातच तिचे बाबा पुण्याला आले आणि तिला तिथून घेऊन माझ्याकडे आणून सोडलं... माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला.. पण तिच्या बाबांनी जर त्या कपटी नातेवाईकांची साथ दिली असती तर काय झाले असते ह्याचा नुसता विचार जरी मनात आला, तरी शहरे येतात, कापरं भरतं मला... आजही तिचे बाबा मात्र म्हणतात की त्यांनी त्या मंडळींकडे तिला ठेवले त्यात काहीच चूक नाही.. पण माझं म्हणण होतं की मग त्या पेटकरांकडे का नाही ठेवलं तिला... पण आता मागे वळून पाहतांना असं जाणवतं की त्यांनी तिला तिथे ठेऊन घ्यायला नकारच दिला असता, कारण त्या बाई खूप धूर्त, आत्मकेंद्रित आणि शिष्ट आहेत... त्यांनी आतापर्यंत आमच्या कौटुंबिक कलहामध्ये कधीच सोडवण्यासाठी पुढाकार घेतला नव्हता आणि पोलीस खात्यात असलेल्या आणि कोर्टकचेऱ्यांची चांगली माहिती असणाऱ्या आपल्या नवऱ्याला ह्या प्रकरणात मध्ये न पडण्याची ताकीद दिली होती... आणि कोर्टात असलेल्या प्रकरणात ते पडलेच नसते हे नक्की... ज्या कुटुंबाच्या आधारे ह्या बाईंनी आपले शिक्षण, नोकरी, मुलाची देखभाल एवढेच नाही, तर स्वतःची डॉक्टरेट देखील पार केली आणि आपल्या कॉलेजच्या नोकरीतल्या महत्वाकांक्षा पूर्ण केल्या त्या कुटुंबाच्या विरोधात त्या बाई कधीच गेल्या नसत्या... आजही त्यांचे ईमान तिकडेच जास्तं आहे... आणि मी मूर्ख होते जे हे सगळं माहित असून, लग्न झाल्यापासून त्यांना हर प्रकारे मदत करीत आले, माझं कर्तव्य पार पाडत आले... पण माझ्या ह्या संकटाच्या वेळी त्यांनी आम्हा दोघींकडे पाठ फिरवली.. आमची खबर देखील घेतली नाही...
पण तिच्या बाबांनी जर वेळेत हे प्रकरण मिटवलं नसतं, तर....मी जर ही केस हरले असते तर ....  कल्पना सुध्दा करवत नाही...भानुप्रिया माझ्यासाठी कायमची दुरावली असती... पण त्याहीपेक्षा खूप भयंकर होऊ शकत होतं... तो माणूस आणि ते कुटुंब इतकं खतरनाक आहे, की त्यांनी तिच्याशी काय व्यवहार केला असता, तिचे काय हाल केले असते... ते काहीही करू शकत होते.... काहीही... माझ्यासाठी तर ह्या दुनियेत जगण्याचे काही प्रयोजनच उरले नसते... कारण अभिषेक पण आम्हा दोघींना सोडून गेला होता... आमच्या आयुष्यात जी पोकळी होती ती कधीच भरून  निघणारी नव्हती..पण हे दुःख पण थोडं बाजूला सारलं होतं आम्ही दोघींनी... ह्यानंतर कोणतीही आशा, कोणतेही सुख किंवा जगण्याची उमेद उरली नसती...
भानुप्रिया माझ्या जवळ परत आली आणि घर आनंदाने भरून निघालं! दहा दिवसात कुणी धडपणे जेवलं सुध्दा नव्हतं... पण आता सगळे खुश झाले आणि मी पुढे प्रवास सुरु केला तो एक महत्वाचा निर्णय घेऊन... पुन्हा आयुष्यात कधी तिला एकटी सोडून कुठेही जायचं नाही...आता मी तिच्यासाठी सर्व हाल, अवहेलना दुःख सोसून माझ्या घरात राहायचा निर्णय घेतला... घरात राहूनच माझ्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करीन, ते नाही जमलं तरी तिला एक उत्तम आयुष्य देण्याचा प्रयत्न करीन असं मनोमन ठरवलं आणि तिला घेऊन लखनौला गेले...
ह्या निर्णयात त्यांच्या चुलत बहिणीनी माझी खूप मदत केली. ती नंतर आली होती आमच्याकडे रहायला तेंव्हा म्हणाली होती. तिनं पण घटस्फोट घेऊन मुलाला आपल्याबरोबर अमेरिकेला नेलं होतं आणि तिचा हा मुलगा खरतर माझ्या ह्या कोर्ट प्रकरणातला महत्वाचा दुवा आहे... तो सुट्टीसाठी आला होता पुण्यात आणि त्या दिवशी ह्या धूर्त कावेबाज कुटुंबाकडे गेलेला होता.. तिथे त्याला भानुप्रिया भेटली होती. मी त्याला फोन केला सहज, तेंव्हा त्यानं भानुप्रिया लखनौला गेलेली नसून त्या घरात असल्याचं सांगितलं. मला धक्काच बसला हे ऐकून आणि काहीतरी अघटित घडणार असल्याची कुणकुण लागली... आणि मी कामाला लागले त्यानंतर हे सर्व रामायण घडलं... बरं, ह्या मुलानं मला काही सांगितलच नसतं तर? मी ह्या गैरसमजुतीत राहिले असते की भानुप्रिया लखनौला गेली आहे. ह्या गैरसमजुतीत मी गाफील राहिले असते तर? भानुप्रियाला काय आणि कसं कळणार होतं? तिनं माझ्या बद्दल काय समज करून घेतला असता? तिच्या मनात माझ्याबद्दल राग, द्वेष निर्माण झाला असता आणि त्याचा फायदा त्या मंडळींनी भरपूर घेतलाच असता... बाप रे... मनाचा थरकाप उडतो आजही...
नुकताच मी ह्या पुतण्याशी facebook वर संवाद साधला, आणि त्याला आठवण करून दिली ह्या सगळ्याची... पण तो १२वीत होतं तेंव्हा त्यामुळे फार काही आठवत नव्हते. पण मी मात्र त्याचे खूप खूप आभार मानले, कारण त्याने सांगितले नसते तर....
मी माझ्या घरी परतण्याचा ठाम निश्चय केला आणि आजपर्यंत त्या निश्चायावरून न डगमगता, आपल्या परीने अंन्याय सहन करीत आणि हळू हळू बदल घडवून आणत खंबीरपणे उभी आहे... भानुप्रियाला एक उत्तम माणूस आणि चांगला नागरिक म्हणून जडण घडण करायची, तिच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायची, तिच्या उत्कर्षासाठी, सर्वतोपरी सुखी आणि समृध्द   आयुष्यासाठी उत्तम शिक्षण देण्याची धडपड केली, सर्व लक्ष तिच्यावर केंद्रित केलं... पण माझ्या घरातल्या सर्व कर्तव्यांकडे कधीही डोळेझाक न करता...
मला वाटतं, आज मी हे सर्व साध्य केलं आहे... मी यशस्वी आहे! तिच्या बाबांसोबत संपूर्ण आयुष्य घालवलं, जिकडे गेले तिकडे घर संसार उभा केला.. माझ्याकडे जे काही काम येत गेलं, ते सर्व प्रामाणिकपणे, सर्व कौशल्य पणाला लाऊन, मनापासून केलं... कधीही चालढकल केली नाही, कर्तव्यात हलगर्जीपणा केला नाही. तत्परता, समयसूचकता, सावधानता बाळगून हरतऱ्हेने त्यांच्या कर्तव्य पालनात त्यांची साथ दिली... प्रत्येक भूमिका समरसून पार पाडली... आणि एवढ्या वर्षांच्या प्रवासात मिळालेल्या आनंदाने, कामाने आणि अनुभवाने मी स्वतःला समृध्द करीतच गेले! आजही माझी समस्या सुटलेली नाही, त्याचं उत्तर मला मिळालेलं नाही, त्याचं दुष्टचक्र अजूनही चालूच आहे, पण मला त्याची फिकीर नाही... सोडून दिलंय ते सगळं... कारण ह्या प्रश्नावर अविरत, अविश्रांत विचार करून, अनेक प्रकारे उपाय करून देखील काही फरक पडला नाही, मी ह्या बाबतीत हरले...सपशेल हरले...पण माझा अजूनही विश्वास आहे..’पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..’पण मी कधी दुःख करीत बसले नाही, आयुष्याबद्दल तक्रार करीत बसले नाही की सगळं संपल.. नाही... आयुष्यात आनंद घेण्यासारखं, जगण्याची उमेद देणारं, बरंच काही असतं... प्रत्येक क्षण जसा येतो, तसा त्याचा उपभोग घ्यायचा, आयुष्याचा तो हिस्सा जगायचा आणि पुढे व्हायचं! आणि हो...जगता जगता ह्या सुंदर आयुष्यासाठी प्रत्येक क्षणी भगवंताचे आभार मानते!!!
मी तेंव्हा हा निर्णय नसता घेतला, तर ही माझ्या आयुष्यातली मोठी घोडचूक असती हे नक्की... पण माझ्या भगवंतावरच्या संपूर्ण श्रद्धेने मला अनेकानेक संकटातून वाचवले आहे! त्यामुळे होत असलेला त्रास एकीकडे ठेऊन, मी आयुष्याला सामोरी जात होते... मी घर सोडून गेले असते, तर सर्वात जास्त नुकसान भानुप्रियाचे  झाले असते.. तिच्या वडिलांच्या आर्मीतील नोकरीमुळे मिळालेल्या समाजातील मान्यतेतून तिला मिळणारी सामाजिक, आर्थिक आणि व्यक्तिगत सुरक्षितता हरवून तिला अनेक प्रकारांनी मानहानी सोसावी लागली असतीच पण माझ्या सोबत नव्याने आयुष्य सुरु करतांना आणि प्रगती करतांना होणारी आर्थिक कुचंबणा तिची कोणतीही चुकी नसतांना मी तिच्या माथी का  मारावी? आमच्या ह्या समस्येचा तोडगा निघाला असता नसता, पण तिला मात्र तुटपुंज्या सोयीसुविधा आणि साधन सामग्रीच्या सहाय्याने आयुष्याची नव्यानं सुरुवात करावी लागली असती... शिवाय ह्या सगळ्यात तिचं मनोधैर्य आणि आत्मविश्वास कमी होऊन त्याचा अभ्यासावर विपरीत परिणाम झाला असता आणि तिच्यासारखी हुशार आणि उत्तम शैक्षणिक गुणवत्ता असणाऱ्या  मुलीच्या करिअरचे नुकसान झाले असते....
हा निर्णय न घेण्याची आणखीनही काही तितकीच महत्वाची कारणं होती... माझ्या ह्या निर्णयाचे पडसाद माझ्या बहिणीच्या आणि दोन्ही भावांच्या लग्नावर आणि चांगल्या स्थळांच्या अपेक्षांमध्ये विघ्न आली असती, कारण अशा घडामोडींबाबत विचारणा केल्याशिवाय समोरची मंडळी गप्प रहात नाहीत न? सुरुवातीला सर्वांनी मला पाठींबा दिला असताही, पण कालांतराने माणसांचे विचार, एकमेकांबाबतचे दृष्टीकोन बदलतात, त्यांच्या प्राथमिकता बदलतात... आणि वय वाढत गेले तर त्यांच्या लग्नातील अडचणींना आणि त्यांच्या दुर्दैवाला मला दोषी ठरवले असते.... आणि हे मला कधीच मान्य होणारं नव्हतं....पुन्हा, माझ्या आई बाबांचं तेंव्हा वय होतं हे आघात सहन करायचं आणि मला सर्वतोपरी आधार द्यायची धमक त्यांच्यात होती... हे जरी खरं असलं, तरी ते माझी किती काळ देखभाल करू शकणार होते? एकदा त्यांचे वय झाले, ते शारीरिकरित्या दुर्बल आणि मानसिक रित्या अस्थिर झाल्यावर त्यांना माझ्या भविष्याची चिंता आणि घरघर लागलीच असती ना? त्यातून त्यांना खूप मनःस्ताप आणि दुःख झालं असतं.... त्यांनी कधी बोलून दाखवलं नसतं तरी त्यांना हे दुःख त्यांच्या आयुष्याच्या अंतापर्यंत उराशी बाळगावं लागलं असतं...आणि माझ्या एका हट्टापायी झालेल्या ह्या सगळ्या अनर्थाला मी स्वतः जबाबदार रहाणार होते....ह्या दुर्दैवी घटनेचे दूरगामी परिणाम आमच्या संपूर्ण परिवारावर झाले असते... आजच्या सारखे हसते-खेळते घर कधीच नसते.... “सर्वकाही सोडून निघून जाण्यासाठी अनेकानेक कारणे असली, तरी थांबण्यासाठी अगदी एखादेच कारण पुरेसे असते”  आणि इथे माझ्याकडे बरीच होती... त्यामुळे विचारांती मी निर्णय मागे घेतला, पाऊल मागे घेऊन परत घरी गेले...माझ्या ताकदीत जे जे असेल ते ते करून माझ्या वैवाहिक आयुष्यातल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार .... आणि हे जरी नाही झाले तरी भानूप्रियाचे आयुष्य उत्तमरीत्या घडवायचेच हे ठामपणे ठरवूनच.... ज्यामुळे तिला मी घेतलेल्या निर्णयाचा अभिमान वाटेल आणि माझी मेहनत आणि सोसलेल्या कष्टांचे चीज होईल! आज भानुप्रियाला तिच्यासाठी ढाल बनून उभ्या असलेल्या तिच्या आईचा तिला अभिमान आहे...  तिला लाभलेले उत्तम आयुष्य हे त्याच समर्पणाचे फलित आहे... जे जे शक्य होतं ते ते मी तिला देण्याचा  प्रयत्न केलेला आहे... चांगले शिक्षण, संस्कार, उत्तम विचारांची शिदोरी, मानसिक आणि भावनिक संतुलन, सर्व लाड पुरवले, हवं-नको पाहिलं, आणि मुख्य म्हणजे सर्वतोपरी प्रेम दिलं, आत्मविश्वास दिला की भल्या बुऱ्या, चांगल्या वाईट सर्व वेळी मी तुझ्या पाठीशी आहे.. वळून बघशील जेंव्हा... मी असेन तिथे तेंव्हा... तू भरारी घेत रहा... मी तुझ्याकडे लक्ष ठेऊन राहीन... आणि ह्याचे तिला भान आहे हि कौतुकाची बाब आहे माझ्यासाठी... तिला माझ्या वैयक्तिक समस्येत माझी कोणतीच मदत करू शकत नाही ह्याची खंत आहे, पण ती  माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हि भावनाच कितीतरी बळ देऊन जाते ! मला इतकं सगळं, इतकी वर्ष सहजपणे झेलण्याची शक्ति आणि साहस दिल्याबद्दल मी देवाचे नेहमीच आभार मानते!
असं म्हणतात की देव प्रत्येकाला तेवढेच ओझे देतो, जेवढे त्याची पेलायची ताकद असते! तो प्रश्नपत्रिका पाठवतच असतो... एका पाठोपाठ एक... आपण त्याची आराधना करून, त्याचे आशीर्वाद घेऊन प्रश्न सोडवत रहायचं असतं... अचूक उत्तराचे बक्षीस मिळते आणि आनंद होतो... पण काही प्रश्नांची मुळी उत्तरंच  माहित नसतात...आमच्या अभिषेकची सोबत तुटली तो असाच एक प्रश्न...इतका निष्पाप कोवळा जीव.... एक वर्ष सोबत केली पण किती आनंद देऊन गेला! जेंव्हा त्याच्या पहिल्या वाढदिवसानंतर  त्याला २१ दिवसांसाठी श्रीनगरला घेऊन गेले होते तेंव्हा स्वप्न पडलं होतं का पुढे काय वाढून ठेवलंय? तिकडच्या थंडीचा विचार केला तर मी त्याला तिकडे न्यायला तयार नव्हते..पण त्याच्या बाबांनी काही ऐकलं नाही, आणि आमच्या निघण्याची तयारी झाली, पण... त्याला तिकडे सर्दी बाधली, bronchitis झाला.... पण मुलगा धीट बरं, घरी येईपर्यंत दम धरला... दुसऱ्या दिवशी दुपारी आई आणि मी त्याला घेऊन डॉक्टरकडे गेलो, आणि त्यांनी खूप वेळ तपासून, औषधं दिली. आणि दुसऱ्या क्षणाला, त्यानं माझ्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला ... मन बधीर झालं होतं, काहीच सुचत नव्हतं.... त्राणच गेले अंगातले... आई त्याला घेऊन ICU मध्ये गेली....  पण नाही वाचवू शकले मी अभिषेकला... एवढ होऊन मला दोषी ठरवलंय त्याच्या बाबांनी... काय म्हणायचं? अशा अनेक जखमा दिलेल्या आहेत मला... लहान, मोठ्या...मानसिक आघात...  शिवाय रागाच्या भरात  शारीरिक इजा पोहोचवणे आहेच... परत त्याला होणाऱ्या त्रासाला माझ्या घरच्या सर्व मंडळींना दोषी ठरवायचं सत्र अव्याहत आजतागायत चालूच आहे..  पण ही एक प्रकारची विकृती आहे आणि त्याची मुळ त्याच्या गतआयुष्यातील कुठल्यातरी वाईट प्रसंगात आहे असे नेहमी वाटते... माणूस मोकळेपणे बोलला, तर अनेक गोष्टींचा उलगडा होतो, प्रश्न देखील सुटतात, पण हा माणूस एकटा आहे...मानसिक आणि भावनिक रित्या एकटा ... मनातलं कधीच, कुणालाच सांगणार नाही....फक्त  सगळ्याचं खापर माझ्यावर फोडून आपली कमतरता लपवणे चालू आहे.. आणि चालू राहणार...
असो... तर अभिषेकचं दुःख मी कसतरी पचवलं, पण भानुप्रियाला काय आणि कसं सांगायचं?ती जेमतेम ५ वर्षांची होती तेंव्हा.... पण तिनं १ वर्षापूर्वीच सुमाचा दुखद अंत बघितला होतं.. तेंव्हाही तिला काही कळलं होतं, की नाही, माहित नाही... पण ह्यावेळी बहुधा तिला थोडं कळलं असावं... आपल्या जवळच्या व्यक्तीचं असं हरवणं तिला लहान वयातच उमगलं होतं...
म्हणून  मी नेहमी म्हणते त्या भगवंताला प्रश्न विचारायचे नाहीत, ’मीच का?’’मलाच का?’ माझ्याच वाटेला हे का?’ असे विचारायचे नाही...नाहीतर तो आणखीन कठीण प्रश्नपत्रिका पाठवतो...
ह्या सर्व घटनांकडे वळून पहाते, तेंव्हा लक्षात येतं, की हे एवढं सगळं सोसण्याची हिम्मत मला आई बाबांकडूनच मिळाली आहे! मृदुभाषी, कणखर, वास्तववादी आणि उत्तम संस्कारांनी युक्त अशी  व्यक्तिमत्व आहेत ही दोघं.... हे सर्व गुण त्यांना त्यांच्या आईवडीलांकडून वारसाहक्काने आलेले आहेत, आणि आपण सर्वांनी तेच संस्कार पुढे न्यावेत हेच संयुक्तिक ठरेल! हे दोघे माझ्या मागे इतकी वर्ष खंबीरपणे उभे आहेत...
माई आणि दादांनी आम्हाला आपल्या वागण्याबोलण्यातूनच  बरेच काही शिकवले... दादा खूप बुद्धिमान होते, मोठ्या हुद्यावर नोकरी करणारे, अतिशय साधे पण काटेकोरपणा, नीटनेटकेपणा, स्वयंशिस्त आणि तत्वांबद्दल आग्रही असणारे एकनिष्ठ व्यक्ती होते... ह्या अनेक गोष्टींचा तेंव्हा कधी कधी जाच वाटायचा, पण पुढच्या आयुष्यात ह्याच गोष्टींमुळे फायदा झालेला आहे हे हि नक्की! आई आणि बाबांना शतशः प्रणाम आणि धन्यवाद!!! दोन्ही आजी खूप प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या होत्या... शिवाय अन्नपूर्णा होत्या... त्यांच्यामुळे आमचे बाळपण हे एखाद्या परीकथेसारखे वाटते!!  आजोबा म्हणजे ‘अण्णा’ त्यांचा लाकडी वस्तूंचा कारखाना होता, ते पण मृदुभाषी, प्रेमळ, आचार विचारांत दातृत्व भरलेलं, मध्यमवर्गीय तत्वांवर ठामपणे जगलेले होते...आमच्या आईच्या तोंडून त्याचं वर्णन ऐकून हे त्याचं चरित्र डोळ्यांसमोर उभं रहातं! त्यांच्या पाठीमागे विमला आजी हा आघात अगदी कमी वयात सहन करून, खंबीरपणे उभी राहिली.. मुलीचं लग्न करून तिला आपल्या घरी आनंदात गेलेली पाहून समाधानी झालीच, पण तिन्ही मुलांचं संगोपन करून, त्यांना जीवनात एक भक्कम पाया देऊन स्वावलंबी बनवलं... आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर अतिशय हिमतीने आणि निग्रहाने आणि स्वतःवरच्या विश्वासाने सर्व लहान मोठे निर्णय घेत संपूर्ण कुटुंब उभं केलं... तो जमाना पाहता, ही आजी म्हणजे आजकाल उदोउदो होत असलेल्या ‘स्त्रीशक्तीचा’ जागर आहे!!! आमच्या आईनं हे सर्व गुण आत्मसात केले होते, आणि त्याच हिमतीने स्वतःच्या कुटुंबाचा डोलारा समर्थपणे पेलला आहे!!! माई वेगळ्या होत्या... त्यांना कधी फारसं घरकाम करावं लागलं नाही... वरकामासाठी एक गडी ऑफिसमधून यायचा... स्वयंपाकासाठी त्याकाळी त्यांच्या घरी ब्राह्मणाच्या बाई होत्या असे बाबा सांगतात... त्यामुळे सुखवस्तू होत्या, शांत, मजेत आणि आपल्या तालात राहणाऱ्या होत्या... पण त्यांनी देखील सगळ्या मुलींचं व्यवस्थित करून, आपली सर्व कर्तव्य उत्तमरीत्या पार पडली होती हे नक्की!! माझे व्यक्तिमत्व घडवण्यात आमच्या मोठ्या कुटुंबातील अनेक मंडळींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लागलेला आहे... यादी खूप मोठी होईल, पण सर्वांकडून काही ना काही घेतलंय,कळत नकळत  आत्मसात केलंय... त्याचा आयुष्यात उपयोग झालाय...
माझी शाळा... पुण्याची St. Mira’s  school.. माझे व्यक्तिमत्व घडण्यात ह्या शाळेचा आणि पुढे ज्या ज्या शाळेत गेले, त्या सर्व शाळांचा खूप मोठा वाटा आहे! ह्या शाळेचे संस्थापक श्री. दादा वासवानी आणि आमच्यावेळी असलेले श्री. जे.पी. वासवानी, ज्यांचे नुकतेच निधन झाले, ह्यांनी त्यांच्या लेखनातून एक मोठा खजिना आमच्या हाती दिला आहे असे म्हणणे योग्य होईल...भूतदया, सर्वांना सहानुभूतीने आणि प्रेमाने वागवणे, सदैव मदतीला धावून जाणे, परोपकारातून आपले आत्मिक समाधान वाढवणे, चांगली वागणूक ठेवणे ... असे अनेक पैलू आहेत ज्यांचे माझ्या आयुष्यात पडसाद उमटतांना दिसतात... मला प्राणी विशेषतः कुत्री आणि घोडे फार आवडतात. घोड्यांशी एवढी ओळख होण्याचा मोका नाही मिळाला, पण डॉग्स हा माझा weakpoint आहे!! आजूबाजूच्या भटक्या कुत्र्यांना माझ्या कुवतीप्रमाणे खायला घालायला आवडतं... त्यांच्याशी गप्पा मारते तर खूप मजा वाटते! आतापर्यंत दोन तीन मेलेल्या पिल्लांना रस्त्यावरून उचलून त्यांचे योग्य तऱ्हेने दफन देखील केले आहे... आपलं प्रेम प्राण्यांना कळतं, आणि इतर प्राणी देखील आपल्याला इजा करीत नाहीत, कारण आपल्या अंगाला प्राण्यांचा वास येतो तो वास ते ओळखतात.. आपल्या निर्भेळ आणि निर्व्याज मनाने केलेल्या सेवेचं मोल ते खूप प्रेम देऊन करतात आणि त्यांचे आशिर्वाद आपल्याला मिळतात...
गरजू माणसाला शक्य होईल तेंव्हा, तितकी, तशी आणि त्याची जास्तीत जास्त गरज भागेल अशी   मदत मी नेहमी करण्याचा प्रयत्न करीत असते. दान हे ‘सत्पात्री’ असावं असं बाबा नेहमी म्हणतात, त्याप्रमाणे, मी माझ्याकडच्या घरातल्या, माझ्यासाठी निरुपयोगी पण चांगल्या उपयोगात येऊ शकणाऱ्या वस्तुंच दान करून टाकते.. निर्मळ मनाने त्या वस्तूंनी दिलेल्या आनंदासाठी त्यांचे आभार मानून, विचारपूर्वक दान करून टाकायच्या... पण द्यायचं अशांना ज्यांची गरज तर भागेलच पण ती वस्तू  मिळाल्याचे मोल आणि जाण राहील.... अशाने घरातील अडगळ कमी करून आपला परिसर मोकळा, स्वच्छ, आणि सुंदर ठेवण्याचा माझा संकल्प पूर्ण होतोच, शिवाय नवीन वस्तूंसाठी पर्यायाने  नवीन खरेदीसाठी मार्ग मोकळा होतो! आणि योग्य विनियोग केल्याचे खरे आत्मिक समाधान मिळते! तसेच मला मनात, हृदयात, आणि डोक्यात नकारात्मक, वाईट, क्लेशकारक आणि दुःख देणाऱ्या अनावश्यक विचारांची आणि भावभावनांची अडगळ ठेवायला आवडत नाही.. अनावश्यक द्वेष, मत्सर, डूख धरणे, मनात अढी धरणे वगैरे... ह्यांनी आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो...  त्यानं आपल्यातल्या सकारत्मक उर्जेचा ऱ्हास होतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात...आपल्याला आनंदी, उत्साही, तणावमुक्त आणि चिंतामुक्त रहायचे असेल, तर हे ‘decluttering’ करणे फार आवश्यक आहे!
दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि थोडे दयाळू पण राहता येणे आवश्यक आहे. पण असे करतांना मी स्पष्ट बोलणे सोडू शकत नाही... नितळ विचार करून, कोणतेही आढेवेढे न घेता, सहमत  नसलेल्या विचारांचे समर्थन न करता स्पष्टपणे आपले विचार सांगते... म्हणजे प्रयत्न तर नेहमी करते, पण हे सांगणं जितकं सोपं, तितकंच आचरणात आणणे मुश्कील... कारण आयुष्यात बऱ्याच वेळा काही तडजोडी कराव्याच लागतात... सुखी आयुष्य जगण्यासाठी बऱ्याच वेळा जुळवून घ्यावं लागतं.... मला हे जमत नाही बऱ्याचदा... पण करते प्रयत्न....
मथुरेहून पुण्यात आल्यावर शाळेत माझी परीक्षा घेतली, मला चांगले मार्क पडले म्हणून पहिलीत न घेता मला दुसरीत admission मिळाली. कर्वे रोडच्या घरून २ बसनं जा-ये करून मी धीट, स्वावलंबी आणि निर्भीड झाले, पण त्याच बरोबर मी सावधपणे आणि सुरक्षितपणे वावरायला शिकले. (ह्या सर्वांचा फायदा मला ऑस्ट्रेलियाला गेले तेंव्हा खूप जाणवला!) ह्या गोष्टींचा फायदा बाबांसोबत पुढे पोस्टिंगच्या ठिकाणी राहिलो तेंव्हा झाला...
त्रिचीला पोस्टिंग झाल्यावर मी आणखीन एका उत्तम दर्जेदार शाळेत म्हणजे  RSK high school मध्ये ९वी आणि १०वी केली. अभ्यास,खेळ आणि इतर विविध गुणांच्या विकासाकडे घरी आणि शाळेत समान महत्व दिलं जायचं. लगोरी, हुतुतू, विटीदांडू, लपाछपी सारखे खेळ मी भरपूर खेळलेच, पण ह्या शाळेत मला व्हॉलीबॉल, बास्केटबॉल सारख्या खेळांसोबतच बेसबॉल सारखा नवीन खेळ खूप खेळायला मिळाला!! शिवाय हायजंप, long जंप, जावेलीन थ्रो, डिस्कस थ्रो, रीले, रनिंग वगैरे खेळांचा रोमांच अनुभवायला मिळाले! शाळेची बस सुटायच्या आधी आम्हाला १ तास ग्राउंडवर खेळणं बंधनकारक होतं! मला तो तास खूप आवडायचा तेंव्हा! त्यानंतर पुन्हा हे मैदानी खेळ खेळायला नाही मिळाले ह्याचा खूप खेद वाटतो.. पण ठीक आहे... टेबलटेनिस खेळायला मिळतं कधी कधी... पण खेळांत रमल्यामुळे अंगात सहनशक्ती, धमक, आणि एक स्पर्धात्मक वृत्ती अंगी रुजते, काही मिळवण्याची शारीरिक आणि मानसिक कुवत येते हे नाकारता येणार नाही.. खिलाडूवृत्ती थोडीफार अंगी बाणली ती ह्यामुळे कदाचित...जिंकल्याचा अभिमान असावा आणि तेवढ्याच नम्रपणे हार स्वीकारावी, मनी कटुता नसावी... हे सगळं जरी खरं असलं, तरी मला टीम मध्ये राहून काम करणे फारसे जमत नाही... त्याचं कारण असं, की मी माझे काम एकदम प्रामाणिकपणे करते, पण तसेच सहकार्य सर्वांकडून मिळत नाही, आणि मग मला मनःस्ताप होतो... खेदाने मानावेच लागते की अशा घटना माझ्यासोबत घडतच रहातात, आणि मी आजपर्यंत त्यांचा सक्षमपणे मुकाबला नाही करू शकलेले.... उत्तम आराखडा, उत्तम नियोजन, आणि अतिशय प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याचा मानस असून देखील, शिष्टाईची कमतरता, आणि  गोड बोलून, गोड शब्दात टोमणे मारून किंवा आडून वार करून दुसऱ्यांकडून काम करून घेता येण्याची हातोटी नसल्यामुळे मला टीम मध्ये काम करणे अवघड जाते. माझ्याकडे सुपूर्द केलेले काम मी उत्तमरित्या पार पडू शकते आणि त्याचे कौतुकही होऊ शकते!!
वेळोवेळी बदलणाऱ्या परिस्थिती मला चलबिचल करू शकत नाहीत, कारण मला प्रत्येक कामाचे परिपूर्ण नियोजन आणि नेटकी अंमलबजावणी करायची सवय पडली आहे. त्यासाठी नेहमी प्लान A, प्लान B आणि जमलं तर प्लान C देखील डोक्यात तयार हवा...एवढ्या वर्षांतल्या अनुभवांतून छोटी मोठी आव्हानं पेलतांना मिळालेल्या अनुभवांतून काहीतरी रोज शिकत गेले... कधी कधी अपयश येतं, पण चिंतनशील राहून जलद विचारांची चाकं धावती ठेवावी लागतात.. आणि पुन्हा यश प्राप्त करावं लागतं... ह्यासाठी सुदृढ शरीर आणि मन असणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य उत्तम असेल तर शारीरिक कमतरतेवर मात करून यश मिळवता येतं!!
ऐकायला जरा चमत्कारिक वाटेल, आणि ते पण माझ्याकडून... पण मी बरेच वेळा हे करते म्हणून सांगता येतंय... म्हणजे तसं सगळेच जण करत असतात म्हणा... कोणतीही वाईट अथवा प्रतिकूल  परिस्थिती आली, किंवा अडचणीत टाकणारी माणसं भेटली किंवा तापदायक घटना घडली तर सर्व प्रथम त्य परिस्थितीकडे, घटनेकडे किंवा माणसांकडे सहानुभूतीने पहा...त्यांच्यावर लगेचच राग व्यक्त करू नका, उपरोधात्मक बोलू नका, टोमणे मारून अपमान करू नका... जितकी तापदायक घटना, परिस्थिती किंवा माणसं... तितकं जास्त शांत डोक्यानं विचार करा, विषयवस्तू समजून घ्या आणि मग योग्य निर्णय घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करून गोष्टी अनुकूल करून घ्या....एका वाईट घटनेतून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो नाही? पण हे सगळं म्हणणं जितकं सोपं तितकं प्रत्यक्षात करणं कठीण... पण अपयशापेक्षा आपलं यशाचं पारडं जड असलं पाहिजे मग झालं... त्यासाठी आपला अहंकार बाजूला ठेऊन, किंवा अहंकार नकोच... त्या परिस्थितीला निम्म्या वाटेत जाऊन भेटलं तर समस्या लवकर सुटते असा माझा अनुभव आहे... पण काही ठिकाणी कोणतीच मात्रा लागू पडतच नाही.... काय करणार? अहंकार कधी दाखवायचा आणि कधी नाही ते आपणच ठरवायचं...
चिंता, विवंचना, समस्या ह्या येतच राहणार... आपल्या अंतापर्यंत... पण आयुष्यात अनावश्यक ताण चिंता न करता, सुखासमाधानाने जगायचं असेल तर एक करता येईल.... आपल्या मनाचे अनेकानेक कप्पे करून त्यात प्रत्येक गोष्टीसाठी..विषय, माणूस, समस्या, नाती आणि इतरही सर्व इश्युज... वेगळा कप्पा करून ठेवायचा.. compartmentalisation....बँक लॉकरसारखं...
जेंव्हा समस्या उभी रहाते, तेंव्हा त्या कप्प्यात जायचं, तिथे ती समस्या सोडवण्यासाठी लागणारी उपाययोजना शोधायची, सर्व आवश्यक गोष्टींची जमवाजमव करायची आणि मग बुद्धी, मन आणि हृदयाच्या निकषांवर तावून सुलाखून निर्णय घ्यायचा...कायदा, नैतिकता, तर्क वितर्क, आचारसंहिता आणि विचारमंथन होत असतांना इतर अनेक विचारप्रवाहांचा निकोप दृष्टीने आणि मोकळ्या मनाने आदर ठेवून विचार केला तर कमीतकमी अन्याय होऊन सर्वोत्तम निर्णय घेता येतो...‘वडाचं तेल वांग्यावर न काढता, आणि ‘मीच बरोबर’ हा घातक दृष्टीकोन न ठेवता निर्णय घ्यावा... अर्थात एका कप्प्यात जर आनंद असेल तर तो मात्र दुसऱ्या कप्प्यांत जरूर पसरू द्यावा!
ह्या compartment पध्दतीनं काम केलं तर एकाच वेळी अनेक कामं करता येतात, नियोजन, आणि सिध्दता करता येते. मग आपल्याकडे आपल्या मनोरंजनासाठी, विरंगुळ्यासाठी वेळ उरतो हे नक्की! आपलं जीवनमान उंचावण्यासाठी अशी विचारधारा अमलात आणणं फार जरुरीचं आहे.
तर वाड्यात असतांना आम्हाला अभ्यास आणि खेळ ह्यावर समसमान वेळ देण्याचा कायदाच होता जणू... दुपारी झोपा काढणं, लोळत पडणं वर्ज्य होतं. शहा बिल्डींग मध्ये मैदानी खेळ खेळलेच, पण मजामस्ती पण खूप केली! हजर नसलेल्या मुलांच्या घरची बेल मारून पसार व्हायचं, लपाछपी खेळतांना एकमेकांच्या कपड्यांची अदलाबदल करून ज्याच्यावर राज्य आहे त्याला बेजार करायचं...एक ना अनेक खोड्या! पण मिळून मिसळून खेळलेली ‘भातुकली’ कधीच विसरणार नाही! भांडीकुंडी मांडून सर्व काही सज्ज करायचं, आणि घर-घर खेळायचं... भांडी छोटी पण मजा खूप मोठी! मुलगे पण कधीतरी यायचे आमच्यात...मग त्यांना वडिलांचे पार्ट मिळायचे.. म्हणजे ते बाहेर कामाला गेलेत (म्हणजे तिकडे ते लोकं काहीतरी खेळत असायचे!) आणि नंतर फक्त जेवायला घरी येणार!  आपल्या आयांचे अनुकरण करीत सर्व मुली स्वयंपाक करायच्या, आणि मग जेवण झालं की सगळं आवरून, चट्टामट्टा करून घरी जायच्या! आणि हो.. कधी कधी छोटी मुलं पण असायची आमच्यात.. मग त्यांना आमच्यातल्याच एकदोघी जणी सांभाळणार! त्यांच्याशी खेळायचं,गाणी म्हणायची, त्यांना भरवायचं, ऐकलं नाही की रागवायचं...मजा! कधी कधी आजी आजोबा पण यायचे आमच्यात खेळायला! मग त्यांना आम्ही खऱ्या आजी आजोबां सारखच वागायला लावायचो! मग तर आणखीन मजा यायची कारण हे आजी आजोबा सोबत खुपसारा खाऊ पण आणायचे ना!! नवरा नवरीचं लग्न पण लागायचं! खूप धमाल यायची!!! ह्या भातुकलीतून खरंतर खुपकाही शिकायला मिळालं...घर परिवार आणि आपापली भूमिका चोख कशी बजावायची ह्याचं प्रशिक्षण तिथे मिळतं!
पण जग बदलत गेलं,जमाने बदलले, नव्या नव्या गोष्टींची ओळख झाली... पिढी बदलली, तशी भातुकलीचं स्वरूप बदललं! आता भानुप्रियासोबत ह्या भातुकलीचा बाजच बदलला! जुन्या बाहुल्या, बाहुले आणि कापडी बाळं गेली आणि नव्या जमान्याच्या  ‘smart ‘barbie’ आल्या आणि लहान मुलींचं खेळाचं जगच बदललं!! आता ह्या अनेक ढंगात, रंगात, नव्या fashionable कपड्यांनी, आभूषणांनी नटलेल्या सजलेल्या, zero size चा नवा आदर्श मुलींसमोर घालून जुन्या अघळपघळ पेहरावांना कालबाद करू पाहणाऱ्या इटुकल्या पिटुकल्या पण अत्यंत महागड्या बाहुल्या बाजारात आल्या आणि आयांनी स्वतः बरोबरच आपापल्या मुलींना ह्या विश्वात अलगद नेऊन सोडलं... आणि स्वतः पण तिथेच रमल्या... बरं ह्या बाहुल्या एकट्या नाही आल्या, तर सोबत पाश्चिमात्य संस्कृतीचा संपूर्ण डोलारा घेऊन आल्या... बेड, सोफासेट, बाथरूम, बाथटब, ड्रेसिंग टेबल, फ्रीज, छोटी कपाट, पंखे, छोट्या आधुनिक पध्दतीच्या भांड्यांनी सज्ज छोटसं किचनेट...एक न अनेक... आणि बघता बघता जुन्या, बाळबोध भातुकलीची जागा हळूहळू ह्या नव्या पाहुण्यांनी काबीज केली!! आमच्याकडे असलेल्या इतर खेळण्यांची ह्या संसारात भर पडली आणि नवीन संकल्पनेतली भातुकली सुरु झाली... ह्या भातुकलीची भुरळ इतरांसारखी मलाही पडली!! घरातली एक केनची बास्केट होती ती ह्या बार्बीसाठी कार म्हणून सज्ज केली गेली! छोटं बाळ होतं त्याला बाळाचा रोल देण्यात आला! छोटीशी लेदरची bag होती त्यात त्यांचे छोटे छोटे ड्रेस आणि इतर वस्तू pack करून त्या कारमधून फिरायला जातात! हे सगळं अगदी खऱ्यासारखं चालायचं आणि वाटायचं! खूप मजा यायची... आठवलं तरी मी मनाने हरवून जाते... पुस्तकं ठेऊन drawing room, kitchen, bedroom, bathroom अशा सर्व  खोल्या तयार करून मग खेळाला रंगत यायची! सगळ्यात जुनी जी बार्बी होती तिचे पाय मोडले होते, त्यामुळे तिला ‘आजी’ म्हणून एका खुर्चीत ठेवून दिले होते! ह्यालाच मी म्हणते काळा सोबत बदलत जाणे... कारण आमच्या काळी अशा वेगळ्या खोल्यांची संकल्पना नव्हती... पण भानुप्रिया ज्या पध्दतीत मोठी होत होती, त्यात हे सर्व नॉर्मल मानलं जातं होतं!! तिच्यावर झालेल्या पाश्चात्य लेखन, वाचन  संस्कृतीचे थोडे पडसाद तिच्या खेळातून दिसत असत.... असो, भातुकलीचं स्वरूप बदललं, पण मुलींची स्वप्ने, त्यांच्या कल्पना आणि त्यांचा आनंद तोच राहिला!!!
आता आम्हाला ह्या बार्बींसाठी कपडे कमी पडू लागले...त्यांचे जीवनमान अतिशय उंची असल्यामुळे!! माझ्या वेळी कपडे एकुणात फक्त चार कपडे मिळायचे... आता कपड्यांची गिनतीच नसते मुळी! (आई तर म्हणते त्यांच्या कडे तर दोनच साड्या असायच्या वर्षाकाठी!!!) मग आई आमच्याकडे रहायला आली की त्या बार्बींचे माप(????) घेऊन त्यांच्यासाठी छान छान कपडे शिवले जायचे! उन्हाळ्याचे सुती आणि थंडीचे लोकरीचे कपडे! (मला तर हेवाच वाटायचा ह्या इटुकल्या बाहुल्यांचा!) आणि हे कपडे इमाने इतबारे ऋतूंप्रमाणे बदलले जायचे बरं! तर एकदा भानुप्रिया मला म्हणाली तू का नाही माझ्या बाहुल्यांचे कपडे शिवत? अरे देवा.... मला घामच फुटला ना... मी आणि शिवणकाम?? बापरे! ती म्हणाली ‘तुला आजीसारखे कपडे शिवताच येणार नाहीत मुळी!’ झालं... challenge? मग माझ्या शिवणकामाचे सर्व कसब पणाला लावून मी हे आव्हान पेलायचं ठरवलं! (शाळेतली गोष्ट आहे... मी अभ्यासात हुशार होते नेहमी पहिल्या बाकावर बसायचे... पण चित्रकला आणि शिवणाच्या वर्गाला मात्र माझी बोबडी वळायची, आणि मी हळूच सगळ्यात मागच्या बाकावर जाऊन बसायचे! दोन्हीतलं माझं कसब माशाल्लाह होतं!) मोठ्या हिकमतीने, कष्टाने आणि नेटाने मी दोनचार कपडे शिवालेच! कारण न भिडताच, लढाई न करताच युध्दभूमीतून माघार घेणं माझ्या तत्वात बसत नाही... हरलं तरी लढल्याचं समाधान मिळालं पाहिजे, नाही का? आईच्या शिलाईची सर नाही आली, पण आव्हान स्वीकारून पूर्ण केल्याचं समाधान आणि आनंद खूप होता! आजसुद्धा त्या कपड्यांची आठवण झाली की हसू येते! त्या आठवणी काल घडल्यासारख्या आनंद देतात! पण माझी ह्या दोन्ही विषयातली कमतरता भानुप्रियानं मात्र भरून काढली! खास करून तिला चित्रकलेच्या distance course ला घालून तिची कला चांगलीच जोपासली गेली आणि हा माझ्यासाठी समाधानाचा विषय आहे! अरे हो... तिला मी जादूच्या क्लासला देखील घातले होते! उन्हाळ्याच्या सुट्टीत असे अनेक उद्योग तिच्याकडून मी करून घेतले... वेळेचा सदुपयोग, कौशल्य विकास आणि ज्ञानात भर! SNDT कॉलेजमध्ये नोकरी करीत असतांना मी अनेक छोटेमोठे कोर्स केले जसे पुष्प रचना, सिरामिक पेंटिंग,रांगोळी वगैरे वगैरे... हे मला येणाऱ्या आर्मीमधल्या काळात उपयोगी पडणार म्हणून मी शिकले, पण नाहीतर ह्या असल्या विषयांत माझी फारशी गती नाहीच मुळी... आणि हे सर्व नंतर उपयोगी पडले... तर ह्यातलं देखील तिला थोडं थोडं मी शिकवून दिलं!  ह्यातूनच एक परिपूर्ण व्यक्तिमत्व साकारायला मदत होते...
भानुप्रियाची चित्रकला खरच छान आहे! माझी चित्रकला म्हणाल तर ऐकून गम्मत वाटेल... चित्रकलेच्या वर्गात सुरुवातीला एक अगदी पांढरा शुभ्र, स्वच्छ, कोरा करकरीत आणि मोहक कागद मिळायचा... बघताच क्षणी प्रेमात पडावं असा... आपल्यातल्या चित्रकाराला (म्हणजे आपल्यात चित्रकार असेल तर हं...) साद घालणारा.... ( मला चित्रकलेच्या वर्गात आवडणारी एकमेव गोष्ट म्हणजे हा सुरुवातीला मिळणारा कागद...) त्यावर चित्र काढून होईपर्यंत त्या कागदाचे पानिपत झालेले असायचे! खरंच! खोडरबराचे शत शत आघात सोसून अनेकानेक छिद्र पडून  काळा कुळकुळीत पडलेला तो कागद माझ्या खिलाडू वृत्तीचे आणि  झुंजार आणि लढवैय्या व्यक्तिमत्वाचे दर्शन मला घडवून देत असे! ह्या संपूर्ण युध्दभूमीवर ताठ मानेने आणि सुरक्षित उभे असायचे ते वरच्या कोपऱ्यातले माझे नाव!! जे वाचल्यानंतर आमच्या चित्रकलेच्या बाईंना दुसरे काहीच बघायची गरज उरायची नाही!!!
मला कप बशी छान काढता यायची.... एक चित्र मात्र मला आजही फार आवडतं... म्हणजे माझ्या त्या आविष्काराला ‘चित्र’ म्हणण्याचे धाडस केलेच तर... एक साधं घर, त्याला खिडकी, दरवाजा, घरासमोरून वाहणारा ओढा, आणि घराच्या मागे डोंगरांच्या रांगेतून उगवणारा किंवा मावळणारा (???म्हणजे बघणाऱ्यानेच ठरवायचे!) सूर्य, काही उडणारे पक्षी, आणि काही झाडं... ह्याशिवाय मला box, कपाट वगैरे शुल्लक गोष्टी काढायला जमायच्या बरं... पण मला धडकी भरायची ते एका विषयाने...’गावचा बाजार’....हे शब्द फळ्यावर दिसले रे दिसले, की माझे पाय लटपटायला लागायचे, बोबडी वळायची, घाम फुटायचा.... खरंच... म्हणजे मला बाजारात जायला फार आवडतं, पण बाजाराचं, तिथल्या माणसांचं वेगवेळ्या पोसिशनमधल्या माणसांची कल्पना करण वेगळं आणि ते चित्र काढायचं म्हणजे....ह्याच्या आधी आणि ह्यानंतर मी कशालाच कधीही घाबरलेले नाहीये! चित्रकलेच्या आणखीन एका प्रकारानं मला पूरतं भेडसावलं ते म्हणजे ‘free hand drawing’... दिलेला पांढरा स्वच्छ कागद उभा, मधोमध फोल्ड करायचा इथपर्यंत ठीक असायचं... मग आमच्या टीचर उजव्या हाताचं एक डिझाईन द्यायच्या ते पण उत्तम रेखाटलं जायचं... पण मेख तर पुढेच होती.... हेच डिझाईन डाव्या बाजूला काढायचं...जसं च्या तसं... हुबेहूब प्रतिकृती दिसली पाहिजे... मग काय? पुन्हःश्च हरिओम! अपरिमित कष्ट आणि किलोच्या मापांत खोडरबर झिजवल्यावर (शाळेतल्या माझ्या एकूण खोड रबराच्या वापरातला ९० टक्के रबर हा ह्याच वर्गात झिजलेला आहे!) माझी प्रतिकृती तयार व्हायची पण कागदाच्या डाव्या हाताकडे नेहमीप्रमाणे पानिपत झालेलं असायचं... पण त्याला प्रतिकृती म्हणण्याचं धाडस आमच्या बाई तरी नाही करायच्या...आणि तासाची घंटा वाजेपर्यंत अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करून जेंव्हा तो कागद मी बाईंच्या पुढ धरायची, तेंव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव मला अजूनपर्यंत कळलेले नाहीत... म्हणजे त्यात माझ्यासाठी दया होती, राग होता, असहाय्य अगतिकता होती, का त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि शिकवणीला खुल्लं आव्हान देणाऱ्या यःकिंचित विद्यार्थ्याला बडवून काढण्यासाठी हात शिवशिवावेत तो राग होता... माहित नाही...असो, पण आज मला तो क्लास आठवतो, त्या बाई आठवतात आणि मग ओठांवर हसू येतं..
असचं हसू आज माझा शिवणाचा क्लास आठवून येतं... हे पण आणखीन एक दिव्य... मोठ्या उत्साहानं एक छानसा कापडाचा तुकडा खरेदी केला जायचा, सोबत रेशीम धागे, सुई, कात्री वगैरे सगळं घेऊन शिवणाचा छोटासा डबा सज्ज व्हायचा... दुसऱ्या दिवशी शाळेत नेण्यासाठी... मग शिवणकामाच्या वर्गात सुरु व्हायचा असाच एक झगडा... सुईत धागा ओवण्यापासून हा झगडा सुरु व्हायचा तो घंटा वाजेपर्यंत अव्याहत चालूच राहायचा... बटन होल, उलट, सुलट आणि अशाच अगम्य नावाच्या stiches घालायला शिकवायच्या आमच्या बाई... पण माझ्या हातून एक साधी stich नीट घातली जाईल तर शपथ... हे प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत ते कापड इतके रंग बदलायचं की शेवटी त्याचा मूळ रंगच हरवून जायचा, सुई-धाग्याचे निशाण कापडावर कमी आणि माझ्या अंगठ्यावर जास्ती उमटायचे, आणि ते कोरं करकरीत कापड बाईंकडे तपासणीसाठी जाईपर्यंत अक्षरशः गतप्राण झालेलं असायचं....त्यात जे काही प्राण उरायचे ते आईनी रात्रीतून त्याच्यावर सुई धाग्याने काही सुधारणा करून दिल्यामुळेच.... ह्या दोन्ही विषयांतले माझे मार्क हे कुणालाही सांगायची हिम्मत मी कधीही केली नाही... नाहीतर माझ्या इतर विषयातल्या उत्तम मार्कांवर संशयाची सुई उभी राहिली असती ना? पण, माझ्यावर न रागावता, न ओरडता मला बरे मार्क्स देऊन ह्या भयंकर दिव्यातून सोडवणाऱ्या माझ्या दोन्ही शिक्षिकांची मी आजन्म ऋणी आहे!!!!! ह्या प्रेमाला कारण पण तसंच होतं... माझा अभ्यास, माझे इतर सर्व विषयातले मार्क्स, माझी शाळेतल्या सर्व कार्यक्रमातला उत्स्फूर्त प्रतिसाद, सामाजिक उपक्रमांत माझा सहभाग ह्यामुळे मी शिक्षक मंडळींत बऱ्यापैकी आवडती होते! शाळेत education inspectors यायचे तेंव्हा हुशार विद्यार्थ्यांना क्लासमध्ये विखरून बसवलं जायचं... मी त्यातली एक असायचेच...मग त्यांना शाळा फिरवून माहिती द्यायची, शाळेसाठी चांगल्या प्रतिक्रिया मिळवण्यासाठी सर्वकाही करायचं... मला खूप गर्व वाटायचा ह्याचा तेंव्हा.. आजही वाटतो... आणि आनंद ह्यासाठी व्हायचा कारण ह्या निमित्ताने इतर वेळी ‘out of bound’ असलेल्या staff room मध्ये जायला मिळायचं!! आईची मैत्रीण होती त्यांचं नाव बहुधा मंगला होतं... त्या आम्हाला मराठी शिकवायच्या...( पुलंच्या भाषेत ‘मराठी शिकवता म्हणजे काय शिकवता ओ?’) तर त्या माझ्या आईच्या मैत्रीण ह्याचं मला फार अप्रूप होतं... मग त्या समोरून गेल्या की हसायच्या तेंव्हा असं वाटायचं की त्या आपल्यासाठी काहीतरी खास स्माईल देतायत..जे टीचरपेक्षा काहीतरी आणखीन आहे...आई बरोबर ह्यांच्या घरी पण गेले होते, त्याचा मला कोण आनंद होता... वर्गात सगळ्यांना सांगितलं होतं मी....
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एकदा मी एका डान्समध्ये भाग घेतला होता... गाणं होतं ‘ब्रिंदाबन का क्रिशन कन्हैय्या.. सबकी आंखों का तारा...|तेंव्हा मी दुसरीत होते... नंतर ह्याच वर्षी दुसरा कार्यक्रम होतं त्यात ‘A’ to ‘Z’ alphabet पासून सुरु होणारे वाक्य प्रत्येकाला म्हणायला दिले होते... गोल्डन sash वरती हे वाक्य लिहून तो खांद्यावर ठेवून प्रवेश केला... माझं वाक्य ‘U’ नी होतं..”United we stand, divided we fall!’ आई बाबा तिकडे प्रेक्षकांत बसले होते हे माहित होते, मोठ्या ऐटीत हे वाक्य म्हटलं, आणि bow करून परत गेले... because I had to give my best! हे वाक्य मला अजूनही आठवतं ते वाक्य म्हणून नाही तर आयुष्याचं एक तत्व म्हणून वापरलं पाहिजे हे मनात बिंबलंय... खरच आहे ते... कोण म्हणतं लहानपणीचे वार्षिक समारंभ विसरून जातात? लांब पर्यंत पडसाद उमटतात कधी कधी...
मी P.T. मध्ये खूप पुढाकार घ्यायचे, कारण आमच्याकडे स्पोर्ट्स पिरीयड दर आठवड्याला असायचा, त्यात शाळेतल्या सगळ्या मुलींसमोर टेबलवर उभे राहून कवायतीचे प्रकार करून दाखवले जायचे... मी बरेचदा असायची तिथे! खूप छान वाटायचं तेंव्हा... अभिमान वाटायचा हे आज कळतंय...
पण PT ला जितकी उत्सुक असायचे, त्यापेक्षा डान्स म्हटला की मला लांब लांब पळून जावं असं वाटायचं... म्हणजे शाळेत केला नाच वगैरे पण नंतर का कुणास ठाऊक पण  मला कधीच डान्स करायला आवडला नाही.  मला खूप अवघडल्या सारखं होतं... मला चांगलं संगीत आवडतं, माझा आवाजही बरा आहे त्यामुळे स्वतःच्या करमणुकीसाठी गात असते... मला चांगला डान्स बघायला आवडतो, पण डान्स करणे... छे...छे...आणि ते किळसवाणे अंगविक्षेप करून केलेला डान्स च्या नावाने बीभत्स प्रकार तर अजिबातच आवडत नाही... हं.. डान्स वरून आठवलं... एक मजेशीर किस्सा आहे... सांबा मध्ये एकदा असं झालं की, आमच्या brigadier जयराम साहेबांनी मला डान्ससाठी विचारलं आणि मला कुठे बघु आणि कुठे नको असं झालं हो! धरणी दुभंगावी आणि मला तिनं पोटात घ्यावं असं सीतेला वाटलं तसचं काहीसं मला वाटलं! तर, मी त्यांना म्हणाले की मला डान्समध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि मी कधीही डान्स करीत नाही! (हे सगळं जरा घाबरत घाबरतच सांगितलं... तर त्यांना पण अगदी ‘हुश्श’ झालं, कारण त्यांना पण डान्स आवडत नाही, आणि uncomfortable वाटतं... मग आम्ही दोघेही खूप हसलो... एक नजर त्यांनी डान्स फ्लोर वर मजेत डान्स करणाऱ्या mrs जयराम कडे टाकली, आणि आम्ही तीन चार लोकं खुर्च्या ओढून गप्पा मारायला बसलो... सगळ्यांच्या नजरेपासून दूर... थोडे लांब असे!  मग मी भानुप्रियाला सांगितलं की मला डान्स करायला शिकलं पाहिजे, कारण अशी फजिती पुन्हा नाही झाली पाहिजे! मग भानुप्रिया आणि मी रोज डान्स करायला लागलो...म्हणजे मी आपला नाचण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिले, पण डान्स काही  जमला नाही, आणि शेवटी भानुप्रियानेच नाद सोडून दिला, आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला!!
हो, पण संगीत मला फार आवडतं! कानाला जे सूर छान वाटतील ते मनाला भावतात हा अनुभव नेहमीचाच आहे. सिनेमा, नाटक पण मला फार आवडतात... बालनाट्या पासून ते आज गंभीर नाटकां पर्यंत सर्व आवडतात... एकदा लहान असतांना मला आठवतंय आई बाबांबरोबर अलका टाकीज मध्ये जिथे फक्त इंग्लिश सिनेमे दाखवले जायचे तिथे ‘sound of music’ हा अतिशय सुंदर सिनेमा बघितला होता! आज देखील तो सिनेमा माझ्यासाठी खास आहे! तेंव्हा त्यातलं सगळं कळलं नाही, पण त्याचा लुक फार भावला होता...तेंव्हा पण आणि अजून पण भावतो! इंग्लंड मधले ते खेड्यातले घर, परिसर, लोकं, त्यांचे छान छान कपडे, त्यांचे घर, आतली सजावट, त्यांचे उत्तम इंग्लिशमधले संवाद, त्यातली गाणी... अतिशय सोपं आणि ओघवतं होतं सगळं... एक एक सीन म्हणजे एखाद्या स्वप्नाप्रमाणे होता! त्या व्रात्य मुलांना त्या मुलीने त्यांचे संगोपन करून, प्रेमाने, समजुतीने त्यांना कसे सुधारले ह्याचे सुरेख चित्रण म्हणजे हा सिनेमा... सिनेमा नाही तर तो एक आठवणीचा तुकडा आहे माझ्यासाठी! आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे मला हा सिनेमा इतक्या वर्षांनी पुन्हा CD वर बघायला मिळाला ह्याचा फार आनंद वाटला! इतक्या वर्षांनी पुन्हा तीच जादू अनुभवायला मिळाली!
तंत्रज्ञान हे सतत विकसित होतच असतं... आमच्या शनिवार वाड्यातल्या मोठ्या रेडीओ पासून बघितलेला हा प्रवास आज CD, pendrive, mobiles, आणि smart phones पर्यंत येऊन ठेपलाय आणि इथून पुढे पण नवीन नवीन शोध लागतच राहणार!
वाड्यातला आमच्या घरातला हा एकमेव रेडिओ बर का... त्याची वायर म्हणजे त्याचा antena ही  पण एक करामतच होती... रोज सकाळी तिला नीट करून रेडिओ चालू करायचा म्हणजे एक काम होतं! मग मात्र ह्या अद्भुत पेटीतून दिवसभर आवाजाची जादू चालू राहायची! सकाळी सर्वप्रथम श्रोत्यांचे स्वागत सनईच्या मंजुळ स्वरांनी व्हायचे! नंतर भक्तीगीतं, भजनं आणि त्यानंतर मग अनेक विविध कार्यक्रम चालू राहायचे... भावगीत, सिनेसंगीत, आरोग्य, अर्थकारण, साहित्य, संस्कृती ह्या विषयांवर आधारीत कार्यक्रम, श्रुतिका, सिनेमांचे साउंड track (हे माझ्या आवडीचं!) महिलांसाठी, युवकांसाठी विशेष कार्यक्रम, उपदेशपर कार्यक्रम, दुपारी विविध भाषांमधील मिश्र गाणी, आणि हो... इंग्रजी, मराठी आणि हिंदीच नव्हे तर संस्कृत मध्ये बातम्या! रात्री दहा वाजता पुन्हा छान जुन्या गाण्यांनी त्या दिवसाची सांगता व्हायची! ह्या सगळ्या मेजवानीत मानाचा शिरपेच म्हणजे रेडियो सिलोन वरचा ‘बिनाका गीत माला’... दर रविवारी रात्री आठ वाजता प्रसारित होणाऱ्या ह्या कार्यक्रमाचा मानबिंदू म्हणजे अमीन सयानी ह्यांचा जादुई आवाज आणि त्यांचे अप्रतिम सादरीकरण! आजवर त्यांच्या आवाजाची नक्कल केली जाते आणि त्यांच्या सादरीकरणाचे धडे गिरवले जातात! साठ मिनिटांत मन कुठल्यातरी स्वप्नांच्या दुनियेत फेरफटका मारून यायचं कळायचंच नाही! आणि हा एकच कार्यक्रम असा होता, जो ऐकण्यासाठी वाड्यातल्या सर्व ताई आणि दादांना अभ्यास सोडून जायची घरून फुल परवानगी होती!! ह्या gang ची लीडर होती जयूताई! शिरीष, शेखर, मंगल असे हे gang चे सदस्य आठ वाजायच्या थोडं आधी आमच्या खोलीत मधाभोवती गोळा होणाऱ्या फुलपाखरांसारखे रेडियो भोवती जमा व्हायचे! मग एक तास सगळे चिडीचूप!!! ‘जीवाचे कान करून ऐकणं’ म्हणजे काय असतं ते मला तेंव्हाच कळलं होतं! पण ह्या कार्यक्रमाची मोहिनीच अशी होती की मंडळी (त्यातल्या जाहिरातीं सकट) अगदी भक्तिभावाने हा कार्यक्रम ऐकायची! हो... भक्तीभावानेच कारण सुमधुर गाण्यांच्या माध्यमातून सिनेमाच्या मायानगरीची मोहून टाकणारी सफर घडवून आणणारा मनाला तृप्त करणारा कार्यक्रम होता तो!
शिवाय रविवारी सकाळी सादर होणारा ‘बालोद्यान’ हा कार्यक्रम पण आम्हा लहान मुलांचा आवडीचा कार्यक्रम होता! बालगीत, कविता, कथा, छोट्या नाटूकल्या... सगळं काही होतं त्या अर्ध्या तासात! ह्या कार्यक्रमासाठी सगळी मुलं आमच्या घरी असायची!
वाड्यात अनेक गोष्टी कळत नकळत शिकायला मिळाल्या त्याचे पडसाद आज उमटतांना दिसतात! एक वर्षी मला रंगीत पाण्याच्या हौदात उडी मारायला लावली होती, किंबहुना लोटलं गेलं होतं... तेंव्हा पासून मला होळीचा, रंगपंचमीचा हा खेळ अजिबात आवडत नाही! मला सण आवडतात, पण हा एक सण मला अजिबात आवडत नाही... आजही नाही... ह्याचा अर्थ असं नाही की मला रंग आवडत नाहीत... मला सगळे रंग आवडतात... सुंदर चित्र, रंगतदार नेपथ्य, सिनेमाचे विविध रंग... सगळं आवडतं... रंगांमुळेच तर हि दुनिया सुंदर आहे! तरीसुद्धा, ह्या वाड्यात मजा खूप केली!!! वाड्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीकडून काही ना काही शिकायला मिळालं आहे मला!
पण ह्याच वाड्यात आई बाबांना अनेक अप्रिय गोष्टींना सामोरं जावं लागलं....म्हणूनच ह्या छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना महत्व आहे! नितीन सचिनचा जन्म इथेच झाला होता... लहान होते दोघेही आणि प्रमोदिनी पण लहानच होती...  काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आई बाबांना कोर्टाची पायरी चढायची वेळ आली... मनःस्ताप खूप झाला, त्रास झाला पण त्यांची बाजू न्यायाची, सत्याची होती, आणि म्हणूनच सर्व लोकांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे ह्या मंडळींना हार मानवी लागली होती! मी तो प्रवास खूप जवळून पाहिलाय आणि काल घडल्यासारखा वाटतो... माझी आंतरिक शक्ती ही ह्याच नाट्याचा परिपाक आहे असचं वाटतं... अनेक धडे मिळाले जे चिरकाल स्मरणात राहून मला माझ्या संकटात नेहमी कामाला येतात!
वाड्यातून आल्यावर कर्वे रोडवर ‘शहा बिल्डींग’ मध्ये राहायला आल्यावर एका वेगळ्याच दुनियेचं दर्शन झालं! चार माजले, प्रत्येकी दोन flat अशा १०- १२ बिल्डींग होत्या! हेच मुळी पहिल्यांदा बघितलं! बरीच मंडळी ही वाड्यातून flat मध्ये राहायला आली होती, त्यामुळे तसे सगळे मनानं तिथेच होतो! त्यामुळे नवीन मित्रमैत्रिणी, नवीन शेजार, नवीन प्रकारचं राहणीमान आणि त्याहून नवीन प्रकारचे खेळ खेळायला मिळाले! शेजारच्या बिल्डींग मध्ये राहणाऱ्या काकांनी आम्हाला समोरच्या ग्राउंडवर खेळायची मजा दाखवली... volley ball, basket ball, शिवाय base ball सारखे खेळ आम्हाला खेळायला शिकवले! हुतुतू, हॉकी, कबड्डी खेळायला मी इथे शिकले! तेंव्हा क्रिकेट फार प्रचलीत खेळ नव्हता असे वाटतं... पण ते पण खेळायचो... इतकं आवडायचं की घरी जाऊच नये वाटायचं... पण घरी तर जायचंच असतं ... पण इतके दमून जायचो, की जेवण केलं की झोप यायची... घरच्या पौष्टिक आहारा सोबतच खेळांमुळे तयार झालेली शारीरिक क्षमता आणि मानसिक आरोग्याची शिदोरी आजही उपयोगी पडते आहे!
पुढे काही वर्षांनी तिरुचिरापल्ली ‘त्रिची’ ला बाबांची बदली झाली आणि पुन्हा आमचे विश्व बदलून गेले! RSK शाळेत मी ९वी आणि १०वी केली. आमच्या शाळेत संध्याकाळी ४ ते ५ सर्वांनी ग्राउंडवरच खेळायचं हा नियम होता, कुणालाही घरी सोडलं जायचं नाही. आम्ही मुलं बसनी घरी जायचो, तर बस देखील नंतरच सोडल्या जायच्या. इथे ऑलिम्पिक दर्जाचे खेळ शिकवले जायचे. long jump, high jump, pole vault, discus throw, javeline throw, १०० mtrs relay आणि असे बरेच काही शिकायला मिळाले! इथे अभ्यास देखील छान झाला आणि ह्या खेळांमुळे team spirit, मैत्रीपूर्ण खेळाचे महत्व,आणि सहकार्याचे महत्व कळले. पण मी team person नाही... ही माझ्यातली  कमतरता आहे हे मी जाणून आहे. एकसंघ,एकदिलानं आणि ठरलेलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियम पाळणारे आणि आदेश पाळणारे लोकं एक उत्तम संघटीत कार्य करू शकतात. पण मला काम करतांना अडचणीत आणणारे लोक भेटतात आणि त्यांना गोड बोलून, tactfully हाताळता येत नाही... ह्यामुळे माझ्या आयुष्यात अनेक वेळा अडचणी निर्माण झाल्या पण मी त्यातून तरून पुढे आले आहे!
10+2 pattern लागू झालेली आमची पहिलीच batch होती. त्यासाठी आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली होती. पण मला कधी टेन्शन आल्याचं आठवत नाही कारण बाबा नेहमी म्हणायचे की कोणताही धडा हा पहिल्या पासून शेवट पर्यंत नीट अभ्यासलेला हवा, मग प्रश्न किती मार्कांचा आहे त्याप्रमाणे आपले उत्तर लिहायचे! म्हटलं तर किती अवघड आणि म्हटलं तर किती सोपं! ह्याच पद्धतीनं अभ्यास केला नेहमी, त्यामुळे तरून गेले! भानूला हेच शिकवले, तिलाही फायदाच झाला! कोणतेही काम पूर्ण करायचे असेल, यशस्वी करायचे असेल, तर त्याचा सखोल, सर्वांगीण अभ्यास करून त्यात झोकून देऊन काम केले पाहिजे. कधी कधी अपयश पण येतं, पण  आपल्याकडून आपण शक्य ते सर्व केल्याचे समाधान असते आणि खच्चीकरण आणि औदासिन्य येण्याचे प्रमाण कमी राहते. .
शाळा सुटली आणि खेळ पण सुटले... B.Com नंतर लग्न होईपर्यंत वेळेचा सदुपयोग आणि थोडे अर्थार्जन करण्याच्या हेतूने चार पाच वर्ष नोकरी केली. थोडेसे का होईना, आपण पैसे कमवून आणले ह्याचा अभिमान वाटायचा... प्रमोदिनी सचिन, नितीनला दिवाळीची खरेदी करून दिली ह्याचा मला खूप आनंद वाटायचा तेंव्हा... आई बाबांसाठी काही खरेदी करू शकले ह्याचा मला आनंद वाटतो... माझ्या पैशातून मी घरी शोकेस वगैरे वस्तू आणल्या... छान वाटायचं! फार मोठं योगदान नाही, पण खारीचा वाटा उचल्ल्याचं समाधान!
नोकरीच्या ठिकाणी मी फारशी रमले नाही, त्याला कारण अंतर्गत राजकारण ज्यातलं मला कधी काही कळलं नाही. मग आपण त्यातून योग्य मार्ग निवडायचा आणि पुढे व्हायचं! मला राजकारण जमत नाही... माझा फंडा साधा असतो... आपल्याला दिलेले काम इमानदारीने करा आणि बाकीच सोडून द्या! कुणाच्याही बद्दल मनात द्वेषभाव, राग वगैरे ठेवायचा नाही... लोकांना वाटतं हिने आपल्याला सारखं विचारावं, आपला सल्ला घ्यावा... पण माझं म्हणण आहे की मला जे काम येतं, त्यासाठी मी कुणाच का ऐकायचं आहे? उगीचच कुणाला तरी मोठेपणा द्यायचा? स्वतः कडे कमीपणा घेऊन? जमायचं नाही! पण मी माझं उद्दिष्ट साध्य केल्या शिवाय गप्प बसत नाही. I am a go-getter! माझं काम झालं नाही तर मला अपराधी वाटतं... पण सहजी कुठल्या गोष्टीची पाठ सोडून देणाऱ्यातली मी नाही!
आता मी पण थोडी tech savvy झाले आहे आणि त्याचं श्रेय भानुप्रियाला जातं! आंतरजालाचा प्रसार होण्याच्या पाऊलखुणा ओळखून मी सर्व शिकून घेतलं... अगदी पध्दतशीरपणे! जशी भानुप्रियाला मी शिकवायचे तसेच तिच्या कडून मी शिकले! laptop चालू करण्यापासून तिनं सर्व शिकवलं आणि मला up to date बनवलं! कधी सगळं नीट जमलं तर आनंद व्हायचा, आणि काही अडलं तर तिला फोन करून त्रास द्यायचा! पण भानुप्रिया माझ्यासाठी lucky mascot आहे! तिच्याशी सल्लामसलत केली आणि कुठला प्रश्न सुटला नाही असं कधीही झालेलं नाही! तिच्याशी बोललं की मला नवीन मार्ग,नवीन कल्पना  मिळतातच, पण खूप आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची हिम्मत मिळते. आम्ही दोघी एकमेकींना नीट ओळखतो आणि जिथे कुणी कमी पडतोय असं दिसलं की ती कमी पूर्ण करायला पुढे सरसावतो! तिच्या CA आणि LLB च्या अभ्यासात मी तिची अशीच मदत केली होती... मला सांगितलेला धडा मी नीट अभ्यास करून, notes काढून तिला संध्याकाळी शिकवायचे! खूप मजा यायची मला, कारण त्यानिमित्ताने मला खूप काही शिकायला मिळालं! corprate sector, commerce and business मधल्या गोष्टी शिकायला मिळाल्या..त्याने आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात...आपण जगासोबत आहोत हा विश्वास मिळतो!
आम्ही एकमेकींचे मन जाणतो, पण कधी कधी एक व्यक्ती म्हणून समोरच्याला मोकळीक देणं आवश्यक आहे हेही जाणतो...  जेंव्हा आपला विद्यार्थी आपल्या पेक्षा जास्तं चांगलं काम करतो, तेंव्हा गुरूला अधिक आनंद होतो! आपले यश हे गुरूंनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचे फलित आहे असे विद्यार्थ्याला वाटले पाहिजे! असे समर्थ रामदासांनी ‘दासबोध’ मध्ये म्हटले आहेच! आणि हे सर्व आई बाबांनी आमच्या बाबत देखील आचरणात आणले होते, म्हणून हीच शिकवण पुढे नेऊ शकले!
बाबांचे आर्मीतले थोडे बेभरवशाचे पण तितकेच रोमांचक असे आयुष्य बघितल्यानंतर, माझा पण आर्मी ऑफिसरशीच लग्न करण्याचा निर्णय पक्का होत गेला!  मला खवैय्येगिरी, भ्रमती, प्रवास, आणि मुख्य म्हणजे साहस आणि रोज काहीतरी नवीन असावं, करावं असं वाटतं! तेच तेच करण्याचा, रटाळ,एकसुरी आयुष्य जगण्याचा मला कंटाळा येतो! मला सतत काही बदल आणि नाविन्य हवं असतं, ज्यामुळे माझा उत्साह वाढतो आणि आंतरिक ऊर्जा प्रबळ होत रहाते! हे सर्व आणि बरंच काही मला आर्मी मध्ये मिळणार होतं! पण हा निर्णय घेतांना मला कुठल्याही भ्रामक कल्पना नव्हत्या... मला आर्मीमध्ये असणारी जीवनाची अशाश्वतता, अस्थिरता, अवघड वेळ नी परिस्थितीशी करावा लागणारा खडतर सामना ह्या सर्वांची पूर्ण कल्पना होती. पण सोबतच एक उत्तम जीवनशैलीची खात्री पण होतीच न! मी ह्या सगळ्याला सामोरे जायला तयार होते!!! पण म्हणतात ना भगवंताकडे जे मागितलं ते तो देतो, आणि नंतर लक्षात येतं, अरे... हे तर मी नव्हतं मागितलं? तसंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं... म्हणजे आर्मी ऑफिसर मिळाला, चांगली जीवनशैली अनुभवायला मिळाली, सगळं उत्तम झालं, पण माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र न थांबणारं, न शमणारं सतत घोंघावत राहणारं वादळ, किंवा वावटळ निर्माण झालं....मी मात्र न डगमगता, जमेल त्या पध्दतीनं ह्या वादळाचा सामना करीत राहिले... सुरुवातीला एकदम धक्का बसला... पण नंतर हळू हळू प्रत्येक नवीन वादळाचा सामना करायला शिकत गेले, मार्ग काढत गेले... काही ठिकाणी यश आले, काही ठिकाणी अपयश आले, काही ठिकाणी अजूनही झगडा चालू आहे...  कधी प्रेमाने, कधी संवादाने, कधी वादविवादाने, कधी आणखीन कुठल्या पध्दतीने ह्या समस्येच्या मुळाशी जाण्याचा खूप प्रयत्न केला पण  यश नाही.... सर्वांसाठी एक उत्तम, कार्यकुशल इमानदार ऑफिसर असणारा हा माणूस माझ्याशीच असे अमानुषपणे का वागतो ह्याचं उत्तर आजही मिळालेलं नाही...खुपकाही झेललं, सहन केलं... अपमान, घरच्यांची बदनामी, माझी काही करायची किंवा करून घ्यायची लायकी नाही हे सतत ऐकणे... एक ना अनेक... वकिली बाण्याने, थंड डोक्याने ‘ठकास महाठक’ असे वागले आणि हळू हळू थोडे यश मिळते आहे... ह्याला काय यश म्हणायचं? असो....
पण ह्या सगळ्या जाचातून जात असतांना मला माझ्यातल्या शारीरिक बळकटीचा, निकोप मानसिकतेचा आणि अखेरपर्यंत जिद्दीने लढण्याच्या वृत्तीने साथ दिली...आणि साथ दिली ते आई बाबांच्या संपूर्ण प्रेमाने आणि पाठींब्याने... ज्याच्या शिवाय मी एकटी पडले असते, तर एवढे दिवस ताठ मानेने जगूच शकले नसते! माझ्या ह्या अंतर्गत वादळाचा माझ्या इतर कोणत्याही कामावर, मुलांवर, संगोपनावर, जबाबदाऱ्यावर  कोणताही अनिष्ट परिणाम होऊ दिला नाही... माझ्या सर्व जबाबदाऱ्या मी नीटपणे पार पाडत गेले कारण मला कोणतीही अपराधी भावना मनात नको होती...मी जर योग्य होत्ते तर मला कशाचेही डर नव्हते... सिनियर ऑफिसरना सांगून पाहिलं, सगळं करून पाहिलं, पण सगळेच माझी मदत करण्यास असमर्थ होते...  त्यामुळे हा लढा माझ्या एकटीचाच होता....

आता मी स्वतःला बदलायला सुरुवात केली. सर्वात आधी स्वतःला बदलले पाहिजे, समर्थ केले पाहिजे, बळकट केले पाहिजे हे ठरले... आता रडायचं नाही, फक्त लढायचं! ह्याचा मानसिक त्रास पहिला कमी करायला सुरुवात केली...
मधल्या दरम्यान मी स्वतःच्या बुद्धीला गंज चढू नये ह्यासाठी पण प्रयत्न सुरूच ठेवले. १९९३ मध्ये मध्ये माझ्या टाचेचे दुखणे सुरु झाले. डॉक्टरांनी सर्जरी सांगितली! मी हबकलेच! पण माझं मन मला सांगत होतं की ह्याची जरुरी नाहीये. मग ह्याव्यतिरिक्त काही इलाज आहेत का ह्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता एक दिवशी ‘Health in your hands’ हे पुस्तकं हाती लागलं! ह्यात accupressure, naturopathy, magnet therapy वगैरे अनेक उपचारांचे वर्णन होते. मला खात्री वाटली की ह्यात माझ्या दुखण्याचे इलाज सापडतील आणि म्हणून मी नेटाने प्रेशर points चे उपचार सुरु केले, आणि मला काही दिवसातच खूप फरक जाणवला! मला आनंद झाला! मग पुढे मी आणखीन बऱ्याच व्याधींवर हे उपचार केले आणि मला खूप बरं वाटायला लागलं! ह्यात मानसिक स्वास्थ्यासाठी पण उपचार केले! औषधांविना आणि औषधांचे दुष्परिणाम टाळणाऱ्या सोप्या उपचार पध्दतीचे एक नवे अनोखे दालन मला सापडले होते! ह्यानंतर हे सर्व डिप्लोमा कोर्स मी पूर्ण केले आणि खूप आत्मविश्वास आला! आजही मी ह्या उपचार पध्दतींची कास धरून आहे! 
ह्याच सुमारास अभिषेक आम्हाला सोडून गेला... माझ्या आणि  भानुप्रियाच्या आयुष्यात एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करून... पण दुनिया गोल आहे म्हणतात ना? जे जातं ते परत येतं! रुद्रांश आला आणि आमच्या दोघींच्या आयुष्यातली कमी भरून निघाली! त्याच्यात अभिषेकचं रूप दिसत होतं सुरुवातीला कितीतरी दिवस! असं वाटतं भानुप्रियाला तिचा अभिषेक परत मिळाला!
शारीरिक व्याधींवर उपचार चालू होते, पण तरी माझे मन काहीतरी शोधत होते... असं काहीतरी जे औषधांनी बरं न होऊ शकणाऱ्या किंवा औषधच नसलेल्या काही मानसिक आणि भावनिक पातळीवरच्या आजारांना बरं करेल असं काहीतरी दिव्य! आपल्या aura level किंवा ocult level वर काम करणारी शक्ति निश्चित आहे, कारण मानवाचे प्रयत्न जिथे थांबतात तिथे माणसाचा aura किंवा त्याची आभा अनेक गूढ आणि अंतर्मनाच्या गाठी उकलायला मदत करते. हे सगळं मी आत्ता सांगू शकते, पण तेंव्हा मी हेच शोधत होते, पण सापडत नव्हते... पण सापडणार हे मला कळत होतं! आणि बहुधा ती शक्ति म्हणजे ‘रेकी’ शक्ति होती हे आता पटतंय! कारण तेंव्हा नुकतीच ही विद्या प्रसारण पावत होती, नवीनच होती!
दरम्यान २००३ साली बंगलोरला पोस्टिंग होती, तेंव्हा Brig. M.P. Singh हे Sub-Area Commander म्हणून दाखल झाले. Mrs. M.P. Singh ह्यांची Ladies meet मध्ये ओळख करून दिली गेली ती म्हणजे त्या Reiki Grand Master आहेत! रेकी मधली सर्वात वरची डिग्री!  रेकी उपचार पध्दत भारतातच फार पूर्वी विकसित केली गेली, पण नंतर तिचा लोप झाला, आणि चीनी लोकांनी तिचं पुनरुज्जीवन केलं. ही शक्ति निसर्गानीच आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे त्यात काही बदल कधी झाला नाही! असो, तर माझ्या कानात हे शब्द शिरले, आणि मी त्यांना भेटण्यासाठी अधीर झाले! चहापानाच्या वेळी त्यांना भेटले, आणि मी तुमची ह्या स्टेशन मधली पहिली विद्यार्थिनी असणार आहे असे सांगितले...त्या खुश झाल्या! ह्या भेटीतून पुढे माझा आणखीन एक अद्भुत, सुंदर, सर्वांगीण विकासाचा प्रवास सुरु झाला म्हणायला हरकत नाही! मी खूप दिवसांपासून रेकीच शिक्षक शोधत होते, आणि माझी प्रार्थना देवाने ऐकली! एका हिंदी सिनेमाचा प्रचलित संवाद आहे ना...’जब आप किसी चीज को शिद्द्त से चाहो, तो सारी कायनात उसे आपतक पहुंचाने में जूट जाती है|’ मला ह्याची प्रचीती आली. तसं माझा ह्यावर पूर्ण विश्वास होताच आधीपासून!  आपलं उद्दिष्ट जर साध्य झालं नसेल तर ह्याचा अर्थ...’पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!’,,, ह्याच सिनेमातला आणखीन एक संवाद! अगदी खरं आहे हे! त्यानंतर पुढच्या दोन वर्षात मी त्यांच्या कडून रेकी शिकून, Grand Master झाले!!! म्हणजे आता मी आणखीन लोकांना ही सरळ आणि सोपी विद्या शिकवू शकणार होते!! त्यांना निरोगी आणि निरामय आयुष्यासाठी विनाऔषधं, बिना साईड इफेक्ट चा कानमंत्र देऊ शकणार होते!! आणि पैसे खर्च न करता ते सुध्दा!! dr. गाला ज्यांच्याकडून मी accupressure शिकले आणि m.p. singh ह्या दोन्ही गुरुजनांचं माझ्यावर ऋण आहे! माझ्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा दिली ह्यांनी! रेकीमुळे माझ्या रागावर मी पुष्कळ नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाले. पण राग कधी कधी आवश्यक असतो असं मला वाटतं. योग्य वेळी, योग्य व्यक्तीवर, योग्य कारणासाठी आणि योग्य प्रमाणात राग व्यक्त करणे उचित आहे. मला लांडीलबाडी, खोटं बोलणारे, पाठीमागे वाईट बोलणारे, गोड बोलून धोका देणारे आवडत नाहीत... पाठीत सुरा खुपसतात, आपल्याच माणसांना फसवतात... अशी माणसं भेटली की मला भयंकर राग येतो... इतर वेळीस मी माझी आनंदात असते, कुणाच्याही अध्यात मध्यात जाण्याची माझी वृत्ती नाही. अनेक ठिकाणी लोकांच्या वाईट वृत्तीमुळे भांडणे होतात हो! आजकाल नवीन म्हणजे आपण ATM वर व्यवहार करत असतांना दुसरे येऊन डोकावतात... मला राग येतो त्यात काय चुकतं? असे अनेक प्रसंग असतात.
मी तशी मस्तमौला, cool असते! मला लुडबुड आवडत नाही, आणि मी करत नाही. छान रहावं, मजा करावी, आनंद द्यावा, घ्यावा...बस... आपल्याला काय मिळालंय ते पाहून सुखात राहावं आणि जे मिळालं नाही ते विसरून जावं!
लोकं सारखी कुरबुर करीत रहातात माझ्याकडे हे नाही ते होत नाही वगैरे वगैरे... पण जे आहे तुमच्याकडे त्याचा आनंद घ्या ना! दुसरं म्हणजे सारखं देवाला शोधत राहतात... अरे देव शोधायचाय काय? तो आपल्यातच तर आहे! आजूबाजूला, सगळ्या गोष्टीं मधे तो आहे!  म्हणजे मला तरी तो असाच दिसतो! प्रत्येक संकटात, प्रत्येक समस्येत, प्रत्येक दुःखात, प्रत्येक सुखात तो आपल्या जवळच तर असतो! मला तर त्याला हाक देखील मारायची जरूर भासत नाही, कारण तो सदैव माझ्यापाशी आहे, माझ्या जीवनात काय चाललंय, काय घडतंय , मी काय विचार करते आहे, कसं वागते आहे, माझी काय आवशकता आहे, माझ्या काय इच्छा आहेत हे सगळं सगळं तो जाणतोच... मग त्याच्याकडे काय आणि कसं मागायचं? तो देतच असतो.. आपण फक्त घ्यायचं! शांत राहून त्याच्या अस्तित्वाचा स्वीकार केला की आपलं काम सोपं होतं! त्याच्या कुठल्याही दानाचा अव्हेर करीत नाही, त्याला वाईट बोलत नाही. त्याच्या मनसुब्यांवर संशय ठेवत नाही, हे संकट मलाच का? असे कधीही विचारत नाही, कारण मला माहित आहे ह्यावर शंका उपस्थित केली, तर तो पुढे असे संकट टाकतो कि आधीचं बरं म्हणायची वेळ येते!  इथे मी ऐकलेली आणि चिरकाल स्मरणात राहिलेली गोष्ट सांगते...
एकदा एक जहाज समुद्रात वादळात सापडून, बुडायला लागलं. एक माणूस सगळ्यात वरती उभं राहून देवाकडे त्याला वाचवण्याची प्रार्थना करू लागला. तिकडे लांबून त्याला एक व्यक्ती हात करून खुणावत होती असे वाटले. ती व्यक्ती सांगत होती.. तू चालायला सुरुवात कर, मी आहे. पण ह्याला तो मूर्खपणा वाटत होता. पण शेवटी त्यानं धीर करून पाय बोटीच्या बाहेर ठेवला... आणि चमत्कार  म्हणजे तो चालत जाऊन किनाऱ्याला लागला.. अगदी सुरक्षितपणे! त्याने वळून त्या व्यक्तीचा शोध घेतला तर त्याला कुणीच दिसले नाही! त्याच्या देवावरच्या विश्वासाने त्याचा बचाव केला होता! ती कुणी व्यक्ती नसून त्याची श्रद्धा होती जी त्याला खुणावत होती!
एक भक्त होता जो अधून मधून भगवंतावर, त्याच्या अनुकंपेवर, त्याच्या कृपाकटाक्षावर शंका घ्यायचा. एकदा वाळवंटातून वाळूचे चटके बसत असतांना चालता चालता भगवंताला म्हणत होता तुला माझी काळजीच नाही मुळी... आधी वाळूमधे दोन पावलांचे ठसे दिसत होते आता एकाच पावलाचे ठसे दिसू लागले... तो आपला भगवंताला बोलतच राहिला की तुला माझी काळजीच नाही! जमिनीवर सावली मिळाल्यावर त्याने पुन्हा भगवंताला तोच प्रश्न विचारला तेंव्हा भगवंत म्हणाले.. अरे बाळा, तुला जे वाळूत एक पाऊल दिसत होतं, ते माझं होतं, कारण तुला तर मी उचलून घेतलं होतं! तेंव्हा भक्त खजील झाला, आणि त्याची भगवंतावरची श्रद्धा दृढ झाली.
मी त्याच्याकडे काही मागतच नाही कारण त्यानं सगळंच तर दिलंय असं वाटतं! माझ्या कल्पनेपेक्षा, अपेक्षेपेक्षा, योग्यतेपेक्षा खूप जास्तं मिळालंय! मला मिळालेली छोटी छोटी सुखं, छोटे छोटे आनंदाचे क्षण, मोठे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण ह्या सर्वांसाठी मी त्याचे नेहमी आभार मानते! आणि स्वतःला धन्य समजते! कारण आपल्या सुखाची किंवा दुःखाची दुसऱ्या बरोबर तुलना करायला लागलो तर लक्षात येतं की प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याच्या मर्यादा, त्याची बलस्थानं वेगळी आहेत, त्याचे विचार वेगळे, त्याची जीवनमूल्य वेगळी, त्याचे आचरण वेगळे आहे कारण प्रत्येकाची जडणघडण वेगळी आहे, आणि त्यामुळे त्याचे सुख दुःखाचे आणि पर्यायाने त्याच्या जीवनाचे मूल्यमापन वेगळे आहे आणि असणारच! आणि खरं सांगायचं तर ह्या दुनियेत सगळ्यांना सगळंच मिळत नाही. पण तरी प्रत्येकाला काही ना काही सुख मिळतंच फक्त ते सुख हे सुख आहे हे मान्य करावं आणि परमेश्वराचे आभार मानावेत! मग आपल्याकडे ‘असलेल्या’ गोष्टींची यादी मोठी आणि ‘नसलेल्या’ गोष्टींची यादी छोटी असेल! आपल्याला जिथे थांबायचं असेल तिथे आपण निश्चित थांबू शकतो.... नाहीतर आपल्या गरजा आणि ध्येयासक्ती आपल्याला नवनवीन सुखांच्या शोधात  पुढे पुढे ढकलतच राहील, आणि अपेक्षित सुखापाशी येताच पुन्हा एखादे नवीन प्रलोभन खुणावेल आणि मग आपण पुन्हा पळत राहू, पळतच राहू.... आणखीन जोरात, आणखीन जोशात...आणि कोणताच उपभोग न घेतल्याची खंत करीत, अपराधी भावनेने हा सर्व पसारा इथेच ठेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जाऊ...  तर योग्य वेळ ओळखून आणखीन प्रलोभनांना ‘नाही’ आणि ‘नको’ म्हणता आले पाहिजे. त्यासाठी आहे त्यात समाधान मानता आलं पाहिजे हे नक्की! हे आई बाबांकडून शिकायला मिळालं!
१९९५ मध्ये ज्ञान प्रबोधिनी पध्दतीचं पौरोहित्य शिकायला मिळालं. भारती त्या शाळेत होती, आणि ती पुरोहित म्हणून काम करीत होती. तिच्याकडून हे शिकले. हे क्षेत्र माझ्यासाठी वेगळं आणि थोडं अनोळखी होतं. ह्यात मला जोडणारा दुआ एवढाच होता की पूर्वी बाबांनी घोटून घेतल्यामुळे माझं संस्कृत वाचन, शब्दोच्चार आणि व्याकरण चांगलं होतं.शिवाय त्रिची मधल्या शाळेत मला संस्कृत शिकवायला mrs. सुब्रमण्यम होत्या ज्यांच्यामुळे हा विषय मी चांगला शिकले होते.  मी ह्या क्षेत्रात देखील माझ्या स्वभावानुसार खूप मेहनत घेतली आणि स्वतःला तयार केलं. बाबांनी पण नुकतीच सुरुवात केली होती पौरोहीत्याला पण त्यांनी शाळेत कोर्स केल्यामुळे फरक असा झाला की त्यांचा चांगला जम बसला... त्यांची हातोटी, ज्ञान, जनसंपर्क ह्यामुळे त्यांना काही वर्षांनी उत्तम पुरोहिताचा सन्मान मिळाला! पण मला ह्याही क्षेत्रात फार काही करता नाही आलं कारण नाशिक मध्ये लोकांचा स्त्री पुरोहित ह्याला फारसा प्रतिसाद नाही... शिवाय, ठरलेली दक्षिणा, सुटसुटीत पोथी, कोणतेही  अवडंबर नाही, अत्यल्प साहित्याची आवश्यकता, दिलेल्या तारखेचे आणि वेळेचे बंधन पळून अतिशय काटेकोरपणे, शिस्तबध्द पूजा विधी करून संस्थेनी ठरवलेली दक्षिणा घेऊन आनंदाने बिनबोभाट पूजा करून जाणारे पुरोहित आमच्या पचनी पडत नाहीत! आम्हाला हवेत मोठं वलय असलेले, वेळेनंतर वाट पहायला लावून आपले महत्व वाढवणारे, भरपूर दक्षिणा आणि अनेकानेक अनावश्यक साहित्याची आणि अन्नपदार्थांची मागणी करणारे, आणि शिवाय भरमसाठ दक्षिणा घेऊन यजमानांना अडचणीत टाकणारे पुरोहित! पूजा जितकी भव्य, आमंत्रित जितके जास्त,सन्माननीय पाहुणे जितके जास्त, बोलबाला जितका जास्त, तितके यजमानांचे व पर्यायाने पुरोहितांचे महत्व जास्त! त्यामुळे काही वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करून नंतर मी हे पौरोहित्य देखील सोडून दिलं... आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे घरातून होणारा जाच... हे कशाला, ते कशाला? मग ही नकारात्मक शक्ति कोणत्याही कार्याचा नाशच करते ना? माझ्या कुकिंग क्लासचे असेच बारा वाजलेत... बंगलोर मध्ये मी लग्न विधी केले, लोकांना आवडले कारण लोकं पुरोगामी विचारंची होती. पण, २ वर्ष एका स्टेशन मध्ये राहून किती पूजा मिळणार? हा पण प्रश्न होताच. असो....पण मला तर ह्या पूजा शिकल्याचा भरपूर उपयोग झाला,,,घरच्या सगळ्या पूजा, भानुप्रियाच्या घरच्या पूजा मीच केल्या, लग्ना आधी साखरपुडा मीच केला... दोखालेजेवान, मंगळागौर...सगळ्या पूजा मीच केल्या... मग आणखीन काय पाहिजे होते? मी खूप पैसे कमावण्याच्या उद्देशाने हे पौरोहित्य शिकलेच नव्हते! सो, मला काहीच दुःख नाहीये! तात्पर्य, कोणतीही विद्या वाया जात नाही, फक्त त्याची उपयुक्तता बदलते एवढच....
नवीन नवीन गोष्टी शिकून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे माझे उद्दिष्ट नेहमीच होते आणि त्यातून मला भरपूर फायदाही झालेला आहे. कालच्या पेक्षा आजचा दिवस आपला जास्ती चांगला व्हावा, आणि आजच्या पेक्षा उद्याचा दिवस चांगला व्हावा असं माझं नेहमी प्रयत्न असतो...तेंव्हा ज्ञानार्जानासारखे पुण्य नाही! आपले जीवनमान नेहमी उंचावत राहिले पाहिजे!
शिकण्यासारखे खुपकाही असते. ज्याच्या कडून, जे जे शिकता येईल ते ते शिकावे आणि स्वतःला समृध्द करीत जावे... हे माझ्या दृष्टीने यश आहे! आणि आज मी यशस्वी आहे असे मला ठामपणे वाटते!
माझ्याकडे शिक्षण नाही, माझ्याकडे कोणतेही व्यावसायिक यश मिळवून देणारे शिक्षण नाही, मी निरुपयोगी आहे असे मला सांगून आयुष्भर हिणवण्याचा प्रयत्न केला गेला... पण मी कधीच बधले नाही कारण असे मान्य करणे म्हणजे आपल्या आईबापानी आपल्याला दिलेल्या ज्ञानाच्या आणि प्रशिक्षणाच्या शिदोरीचा अपमान करण्यासारखे आहे... प्रत्येक वेळी आईबापाला असे करणे जमतेच असे नाही, त्याला अनेक करणे असतात... शिवाय आपली पण एक कुवत असते, आपल्याला संधी मिळतात की नाही, वेळ मिळतो की नाही, आवड आहे की नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचे जसे नशीब उलगडत जाते तसे तो जगण्याचे साधन आणि साध्य शोधात जातो... पुढे असे आहे, की स्त्रियांना बाहेर पडून अर्थार्जन करून, नाव कमवण्यासाठी घरच्यांची भक्कम साथ लागते... ती आमच्याकडे कुठे होती? मग साधी नोकरी तरी जमेल का? आणि आर्मीतल्या माणसाशी लग्न केल्यावर त्याच्या सोबत संसार करायचा हे ध्येय असतांना, उगीचच काहीतरी खूळ घेऊन वेगळ्या ठिकाणी, तुटपुंज्या पगाराची नोकरी करायची, मुलांची, नवऱ्याची आबाळ करायची हा कुठला न्याय? आणि आर्मीचं व्रत स्वीकारल्यानंतर हेच सगळं करायचं, मग तिथली कर्तव्य कधी आणि कशी पार पडायची? मजा कधी उपभोगायची? मी नोकरी करीत नाही हे कायम ऐकत राहिले, पण भानूच्या बाबांचे नखरे पाहता हे सगळं सांभाळून नोकरी जमली असती? मला करू दिली असती सुखाने? मुळीच नाही... त्यामुळे मी तेंव्हा घेतलेला निर्णय एकदम बरोबर होता! माझ्यासाठी मी कोणताही वेळ द्यायचा नाही असा दंडक करून मला नेहमी त्रास दिला गेला, पण तो सहन करूनही मी स्वतःला समृध्द करीतच गेले!
गेल्या काही वर्षांत मी आर्मी सर्कल मध्ये हे बदललेले दृश्य बघते आहे. कुठल्याही कार्यक्रमात ऑफिसर्सच्या बायको मुलांची उपस्थिती कमी होत चालली आहे, कारण बायको दुसरीकडे मोठ्या हुद्द्यावर नोकरी करते, आणि मुलं दुसरीकडे शिकायला आहेत! अशा वेळी एकट्या रहाणाऱ्या ऑफिसर्सवर त्यांच्या नोकरीतल्या ताण तणावांव्यतिरिक्त कौटुंबिक दुराव्याने आणखीन ताण वाढतो. त्यामुळे आर्थिक प्रगती झाली तरी मनाची शांति आणि आंतरिक स्वास्थ्य बिघडलेलं दिसतं. जी मंडळी अशी व्यवस्था मान्य करतात, त्यांना अनेक समझोते करावे लागतात. त्याची तयारी असेल तर काही हरकत नाही. पण नेहमीच असे होतांना दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, आर्मीच्या कुठल्याही कार्यक्रमांना महिला आणि मुलांशिवाय रंगत, रौनक आणि मजा येत नाही!
आणि अशा ऑफिसर्सच्या बायकांशी बोलतांना त्यांची नोकरी करीत असल्याची घमेंड आणि त्यांच्याकडे असल्या कार्यक्रमांना फालतू वेळ नसल्याचा अहंभाव जाणवतो... म्हणजे आम्ही बायका ज्या इकडे रहातो, त्या काही कामाच्या नाहीत असे त्या दाखवण्याचा प्रयत्न करतात... मला जुन्या वळणाची म्हणा, पण मला हा दृष्टीकोन अजिबात पटत नाही. मी भानूच्या बाबांबरोबर प्रत्येक पोस्टिंगवर गेली आहे, जिथे आणि जसे राहावे लागले तिथे आणि तशी राहिले, घर संसार फुलवला, आणि आर्मी ऑफिसरची बायको म्हणून माझ्या वाट्याला आलेली सर्व कर्तव्य सर्व शक्तीनिशी यशस्वीरीत्य पार पाडित राहिले. आर्मीमध्ये महिला आणि मुलांसाठी अनेक कार्यक्रम, योजना राबवल्या जातात ज्यातून त्यांचे कौशल्य विकसित होऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा हेतू सध्या होतो. त्यांच्या सुरक्षेचा आणि विकासाचा विचार करणे हे मोठे काम होतांना दिसते,आणि हे काम ऑफिसर्सच्या बायकांच्या योगदानाशिवाय होत नाही. प्रत्येक फौजी हा एक फौज असतो असे म्हणतात आणि ते खरंही आहे! Every soldier is an Army in itself!
मी ३० वर्ष व्यवस्थित घर सांभाळलं, बाहेरची खिंडही लढवली.त्याचे फायदे समोर दिसतातच आहेत, पण त्याचं कधी कौतुक नाहीच झालं, वर मला अपमानित केलं गेलं... पण माझी सदसद्विवेकबुद्धी मला सांगते की मी संपूर्ण, साधक बाधक विचारांती घेतलेले निर्णय योग्यच होते, करण मी माझ्या मर्जीने नाही तर योग्य अयोग्यच्या निकषांवर निर्णय घेतले.    
नाशिक मध्ये आल्यावर विचार केला, आपल्याला इतक्या चांगल्या डिशेस येतात तर त्या आपण इकडे ह्या महिलांना शिकवूयात... पण इथेही त्रास होताच ... एकीकडे घरातल्या जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे ह्या कामात यश मिळवण्यासाठी धडपड ह्यात माझी हार झाली आणि हे कामही बंद पडलं... शिवाय महिलांचा फारसा प्रतिसाद नाही! मी इतकी मेहनत घेऊन, notes काढून, printout काढून, त्यांच्या सोयीच्या वेळेत क्लास घ्यायचे, नीट त्यांना समजेल अशा पध्दतीने शिकवायचे पण माशी कुठे शिंकते माहित नाही... माझा प्रामाणिकपणा, मेहनत, व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन काम करण्याची सवय... काहीच कधीच उपयोगी पडलं नाही.... अनेक दिवस, अनेक रात्री जागून ह्यावर विचार केला पण उत्तर सापडलं नाही...कदाचित माझी बुद्धीच अपुरी पडते..बस...
इथे कॉलनीत मैत्रिणी जोडल्या थोड्या, भिशी देखील चालू केली... तिथे मी tambola देखील खेळायला शिकवले...अगदी त्यांच्या आकलनाच्या कक्षेत राहून शिकवले...त्यांच्यासाठी छोटी छोटी बक्षीस अरेंज करायची, दिवाळीला वेगळा स्पेशल तंबोला असायचा! माझ्याकडची भिशी पार्टी मस्त, कल्पकतेने सादर केलेली असायची, खायला काहीतरी वेगळं, टेस्टी बनवायची थोदे डोकोरेशन पण असायचे!...थोडक्यात, कष्ट घेऊन हा प्रोग्राम अरेंज करायची. मी छोट्या छोट्या गिफ्ट्स सुध्दा द्यायचे! माझ्या आगळ्या वेगळ्या पध्दतीने सादर करायची मी. ह्या महिला गिफ्ट्स घेणार, खोटं खोटं तात्पुरतं माझं तोंडावर कौतुक करणार... आणि पाठीमागे माझ्याबद्दल काही ना काहीतरी खोटंच बोलायच्या...  त्यांच्या घरी गेलं की अगदीच थंड कार्यक्रम... आधी उशिरा यायचं, गप्पा मारायच्या, तंबोला खेळायचा, जिंकलं नाही तर कुरकुर करायची, आणि तेच ते रोजचच खायचं, की घरी पळायचं! संपला भिशी प्रोग्राम!
 पण त्यांना माझी एकूण personality फार वेगळी वाटायची! माझं वेगळेपण माझ्या कपड्यांतून, वागण्या बोलण्यातून दिसून यायचं...माझा वक्तशीरपणा, माझा आनंदी राहण्याचा स्वभाव त्यांना खचितच  आवडत नसे बहुधा... ही अशी नेहमी आनंदात कशी असते? हिला काही प्रोब्लेम दिसत नाही आयुष्यात...असं आपलं त्यांना वाटायचं! माझ्या आनंदाचं कारण असं आहे की मी माझं भावविश्व आणि त्यातल्या गुंतागुंतीचं गाठोडं माझ्या दारात सोडून बाहेर जाते, आणि बाहेरून  ऐकलेलं, बघितलेलं, अनुभवलेलं नकारात्मक उर्जा (depressing) जागवणारं भावनांचं गाठोडं बाहेरच टाकून घरात येते! दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये, अगोचर, अवघड प्रश्न विचारू नयेत असे मी मानते आणि मलाही कुणी ढवळाढवळ केलेली खपत नाही. पण ह्यांना गॉसिप मधेच तर जास्त रस! त्यांना मी खूपच शिष्ट वाटायची, कारण मी कुणाच्या खाजगी प्रश्नांना उत्तर द्यायची नाही! त्यामुळे मला त्यांच्या अंतर्गत खाजगी वर्तुळात घेतलं जायचं नाही...मला थोडीच हवी होती तिथे जागा? मी बोलले तर  त्या  बोलणार, मी नमस्कार केला तर त्या करणार असं सगळं होतं...पण मला ह्याची लहानपणा पासून सवय आहे. माझ्या मैत्रिणी होत्या, पण मला कुणा जिवाभावाच्या मैत्रिणींची गरजच नव्हती कारण मला माझ्या मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी कुणाचीच गरज कधीच भासली नाही! आणि असं काही दुःख वगैरे नव्हतंच तर काय आणि कुणाला आणि का सांगायचे? आम्हाला घरात भरपूर सुख होतं, दुःख कधीच नव्हतं! आणि असलंच दुःख तर ते आपण आपलंच सोडवायचं... काही गोष्टी आपोआप ठीक होतात..’कालाय तस्मै नमः’ नंतरच्या आयुष्यात बरंच दुःख पचवावं लागलं... हिसाब बराबर! तरी मी नेहमी आनंदातच राहिले. कधी जेंव्हा वातावरण गढूळ व्हायचं, मन खिन्न व्हायचं, उदास वाटायचं, किंवा आपलाच आपल्याला राग यायचा, सगळं चुकतंय की बरोबर हा संभ्रम पडायचा... तेंव्हा तेंव्हा मी स्वतःवर ताबा मिळवून, शांत राहिले आहे... क्षणात बदलणाऱ्या परिस्थितीला हसतमुखानं सामोरं गेली आहे, कारण मी अशा मूड मध्ये असेन आणि दुसऱ्या समोरचा व्यक्तीवर, जर मी हा राग काढला तर त्यच्यावर अन्याय नाही का? त्याची काय चूक? सो, झटकन मूड बदलायचा आणि पुढे व्हायचं! सोपं काहीच नव्हतं, पण प्रयत्न केला आणि जमलं थोडं थोडं....    
तरी देखील, माझ्याकडे प्रत्येकासाठी काहीतरी छान बोलायला असतं, काहीतरी विनोद करून सर्वांनी हसावं, बोलावं असा माझा प्रयत्न असतो. पण हेच नेमकं मंडळींच्या पचनी पडत नसावं! असो...
इतकी वर्ष घराला घरपण देत, स्वतःला अनेक अनुभवांनी समृध्द करीत एक चांगलं, परिपूर्ण आणि सुखी आयुष्य जगले... चांगले, वाईट, कडू गोड हर तऱ्हेचे अनुभव घेतले! कधी एकट उदास वाटलं, तर, मनाच्या गाभाऱ्यात जतन करून ठेवलेल्या, आनंद देणाऱ्या अनेक प्रसंगांची शिदोरी बाहेर काढते...आणि क्षणात माझ्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि मळभ दूर होतं!
किती तरी अनुभव आहेत जे सामान्य माणसाला मिळणे दुरापस्त! सांबा मध्ये असतांना बोर्डरवर जाऊन, दोन्ही देशांच्या सीमांच्या मध्ये  ज्याला ‘No man’s  land’ म्हणतात, त्या काही फुटांच्या जागेवर उभे राहण्याचा थरारक आणि अतिशय रोमांचक अनुभव घेतला! तिथे उभे राहिल्यावर, आजूबाजूचा परिसर न्याहाळला आणि देशाची सीमा काय असते ह्याचं प्रत्यंतर आलं. त्या सीमेचे दोन्हीकडे रक्षण करणारे सशस्त्र सैनिक बघितल्यावर डोळ्यात पाणी आणि हृदयात देशाभिमान भरून आला! सशस्त्र दलांना त्रिवार वंदन!!
सिमल्याला पोस्टिंग असतांना आम्ही दोघी नाशिकहून थोडे दिवस सुट्टीसाठी गेलो होतो. तेंव्हा एका रविवारी, गव्हर्नर कोकजे साहेबांचे चहासाठी आमंत्रण असल्याने खूप आनंदात त्यांच्या निवासस्थानी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास गेलो. ते मराठी असल्याने ही भेट खाजगी स्वरुपाची होती. युनिट मधले १०-१२  लोकं होतो. आम्ही गेलो, गव्हर्नर साहेब आले, आम्हाला भेटले, विचारपूस केली. थोड्याच वेळात छोट्या चणीच्या,हसमुख चेहऱ्याच्या, घरगुती वळणाच्या पण धारदार व्यक्तिमत्व असलेल्या सौ. कोकजे आल्या. त्यांनी पण ओळख करून घेतली. माझ्या चिरकाल स्मरणात राहिलेली छोटीशी पण लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्यांनी गव्हर्नर साहेबांच्या खांद्यावर हात ठेऊन, हळूच विचारले, ’ह्यांच्यासाठी चहा सांगितलाय न?’ माझ्या ओठांवर आलेले एक मिश्कील हसू मी महत्प्रयासाने रोखले! ह्याचे  कारण, गव्हर्नरच्या कार्यालयात होणाऱ्या सर्व बैठका, मीटिंग हे सर्व ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे चालू असतात. आणि चहापाणी, अल्पोपहार, पाहुण्यांची व्यवस्था ह्या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन काटेकोरपणे होत असते. त्याप्रमाणे चहा येणारच होता. पण एक गृहिणीचे कर्तव्य बजावण्याचे संस्कार त्यातून दिसले आणि ते मला भावले! अशा अनेक छान आठवणी घेऊन, आमच्या सन्माननीय यजमानांसोबत फोटो काढून त्यांचा निरोप घेतला!
युनिट आणि स्टेशन मधल्या family welfare meets, Ladies  meets, high tea, coffee  meets, बडा खाना जिकडे जवानांनी सादर केलेलेल्या विविधरंगी कार्यक्रमातून त्यांच्यातले अनेक गुणांचे दर्शन घडते आणि जवान, JCO आणि त्यांच्या कुटुंबांना भेटता येतं, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या विशेष सभा असे अनेकानेक कार्यक्रम! ह्या अशा भेटीगाठींतून बऱ्याच गोष्टी शिकायला आणि शिकवायला मिळतात. आपण एकमेकांना मदत करून पुढे जायचे ह्याचे संस्कार घडतात, सामाजिक तफावत दूर होते, प्रेम आणि सलोखा वाढतो! माझ्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्याचे समाधान आहेच, शिवाय मिळालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा मला नेहमीच मिळतो आहे!
आर्मीतली नोकरी म्हणजे ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ अशी गत! जिथे मिळेल, जसे मिळेल तसे निवासस्थान घ्यायचे आणि त्याचे अल्पावधीतच सुसज्ज ‘घर’ बनवायचे आणि तसेच टिकवायचे! आधी टेंट मध्ये, मग तात्पुरते मिळणाऱ्या घरात, आणि tenure संपता संपता मिळणाऱ्या permanent accommodation मध्ये... अशा चढत्या भांजणीत घरं बदलायची मानसिक आणि शारीरिक बळकटी हवी! वर्षागणिक वाढणाऱ्या ट्रंकांची संख्या, त्यात सामान शिस्तीत भरायचं, पुढच्या घरी सोडवून लावायचं आणि जेमतेम २ वर्षानंतर पुन्हा भरायचं म्हणजे एक मौज असायची माझ्यासाठी कारण मला हे सगळं फार आवडायचं, मी एन्जॉय करायचे!
रिटायर व्हायच्या आधी अनेक ट्रंका, अनेक चांगल्या पण अनावश्यक वस्तू देऊन टाकल्या आणि तरी जवळपास ४० लहान मोठ्या ट्रंका आणि इतर सामान ट्रकमध्ये टाकून नाशिकला पोहोचले आणि सगळ्या खोल्या सामानाने भरून गेल्या होत्या! ते दृश्य पाहून माझ्या मनात काय काय भाव तरळून गेले माहित नाही... थक्क झाले, आश्चर्यचकित झाले, हबकले, आपल्याकडे खरंच एवढे सारे सामान आहे असे वाटून थबकले? सामानापुढे घर अगदीच छोटं भासायला लागलं आणि एवढे सामान कुठे ठेवणार असा यक्षप्रश्न माझ्या पुढे आ वासून उभं राहिला... आणि पुढे तीन चार दिवस नुसते सामानाकडे बघण्यातच घालवले! काहीच सुचत नव्हते कारण तिथे कोणतेही फर्निचर, modular kitchen, कपाटं काहीच नव्हते त्यामुळे काय करावं सुचतच नव्हतं! पण बँक, भानुप्रियाची कॉलेजची admission, dishtv चे कनेक्शन, gas कनेक्शन वगैरे अनेक प्राथमिक कामं हातात घेणं आवश्यक होतं, त्यामुळे जुजबी सामान काढून घर चालू केलं! मग हळू हळू फर्निचर आलं, कपाटं आली, आणि घर लागत गेलं! आणि मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आता हे आपलं कायमस्वरूपी घर आहे! म्हणजे आता कुठेही बदलीवर जायचं नाहीये! नो packing नो unpacking! वाह! किती छान वाटतं होतं! पण पुढे बरेच दिवस एकदम मनात यायचं... अरे.. कुठं जायचं नाही पोस्टिंगवर? (हा.. हा..) काही दिवसातच आजूबाजूच्या लोकांशी ओळख झाली, पण गेल्या ३० वर्षांतल्या सर्व गोष्टी मी मिस करणार होते... तो आनंद, नवीन ठिकाणं, नवीन लोकं, खाण्या पिण्याची चंगळ, ती शानदार जीवनपध्दती... सगळं खूप एन्जॉय केलं म्हणून तर... आता ह्या आठवणी जपून ठेवायच्या आणि सुगंध घेत रहायचा! ह्या नोकरीतल्या अस्थिरतेचे, धोक्यांचा मी फारसं टेन्शन घेतलं नाही, कारण माझा तो स्वभाव नाही. भीती असते, पण सारखं भितीची भिती घेत बसलं, तर ही भीतीच आपल्याला नष्ट करू शकते. उद्याच्या भीतीने आजचे जगणे दुःखी करणार तर मग जगणार कधी? आयुष्य जगतांना थोडी खबरदारी घ्यायची, थोडी जोखीम घ्यायची, थोडी हुशारी वापरायची, थोडी कल्पकता वापरायची, आणि जिथे आपल्या शक्ति कमी पडतायत असं वाटतं ते सर्व भगवंताच्या चरणी ठेऊन थोडं थोडं करीत आयुष्याला मुठीत बंद करीत चालत रहायचं! ह्या इंनिंग मधलं आयुष्य एकदम वेगळं असणार होतं, आणि मी त्यासाठी एकदम तयार होते!
भानुप्रियाची १२वी झाली होती, आणि तिच्या कॉलेजच्या admission ची गडबड सुरु झाली. तिने कॉमर्सला admission घेतली. सोबतच LLB चा कोर्स करायला घेतला. पाठोपाठ कंपनी सेक्रेटरी च्या कोर्स साठी दाखल झाली... बापरे..एवढे सगळे अभ्यासक्रम एकत्र?  ह्यात अभ्यास, मेहनत, वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन फार आवश्यक होतं. २०११ मध्ये पदवी नंतर तिने एकीकडे अभ्यास चालू ठेऊन नोकरी सुरु केली.
CS आणि LLB ची मोठी जाडी पुस्तकं दिवस दिवस खोलीत पसरलेली असायची! तिला ज्या विषयात शंका असायच्या, ती पुस्तकं मी वाचून, तिला संध्याकाळी समजून सांगायची. मला अभ्यास करायला फार आवडायचा कारण मला परत विद्यार्थी होता आले, आणि खुप सारे ज्ञान मिळवता आले! म्हणजे एकीकडे विद्यार्थी आणि दुसरीकडे शिक्षक! मजा आली ह्या दिवसात!  शिवाय माझी बुद्धी अजून तितकीच तल्लख आहे ह्याची पुन्हा नव्याने खात्री झाली. ज्या आत्मविश्वासाने मी तिला लहानपणापासून शिकवलं, तो आत्मविश्वास आणखीन दृढ झाला! वर्ग बदलले, विषय बदलले, शिकवण्याच्या पध्दती बदलल्या, पण तिला शिकवून एक चांगले व्यक्तिमत्व घडवण्याची तळमळ मात्र तिचं राहिली! अशा कठीण परीक्षांमध्ये मानसिक संतुलन ठेवणे फार गरजेचे असते, कारण थोडे जरी इकडे तिकडे झाले तर अभ्यासावर आणि पर्यायाने मार्कांवर परिणाम होतो. एकदा आत्मविश्वास ढासळला आणि मनोधैर्य खचले की गोष्टी खूप अवघड होऊन बसतात. तर तिचं मनोबल उत्तम ठेवण्यासाठी मला पण खूप मेहनत घ्यावी लागली. एकप्रकारे जागता पहाराच ठेवला होता इतके वर्ष! तिच्या स्वतःच्या मेहनतीने, आणि अथक प्रयत्नाने तिनं हे दोन्ही कोर्स उत्तम गुण मिळवून वेळेत पूर्ण केले!! हे श्रेय पूर्णपणे तिचं आहे!! कारण देणाऱ्याने कितीही दिलं, तरी घेणाऱ्याने घेतले पाहिजे ना? पण तिनं घेतलं... भरभरून घेतलं!
आज लग्नानंतर सुध्दा हे शिकणे शिकवणे चालूच आहे बरं! आता विषय बदललेत इतकंच. शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास ह्यावरून गाडी पुढे कुटुंब व्यवस्थापन, बालसंगोपन, पाकसिद्धी ह्याकडे वळली आहे. ह्या सर्व विषयांवर माझ्या आईशी मी आजही चर्चा करते, सल्ला घेते! म्हणजे दुनिया गोल आहे!  आणि हो, मनातल्या गुजगोष्टी तर होतच असतात ना! नितीन म्हणतो तसं...माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो! कारण ज्याक्षणी कुणी म्हणेल की मला सगळं येतं त्याक्षणी त्याची अधोगती निश्चित आहे! तंत्रज्ञानाचेच पहा ना... आमच्या आईची छोट्या, बेसिक फोन पासून सुरुवात झाली आणि आज ती tech-savvy झाली आहे! फोनचा वापर फक्त एकमेकांत संवादासाठी न रहाता  माहिती आणि मनोरंजनासाठी पुरेपूर करून घेते! फोन मधल्या नव्या नव्या घडामोडींची माहिती करून घेण्याची तिची धडपड आणि उत्सुकता वाखाणण्यासारखी आहे. ह्याच जिद्दीमुळे तिनं आयुष्यात  आलेल्या अनेक प्रसंगांना तोंड दिले आहे. ह्यालाच मी यश म्हणते. त्या मापदंडाने मी पण माझ्या आयुष्यात यशस्वी झाले असे माझे ठाम मत आहे. जो कुणी आयुष्याला बेधडक सामोरे जातो, दोन हात करतो आणि आपत्तींवर स्वार होतो तो यशस्वी म्हणवतो! अडचणींना घाबरून मैदान सोडून पळ काढणारे, हरण्याच्या भितीने आव्हानांना सामोरे न जाणारे, आपल्या क्षमतेचे १००% योगदान न देणारे हे लढाईच्या आधीच पराजित होतात.
इथे मला सोशल मिडियावर बघितलेली गोष्ट सांगावीशी वाटते... वक्त्यांनी काही श्रोते मंडळींना ५० रुपयांची कोरी नोट दिली आणि त्या पैशात तुम्ही काय काय विकत घेऊ शकता ह्याची काही उदाहरण मागितली. नंतर त्याला चुरगळून मागच्या खिशात ठेवायला सांगितली. उर्वरीत कार्यक्रम झाल्यानंतर, त्याच वक्त्यांनी सगळ्यांना ती नोट बाहेर काढून त्याच्या घड्या नीट करायला सांगितल्या. आता त्यांनी विचारलं की ह्या नोटेचे मूल्य कमी झाले आहे का? सगळ्यांनी नकार दिला! मग ते म्हणाले, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला ह्या नोटेची विचारसरणी अंगीकारावी लागेल. लोकं तुमचा अपमान करतील, तुमचा पाणउतारा करतील, आत्मविश्वास चूर करायचा प्रयत्न होईल, पण तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवर, हिमतीवर पूर्ण विश्वास असेल, स्वतःची किंमत माहित असेल तर तुम्हाला यश नक्की मिळणार! त्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतांचं, मर्यादांचं वेळोवेळी तटस्थपणे आणि निष्पक्षपणे योग्य मूल्यमापन करता आलं पाहिजे आणि सोबतच सुधारणा करण्याची, सकारात्मक बदल घडवून आणायची मानसिकता असावी लागेल.
कोणतंही काम हाती घेतांना अचानक अनपेक्षित अडचणींचा धोका नेहमीच संभवतो. तेंव्हा                          यश प्राप्त होण्यासाठी प्रत्येक कामासाठी  plan ‘A’ सोबतच ‘B’, ‘C’ आणि जमल्यास ‘D’ देखील तयार हवा! मी बहुतेक वेळा ह्याचा अवलंब करते, पण... कधी कधी अपघात आणि अनर्थ टाळता येत  नाहीत...  ‘’Hope for the best and be prepared for the worst!’’
काही काही घटना अनपेक्षितपणे, तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता आणि पूर्वतयारी करण्यासाठी वेळ न देता वेगाने घडतात! एखाद्या आपत्तीच्या, गोंधळाच्या किंवा अवघड प्रसंगी आपल्याला आपले मित्र, शुभेच्छुक, आपल्या हितचिंतकांची खरी ओळख होते. चांगल्या वाईटाची, भल्या बुऱ्याची पारख होते. आयुष्याच्या अनोळखी पैलूंचे विलक्षण दर्शन घडते! आपलेपणाने मदतीला आलेला एखादा नवीन सवंगडी मिळतो किंवा एखादा चांगला सवंगडी साथ सोडून जातो... कधी विश्वासू माणसं गवसतात, कधी विश्वासघात करणाऱ्यांचे पितळ उघडे पडते...
नाशिकमधे नुकतेच रहायला आलो तेंव्हाची गोष्ट... एक दिवशी भानुप्रियाला दुपारी घरी येतांना कॉलनीतल्या टेम्पोवाल्याने धडक दिली आणि नाकाला मार बसला. माझ्या फोनवर तिने मला हा प्रकार सांगितला आणि लगेच तिथे यायला सांगितले. त्याच दिवशी सकाळी भानुचे बाबा पुण्याला काही कामासाठी गेले होते आणि दोन तीन दिवसांनी येणार होते. त्या दिवशी युनिट मधले २ जवान आमच्याकडे बगीचाचे काम करीत होते. त्यातल्या सचिनकडे मोटरसायकल होती. तो म्हणाला ‘बसा पटकन जाऊ तिकडे.’ मी त्याच्या बरोबर गेले, भानुप्रियाला हॉस्पिटलला नेलं आणि उपचार सुरु झाले. मला काही रक्कम भरायला सांगितली पण मी फारसे पैसे सोबत आणले नव्हते त्यामुळे नंतर देते असे सांगितले, पण त्यांनी नकार दिला. हि गोष्ट मी सचिनभैय्याला सांगितली. तर तो म्हणाला काही चिंता करू नका. जो दुसरा जवान आपल्याकडे काम करतोय त्याच्याकडे जमिनीच्या सौद्याचे बरेच पैसे आहेत, मी घेऊन येतो. पैशांची सोय झाली, भानुप्रियाला २-३ दिवस admit केले होते, त्यामुळे मी बिझी होते. रोज मी सचिनच्या मोटरसायकलवर जात येत होते, कारण ते हॉस्पिटल अडनिड्या ठिकाणी होते, सामानाचा ट्रक पोहोचला नव्हता आणि कोणतीच सोय नव्हती दुसरी. दुसरा जवान घरी लक्ष ठेऊन होता. बऱ्याच दिवसांनी मी विचार करत होते... आर्मी सर्विसमध्ये असे जवनासोबत मोटरसायकलवर जाणं शक्य तरी होतं का? एक तर गरजच पडली नसती, कारण तिथे सगळ्या सोयी होतात ताबडतोब. पण इथे सिविल एरिया होती, मोटरसायकलवर जाणं सामान्य गोष्ट होती त्यामुळे  कुणी फारसं लक्ष देत नाही. पण हे दोघेजण माझ्यासाठी देवदूत होते! त्यांचे आभार मानण्यासाठी नव्हे, तर माझ्या संकट समयी मदतीचा हात पुढे करून माझं आयुष्य समृध्द केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि माझ्या आनंदासाठी त्यांना चांदीची नाणी आठवणरूपाने रहावे म्हणून दिली! अशा अडचणींच्या वेळी मला देवाचे दर्शन होतेच! निदान मला तरी अशा अनेक प्रसंगात देव भेटला आहे.. तोच मला आव्हानं पेलण्याचे बळ देतो, कठीण प्रश्नांची उकल करण्याची बुद्धी देतो, आणि माझ्या योग्यतेनुसार मला शाबासकी देखील देतो!
ह्याच्या पुढल्याच वर्षी डिसेम्बर मधे ड्रायव्हिंग स्कूल च्या गाडीचा अपघात झाला आणि माझ्या हाताचे कोपराचे हाड मोडले. माझे चालवून झाले होते म्हणून मी मागे बसले होते. थोड्याच वेळात डाव्या बाजूने येणारी लोगन एकदम उजवीकडे वळली आणि आमच्या गाडीवर धडकली... बम्पर टू बम्पर... पण आमच्या इन्स्ट्रक्टरच्या सावधगिरीमुळे आम्ही गाडी डावीकडे घेतलीच, शिवाय कुठलेही वाहन तेंव्हा आले नाही म्हणून मोठा अपघात टळला! पण माझं डाव्या हाताच्या कोपराचे हाड fracture झाले. बाकीच्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. भानुचे बाबा पण होते गाडी शिकायला. ते एक बरं झालं, नाहीतर माझ्यामुळेच अपघात झाला असे नवीन खापर माझ्यावर फोडले असते... असो...म्हणजे माझी काहीच चुकी नाही तरी माझ्यावरच संकट ओढवलं! पण मी नंतर हा विचार केला की ह्यापेक्षा भयंकर होऊ शकत होतं, ते त्या विधात्याच्या कृपेने टळलं! जीवावर बेतलं होतं ते हातावर निभावलं....माझ्यावर हा वार घेऊन बाकीच्यांना वाचवलं होतं त्यानं असं म्हणते मी!
ह्या अपघाता संबंधी जेंव्हा कोर्टात केस चालू होती, तेंव्हा माझे वकील सारखे नुकसानभरपाईचे पैसे वाढवून सांगू असा घोषा धरायचे. पण मी? मला त्या गाडीवाल्या इसमा साठी सहानुभूती वाटतं होती, ज्याच्यावर मी खटला दाखल केला होता! आहे की नाही कमाल? त्याला कारण अगदी साधसंच होतं... देव न करो, असा काही बारा वाईट प्रसंग माझ्या घरातल्या व्यक्ती, मित्र, स्नेही ह्यांच्या बाबतीत  घडला असता, तर माझ्या मनाची काय अवस्था झाली असती? असं संकट तर दुष्मनावर देखील येऊ नये असे विचार बाबा आई नेहमी शिकवायचे! मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेचे मला काहीच आकर्षण किंवा अट्टाहास नव्हताच मुळी! जे पैसे असतील ते मला मान्य होते, कारण अपघाताची नोंद व्हावी हा हेतू होता ना की पैसे किती जास्त मिळतील हा... त्या व्यक्तीने येऊन त्याचं चुकल्याची कबुली दिली असती ना, तरी मी ही केस केली नसती... पण ती मंडळी साधं भेटायला नाही आली, आणि वर केसमध्ये अडथळे आणत होते, त्याची मला चीड आली होती... म्हणून हा मुर्खांचा प्रपंच मांडला! अशा गोष्टींमधून मिळणारे पैसे हे कधीही कोणतंही शाश्वत सुख देऊ शकत नाहीतच, आणि पुन्हा अशाच कुठल्यातरी कारणासाठी खर्च होऊन जातात ह्याची खुणगाठ माझ्या मनात पक्की आहे म्हणूनच आलेल्या पैशांतून काही पैसे समाज सेवेत खर्च करून काही व्यक्तींच्या जीवनात थोडे आनंदाचे क्षण आणण्याचे समाधान मिळवले आणि उरलेले पैसे मार्गी लावले.
जेंव्हा अभिषेक गेला, तेंव्हा पण मी हीच भूमिका मांडली होती. आम्ही त्याचा पहिला वाढदिवस  पुण्यात साजरा केला. त्याच्या बाबांनी श्रीनगरला येण्याचा आग्रह धरला. त्याला थंडीत नेऊ नये असं माझं मत होतं, पण माझं काही ऐकलं नाही. सप्टेंबर मध्ये २१ दिवस आम्ही तिकडे गेलो. १७ तारखेला आम्ही परत आलो, आणि १८ ला संध्याकाळी त्याला हॉस्पिटल मध्ये नेले असतांना त्याचा bronchaitis मुळे अचानक मृत्यू ओढवला.... माझ्या मांडीवर होता तो तेंव्हा... आई बरोबर होतीच...
ज्या हॉस्पिटल मध्ये मी गेले होते, त्या डॉक्टरना अभिषेक आणि त्याच्या प्रकृती बाबत संपूर्ण माहिती होती, कारण श्रीनगरला जाण्याअगोदर मी त्याची सगळी औषधं त्यांच्याकडूनच घेऊन गेले होते. बरं, २० मिनिटं तुम्ही त्याला तपासताय आणि तुम्हाला त्याच्या इन्फेक्शनचा पत्ता लागू नये? नामांकित बालरोगतज्ञ असून त्यांना कळलं नाही? काहीतरी चुकतंय हे लक्षात आल्यावर त्यांनी त्याला खाली ICU मध्ये का नेले नाही? नुसती औषधं देऊन का भागावलं? त्याच्यावर त्वरित उपचार करणं गरजेचं होतं, हे त्यांनी ओळखलं नाही का? जर त्यांनी तत्परतेनं उपाययोजना केली असती तर? नशीब आपली खेळी खेळतच असते, पण आपण आपले संपूर्ण कर्तव्य निभावले नाही, संपूर्ण हिमतीनिशी आलेल्या प्रसंगाचा सामना नाही केला तर, आपली काय किंमत रहाते? मी स्वतःला आजही अभिषेकच्या मृत्यूला कारणीभूत मानते, कारण मी तेंव्हा काहीच करू शकले नाही... त्या संध्याकाळी आम्ही त्याला घरी नेण्याच्या तयारीत होतो, तेंव्हा त्या डॉक्टरांच्या वकील सौभाग्यवती आल्या आणि आम्हाला आडून आडून विचारत होत्या, अंदाज घेत होत्या की आम्ही काही केस वगैरे करणार आहोत का म्हणून. मी त्यांना स्पष्ट सांगितलं..’ माझा मुलगा परत द्या, मी तुम्हाला लाखो रुपये देते. पण तो मिळणार नसेल, तर मला त्या लाखो रुपयांचे काडीचेही प्रलोभन नाही!’ माझ्या आणि भानुप्रियाच्या आयुष्यातली उणीव कितीही पैसे दिले तरी कधीही भरून निघणारी नव्हती....
२००९ मध्ये रिटायर झाल्यावर भानूच्या बाबांनी जिल्हा सैनिक अधिकारी म्हणून काही वर्ष नोकरी केली... जळगाव, बुलडाणा, रत्नागिरी, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी नोकरी करून शेवटी नाशिक ऑफिस मधून रिटायर झाले. तोवर भानुप्रियाचे LLB, CS पूर्ण हून ती २०१३ -१४ मध्ये  अंबड मध्ये नोकरीला लागल्यापासून मला खूप समाधान वाटत होते! पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं... आता आराम मी करीत होते आणि भानुप्रिया माझे लाड पुरवीत होती!!! सिनेम, नाटक, mall मध्ये shopping, काही विचारू नका! आता बिलाचे पैसे पण तीच भरायची... मजा!!! कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजनापासून ते त्याच्या अंमलबजावणीपर्यंतची सर्व जबाबदारी ती छानपणे पेलतांना बघून खूप आनंद व्हायचा! आम्ही एकमेकींचे वाढदिवस मजेत सेलिब्रेट करायचो... भटकंती, खाणे, पिणे, आणि एकंदर मजेचे दिवस होते...एकदम जादूभरे! तिचा २५ वा वाढदिवस... तिच्या मित्रमैत्रिणींना बोलावून, तिला तिच्या आवडत्या हॉटेल मध्ये, surprise party आयोजित केली! खूप धमाल आली! तिच्या आवडीच्या वस्तू fondant मध्ये बनवून केक ऑर्डर केला होता! fondant चा केक हे आमच्या दोघींचे बरेच दिवसांचे स्वप्न ह्या निमित्ताने पूर्ण झाले!!
ह्या वाढदिवसाच्या आधी आम्ही दोघींनी केलेली चेन्नई पोंडीचेरीची ट्रीप अविस्मरणीय आहे! किती मजा केली आम्ही दोघींनी... तो प्रवास, समुद्रावरची मजा, भटकंती, खादंती आणि बरंच काही! आणि हो, खरेदी कशी विसरणार? चेन्नई मध्ये सिल्कच्या पारंपारिक वारसा सांगणाऱ्या सुंदर साड्या खरेदी केल्या, त्यानंतर तिच्या आवडीची temple jewellery घेतली जी तिला ह्या ट्रीपची आठवण करून देते! छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मात्र मोठा  असतो, नाही?  ह्या ट्रीपची वेळ पण छान साधली होती, कारण तिच्या २५ व्या वाढदिवसानंतर लगेचच भानुप्रियाचं लग्न झालं!
एप्रिल 15 २०१५ ला भानुप्रियाचं लग्न झालं तो सोहळा माझ्या डोळ्यासमोर आहे... अगदी  कालपरवा घडल्यासारखा!!! भानुप्रियाचं लग्न म्हणजे सुंदर, आनंदी क्षणांची मालिकाच आहे! सगळं किती झट की पट झालं! फक्त ३० दिवस... लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंत!
आम्ही तिघे रविशंकर आणि त्यांच्या बाबांना भेटायला बंगलोरला गेलो होतो. त्यांना भेटून आम्हाला छान वाटलं... थोड्या औपचारिक गप्पा करून, आणि चहा घेऊन आम्ही गेस्ट रुममध्ये परत आलो. हे स्थळ आम्हाला आवडलं होतं, मुलगा आवडला होता. पुन्हा भेटण्याला दुजोरा मिळाला. मग दुसऱ्या दिवशी आमच्या गेस्ट रूम वर दोघे आले, आणि दोन्हीकडच्या मंडळींनी आणखीन सखोल माहिती करून घेतली. रविशंकर आणि भानूप्रिया ह्यांनी एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, विचार मांडले, आणि पसंती कळवली. आम्ही त्याच दिवशी नाशिकला परत आलो. आणि त्याच दिवशी आम्हाला अकोलेकरांनी ते दोघे नाशिकला येत असल्याचे कळवले! आणि आमचं त्रिकूट घर सज्ज करायच्या तयारीला लागलं!
अकोलेकर मंडळी सकाळी आली, पुन्हा गप्पा झाल्या, आणि गोष्टी काही निर्णयाप्रत येऊन पोहोचल्या! आमचा होकार होताच आणि ह्या दोघांनी तर आधीच निर्णय घेतला होता! अशा रितीने लग्न ठरले! आणि आता पुढच्या तयारीला लागायचं होतं! दुपारी पुरणपोळीचे जेवण झाले, आणि थोडी विश्रांती झाल्यावर, पुन्हा हालचालींना वेग आला! रविशंकर आणि भानुप्रिया बरोबर मी shopping साठी बाहेर पडले. दोघांचे कपडे, त्यांच्या आवडीने साखरपुड्याच्या अंगठ्या अशी जय्यत तयारी करून घरी आलो! मला रविशंकरनी एक साडी दिली जी मला फार आवडते! काहीतरी वेगळंच वाटत होतं... एकीकडे आनंद, दुसरीकडे मनात हुरहूर, भीती, थोडं टेन्शन... पण खुश मात्र होते मी!
दुसऱ्या दिवशीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम ठरवून दोघे हॉटेलवर परत गेले. दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम नीट आणि सुरळीत पार पडण्याची उत्सुकता आणि कामांची पूर्तता करण्याची चिंता ह्यामुळे आमची मात्र इकडे झोप उडाली! माझ्या डोक्यात तर अनेकानेक योजना फेर धरीत होत्या आणि कामांची यादी तयार होत होती!
आई, बाबा, मोहिनी वहिनी आणि ऋषिकेशला ही गोड बातमी देऊन त्यांना दुसऱ्या दिवशीच्या  साखरपुड्याच्या कार्यक्रमाला बोलावणं करण्यात आलं. आई बाबा तर प्रचंड खुश होते! त्यांच्या पहिल्या आणि अतिशय लाडक्या नातीचं लग्न ठरलं होतं! तिला पण आजी आजोबांचा विशेष लळा होताच!
आई बाबा आमच्या पोस्टिंगच्या प्रत्येक ठिकाणी आलेले आहेत. लखनौ, पुणे, देवळाली, बंगलोर, सांबा सगळीकडे. पुण्यात तर आम्ही रहात होतो तेंव्हा भानुप्रियाला त्यांचा भरपूर सहवास मिळाला होता. इतर ठिकाणी पण ते नेहमीच यायचे. देवळालीत पण अनेकदा यायचे. त्याची परत जायची वेळ झाली की तिला अजिबात आवडायचं नाही...पुण्यात तर एक किस्सा चांगला आठवतो मला... तेंव्हा बाबा vespa चालवायचे. एकदा संध्याकाळी दोघेही निघाले हडपसरला परत जायला. आता आजोबा अगदी बूट घालणार, तेवढ्यात भानू त्यांना म्हणाली, आजोबा, मला संस्कृतमध्ये काही शंका आहेत. झालं... आजोबांचे पाय तिथल्या तिथे थांबले!!! मग तिनं थोडा वेळ TP करवला त्यांचा, आणि मग ते गेले! मला फार हसू यायचं ह्या तिच्या गोड फसवणुकीचं! ते दोघं पण तिच्या बरोबर रमायचे... पुस्तकं वाचायची, अभ्यास घ्यायचा, गोष्टी सांगायच्या, फिरायला न्यायचं, लाड पुरवायचे... सगळीकडे ते येऊन राहिलेले आहेत, त्यामुळे तिला तिच्या २५ वर्षांत खूप खूप प्रेम आणि  भरभरून आशीर्वाद मिळाले आहेत! आम्ही जेवढे मोकळेपणाने आई बाबांबरोबर बोललो, त्याच मोकळेपणाने ती त्यांच्या बरोबर कोणत्याही विषयावर बोलू शकते, ह्यातच त्यांच्या प्रगल्भतेचे आणि पुरोगामी विचारसरणीचे दर्शन घडते! ह्याच स्वभावामुळे त्यांनी सर्वांना आपल्या आकर्षित पण केले आहे, आणि नातेसंबंध टिकवून वाढीस लावले आहेत.
तर, साखरपुड्याची तयारी केली! ह्याची पूजा ज्ञानप्रबोधिनी पध्दतीनं मीच केली! दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या, सर्वांचे आशीर्वाद घेतले! संपूर्ण दिवस खूप धावपळीचा पण तितकाच आनंदाचा, समाधानाचा गेला! त्यानंतर हॉटेल मध्ये सर्वांसाठी जेवणाचा कार्यक्रम पार पडला...त्याच हॉटेलमध्ये नंतर २०१८ मध्ये आम्ही रुद्रांशचा पहिला वाढदिवस साजरा केला!
दुसऱ्या दिवशी पाहुण्यांना निरोप देऊन आम्ही तिघे आता सज्ज झालो एका मोठ्या कामगिरीसाठी! सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लग्नाचा मुहूर्त ठरवायचा... रविशंकरच्या दोघी बहिणी एप्रिल मध्ये सुट्टीवर येणार होत्या, त्यामुळे एप्रिल १० चा मुहूर्त मिळाला, आणि घरात वेगाने हालचाली सुरु झाल्या! कारण फक्त तीन आठवडे होते लग्नाला! कामाच्या याद्या बनल्या आणि सर्वजण होशात कामाला लागले...सर्वप्रथम लग्नासाठी योग्य ठिकाण शोधलं...हॉटेल जुपीटर! पाहुण्यांची रहाण्याची, संपूर्ण सोहळ्याची, सजावटीची, जेवणाखाण्याची सर्व सोय एकाच ठिकाणी झाली! संपूर्ण कार्यक्रमाचं कंत्राट दिल्यामुळे बरीचशी धावाधाव, पळापळ, आणि गैरसोय टळली! मेनू ठरला...food tasting sessions मध्ये खूप मजा आली! आता आम्ही इतर बाबींकडे बघायला सुरुवात केली...
कपडे... साड्या...दागिने.... आमंत्रण पत्रिका, पाहुण्यांच्या याद्या... नुसती धमाल होती! आता रोज आम्ही दोघी बाजाराकडे निघायला सुरुवात केली... अक्षरशः दमून जायचो. यादीप्रमाणे, शिस्तशीर सर्व कामं होतं होती, कारण वेळ कमी होता आणि वाया घालवायला एकही क्षण नव्हता! खरेदी हा माझा अत्यंत लाडका छंद, आणि आता तर इतकी सारी बाजारहाट! वाह! मजा आली! साड्या निवडून, घालून बघायच्या, लग्नातल्या प्रत्येक विधी प्रमाणे योग्य साडी निवडायची... त्यासाठी दागिने, इतर साजसामान खरेदी करायचं...  पैठणी, बनारसी, नऊवारी... साडी कोणतीही असो, आमची खरेदी अक्षरशः रेकॉर्ड वेळेत व्हायची आणि दोघींची पसंती पण एकच असायची! नंतर आई बाबा रहायला आले आणि आम्ही दागिन्यांच्या खरेदीसाठी बाहेर पडलो! wow! ही पण खरेदी भारी झाली! दागिना तर सुंदरच, पण त्यासोबतची आठवण तर आणखीनच सुंदर!
घरी देवक ठेवणे, ग्रहमख वगैरे पूजांची जबाबदारी बाबांनी उचलली, तर लग्नाच्या आदल्या दिवशी रविशंकरच्या मौजीबंधनापासून ते लग्न लागे पर्यंतच्या सर्व विधींची जबाबदारी अश्वीनीवर सोपवून मी त्या दृष्टीने निर्धास्त झाले होते! तिनं पण सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली!!
एक सुंदर लग्न पत्रिका निवडून, छापून आमंत्रितांना पाठवायला सुरुवात झाली! लग्नाच्या दोन दिवस आधी घरापुढे मांडव टाकला, रांगोळ्या काढल्या, दारावर तोरण लावले, रोषणाई केली, आणि लग्नघर सजलं की हो!!! मी स्वतःच्या हातांनी, प्रेमानं हळद बनवली नवरा नवरी साठी! त्यातली अर्धी हळद, दारातल्या आंब्याच्या हिरव्याकंच पानांनी झाकून नवऱ्या मुलाकडे पाठवून दिली!
८ तारखेला, ग्रहमख पूजन झाले, आणि संध्याकाळी सनई चौघड्यांच्या मंगल सुरांत व्याही भोजन पार पडले! सर्व महिला वर्गाने चुडा भरला, हातांवर मेंदी रंगायला सुरुवात झाली! सर्वांनी नवऱ्यामुलीला आशीर्वाद दिले... आता दोन दिवस ती कुठेही बाहेर पडणार नव्हती...  आणि सर्वांना मंगलपरिणयाच्या दिवसाचे वेध लागले! आता उरलेल्या बारीक सारी तयारींना वेग आला...
९ तारखेला सकाळी भानुप्रियाला हळद लागली! तिला  न्हाऊ माखू घातले, आणि खूप सारे आशीर्वाद दिले, तिच्यासाठी मंगलकामना केली! आई, मी, प्रमोदिनी.... सगळेच खूप भावूक झालो!
सर्वांना लवकर तयार होता यावे म्हणून संध्याकाळी आम्ही तिघे सोडून सर्व मंडळी हॉटेलवर गेली. दुसऱ्या दिवशी, देवांना नमस्कार करून, गाडीपुढे नारळ वाढवून लग्नघराकडे निघालो! आज आम्हा सर्वांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस होता... अतिशय मंगल आणि आनंदाचा!
लग्नघरात मी जरी अग्रस्थानी असले, तरी मला अनेक प्रकारांनी, अनेक गोष्टींमध्ये मदत करणारी बरीच मंडळी होती. भानुप्रियाचा मेकअप, विधींची पूर्तता, पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांची सरबराई, इतर कामं.... सर्व हात आपापली कामं करीत मला कार्यक्रम सुनियोजित पध्दतीनं संपन्न करण्यासाठी झटत होते.
लग्न ज्ञानप्रबोधिनीच्या पध्दतीनं संपन्न होणार होतं... मी सर्व विधी अगदी लक्षपूर्वक बघत होते, त्याचा आनंद डोळ्यात साठवत होते... कन्यादान, होमहवन, मंगलसूत्रबंधन, सप्तपदी असे अनेक महत्वाचे विधी पूर्ण करीत, लग्नघटिका समीप आली....मामा मंडळी जमली, अंतरपाट धरला आणि.... ह्या क्षणासाठी माझी तयारी नव्हती... जशा मंगलाष्टकांचे सूर कानी पडत होते, त्यांचा अर्थ जणूकाही आत्ताच लागत होता! मी एकीकडे उभी होते, सर्वापासून दूर... डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या... अवचित....अनिर्बंध....’शुभ मंगल सावधान!!!’ ह्या काही घटकांमध्ये मला लेकीचे लग्न करून देण्याचे मर्म लक्षात आले! आई बाबांचे मर्म खऱ्या अर्थाने कळले! अंतरपाट दूर झाला, वधु वरांनी एकमेकांना माळा घालून, नवरा बायकोचे पवित्र नाते धारण केले! सर्व ज्येष्ठ मंडळींनी आशीर्वाद दिले! प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या विचारांचे तरंग उठत असतील... बाबांना इतके भावूक होतांना मी क्वचितच पहिले होते... आई पण भावूक झाली होती...त्यांच्या नातीचे लग्न! आता त्यांना नातजावई आला! केवढ भाग्य!! माझ्या मनावर खूप दिवसांपासून असलेलं एक अनामिक ओझं उतरलं... आणि मी हसतमुखाने, आनंदाने, सर्वांचे अभिनंदन स्वीकारत, सगळ्यामध्ये पुन्हा सामील झाले! सर्व विधी पार पडले! नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. नवरा- नवरीसाठी चांदीच्या ताटात जेवण वाढले... आता ‘उखाण्याची’ वेळ आली! भानुप्रियाने एकदम बिनधास्तपणे, सुंदर उखाणे घेतले! रविशंकरना पण उखाण्याचा आग्रह होत होता आणि ते हसून विषय टाळत होते! मग मी त्यांना त्यांच्यासाठी खास करून आणलेले उखाणे संगितले.(आम्हाला दोघींना ह्याची आधीच कल्पना होती, त्यामुळे आम्हीच हे उखाणे तयार केले होते!) मग मात्र त्यांनी खिलाडूवृत्तीने नाव घेतले, आणि सगळी मंडळी खुश झाली!
संध्याकाळी रिसेप्शन अगदी शानदार, झोकदार झाले! नवपरिणीत जोडीला शुभाशिर्वाद द्यायला सगळी मंडळी आली. जसजसा कार्यक्रम रंगत होता, आम्ही सगळे आलटून पालटून भानुप्रियाजवळ जाऊन बसत होतो, तिला हसतांना, आनंदात पाहून खुश होत होतो! आता ती अकोलेकर झाली होती ना!
सकाळी बरीच मंडळी लवकर निघणार होती, त्यामुळे त्यांना निरोप देत होतो... आमच्या घरी चहा नाश्ता करून, भानुप्रिया आणि रविशंकर बंगलोरला रवाना होणार होते. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही... आणि भानूप्रियाच्या निरोपाची वेळ आली! हसत होते पण मनात काय चाललं होतं ते मलाच माहित... भानुप्रिया खुश होती, त्यामुळे मी पण खूप खुश होते! आनंदाने दोघांना आणि वऱ्हाडी मंडळींना निरोप दिला...
दुसऱ्या दिवशी घरातल्या सर्व पाहुण्यांना निरोप दिला, आणि मग मात्र घरात मला काही वेगळंच वाटायला लागलं!  पुढचे काही दिवस शांततेत, विचारमग्नतेत गेले.... भानुप्रियाच्या जन्मापासूनच्या आठवणी मनात येत होत्या... ती घरात होती तर एकही क्षण कंटाळवाणा गेला नव्हता! ती माझ्यासाठी नेहमीच लकी होती, आणि राहील! तिच्या नुसत्या असण्याने माझे अस्तित्व होते! तिच्या हसण्याने, बोलण्याने, विचारांनी माझे आयुष्य सुंदर बनले होते, माझी दुःख सुखात बदलली होती, माझ्या चिंता, विवंचना आणि प्रश्न हाताळण्याचे धैर्य मला आणखीन मजबूत बनवीत होते! तिच्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हसू होते!
तिच्या जन्मापासूनच्या सर्व क्षणांची जणू मालिकाच सुरु झाली! तिला पहिल्यादा पाहिलं आणि जवळ घेतलं त्या क्षणापासून आमच्यात एक छान नातं तयार झालं! लहान मुलीची एक जबाबदार युवती  आणि अचानक लग्नानंतर एक जबाबदार गृहिणी, आई बनतांना पहिली...शाळेतला नंबर टिकवणारी हुशार मुलगी! उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी होणारी, आता मुलाचे योग्य रीतीने संगोपन करणारी एक जबाबदार आई......ह्या सर्व प्रवासात तिच्या वाट्याला आलेले वेगवेगळे प्रसंग पहिले आहेत... परीक्षांचे टेन्शन, रिझल्टची उत्सुकता, काही प्रसंगात ती इच्छा असूनही काही करू शकत नसल्याची अगतिकता, काही अपमानाचे, अवहेलनेचे, मानसिक आघातांचे, काही भावनिक क्षोभाचे किंवा वैचारिक गोंधळाचे क्षण... सगळं डोळ्यासमोरून जात होतं...
हे सगळं मागे सोडून पुढे निघालो होतो आम्ही दोघी... आता जरा निवांतपणा मिळत होता... सकाळची गडबड नाही, नाश्ता, डबा, संध्याकाळचे खाणे, जेवणात काहीतरी चांगले चुंगले बनवायचे नाही... नवीन नवीन पदार्थांसाठी बाजारात पिशव्या घेऊन धावणे नाही, थोडी उसंत मिळाली होती...
पण माझ्या best friend ला मिस करत होते मी...  मला कुणा मैत्रिणीची, जोडीदाराची गुरूची गरजच नाही भासली एवढ्या वर्षात! कारण, हे सर्वकाही तीच होती माझ्यासाठी! All in one! गच्चीवरचे थंडीतल्या दिवसात कोवळ्या उन्हातले मजेदार नाश्ते बंद झाले, उन्हाळ्यात गच्चीवर गार वाऱ्यासोबत रंगलेली भेळ आणि लिंबूपाणी आणि सोबत  मारलेल्या गप्पा बंद झाल्या... विनोद नाहीत, हसणे तर नाहीच... फालतू गप्पा नाहीत.... रात्री गरम कॉफी प्यायला काय मजा यायची! आता कॉफीच पीत नाही मी... कॉफीची चव पहिल्यासारखी लागतच नाही...
तिनं स्वयंपाक करायला घेतला, किंवा साधा चहा देखील केला तरी थोडा आराम मिळायचा, आणि मस्त relax व्हायचे! (अर्थात, तिला घरकाम शिकवण्याचा माझा उद्देश पण साध्य व्हायचा ना!)आता कुणाला म्हणताच  येत नाही ‘जरा चहा कर’ म्हणून...२०१२ ते १४ मध्ये मला खूप डिप्रेशन आले होते, तेंव्हा भानुप्रियानीच मला खूप हिम्मत आणि बळ दिलंय त्यातून सावरायला! माझ्यासोबत डॉक्टरकडे खेपा घालणं, तिथे सोबत बसून धीर देणं...  माझ्या आरामासाठी आणि मला चिंतामुक्त ठेवण्यासठी जे जे करू शकत होती  ते ते तिनं केलं!
ह्याच काळात मी स्वतःला कुठल्यातरी गोष्टीत गुंतवून घ्यावे जेणेकरून माझा वेळ सत्कारणी लागेल, आणि मनाला विरंगुळा होईल असे करण्याचे ठरले. ह्याच सुमारास, इंटरनेटचे वारे वाहू लागले होते. भानुप्रिया आधीपासूनच laptop वापरात होती, आणि मला त्याचे खूप अप्रूप होते. इथून पुढे सारी दुनिया ह्या इंटरनेटवरच चालणार होती हे लक्षात आल्यामुळे, मला हे सर्व शिकून घ्यायचा सल्ला तिनं दिला आणि मी ताबडतोब शिकायला सुरुवात केली!!! आंतरजालाच्या मोहमयी दुनियेची ओळख झाल्यानंतर, माझा आत्मविश्वास खूप वाढला, मी स्वतःला डिप्रेशन मधून सावरून घेऊ शकले. त्यातून पूर्णपणे बाहेर आले! यथावकाश, आयुष्याबाबत खूप काही लिहावसं वाटायला लागलं!  माझ्या खवैय्ये स्वभावानुसार माझ्या जीवनाशी बांधलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या आठवणी सांगणारा ‘food and life’ नावानी blog लिहायला सुरुवात केली!! मी स्वतःला झोकून देऊन ह्या आठवणी लिहायला सुरुवात केली आणि मला एक नवीन आनंदाचा स्रोत सापडला! कारण मला आठवतयं तेंव्हा पासूनचा माझा प्रवास मी लिहायला सुरुवात केला आणि रम्य आठवणींची मालिकाच सुरु झाली! माझ्यात एक नवीन चैतन्य आणि उत्साह संचारला.. त्यानिमित्ताने काही फोटोंची आवश्यकता वाटली, म्हणून अल्बम काढले... मग त्यातून आणखीन एक काम गवसलं!  blog लिहून झाला आणि आता काय नवीन काम असं प्रश्न पडायच्या आधीच काम तयार होतं!  blogचं काम करीत असतांना लक्षात आलं की इथून पुढे कुणी असे अल्बम काढून फोटो बघणार नाही हे नक्की...  laptop वरचे फोटो कधीही, कुठेही बघता येणार होते! म्हणून मग सर्व फोटो laptop वर store करण्याचा उपक्रम हाती घेतला! खूप मेहनत घ्यावी लागली, पण आज त्याचा उपयोग होतांना बघते तेंव्हा मेहनत सफल झाल्याचे समाधान मिळते! काही विधायक काम केल्याचा आनंद होताच, पण सर्वांना उपयोगी पडेल असे कायमस्वरूपी काम केल्याचं समाधान अनमोल आहे!
मानसशास्त्र हा आमच्या दोघींचा आवडीचा विषय आहे! कोणत्याही गोष्टीचा, माणसांचा, परिस्थितींचा, घटनांचा सखोल, मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार करून, त्यातले बारकावे समजून, विचार केला तर अनेक समस्यांच्या मुळाशी जाऊन समस्या सोडवता येते असे आमच्या दोघींचे ठाम मत आहे, आणि आम्ही ते अमलात पण आणतो. आमच्या दोघींमध्ये कोणत्याही विषयाचे बंधन नव्हते, कोणताही विषय आमच्यात वर्ज्य नव्हता, विचारांची मुक्त देवाण घेवाण होत होती त्यामुळेच हे शक्य झालं.
समोरच्या माणसाचे मत, त्याच्या भावना लक्षात घ्याव्यात ह्याबाबत माझं दुमत नाही, पण कधी कधी माझं मत शब्दांचा घुमाव न घालता, कुणालाही न घाबरता सडेतोडपणे मांडू शकते, कारण मी समोरच्या माणसाच्या भल्याचा, त्याच्या सुरक्षेचा विचार करून सांगते. आणि मला गोड गोड बोलून, घुमून फिरून बात करायला जमतच नाही, काय करणार? ज्यांना वाटतं मी माझ्या रोखठोक बोलण्याने त्यांना दुखावते, त्यांना माझ्या भावना यथार्थपणे समजत नाहीत, किंवा समजून घेण्याचा मानस नसतो. पण जे मला चांगलं ओळखतात, त्यांना माझ्या प्रांजळ भावना नक्की समजतात... कधी कधी छोटे छोटे सल्ले देत असते, पण सल्ला मानायचा की नाही ह्याचा निर्णय समोरच्यावर सोडून देते. तसंच, एखाद्या अडचणीत, दुविधेत असले, तर ज्या माणसाकडे मदत मिळेल असं विश्वास आहे त्याला कोणताही फाफट पसारा न मांडता, स्पष्ट आणि सरळ शब्दात सांगते. आणि त्याच्याशी असलेले नाते हे त्याच्या मदत करण्या न करण्यावर बदलत नाही, कारण मदत करायची की नाही, हा त्याचा अधिकार आहे! मी मुक्तपणे जगण्यामध्ये विश्वास ठेवते, आणि दुसऱ्याला पण हाच अधिकार आहे हे मानते. माझ्याकडे विश्वासाने मदत मागायला कुणी आलं, तर मी माझ्या सर्व शक्तीनिशी त्याला मदत करायचा प्रयत्न करते. कुणाविरुध्द राग, द्वेष, मत्सर वगैरे मी बाळगत नाही. रात गई.. बात गई... दुःख आणि दुरावलेलं मन देणाऱ्या कुठल्याच नकारात्मक गोष्टी मी मनात साठवून ठेवत नाही...आपलं अनमोल आयुष्य आणि वेळ वाया घालवण्यासारखं त्यात काहीच नसतं! विसरून पुढे जाते... पण, धडा मात्र लक्षात ठेवते हं...
माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट वेळ तर मागे राहिली... आता पुढे बघायचं... त्या सर्व माणसांना, सर्व परिस्थितींना मी माझ्याकडून माफ केलं आहे, त्यामुळे त्यातले काहीच मला त्रास किंवा मनःस्ताप देऊ शकत नाही...कुणाबद्दल कटू भावना नाहीत मनात.... कारण कटू भावना, नकारात्मक उर्जा ही दुसऱ्या पेक्षा स्वतःलाच जास्त त्रासदायक ठरते हे नक्की! रेकीतून तर शिकलेच... शिवाय आई बाबांच्या वागण्यातून हेच तर शिकले....असा त्रास न होण्यासाठी, माझ्या मनाच्या गाभ्याभोवती एक मजबूत कडं करून ठेवलेलं आहे... कुणीही आणि काहीही आघात केले... दुःख, वेदना, अपमान...  तरी माझ्या ह्या गाभ्याला नुकसान पोहोचवू शकत नाही... जे काही आघात झेलायचे, पचवायचे आणि परतवायचे ते बाहेरच्या बाहेर! ह्यामुळे त्यांच्या दुःखाची तीव्रता कमी रहाते, नुकसान झाले तरी कमीत कमी होते. कारण हा गाभा म्हणजे माझ्या जगण्याचे, अस्तित्वाचे सार आहे... ह्याचमुळे असेल कदाचित मी कधी कधी कुणाकुणाला रुक्ष वाटते... पण मला जो जवळून समजून घेतो त्याला माझ्यातलं प्रेम नक्कीच दिसत असावं!
मला लोकांमध्ये मिसळायला आवडतं, पण मी कुणावर स्वतःला लादु शकत नाही... एखाद्या समारंभात माझ्याशी कुणी बोललं नाही, तरी मी खूप वेळपर्यंत, एकटीने, चुळबुळ न करता, कुरबुर न करता शांतपणे बसू शकते, कारण मन शांत असते! स्वतःची करमणूक करून घेत असते... आजूबाजूला खुपकाही घडत असतं... त्यातून वेळ चांगला जातो! असे प्रसंग अनेकवेळा आलेले आहेत... असं शांतपणे, अलिप्तपणे बसून रहाण्याला माझा शिष्टपणा, अहंभावीपणा किंवा मानभावीपणा समजला जातो, त्याला मी काय करू शकते? अकारण कुणाच्यातरी मध्ये जायचं, लुडबुड करायची, मान न मान, मैं तेरा मेहमान! असं वागणं  मला पटत नाही आणि जमत तर बिलकुल नाही! आर्मी मधल्या समारंभात असे अलिप्त रहाण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे, मला कधी कुणाकडे काहीही मागायची गरज पडली नाही आणि कधी काही मागितलेही नाही.. कारण आपण कुणाचे काही उपकार घेतले, की त्या उपकाराची कधीतरी परतफेड करावी लागते, आणि ती करता नाही आली, तर उगीचच वितुष्ट येते, मानहानी होते, कृतघ्न असल्याचा शिक्का बसतो...  शिवाय, आमच्या घरात्त असे कुणाकडून काही उपकार किंवा आपल्या हक्कात न बसणारे काम करून घेण्याला सक्त विरोध आहेच! आई बाबांचे संस्कार असे आहेत, की ‘आपल्याकडे दुसऱ्याला देण्यासारखे बहुत असावे, आणि आपल्याला कुणाकडे काही मागावे लागू नये’ असे जीवन जगावे. आर्मीमध्ये मला थोडं लांब लांब ठेवण्यात यायचं त्याचं मुख्य कारण हेच.... जिथे काहीतरी फायदा असतो, तिथे ही मंडळी गोड गोड बोलतात,  एकमेकांच्या जवळ येतात. पार्टीमधले बहुतांशी संभाषण ह्या फायद्याच्या गोष्टीं भोवतीच फिरतांना बघितलंय मी..  पण माझ्याकडून किंवा पेटकरांकडून असे काहीच मिळण्यासारखे नसल्याने आमच्याशी औपचारिक संबंधां व्यतिरिक्त फारसे संबंध ठेवण्यात कुणाला स्वारस्य नसायचे... हा मात्र पेटकरांचा plus point आहे नक्की! पण आमच्याकडच्या पार्ट्या मात्र मंडळींना खूप आवडायच्या बरं... कोणतेही प्रलोभन नसतांना, अनेकांना दारू, भरपूर, स्वादिष्ट जेवण खाण केले आहे, स्वखर्चाने! युनिट मधून किंवा कुणाकडून फुकट काहीही न घेता..  परत, आमच्या गरजा पण अत्यल्प होत्या... आपलं काम इमानदारीत करून पुढे व्हायचं... बस... मी आधीच असे आयुष्य जगायचा निर्णय घेतला होता, त्यामुळे पेटकर जे सांगतील त्याप्रमाणेच मी इतकी वर्ष आर्मीमध्ये राहिले आणि माझ्या वाट्याला आलेले काम नेकीने पार पाडले! असं केलं नसतं तर माझ्या संकल्पाचा काय उपयोग झाला असता? मी दिलेला शब्द पाळला! आम्हा दोघांनाही पैसा, सत्ता, मानाची खुर्ची, मनासारखे पोस्टिंग... ह्यातले काहीच प्रलोभन नव्हते... जे समोर आले ते आनंदाने घेतले.. मग कुणाकडून कोणतेही उपकार घ्यायची गरजच उरत नाही ना!
आणि ह्या खुशमस्कऱ्यांच्या झुंडीत देखील मला चांगल्या मैत्रीचे बंध गुंफता आले! अशी मैत्री आहे काही लोकांशी ज्याची वीण आजही घट्ट आहे... सर्व मंडळी रिटायर होऊन अनेक वर्ष झालेली आहेत... मी सगळ्यातली लहान... मिसेस m.k. singh आणि col. m.k. singh १९९० मध्ये देवळालीच्या युनिटचे CO होते. माझ्यासाठी mrs. m.k. ह्या आर्मी ऑफिसरची बायको कशी असावी ह्याचा आदर्श होत्या! सुरुवातीलाच इतक्या छान जोडीकडून खूप काही शिकायला मिळालं... बाळकडू म्हणा हवंतर... जे जे शिकले ते सर्व मला पुढे खूप उपयोगी पडलं! त्या दोन अडीच वर्षांत आम्ही एकमेकींच्या खूप जवळ आलो... औपचारिकता जाऊन थोडे घरगुती संबंध प्रस्थापित झाले आमच्यात... आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत हे विशेष! घरगुती कार्यक्रम, लग्न कार्य, देवळालीमधल्या युनिटच्या काही कार्यक्रमात अनेकदा भेटतो... खूप छान वाटतं! ते पण आपुलकीने चौकशी करतात, एकमेकांच्या मुलांची चौकशी होते, ख्याली खुशाली विचारली जाते...आई बाबा देवळालीत यायचे तेंव्हा त्यांच्याशी पण छान आपुलकीचे नाते तयार झाले होते त्यामुळे कधीही भेटलो तर आई बाबांची पण चौकशी नक्की करतात, नमस्कार सांगतात... भानुप्रिया पण त्यांची लाडकी आहे...तिनं पण त्यांच्याकडून खूप लाड करून घेतले आहेत.. भानुप्रियाच्या लग्नाला आवर्जून आले होते, नुकत्याच झालेल्या आई बाबांच्या ६१ हिरकमहोत्सवी कार्यक्रमात पण विनंतीला मान देऊन ते दोघे आले होते! किती आनंद झाला मला!
mrs. m.p. singh... आणखीन एक मैत्रीण! मैत्रीण नंतर, आधी माझ्या आणि भानुप्रियाच्या रेकीच्या गुरु! आजही माझ्या संपर्कात आहेत. बंगलोर सोडल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष नाही भेटलो, पण कधीमधी फोनवर बोलणे होते, आणि social platform वर active असल्यामुळे बराच संपर्क आहे. त्या पण भानूची, माझी चौकशी करतात... Brig. m.p. singh देखील क्वचित बोलतात! माणूस मनाने जवळ असेल, तर भौगोलिक अंतर नगण्य ठरते!
सांबा मध्ये  brigade commander म्हणून आलेले Brig. जयराम आणि mrs. जयराम ... ओळख झाली, आणि त्या माझ्या रेकीच्या विद्यार्थिनी होऊन एवढ्या वर्षात दृढ झालेली मैत्री! अधूनमधून फोनवर बोलणे होते, आणि social media वर संपर्कात असतोच! सांबाच्या APS मध्ये भानुप्रिया त्यांची लाडक्या विद्यार्थिनीपैकी एक होती! भानुप्रियाची खबरबात त्या घेतच असतात!
ह्या वयाने, मानाने, अनुभवाने ज्येष्ठ मंडळींकडून मी बरेच काही शिकले! त्यांचे कळत नकळत झालेले संस्कार पुढे खूप उपयोगी पडले! देवळालीच्या युनिटमधले दिवस खूप छान होते, आणि आजही माझ्यासाठी देवळाली हे घरासारखंच! इथला जुनं ग्रुप कधीतरी भेटतो.. मजा येते! तसं बघितलं तर सगळीच युनिट, सगळीच पोस्टिंग चांगली होती! आपल्याच मुलांमध्ये आईला लाडकं कोण असं विचारलं तर तिला उत्तर देता येतं का? तसंच काहीसं आहे हे!
लग्नाच्या आधीचा एक ग्रुप आहे मित्रमैत्रिणींचा! हडपसरचा! अजून पण अधेमध्ये भेट होते, गप्पा होतात, ख्याली खुशाली कळते! ग्रुपमधली सर्व मंडळी एकमेकांहून अगदी वेगळी आहेत, पण फक्त मैत्रीचा धागा आहे जो आम्हाला जोडून आहे... एकमेकांच्या आयुष्यात लुडबुड नाही, अति घरोबा नाही, फक्त मैत्री हे सूत्र पहिल्या पासून आहे! सगळ्यांची लग्न जवळपास एकाच वेळी झाली... मुलं पण मागेपुढे झाली... आणि आता तर मुलांची पण लग्न होतायत एकापाठोपाठ... किती मस्त वाटतं! सुरुवातीला प्रत्येकजण ‘स्वतः’ बद्दल बोलायचो, लग्नानंतर ‘आम्ही दोघे’ बद्दल बोलायला लागलो, आणि नंतर सर्व संभाषण ‘मुलं’ ह्या विषयावर येऊन अजूनही तिथेच आहे! पण ह्या सर्व प्रवासात कायम राहिली ती आमची मैत्री... काळानुरूप नवीन कंगोरे सापडले, पण जिथे सोडले तिथून संभाषण पुढे घेऊन जात, वेळेचे गणित विसरणारी मैत्री! अनेक नातेसंबंधांमध्ये देखील अशी मैत्री आणि प्रेम अनुभवायला मिळतं! माझी दोन वर्षांपूर्वीची ऑस्ट्रेलिया सफर हे अशाच मैत्रीचं उदाहरण!
२०१६ च्या डिसेम्बर मध्ये मी ऑस्ट्रेलियाला जायचं ठरवलं! मग सिडनीला वैजू मामी आणि मामाला फोन केला. १९८७ मध्ये माझं लग्न झालं आणि ते दोघं पण त्याच दरम्यान ऑस्ट्रेलियाला गेले कायमस्वरूपी... त्यानंतर संपर्क राहिला नाही जास्त...
माझी आणि मामीची दोस्ती सुरु होते ती सदाशिव पेठेतल्या आईच्या वाड्यात नवी नवरी आली त्या दिवशीपासून! हो, दोस्तीच! तिच्या सगळ्या बहिणी आणि भाऊ ह्यासर्वांबरोबर माझी मैत्री होती! आता मी जेंव्हा पहिल्यांदा मामीशी बोलले, इतक्या वर्षानंतर.... त्या दोघांना इतकं आनंद झाला! इतक्या वर्षाचं अंतर, भौगोलिक अंतर सगळं सगळं एका क्षणात दूर झालं! जिथे संभाषण सुटलं होतं, तिथून पुढे सुरु झाल्यासारखं आम्ही दोघी बोलायला लागलो!
कधीतरी परदेशवारी करण्याची इच्छा नेहमी मनात होती, पण ते स्वप्न कधी पूर्ण होईल अशी अशा मात्र नव्हती....आणि हे माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरू पाहत होतं! ४५ दिवसांची ऑस्ट्रेलियाची सफर करण्यासाठी मी सज्ज झाले! मी ऑस्ट्रेलिया इतके एन्जॉय केले, की परदेशगमनाच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, मन भरून पावले! भानुप्रिया आणि रविशंकर ह्यांच्या आयुष्यात आता एक नवीन पाहुणा येऊ  घातला होता, त्यामुळे त्याच्या स्वागताची तयारी करण्यासाठी माझी ऑस्ट्रेलियाची ट्रीप वेळेत करून परत यायचं होतं! तिची डिलिव्हरी सप्टेंबर मध्ये अपेक्षित होती. आई बाबांबरोबर मी जानेवारीत गणपतीपुळ्याला गेले होते, तेंव्हा तिकडे ही गोड बातमी आम्हाला मिळाली होती! आम्ही दुसऱ्या दिवशी बाप्पाचे दर्शन घेऊन आमचा आनंद व्यक्त केला आणि आशीर्वाद मागितले!
तिसऱ्या महिन्यात भानुप्रिया नाशिकला आली होती थोडे दिवस! खूप कौतुक वाटलं मला... शब्दात नाही सांगता येणार! जसं जसं भानुप्रियाशी नवीन नातं उलगडत होतं, तसं तसं आईबाबांशी माझं नातं वेगळ्या अर्थाने दृढ होतं होतं! अहमदाबादला जाऊन, तिचे डोहाळजेवण केले, काही गोष्टी समजून सांगितल्या, स्वतःला जपायला सांगितलं आणि परत आले... पुढच्या तयारीचे विचार डोक्यात फिरायला लागले होते ना! मार्च मध्ये रविशंकरनी नोकरी बदलली म्हणून मग अकोलेकर मंडळी परत बंगलोरला आली! आणि यथावकाश, सप्टेंबरच्या २६ तारखेला ‘रुद्रांश’ चा जन्म झाला!!! सगळ्यांना खूप आनंद झाला होता! माझा नातू!!! मी ‘आजी’ झाले होते! किती वेगळी भावना, पण किती सुखद, आनंदाची भावना! आता मी आई बाबांच्या अधिकच जवळ यायला लागले होते! त्यांच्यासाठी तर आनंदाची पर्वणीच!! आयुष्याचा फेर पूर्ण झाला होता! ‘life had come full circle!’ त्यांचा पणतू! आणि ते दोघे पणजोबा आणि पणजीबाई!! किती छान!
भानुप्रियाच्या लग्नापासून ते रुद्रांशच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत अनेक कार्यक्रम झाले आणि सगळ्या कार्यक्रमांना आई बाबा येऊ शकले ह्याचं मला खूप समाधान आहे. रुद्रांश ४ महिन्यांचा होतं तेंव्हा ते आले, आणि पणजी आणि पणजोबांवर सोन्याची फुलं उधळली तो क्षण किती भाग्याचा होता आमच्यासाठी! भानुप्रिया, मी आणि रुद्रांश!!
घरातल्या प्रतिकूल वातावरणात, मनात अनेक शंका कुशंका, भिती घेऊन, धास्तावलेल्या मनःस्थितीतच भानुप्रियाच्या लग्नापासून ह्या कार्यक्रमापर्यंत सर्व कार्यक्रम मी यथास्थित करू शकले, आई बाबांना बोलावू शकले ह्याचं मला खूप समाधान आहे! ह्या सर्वातून जाण्यासाठी भानुप्रियानी हिम्मत दिली आणि मी पण धीर करून, अनेक भल्याबुऱ्या गोष्टींचे आघात सोसले तरी मन घट्ट करून, निर्धारानं सर्व पार पाडलं! कार्य सिद्धीस नेण्यास ‘श्री’ समर्थपणे पाठीशी होते, आणि राहतील!
आर्मीमधल्या उच्च अभिरुचीसंपन्न आणि सुखी आयुष्याच्या तुलनेत, माझे व्यक्तिगत आयुष्य मात्र तितकसं सुखी नाही झालं ह्याचा मनात खूप विषाद राहिला. त्या पार्श्वभूमीवर, नाशिकला आल्यावर मला असे अनेक निर्णय घ्यावे लागले जे भानूच्या बाबांच्या दृष्टीने गैरसोयीचे होते, आणि माझ्यासाठी असे निर्णय घेणे मोठे क्लेशकारक होते.... कारण, त्याच्या दूरगामी परिणामांची मला पूर्ण कल्पना होती... माझ्यावर आणि भानुप्रियावर...आम्ही ठरवलं होतं की आपल्या दोन्ही कुटुंबातले कोणतेही सदस्य आपल्या घरी येणार नाहीत.... ह्यामुळे मी आईबाबांना खूप अडचणीत टाकले होते ह्याची मला पूर्ण कल्पना होती, पण काहीच इलाज नव्हता... ते नाशिकला आम्हा दोघींना भेटायला येत होते, पण हॉटेलवर रहावे लागायचे त्यांना... सुरुवातीला धाकधूक असायची मनात ही भेट घेतांना, खोटं बोलण्यची वेळ येत असल्याची खंत वाटायची,  पण नंतर मन घट्ट केलं आणि निगरगट्ट झालो दोघी...
पुढे भानुचे बाबा रिटायर झाल्यानंतर, ह्या माणसाच्या इशाऱ्यांवर चालायची गरज वाटेनाशी झाली, आणि माझ्या नेहमीच्या धाडसी आणि लढाऊ वृत्तीने उचल खाल्ली...मी आता ते करणार होते जे मला करावसं वाटतंय... दबावाखाली यायला माझं मन विरोध करायला लागलं होतं, आणि भानुप्रिया सुजाण झाली होती, तिला संपूर्ण वस्तुस्थिती माहित पडली होती, त्यामुळे तिचा पण आधार होताच... आता ह्या लढ्यात मी एकटी नव्हते, आणि दुबळी पण नव्हते ह्याची जाणीव झाली...
इतक्या दडपणात, धाकधुकीत देखील, दोन तीनदा आई बाबांना घरी येण्याची संधी मिळालीच... एकदा ‘आम्ही सारे खवैय्ये’ ह्या शोच्या शूटिंगच्या निमित्ताने, आणि पुन्हा जेंव्हा मला अपघात झाला होतं तेंव्हा... मुंबईला माझ्या एका शोच्या शूटिंग साठी मी त्यांना घेऊन गेले होते...
भानुप्रियाच्या लग्नानंतर माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती... सगळं बदलून गेलं... म्हणजे मी काही मनाने खंबीर नव्हते असं नाही, पण ती माझ्या संपूर्ण अस्तित्वाची ओळख होती...तिच्यामुळे मी होते, बस... आजपर्यंत तिच्याशिवाय काहीच केलं नव्हतं. मग हळू हळू मी ह्यातून बाहेर आले, आणि आता माझं आयुष्य वेगळ्या पध्दतीनं जगायचा निर्धार केला... मला आवडणाऱ्या गोष्टींना वेळ देण्याचा, आणि स्वतःला मानसिक आणि शारीरिक संतुलानाकडे नेण्याचा निर्धार केला! स्वतःला नाकारत, दबावाखाली खूप जगले, आता नाही... आणि ह्याची पहिली पायरी होती शारीरिक संतुलनासाठी उपाययोजना करणे... मग व्यायाम, योगासनं, प्राणायाम, ध्यानधारणा ह्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने सुरु केल्या... कारण इतकी वर्ष मी हे सगळं करीत होते, पण म्हणावं तसा वेळ देता येत नव्हता... रेकी आणि accupressure मात्र सातत्याने करीत होते त्याचा फायदा मला इतकी वर्ष झाला होता! मानसिक संतुलन, रागावर नियंत्रण आणि आत्मविश्वास जोपासला होता ह्यातून मी!
माझ्या ह्या नात्याच्या कटुतेविषयी मी बऱ्याच मंडळींशी बोलले होते आणि त्यातून मी विश्लेषण सुरु केलं, कारण मला मनापासून हा गुंता सोडवायचा होता, आणि म्हणून ह्या सल्लामसलतीतून त्याचं मूळ कारण शोधून काढायचा ठाम निश्चय केला आणि तो अमलात आणला, कारण मला हे कळलं होतं की हा माणूस फक्त डिवचण्यासाठी असं बोलतो... मग मी प्रत्युतर देऊन माझा राग व्यक्त करायचं बंद केलं, प्रत्येक वेळी अपमानास्पद बोलणं ऐकून, शारीरिक आघात सहन करून मग आपल्याच विफलतेवर रडायचं बंद केलं...मग त्याच्याच पध्दतींनी त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली...आधी वाटायचं इतकी आपली बुद्धीची पोहोच आहे का? कारण तो माणूस भावनाशुन्य आहे आणि फक्त डोक्यानं बोलतो... पण हळूहळू जमायला लागलं... त्याच्या चातुर्याची सर कुणालाच येणार नाही... योग्य वेळी, योग्य शब्दात, योग्य तो मुद्दा’ आपल्याला हवा तसा’ निर्विकार मनानी पण परिणामकारकपणे मांडता आला पाहिजे...समोरच्याला दुखापत झाली तरी खंत करायची नाही...  इथे पाहिजे जातीचे...  बरीचशी सफलता मिळत गेली आणि भिती कमी होऊन, आत्मविश्वास वाढला! म्हणतात ना...’गैरतमंद इन्सान को हराना हो, तो उसकी गैरतपे हाथ डालो... सच्चे इन्सान को हराना हो, तो उसकी सच्चाईपर वार करो..’ मला रोटी, कपडा आणि मकान देण्यापलीकडे ‘माझ्यासाठी’ त्या माणसानी ना कधी वेळ दिला, ना माझ्या गुणांची कदर केली.. कधी कौतुक नाही, कशाची जाणीव नाही... फक्त चुका काढत बसायचं...का? तुमच्या घरात प्रवेश केल्याबरोबर मला सगळं काही माहित असण्याची अपेक्षा कितपत योग्य आणि रास्त आहे? आणि एवढं करून मी हेच ऐकलंय की ‘माझ्यामुळेच’ तु आहेस...मग हा प्रपंच इतकी वर्ष प्राणपणाने सांभाळून, पुढे नेला तो कुणासाठी?’ मी जी काही आहे, मी जे काही शिकले ते सर्व माझ्या हिमतीवर, माझ्या बुद्धीच्या जोरावर, रोज परीक्षण, निरीक्षण करून, स्वतःमध्ये बदल घडवत स्वतःला रोज घडवलंय मी!
हे म्हणण्याचं कारण असं, की मी आर्मीमध्ये अनेक ऑफिसर्सना आपल्या मुलांना, बायकोला नीट शिकवून, गोड बोलून, समजुतीनं सांगून, त्यांच्याशी सल्लामसलत करून, बारकावे समजावून, त्यांच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेली व्यक्ती घडवतांना दिसतात. पण ह्या माणसाने नेहमी फक्त नसलेल्या चुका, फालतू गोष्टींचा बाऊ करून दाखवत मला हिणवलं बस... हे तुला माहित पाहिजे...हे तुला यायला पाहिजे होतं... अशी वाक्य असायची... पण तू कधी माझ्याशी संवाद साधलास? तुझ्या मनात काय आहे हे कधी सांगितलंस? कधीच नाही....
सांबामध्ये आमच्या एका ऑफिसरचे उदहरण इथे देण्यासारखे आहे! मी त्या माणसाला धन्य मानते! त्याच्या पहिल्या बायकोच्या दोन मुली आणि नंतर तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्या वारल्यानंतर, त्यांच्या मुलांचा सांभाळ त्या बाईंच्या धाकट्या बहिणीनं गावी केला. नंतर ह्या ऑफिसरनी तिच्याशी लग्न केलं... आम्ही स्टेशनवर त्या मंडळींना घ्यायला गेलो तर मी अवाकच झाले... तिन्ही मुलं आणि त्याची बायको...सगळे पायात हवाई चप्पल आणि ट्रंकेत समान भरून, अगदी गावाकडच्या लोकांसारखे बाकावर बसले होते! पण ह्यात त्यांचा काहीच दोष नव्हता! असो. तर हा दिवस आणि आम्ही अडीच वर्ष सोबत होतो त्याच्या दरम्यान ह्या सर्वांमध्ये इतके परिवर्तन घडले की मलाच तोंडात बोटं घालावी लागली आश्चर्यानं! त्या ऑफिसरने सगळ्यांना गोड बोलून, हळूहळू, ना रागावता, न मारता, समजुतीनं त्याच्या मुलांमध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले! मुलांना उत्तमप्रकारे शिकवून त्यांना एकदम हुशार, सुसंस्कारी बनवून, सगळ्यांचे व्यक्तिमत्व घडवले! त्याची बायको पण हुशार आणि कष्टाळू होती. मुख्य म्हणजे तिच्यात स्वतः शिकण्याची, सुधारण्याची आणि मुलांना शिकवण्याची, सुधारण्याची  जिद्द होती... आज तिचे आणि त्या कुटुंबाचे सोशल मीडियावरचे फोटो हे त्यांनी केलेल्या प्रगतीचे द्योतक आहेत. ह्या प्रगतीमागे ह्या ऑफिसरचं आपल्या कुटुंबावरचं प्रेम आणि त्याची जिद्द आहे...त्याला माझा नेहमीच सलाम असतो! माझ्यासाठी असं काहीच केलं नाही...
इतकी वर्ष भानुप्रियासाठी गप्प होते. पण आता माझ्यावर कोणतेही बंधन नव्हते, जबाबदारी नव्हती. मी खूप धीट आणि मजबूत होत चालले होते. माझ्या स्वास्थ्यासाठी, माझ्या आनंदासाठी मी अनेक निर्णय घ्यायला मोकळी होते... मग मी माझी ‘बकेट लिस्ट’ बनवायला घ्यायची ठरवलं आणि सुरुवातीला असं वाटलं की आपल्याकडे करण्यासारखं काहीच नाहीये आणि आपलं सगळं करून झालंय!  तेंव्हा लक्षात आलं, की बऱ्याच गोष्टी वेळेअभावी केल्या नाहीत, किंवा आपल्याला त्या कराव्याशा वाटतात हे प्रकर्षाने लक्षात आलं नाही, किंवा काही गोष्टी योग्य वेळी करू असं तेंव्हा वाटलं म्हणून... अंतरीची हाक म्हणतात ती ऐकायला लागले होते! गेल्या ४ वर्षांत मी जे काही स्वतःच्या आनंदासाठी केले त्या यादीकडे बघता मी स्वतःच स्वतःवर घेतलेली शंका खोटी ठरवली! जमेल तेवढा प्रवास करणे, वाचन करायचे, बेकिंग मध्ये थोडे आणखीन प्राविण्य मिळवणे, काही पदार्थ करायचे राहिलेत ते करायचे, खवैय्येगिरी करायची, ड्रायव्हिंग करायचे.... हे सर्व मी आधीपासून करत होते, पण खूप काही मनासारखं करायचं होतं! एक गोष्ट ह्या बकेट लिस्ट मध्ये अगदी तळाशी आहे... छोट्या, अस्पष्ट अक्षरात लिहिलेली.... काहीतरी काम करून, स्वतःचे पैसे कमवायचे... आणि ह्या गोष्टीपायी झालेल्या  मानहानी, अवहेलनेचे दुःख थोडं हलकं करायचं...आणि माझ्या स्वाभिमानाला पुन्हा जागृत करायचं!
माझ्या अवतीभोवती पहाते तेंव्हा स्वतःला कमी लेखत, आपल्या कौशल्याचा, कलेचा, शिक्षणाचा, अनुभवाचा कोणत्याही रुपात फायदा करून न घेता, फक्त आपण किती अगतिक आणि लाचार आहोत हे सांगत, स्वतःची कीव करीत बसलेल्या अनेक महिला जेंव्हा दिसतात, तेंव्हा त्यांना काहीतरी काम करून, स्वतःची ओळख निर्माण करून, स्वकष्टाचे पैसे सन्मानाने कमवून आत्मनिर्भर होण्यासाठी उत्तेजन देणारी , आणि अशा कामकाजी महिलांबाबत अतिशय अभिमान वाटणारी मी... स्त्रियांनी कोषाबाहेर पडून स्वतःला सिद्ध करावं अशी आशा करणारी मी...’.मला’ इतकी वर्ष सांगण्यात आलं, की ‘तू ‘कोणतंच’ काम करायच्या लायकीची नाहीस, तेंव्हा जिथे आहेस, जशी आहेस, तशी स्वतःला धन्य समजलं पाहिजेस...कायमचं...’पण आता माझी परिस्थिती अशी आहे की मी खरंच, कोणतंच काम करू शकत नाही... तरी सुध्दा, ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..’ म्हणत ह्या इच्छेची परिपूर्ती होण्याच्या प्रतीक्षेत आहे!
तर मला सगळ्यात जास्त वेड ड्रायव्हिंगचं आहे हे नक्की! ८१ साली मला ड्रायव्हिंगची परीक्षा देऊन, पर्मनंट लायसन्स मिळालं तो प्रवास फार मजेशीर, नव्यानवलाईचा आणि रोमांचक होता! माझ्या एका गुजराती मित्रानी माझं पर्मनंट लायसन्स एका लेदरच्या wallet मध्ये फिक्स करून मला दिलं ही  माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट होती, कारण असं wallet कुणाकडेच नव्हतं! पण नंतर खूप जणांनी ते विकत घेतलं! मला अशा अनोख्या वस्तूंचं खूप वेड आहे... आजही माझ्याकडे एक wallet आहे, ज्यात माझी कार्ड वगैरे ठेवते... तर हे लायसन्स २०११ मध्ये सरंडर करून, चारचाकीच्या लायसन्स मध्ये ते अंतर्गत झालं...
माझं विद्युत आणि इलेक्ट्रोनिक उपकरणाचं वेड वाड्यात आपल्याकडे रेडियो होता तेंव्हापासून सुरु होतं, आणि पुढे calculator, माझे संगीतातले दैवत मोहमद रफींचा फोटो लावलेला टेपरेकोर्डर, असं करीत पुढे walkman, VCR पाशी येतं.... VCR वर फक्त ५० रुपयात  ३ सिनेमे रात्रीतून जागून पाठोपाठ बघायचे, सोबत भेळ भजीचा झकास झणझणीत बेत! ९० च्या दशकात इलेक्ट्रोनिक क्रांती सुरु झाली आणि बघता बघता जमाना बदलला... पेजर आले, CD आल्या, आणि पेजरची पुढची पायरी मोबाईल आले आणि झंझावात आला!! उद्योगजगतात क्रांती घडायला सुरुवात झाली होती... ह्या मोबाईलने अवघ्या दुनियेला ढवळून काढलं...ह्याच वेडापायी, २००० साली लखनौला असतांना मी एका स्नेह्यांकडून त्यांचा जाडजूड, टीव्हीच्या रिमोट सारखा दिसणारा मोबाईल विकत घेतला... तो इतका  जड होता की कुणा टवाळ कारट्याच्या डोक्यात मारला तर पाणी मागणार नाही!! तेंव्हा आम्ही घरून ह्या मोबाईल वरून एका दुकानदाराच्या STD बूथ मधून फोन करायला लागलो आणि खूप मजा  वाटायला लागली! PCO मध्ये जायची झंझट नाही! पण जेंव्हा बिल यायचं तेंव्हा ‘नानी याद आती थी!’ पण, तंत्रज्ञानाचा फायदा नाही करून घेतला तर मग काय मजा? हा मोबाईल माझ्या आठवणींचा एक छोटासा, गोड हिस्सा आहे! हे मोबाईलचं वेड वाढतंच गेलं...वाढतंच गेलं.... नंतर एक छोटा, हलका nokia चा फोन आला! त्याच्या छोट्याशा स्क्रीनवर ‘गेम’ चा खजिना सापडला! गेल्या काही वर्षांतलं हे वेड आज तर शिगेला पोहोचलं आहे! बाजारात येणाऱ्या प्रत्येक नव्या मोबाईलविषयी मी उत्सुक असते.. ज्ञान घ्यायलाच हवं ना? सध्या tabशिवाय माझा दिवस जात नाही! शिवाय desktops, laptops, palmtops.... आणि बरंच काही... माणसांच्या मनाला भुरळ आणि खिशाला कात्री लावणारी कितीतरी उपकरण बाजारात रोज धडकतात! विचारांना, कल्पनेला पंख देणारं, कमी वेळात जास्त काम करून, माहितीचा खजिना उघडा करणारं आणि माणसांना जवळ आणणारं हे तंत्रज्ञान मला फार आवडलं.... अर्थात तरुण वर्गासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे दुधारी तलवार आहे... जपून वापर करायला हवा!
तर विषय होता ड्रायव्हिंग... स्वभावाने गरीब, सालस पण कामाला वाघ अशा मजबुतीकी मिसाल... सायकल पासून आजमितीस कार पर्यंत बहुतेक सर्व गाड्या मी चालवल्या आहेत! पूर्वी सायकल तासाला भाड्याने घेऊन, शनिवार वाड्या समोरच्या पटांगणात बाबांनी हाताला धरून शिकवली आहे! पैसे देऊन सयकल घेत असल्यामुळे, संपूर्ण तास, अगदी मन लावून फक्त सायकल चालवायची! मथुरेला असतांना आईकडे एक लेडीज सायकल होती, त्यावरून मला शाळेत सोडायची, ते दृश्य माझ्या आजही स्मरणात आहे! ती काळी कुळकुळीत पण चमकदार सायकल, तिचा रेडियमचा चमकणारा दिवा, पुढे एक बास्केट!
त्रिचीला आल्यावर आईसाठी ‘लुना’ घेतली... सायकलची पुढची आवृत्ती... अतिशय हलकी, नाजूक,विनयशील.... दोन चाकांवर एका पिशवीसह जास्तीत जास्त दोन माणसांचा भार पेलू शकणारी ही नाजुका खरी, पण दुचाकी वाहनांच्या दुनियेत येऊ घातलेल्या क्रांतीची ओळख! पण ह्याच नाजुकाच्या पाठीवर दुप्पट माणसं आणि दुप्पट वजन घेऊन, तिच्या क्षमतेपेक्षा जोरात पळवणारे महाभाग कमी नव्हते! मग काय? जे व्हायचं तेच होतं... गाडी  रस्त्यात मधोमध ठिय्या देऊन उभी रहाते...गतप्राण होऊन... ह्याला म्हणतात दुरुपयोग... अतिरेक... पुण्यात हडपसरला मी लुनावर कामाला जात होते.
नंतर माझ्या साहसी आणि धाडसी स्वभावाला अनुसरून मी ‘lambretta’ सारखं, आकार, स्पीड, एका परिवाराच्या ४ सदस्यांना, सामानाच्या भारासाहित रस्त्यावरून गजगमन करणारं  ‘धूड’...  सुध्दा चालवली आहे! रस्त्यात सगळे लोक वळून वळून बघायचे! मजा वाटायची खूप! अगदी मराठी सिनेमातलं दृश्य वाटायचं... हिरोईन lambretta चालवते आहे...भुर्र...सुसाट... एकदम कूल आणि मस्त! आणखीन कुणा महिलेला मी तरी ही गाडी चालवतांना पाहिलेलं नाही! पण बाबा ऑफिसला ही गाडी नेत असल्यामुळे मला फारशी चालवायला मिळाली नाही,,, पण पहिल्या दिवशी मी गाडी नेली तो दिवस मला आजही आठवतो बरं! एकदम भुर्र...सुसाट...
पुढे ८१ मध्ये नोकरीला लागले, तेंव्हा मी स्वतःच्या पैशांनी M80 घेतली! ह्याचा मला रास्त अभिमान आहे! लेडीज सायकल सारखी पुढे मोकळी जागा, ३ गिअर मुळे उत्तम स्पीड, पकड, सामानाची बऱ्यापैकी क्षमता आणि परवडणारी किंमत ह्यामुळे ही गाडी M50 ह्या तिच्या भावंडा सोबत बाजारात आली आणि नोकरी करणाऱ्या महिला वर्गाची लाडकी झाली! मोटरसायकल तर होत्याच, पण तरी ह्या सगळ्यात ‘vespa’ आपलं ‘family वाली गाडी’ हे बिरूद टिकवून होती! मागे इंजिनामुळे थोडी अडचणीची, थोडी अवघड गाडी, त्यामुळे जास्त चालवली गेली नाही कदाचित...मला तर अजिबात आवडली नाही vespa... असो... lambrettaला निरोप दिल्यानंतर बाबा त्यांच्या प्रोबोधीनीच्या कार्यांसाठी vespa वापरात होते...कालांतराने ती विकून टाकली...
जेंव्हा ८७ मध्ये माझं लग्न ठरलं, तेंव्हा पहिली बातमी काय मिळाली? तर पेटकरांकडे नवी कोरी  ‘hero honda’ मोटरसायकल आहे! वाह! मला मनातून ह्या जावा, एन्फिल्ड वगैरे अवजड पण रुबाबदार मोटरसायकलींचं खूप वेड होतं, पण कधी चालवण्याचा योग नव्हता आला..hero honda ही गाडी नुकतीच बाजारात आली होती.. हलकी पण मजबूत आणि तितकीच रुबाबदार! वाजवी किमतीमुळे तमाम युवकांच्या तरल स्वप्नांना जणू पंख फुटले! JCO साहेबांनी आग्रह धरल्यामुळे आणि किंमत ठीक वाटल्यामुळे हे ओरिजिनल जपानी मॉडेल पेटकरांनी विकत घेतलं, आणि आश्चर्य म्हणजे स्वतःला  गाडी चालवता येत नसल्यामुळे, क्वार्टरच्या आवारात हे मॉडेल दिमाखात उभं राहिलं...आपल्याला जोखणाऱ्या खऱ्या पारखीच्या प्रतीक्षेत! म्हणजे मीच की हो! अर्थात मला हे कळलं ना, तेंव्हा मला खूप हसू आलं, पण मी ते पेटकरांना जाणवू दिलं नाही... मी मात्र स्वप्न पाहू लागले होते... hero honda ची आणि काय? लग्नानंतर कोइंबतूरला पोहोचले... क्वार्टर्स मध्ये गेले तेंव्हा हा शानदार साथी माझ्या प्रतिक्षेत रुबाबात उभा होता!!! पहिल्या कटाक्षात प्रेम जडलं माझं! ह्या माझ्या राजेशाही साथीदारावर! दुसऱ्या दिवशी सकाळी उत्साहानं बाईक बाहेर काढली, आणि जुजबी प्रशिक्षणा नंतर पहिला गिअर टाकला... वाहवा! काय वाटत होतं मला... नाही सांगू शकत... बस... स्वार झाले गाडीवर! vroom...vroom... ही नशा दिवसागणिक वाढतच गेली!  मी जितक्या प्रेमाने ह्याची काळजी घेतली, तितक्याच प्रेमाने ह्या साथीदारानं मला तब्बल ३० वर्ष इमाने इतबारे साथ दिली! कधी धोका दिला नाही! आता मात्र हा साथी वय झाल्यामुळे, आमच्या अंगणात उभा आहे... त्याच्या पाठीवर स्वार होऊन जगलेल्या अनेक रम्य आठवणी सांगत...ऐकत! भानुप्रिया, सुमा, नाशिकच्या आजी, आई, बाबा, कितीतरी मंडळींना ह्याची सैर करवली आहे! आत्मविश्वासानं आणि प्रेमानं!
माझ्या नवीन आयुष्यात ह्या गाडी इतकीच महत्वाची होती सुमा! ही ६ महिने आधी घरात आल्यामुळे ती माझ्यापेक्षा सिनियर होती! सुमा म्हणजे ‘छोटा packet...बडा धमाका!’ म्हणता येईल! मी ज्या दिवशी कोइंबतूरच्या quarter मध्ये आले तेंव्हाच ह्या packet ची धमाकेदार ओळख झाली! मी प्राणीमित्र असल्याचा माझा गर्व तिनं काही क्षणातच हरण केला! शेपटी हलवून माझे स्वागत होईल अशी आशा होती, पण तिनं एकदम रणरागिणीचाच पावित्रा घेतला...हात तर लावायचं सोडाच, माझ्याकडे दात काढून रागाने बघत होती... एखाद्या शत्रूला पळवून लावायच्या बेतात असल्यासारखी!!! पण मी मात्र तिच्या ह्या रणरागिणीच्या अवताराच्या प्रेमात पडले! प्युअर पोमेरीअन जात होती तिची! माझ्याबद्दलचा राग तिनं सकाळी दारात पडलेल्या माझ्या नव्या कोऱ्या चपलेच्या चिंधड्या करून व्यक्त केला होता!! आणि पुढे बरेच दिवस ह्या दहशती कारवाया चालूच राहिल्या, पण मीही कमी चिवट नाही ना? तिला रोज फिरवायला न्यायचे आणि एकूणच मैत्रीची बोलणी नेटाने करतंच राहिले... आणि हळूहळू तिचा विरोध मावळला, आणि आमची मैत्री झाली! तिला कुणाशी मैत्री नको असायची, त्यामुळे कुणी अनोळखी माणसं जवळ आलेली तिला खपायचं नाही...  आणि प्राण्यांना तर घराच्या आजूबाजूला फिरकू द्यायची नाही...तिची दहशतच होती तशी! ज्या घरात आम्ही रहायला जायचो, त्याच्या संपूर्ण परिसराचा ती ताबा घ्यायची! आज्ञाधारक होती... घरापासून कधी लांब भरकटत जायची नाही, दाराबाहेर गुपचूप बसून रहायची, आवाज दिला की लगेच घरात यायची... जेंव्हा भानुप्रिया झाली, तेंव्हा तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या बेडवर कोपऱ्यात चुपचाप बसून रहायची! पण जेंव्हा भानुप्रिया मोठी झाल्यावर खेळायला लागली, तेंव्हा हिचं पुन्हा तेच... दात काढून तिला घाबरवायची! पण हा विरोधही हळूहळू मावळला! बरं, गम्मत म्हणजे तिला आमच्या सहायकनं ब्रेड आणि दूध मऊ करून तोंडात भरवायची सवय लावली होती जी मला अतिशय त्रासदायक आणि तापदायक ठरली... त्याव्यतिरिक्त  क्वचित फक्त चिकनचे तुकडे खाल्ले...दुसरं काहीच खाल्लं नाही! हे सुरुवातीला ऐकायला मनोरंजक वाटलं असलं तरी जेवणाची ताटली वाजली की कॉटखाली दडून बसायची... तिला बाहेर ओढून, समोर बसवून खायला घालायचं! कधी कधी टेबलवर सुध्दा बसवून खायला घातलं आहे माझी साडी खराब होऊ नये म्हणून! हे सर्व मी रोज दोनदा, न कुरकुरता, न कंटाळता, माझ्या जेवणाच्या आधी करायचे! हे मजेशीर दृश्य बघण्यासाठी काही छोटे दोस्त आवर्जून यायचे, कारण त्यांनी असं काही जगावेगळं कधी न पाहिल्यामुळे त्यांचे मनोरंजन व्हायचे खास! पण ती जशी होती तशी माझं खूप प्रेम होतं तिच्यावर! मोटरसायकलवर पुढे tankवर बसून, गार वारं अंगावर घेत, फिरायला जायला तिला फार आवडायचं! मी गाडीवर बसले, की फक्त दोन्ही हात खाली धरले, की ती अलगद वर उडी मारायची! पुढे सुमा, मागे पाठीला बेल्टवाल्या bag मध्ये भानुप्रिया अशी माझी जत्रा रस्त्यावरून जायची, तेंव्हा आजूबाजूचे लोक कुतूहलाने बघायचे! मजा यायची! त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं! तेंव्हा मार्केटिंग नाही केलं, नाहीतर पेपरमध्ये बातमी नक्की येऊ शकत होती, पण म्हणून हे सत्य नाकारता येणार नाही की त्याकाळी मोटरसायकल चालवणारी मी एकटीच महिला होते आणि मला ह्याचा रास्त अभिमान आणि आनंद आहे! असो! मी माझ्या आनंदात असायची, आजही असते! सुमा खूप समजूतदार होती... नाशिकला विजयनगरच्या घरी रहात होते मी तेंव्हा, आजींना ती स्वयंपाकघरात आलेली आवडणार नाही हे तिनं कसं ओळखलं माहित नाही, पण किचनमध्ये ती कधीही फिरकली नाही! कुठेही खुर्च्या मांडल्या, की आपल्या राजेशाही थाटात, आपला मुलभूत हक्क असल्यासारखी ती सर्वांच्या आधी जाऊन एका खुर्चीवर बसायची! तिचं कौतुकही व्हायचं! फुल तिकीट काढून, इंजेक्शनचा दाखला आणि सोबत लेखी परवानगीचं पत्र सोबत घेऊन तिनं नाशिक पुणे नाशिक बसनी प्रवास तर कितीवेळा केला आहे! ‘इथे माणसांना बसायला सीट नाही, आनी बाई कुत्रं घिऊन चालल्या पाह्य’ असे टोमणे मी ऐकले आहेत! त्याची पण मी मजा घेतली आहे, कारण त्यांचे म्हणणे रास्तच होते ना? आणि मी stand वर खाली उतरले, तर भानुकडे एक डोळा, आणि माझ्या दिशेनं एक डोळा ठेऊन असायची! बिशाद आहे कुणी गैरवर्तन करेल! ट्रेनमधून फर्स्ट क्लास मधून एकदम थाटात प्रवास केलाय सुमानं! तिच्या फिरायला जायच्या वेळेबाबत ती अगदी काटेकोर होती बरं! तिला लहान मुलं विशेष आवडायची नाहीत... आणि दंगामस्ती करणारी मुलं तर अजिबातच नाही! त्यांच्याकडे रागानी बघायची! रागानी तर आमच्या सफाईवाल्या भैय्याकडे पण बघायची...कारण? तो झाडलोट करतांना फर्निचर उचलायचा, वस्तू उचलायचा म्हणून! प्रत्येक खोलीत त्याच्या मागे असायची...लक्ष ठेवण्यासाठी! खूप मजेशीर होतं ते दृश्य! तो पण तिच्याशी रोज वाद घालायचा..मला पण विचारायचा विनोदानं..मेमसाब, ये सुमा ऐसे गुर्राएगी तो मैं काम कैसे करुंगा?’ घरातल्या वस्तूंना कुणी हात लावलेला तिला आवडत नसे! एकदा महूला, माझ्या शेजारणीनं, मी अंघोळीला गेले असतांना, घरात येऊन टेबलवरच्या काही cassettes उचलून घेऊन जाणार, इतक्यात सुमानी तिची वाट अडवली आणि तिच्यावर गुरकावत उभी राहिली... हिची तर घाबरगुंडीच उडाली! मी बाहेर येईपर्यंत त्या दोघी तशाच उभ्या! ही आक्रमक, आणि ती घाबरलेली! मला खरंतर जोरात हसू येणार होतं, पण प्रसंगावधान राखून त्या शेजारणीची सुटका केली! तिनं परत कधी घरात पाऊल टाकलं नाही मी नसतांना!!! आजही आठवलं तर हसू येतं! तर अशी ही सुमा! 13 वर्ष आम्हाला कधीही त्रास न देता उलट खूप आनंद देऊन, एक सुंदर, स्वास्थ्यपूर्ण आणि निरोगी निरामय आयुष्य मजेत जगून आम्हाला सोडून गेली, तेंव्हा मी अभिषेकच्या वेळी ८व्या महिन्यात होते. तिला डायरिया झाला आणि ८ दिवस झुंझारपणे लढली. डॉक्टरकडे,  टेबलवरच, माझ्या हातातच तिनं प्राण सोडले होते... मी खूप disturb झाले, पण तिला रिक्षात घालून परत आले, युनिटच्या गेटवर साहेबांसाठी निरोप ठेवला आणि घरी आले... तिला आम्ही आमच्या बागेत जागा दिली.... माझ्यासाठी हे सगळं खूप क्लेशकारक होतंच, पण ५ वर्षांच्या भानुप्रियाला काय आणि कसं समजून सांगायचं? मृत्यूची तीव्रता आणि त्याचा आघात ह्याबाबत मोठ्यांना समजत नाही, तर हिला काय सांगणार होते? ती खिडकीपाशी सगळं बघत उभी होती... काय समजलं तिला माहित नाही... पण ह्या आघाताच्या अनुभवामुळेच असेल कदाचित तिला नंतर अभिषेकच्या अशाच अकाली निरोप घेण्याचा घाव सोसता आला असावा... बरोबर एक वर्षानं...दिवाळी होती...  श्रीनगरला जाऊन आलो होतो...दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी हे सर्व घडलं, आणि अभिषेकला हॉस्पिटल मधून घरी आणलं सगळ्या घरात आकाशकंदील लागले होते...मी तर शॉकमध्ये होते, काही कळेनासं झालं होतं, मन बधीर झालं होतं... मी हा आघात पचवायला सक्षम नक्कीच नव्हते....पुन्हा तेच प्रश्न... भानुप्रियाला काय आणि कसं सांगायचं? सुमाचं वय झालं होतं त्यामुळे तिचं जाणं समजू शकतो, पण अभिषेक? एक वर्षाचा कोवळा जीव? आमचा समजुतदारपणा कुठे गेला होता? माझा विरोध असतांना देखील त्याच्या बाबांचा श्रीनगरला जायचा अट्टाहास त्याच्या जीवावर बेतला...ह्याला मी जबाबदार होते... डॉक्टरांनी पण बेपार्वाही का दाखवली? का? त्यांना child specialist असून काही कळलं नाही? अनेक प्रश्न डोक्यात घोंगावत होते...पण उत्तर एकही प्रश्नाचं नव्हतं... आम्हा दोघींचं अवघ जग कोलमडलं होतं... आजही खरंच वाटतं नाही असं घडलंय हे... पण सत्य नाकारू शकत नाही...
नाशिकला आल्यानंतर देखील मोटरसायकल भरपूर फिरवली! मग मात्र, ३० वर्षांच्या अविरत सेवेनंतर तिला आराम द्यावा लागला! आणि ह्याच दरम्यान दोन नवीन सवंगड्यांची एन्ट्री झाली! एक, आमची छोटीशी नाजुकशी ‘scooty’ जी भानुप्रियानी भरपूर वापरली. आणि पाठोपाठ आमची ह्युंदाई  ‘i10’ दारात दिमाखानं उभी राहिली! आमची ‘लाल परी!’
मला कारचं पूर्वीपासून खूप आकर्षण होतं आणि आहे! चारचाकी वाहनांची मला craze आहे! मला आठवतंय... बसमध्ये जेंव्हा ड्रायव्हरच्या मागे उभं रहायला मिळायचं, तेंव्हा रस्त्यावरच्या बेशिस्त वाहतुकीतून, वाहनं, पादचारी, येणारे stop, चढ उतर करणाऱ्या माणसांची कधी कधी विक्षिप्त वागणूक, भांडणतंटे, अशी अडथळ्यांची शर्यत पार करीत, शांतचित्ताने, ड्रायव्हिंगचे सारे कसब पणाला लावून, कुणालाही हानी न पोहचवता, शिताफीनं गिअर बदलत, लीलया गाडी काढतांना बघायचे तेंव्हा त्या ड्रायव्हरचं खूप कौतुक वाटायचं!
i10 आल्यानंतर, मी ड्रायव्हिंगच्या क्लासला जायला सुरुवात केली. ह्याच दरम्यान, मला driving school च्या गाडीत मागे बसलेली असतांनाच छोटासा अपघात झाला... माझ्या डाव्या हाताचे कोपराचे हाड मोडले... सगळ्या सोपस्कारातून हिमतीने बाहेर पडले! शांतचित्ताने O.T. मध्ये निघाले तेंव्हा भानुप्रियाला शंका आली की आईला O. T. म्हणजे कुठलासा mall किंवा shopping complex वाटला की काय?(हा..हा..हा..) माझ्या मनात भितीचा लवलेशही नव्हता! पोलीसात केलेली तक्रार, हॉस्पिटल आणि इतक्या दुखापतीत देखील मी इतकी शांत कशी होते ह्याचं येणाऱ्या मंडळींना आश्चर्यच वाटत होतं!
तणाव मुक्त रहाण्यासाठी ड्रायव्हिंग करते! सायकल पासून आज गाडीपर्यंत...मी सावधगिरी नक्कीच बाळगते गाडी चालवतांना, पण वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या रस्त्याचे वेगवेगळे मूड, वाहतुकीचा नवीन खेळ बघत, आजूबाजूच्या मंडळींचं निरीक्षण करत, नवीन काय दिसतंय ह्याचा वेध घेत, जमलं तर काहीबाही खरेदी करत, गाणी ऐकत, म्हणत  गाडी चालवायची नशा काही औरच आहे! ड्रायव्हिंग करण्याचीच एक झिंग येते मला!  मन relax होतं! जगायची एक नवी उर्मी, नवीन जोश मिळतो! मला घरच्यांसोबत कारमधून फिरायला, shopping ला, सिनेमा नाटकाला जायला नक्कीच आवडतं, पण एकटीनं गाडीतून जायला फार आवडतं! मी ड्रायव्हिंग करून एकदम relax होते, मी ‘माझ्यात’ एकरूप होते! कार ड्रायव्हिंग हे माझ्यासाठी ‘स्पा’ थेरपी आहे!..’कार स्पा!!! हा शब्द प्रयोग आत्ताच सुचला!
मी देवळालीला प्रमोदिनीकडे बऱ्याचदा जाते, तेंव्हा माझा दोस्त ‘freddy’ माझ्या कारचा आवाज ऐकून खूप खुश होतो!! त्याला कारमधून joy ride मिळते ना! पण मी त्याला न्यायला थोडा जरी उशीर केला, तर तो मला चावून आणि जोरात भुंकून हैराण करतो! मजा येते! त्याचं निर्व्याज्य प्रेम बघून खूप आनंद मिळतो! पण मला तो जास्त आवडायचं कारण म्हणजे त्याला खायला खूप आवडतं! बिस्कीट, मटण, पोळी...काहीही खातो आवडीनं! सुमा आणि timmy दोघंही ह्याबाबतीत अगदी उदासीन होते...आणि मला असा dog पाहिजे होता... मस्तमौला... कधीही, काहीही खाऊन मजेत राहणारा! प्रमोदिनीकडे जोधपुर, बठींडा आणि इतर ठिकाणी गेले आहे रहायला तेंव्हा त्याच्याशी खेळायची खूप मजा यायची! निघतांना घरातल्यांचा निरोप घेणं सोपं, पण freddy चा निरोप घेणं खूप कठीण.... कारण तो खूपच भोळा आणि मायाळू आहे! freddyनं इतकं जीव लावलाय मला! आम्ही सगळे गेलो की तो त्या दिवशी जेवत नाही आणि उदास बसून रहातो असं प्रमोदिनी म्हणते...
आमचा timmy म्हणजे ‘sample piece’ होता...पोमेरीअन असून पण थोडा मोठा होता तो... आणि सुमाच्या एकदम उलट! उनाड, मौका मिळाला तर काहीतरी प्रताप गाजवूनच येणार! पण मनमिळाऊ आणि पटकन मैत्री करणारा होता! युनिटमधल्या काही जवानांशी त्याची घट्ट मैत्री होती! तो शिताफीनं आपलं काम करून घ्यायचा... पटकन लळा लागायचा त्याचा पण तो एकदम अलिप्त असायचा! एक गम्मत सांगते... लखनौला एक जवान होता त्याला timmy फार आवडायचा... एकदा तीन दिवसांच्या सुट्टीवर निघाला, तर किती वेळ timmyशी बोलत बसला होता..’timmy, मैं जा रहा हुं... वापस आता हुं...क्या? अभी जाके वापस आता हुं.. ठीक है?’ वगैरे वगैरे... मी त्याला म्हटलं... अरे, असाच बसून राहिलास, तर तीन दिवसांची सुट्टी इथेच संपेल! घरी जाशील तेंव्हा तर परत येशील?’ मग हसायला लागला! तो गेला, आणि timmy? तो मस्त! विसरून सुध्दा गेला त्याला! timmyने कधी मनाने कुणाशी बांधिलकी नाही ठेवली... फक्त कामापुरता गोड बोलायचा... फिरायला जायचं, खेळायचं, दोन चार जवान एकत्र बसून चहापाणी करीत असले की त्यांच्यात जाऊन ऐटीत मध्ये बसून गप्पा मारायच्या...भाव खायचा... बस.. त्याला औषधं, इंजेक्शनं अजिबात आवडायची नाहीत... अशा वेळी आमचा खूप राग यायचा त्याला! मग तासंच्या तास गप्प बसून रहायचा कोपऱ्यात! रुसून! नाशिकला त्याला घरात एकट्याला ठेऊन मी बऱ्याचदा बाहेर जायची ते त्याला अजिबात आवडायचं नाही! मी परत येईपर्यंत पूर्ण वेळ भुंकत बसायचा...
timmyनी अनेक प्रताप गाजवले आहेत! मौका मिळाला की घरातून पळून जायचा! मग जवानांची पलटण पाठवायला लागायची त्याला शोधायला! एकदा बंगलोरमध्ये आमच्या मोठ्या बंगल्यातून पसार झाला... शोधला खूप... सगळे हैराण... जास्तीची कुमक मागवली युनिट मधून जवानांची..(हा..हा..हा..) दहा दिशांना दहा मंडळी निघाली शोधायला! सरते शेवटी सापडला कुठे? घराच्या मागच्या मैदानावरून आत येऊन, हळूच दुबकून झाडाखाली झोपला होता! चांगला चोप मिळाला माझ्या हातचा त्यादिवशी... पण काही उपयोग नाही! हे चालूच राहायचं अधून मधून! लखनौला एकदा मी मोटरसायकलवर आईला घेऊन निघाले... आणि आई म्हणली की अगं, कुठलासा पांढरा कुत्रा बघ धावतोय, आणि कुत्री त्याच्या मागे लागल्येत... माझ्या मनात एकदम धस्स झालं... मी गाडी थांबवली, पहाते तर timmy! बापरे! काही कुत्री लागली होती त्याच्या मागे, आणि तो आमच्या गाडीच्या मागे पळत येत होता! मग आजूबाजूच्या मंडळींनी कुत्री हाकलली, timmyला गाडीवर घेतलं... एक जोरात झापड दिली त्याला... माझं हातातला जाड कडं लागलं असावं त्याला... खूप राग आला होता मला त्याचा... मी कधीही सुमा किंवा timmy वर हात उगारला नव्हता... हे तर सोडाच, कुठल्याच प्राण्यावर कधी हात उगारला नव्हता... पण माझ्या प्रेमापोटी मी त्याला मारलं.... त्यादिवशी त्याचं काय झालं असतं ह्याची कल्पना केली तरी अंगावर काटे उभे रहातात... एकदा भानुप्रियाच्या वेळेस आठव्या महिन्यात, सुमाच्या अंगावर पण कुत्री धावून आली होती, तेंव्हा पण तिला जीवाच्या अकांतानं, उचलून घेतली होती... नाहीतर... एकदा timmyनं हडपसरला लोखंडी गेटमध्ये डोकं अडकवून घेतलं होतं... काय म्हणायचं? त्यानं लखनौला एकदा मोतीचुराचा लाडू खाल्ला आणि तेंव्हा पासून तो फक्त तोच लाडू खायचा!
माझ्या ‘बकेट लिस्ट’ मधली आणखीन एक गोष्टं म्हणजे मनसोक्त प्रवास करणे! बाबांबरोबर काही वर्ष प्रवास केलाच, पण पुढे जवळ जवळ ३० वर्ष अनेक प्रवास केले! बाबांबरोबर केलेले प्रवास म्हणजे धमाल...मस्ती... ट्रेनचा प्रवास म्हणजे अप्रूप होतं त्याकाळी... फर्स्ट क्लासचा ‘कुपे’ म्हणजे सहा सीट आमच्याच! दार लावलं की झालं... कुणी येणार नाही, काही नाही! प्रवासाची तयारी पण जोरदार... आधी तिकिटांचे रिझर्वेशन व्हायचे... मग सामानाची बांधाबांध, रेल्वेस्टेशनवर पोहोचायचं... सगळं शिस्तबध्द आणि काटेकोरपणे योजलेल्या पध्दतीने. ह्या सगळ्या गोष्टी मी तेंव्हा जाणता अजाणता शिकले आणि त्या सगळ्याचा पुढे खूप उपयोग झाला! मी पण सगळी तयारी एकदम व्यवस्थित करायची... जेवणा खाण्याच्या, प्रवासात लागणाऱ्या इतर वस्तू.. सगळं नीट pack करून घेतलेलं आणि वेळेआधीच आम्ही दोघी तयार असायचो! वेळेचे आणि कामाचे व्यवस्थापन नीट केले तर गोंधळ होत नाही आणि गैरसोय टाळता येते. शिवाय आपले काम सुरळीतपणे पार पडते!
रात्रीचा प्रवास असायचा त्यामुळे खूप मजा यायची! त्या छोट्याशा जागेत, सामान नीट लावून, मग आम्ही पत्ते, अंताक्षरी, ओळख पाहू?, paper games, ludo.. आणि काही काही खेळायचो! आईची एक केनची बास्केट असायची... ती बास्केट म्हणजे अलिबाबाची गुहाच होती... त्यातून वेळोवेळी काय काय वस्तू बाहेर यायच्या... सुरी, चमचे, बटर, साखर, मीठ, ब्रेड, जाम... आणि बरंच काही! ही बास्केट म्हणजे माझ्या पण जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे! अशी बास्केट नसली तर मला चुकल्याचुकल्या सारखं वाटतं... काहीतरी विसरल्या सारखं वाटतं... भानुप्रिया चेष्टेनं म्हणते की प्रवासात  माझं डोकं नेहमी त्या बास्केटमधेच असतं... त्यातून काहीतरी काढत असते, किंवा काहीतरी ठेवत असते!
तेंव्हा थर्मास असायचे त्यात पाणी, चहा, दूध भरण्यासाठी, काही खायला मिळालं तर डब्यात घालून आणण्यासाठी डबा घेऊन मोठ्या स्टेशनवर उतरायला लागायचं...आणि धावत पळत हे सर्व घेऊन, गाडी सुटायच्या आत डब्यात चढायचं! मला फार मजा वाटायची...आजही वाटते! कारण साहसी, धाडसी काम मी नेहमीच करत आलेली आहे! पळत जाऊन, थोडक्या वेळेत, मोजके पैसे भरून, हवी ती वस्तू, फळ, खाद्यपदार्थ अंगावर न सांडवता, गर्दीतून वाट काढीत, नेमक्या आपल्याच डब्यात चढायचं.... हे thrill होतं माझ्यासाठी...आणि मला ते जमायचं! काहीच काम नसेल, तरी स्टेशनवर खाली उतरून, गम्मत बघायची, आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण करायचं, आणि हिरवा कंदील दिसला की डब्यात चढायचं! स्टेशनवरची घाईगडबड... सामान, मुलं, म्हातारी माणसं सांभाळून चढ उताराची लगबग ... बघायला मजा येते.. आणि माणसाचे अंतरंग बघायला मिळते...विविध जातीधर्माचे लोक, त्यांच्या भावभावना, विचार, संस्कृती, संस्कार... सगळं बघायला मिळतं! मग गाडीत चढल्यावर आपल्या जागेवर बसण्याची धडपड,कायमचं इथे वास्तव्य करायचं असल्याच्या अविर्भावात कमी जागेत आपलं सामान ठेवण्याचे तोकडे प्रयत्न आणि मग त्यासाठी भांडण तंटे... एकदाची गडी सुटली की, ज्यांच्याशी हमरीतुमरीवर आले होते, त्यांच्याशीच बोलायला सुरुवात होते, खाद्यपदार्थांची देवाणघेवाण होते, आणि भाईचारा निर्माण होतो! आपलं स्टेशन आलं की पुन्हा तोच ड्रामा... सामान घेऊन माणसं उतरून पुढे होतात! हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही हे मी माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून सांगू शकते!
ह्या सगळ्या गदारोळात काही महत्वाची वस्तू मागे सुटली तर मात्र.....बापरे! मी ह्या दिव्यातून गेले आहे! एकदा पुण्याला येतांना, ST मध्ये माझी छोटी पर्स विसरले होते...सुमा होती माझ्या बरोबर... ही पर्स मिळवण्यासाठी मी आणि सचिन बसच्या पुढच्या stop ला म्हणजे साताऱ्याला गेलो होतो! २ तासात! मध्यंतरी, जोधपूरला विमानानी गेले होते... आई, बाबा आणि निशांत सोबत होते... मी माझी  पर्स सीटवरच विसरले... ramp वर येत होते तर आईच्या ही गोष्टं लक्षात आली! मग पळत मागे गेले... मला तिथेच थांबवलं गेलं... त्या attendantच्या हातात माझी पर्स दिसेपर्यंत जीवात जीव नव्हता माझा! ही पर्स राहिली असती तर... कल्पनेनं सुध्दा कापरं भरतं मला....थंडीत घाम फुटावा तसं होतं... कारण ही पर्स पुन्हा मिळण्यासाठी कोणत्या दिव्यातून जावं लागलं असतं ते मलाच माहित! ही पर्स म्हणजे आपली ओळख आहे... त्यात सगळी महत्वाची कागदपत्र, कार्ड्स सगळच असत... एक वेळ पैसे हरवले तरी चालतील, पण पर्स? ना बाबा ना! एकदा एक छोटी bag विसरले होते बसच्या overhead लगेज मध्ये! पुण्याहून नाशिकला आले, आणि उतरल्यावर रिक्षात बसले तेंव्हा लक्षात आलं... मग रिक्षा दौडवली बसच्या मागे आणि bag मिळाली! पण ह्या नाटकात रिक्षावाल्याची चांदी झाली ना! त्याला दुप्पट पैसे मिळाले ना? असो..
आपल्या स्टेशनवर पोहोचलो की प्रवास संपला असं नाही बरं... स्टेशन वरून पुढे आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी आणखीन काही दिव्यांतून पार जायचं असतं... हॉटेल, कुणा नातेवाईकांचे घरी, किंवा आपल्याच घरी जायचे... पूर्वी डायरीत नाव, पत्ता, फोन नंबर सगळं टिपलेलं असायचं... (त्याकाळी एवढ्या landline नव्हत्या आणि मोबाईल तर नव्हतेच!) मग तिकडे जाणारे वाहन शोधायचे... खाजगी वाहनांची कमतरता, आणि कार म्हणजे तर ऐश... कुणाकडेच नसायची... मग बसनी जायचं, किंवा मुक्कामाच्या ठिकाणाचे अंतर आणि रिक्षा चालकाच्या मर्जीनुसार भरमसाठ भाडेआकारणी वरून हुज्जत घालून अखेर सौदा पक्का करून रिक्षात माणसं आणि सामान कोंबून, भरधाव वेगाने, आडव्या तिडव्या चाललेल्या रिक्षात जीव मुठीत धरून बसायचं... म्हणजे जमलं तर ‘बसायचं’... नाहीतर इकडे तिकडे कलंडत रहायचं...आणि रोखून धरलेला श्वास इच्छित ठिकाणी रिक्षा थांबली की मगच सोडायचा! तर म्हणायचा उद्देश हा की प्रवास आणि मुक्काम दोन्ही महत्वाचं असतं! अनेक क्षेत्रात प्रगती झाली असली तरी, आणि प्रवास तितका कष्टमय राहिला नसला तरी, ‘लवकर निघा सुखरूप पोहोचा’ ह्या तत्वाशी तडजोड करू शकत नाही. ह्यामध्ये आपल्याच सुरक्षिततेची हमी आपण घेतो. शिवाय हाताशी थोडा वेळ असला, की अचानक उद्भवणाऱ्या समस्या सोडवायला थोडा अवधी मिळतो आणि अनावश्यक मनःस्ताप किंवा पंचाईत टाळता येते. जोधपूरचीच गोष्ट... आम्ही मुंबईला एअरपोर्ट वर पोहोचलो, पण चुकीच्या टर्मिनलवर गेलो... आणि थोडं लांब असलेल्या टर्मिनलवर जायचं होतं... वेळ अगदी कमी...मग तिथे एकच पर्याय होता.. रिक्षा करून जायचं... ड्रायव्हरनं आमची निकड ओळखून,दोन रिक्षांचे ८०० रुपयात तिकडे सोडायची तयारी दाखवली! (त्यानं तयारी कसली दाखवली... आम्हीच ‘अडला हरी...’ च्या उक्तीप्रमाणे पैसे द्यायची तयारी दाखवली!) चार मिनिटात त्यानं फ्लायओव्हर वरून आम्हाला टर्मिनलवर सोडलं आणि आम्ही चेक इनच्या अगदी वेळेत पोहोचलो!
सेकंड AC ची तिकीटं असतांना सुध्दा मी आणि भानूप्रियानं पुष्पक एक्स्प्रेस मधून मुंबई ते लखनौ रात्रीचा प्रवास थर्ड क्लास मधून केला आहे! साईडच्या समोरासमोर असलेल्या दोन लाकडी सीटवर बसून हा प्रवास केला.... रात्री मोठी haversack मध्ये आडवी टाकून, भानुला झोपायला जागा केली... MCOच्या भोंगळ कारभारामुळे आमचा कोच आयत्यावेळी बदलला होता, त्यामुळे मला नावं दिसलीच नाहीत... वेळ थोडा होता... मग आमच्या हमालानं मला 3rd class मध्ये बसून घ्यायला सांगितलं, आणि TC कडून नंतर कोच मध्ये जायचा सल्ला दिला! पण गच्च भरलेल्या डब्यातून उतरायला जागाच मिळाली नाही, आणि एकदा उतरले, पण TC सापडला नाही... आमच्या नशीबानं दोन मुली पुढे उतरल्या आणि ह्या दोन सीट आम्हाला त्यांनी दिल्या! त्यांचे आभार मानले मी! पण ह्या प्रसंगातून धडा मिळाला... काही झालं तरी गाडी सोडायची नाही! (पूर्वी बस पण नाही सोडायचे मी...लटकून घ्यायचे... लोकं आपोआप आतमध्ये घेतात!) इकडे लखनौला सगळी मंडळी आमची सेकंड ACच्या डब्यासमोर वाट बघत उभी होती आणि आम्ही जनरल मधून उतरलो! ट्रेन सुटल्यानंतर त्यांनी आम्हाला शोधलंच म्हणा! ह्याच पुष्पक मधून एक वर्षी थंडीत प्रवास केला, तेंव्हा थंडीनं पाय गारठून गेले होते... कपडे, टॉवेल जमतील तेवढे कपडे गुंडाळले तेंव्हा थोडं बरं वाटलं!
प्रवास केल्यानी आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात, ज्ञानात भर पडते, आणि आपण ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणाची एक माफक कल्पना आपल्याला येते. मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर तिथे फिरलो, फेरफटका मारला की त्या प्रदेशातल्या माणसांची, त्यांच्या संस्कृतीची, खानपानाची, रहाणीमानाची, तिथल्या समाजिक, राजकीय जडणघडणीची कल्पना येते. त्या प्रदेशात तंत्रज्ञान, उद्योग व्यवसाय, आर्थिक दृष्ट्या झालेल्या प्रगतीची देखील कल्पना येते. बाजारहाट हा कोणत्याही प्रवासाचा महत्वाचा भाग असतो... तिथे प्रचलित असलेली खाद्यसंस्कृतीची ओळख करून घेणं, सामान्य  वाहनांनी भटकंती करणं आणि ऐतिहासिक वगैरे वास्तूंना भेट देणं हे कोणत्याही प्रवासातलं मुख्य आकर्षण असतं! आणि हो, स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारून खरेदी करणं आणि फोटोंच्या रूपाने तिथल्या आठवणी सोबत आणायच्या!
एकदा रत्नागिरीला गेले होते. तिथे आंबोळी आणि चटणी मिळते. काही केल्या मला हे खायला मिळालं नाही. परत निघायची वेळ झाली, आणि ’आंबोळी’ ‘आंबोळी’ चा जप करीत स्टेशनकडे निघाले. आणि एखाद्याची श्रद्धा कशी काम करते बघा हं... स्टेशनवर गाडीची वाट पाहत होतो... अगदी १० मिनिटात गाडी येणार..... इतक्यात तिकडून एक मुलगा आंबोळी आणि चटणी घेऊन आमच्यापाशी आला! मी इतकी खुश झाले की आनंदाने नाचायलाच लागले असते! मन भरेस्तोवर आंबोळी चटणी खाल्ली, आणि त्या मुलाला धन्यवाद दिले! कारण मला त्या आंबोळी चटणी विकणाऱ्यात  ‘देव’ दिसला!
मला देवाचा मदतीचा हात संकटाच्य प्रसंगी जास्तच जाणवतो! लखनौला थंडीच्या दिवसात,कोवळ्या उन्हाची मजा घेत मोटरसायकलवर चालले होते. मागून vespa वर दोन १०वीची मुलं अचानक येऊन धडकली! त्यांच्याकडे लायसन्स नाही, गाडीला ब्रेक नाही... शिशुपालासारखे शंभर अपराध... माझ्या गाडीने अचानक वेग पकडला आणि.... माझ्या सावधगिरीमुळे मी गाडी डावीकडे वळवली, आणि सुदैवाने तिथे एक नाला होता आणि त्यावर कट्टा असतो तिथे एका मोटरसायकलला टेकून दोन युवक उभे होते गप्पा मारीत.. जीवाच्या भितीने त्यातल्या एकाच्या गळ्याला घट्ट टाळूंकी मारली आणि गाडी सोडून दिली! गाडी नाल्याच्या थोडं अलीकडे जाऊन पडली... नाल्यात फक्त मोठाले गोटे होते... मी पुढे जाऊन पडले असते तर काय झालं असतं??? पण मी त्या मुलांमुळे वाचले किंबहुना, ह्या मुलांच्या रुपानं देवच माझी मदत करण्यासाठी धावला असा माझा ठाम विश्वास आहे! त्या vespa वरच्या मुलांना थांबवून विचारलं, रागावले पण... तेवढ्यात, तिकडून एक इन्स्पेक्टर साहेब चालले होते, त्यांनी गाडी थांबवून विचारले काय झाले...पण त्या मुलांचे कोवळे वय बघता मलाच दया आली आणि मी काही झालं नसल्याचं सांगून त्यांची आणि माझी सुटका करून घेतली.
एकदा पावसाळ्यात देवळालीच्या बंगल्याच्या ramp वरून गाडी काढतांना,घसरली, आणि माझा दावा पाय गाडीखाली आणि मी निम्मी ramp च्या खाली... सकाळची वेळ होती, आणि घरात काही भैय्या काम काम करत होते म्हणून त्यांनी मला उचलले... नाही तर??? fracture झालं होतं तेंव्हा...पण अशा संकटात देव माझं रक्षण करतो हे त्रिवार सत्य!
देवळालीतच एकदा मोटरसायकलवर मागे आमच्या पाटील भैय्याची बायको छोट्या भानूला मांडीवर घेऊन बसली होती, आणि आम्ही दुपारी कुठेतरी चाललो होतो... आमच्या रस्त्यावरून उजवीकडे मेन रोडला लागण्यासाठी मी स्लो झाले, आणि माझी गाडी सरळ एका लटकलेल्या टेलिफोनच्या वायरीत जाऊन अडकली... माझ्या गळ्यात वायर अडकली...आम्ही पडलो... त्या दोघींना काही लागलं नाही, पण माझ्या गळ्यातून रक्त यायला लागलं...  समोरच्या quarter मधून एका ऑफिसरच्या बायकोनं बघितल्याबरोबर ती तिची गाडी घेऊन आली, मला बसवलं आणि MH ला घेऊन गेली. तोवर त्या दोघी घरी गेल्या आणि माझी गाडी पण कुणीतरी घरी आणून सोडली. डॉक्टर म्हणाले जखम खूप खोल नाही, नशीब बलवत्तर म्हणून वाचलात! मलमपट्टी करून आले परत आणि देवाचे आभार मानले कारण मी जर स्पीडमध्ये असते तर काय झालं असतं???? नंतर टेलिफोन डिपार्टमेंट मध्ये जाऊन साहेबाला चांगले झाडले! शिवाय माझा गाडीचा खर्च घ्यायला येईन म्हणून तंबी पण दिली... पैसे मिळाले पण ते फार महत्वाचे नाही... आपल्याला नुकसान झाले तर त्याला वाचा फोडण महत्वाचं! जान सलामत तो गाडी पचास!
नाशिकमधे नुकतीच आले होते, आणि ड्रेनेजचं काम करण्यासाठी एका माणसाला बोलावलं होतं तो काम करीत होता. मी इकडे बागेत काही काम करता करता एक पाय ड्रेनेजच्या ढाप्यावर ठेऊन वाकले... आणि ढापा तुटला... मी अर्धी septic tank मध्ये घसरले... अर्धी बाहेर बागेत पडले म्हणून वाचले! माझा जोरात आवाज ऐकून तो माणूस धावत आला, मला बाहेर काढलं... मी भीतीनं थरथरत होते अक्षरशः....मी बागेच्या बाजूला न पडता त्या tank च्या बाजूला पडले असते तर????म्हणूनच माझी भगवंतावर पूर्ण श्रध्दा आहे! मला कोणत्याही मंदिरात जायची गरज वाटत नाही, त्यांच्या दानपेट्या माझ्या कष्टाच्या कमाईच्या पैशांनी भरणं मला अजिबात पटत नाही नी मी टाकतही नाही पैसे... कारण हे दान तसेही व्यर्थच जाते हे सर्वश्रुत आहे... प्रत्येक वेळी माझ्या मदतीला आल्याबद्दल त्याचे आभार मानते आणि त्याची आठवण म्हणून, कुणा गरजू माणसाची लहान मोठी गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर करते... सत्पात्री दान... यश तो देतोच!
रोजच्या जीवनात देखील, मी यथा शक्ति, यथा मति कुणाची मदत करू शकत असेन, तर जरूर करते, कारण मला नेहमी वाटतं, मी मदत नाही केली तर दुसरं कुणीतरी करेलच... पण अहंकार वाढवण्यापेक्षा आपले पुण्यकर्म वाढवले तर बरेच ना? प्रवासा पेक्षा मुक्काम महत्वाचा!
प्रवास आणि बाजारहाट हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत. प्रवासात सामान कमी असावं असं माझं मत आहे, पण दरवेळी ते शक्य होतंच असं नाही...म्हणजे बहुतेक वेळा ते शक्य नसतंच!! जिकडे जाते तिकडे shopping होतंच...मग सामान वाढतंच की! shopping हा माझा छंद आहे आणि बाजार हे माझ्या आनंदाचं ठिकाण! ‘देई वाणी, घेई प्राणी’ असे न करता, एखादी छान ऑफर मला खुश करून जाते! प्रत्येक रुपयाचे पुरेपूर मोल मिळाले पाहिजे, फालतू खर्च करायचा नाही! घासाघीस करून सांगितल्या किमतीपेक्षा कमी किमतीत चांगली वस्तू घेतल्याचा आनंद काही और असतो! मग माझ्या वाढलेल्या सामानाचं मला अजिबात ओझं वाटतं नाही! मला खरेदी करायला आवडतं, पण घरात अनावश्यक साठवणूक करायला मला अजिबात  आवडत नाही. आपलं घर, हॉटेलची रूम किंवा कोणत्याही कारणाने वापरत असलेली आपली जागा मला स्वच्छ, चकचकीत, वस्तू जागच्या जागी आणि छान मोकळी ठेवायला आवडते! ती जागा मी तिथून जातांना तशीच ठेवते जशी ती मला परत आल्यावर दिसायला हवी असते! वेळेवेळेला नको असलेल्या वस्तू काढून, त्या वापरण्यायोग्य असतांनाच कुणा गरजूला देऊन टाकते! कचरा कमी केल्याचा आनंद, कुणालातरी वस्तू उपयोगी पडल्याचा आनंद, आणि मला shopping करण्यासाठी पुन्हा नवीन बहाणा मिळाल्याचा आनंद!!!, आनंदी आनंद गडे!
एकेकदा अशीकाही खरेदी केलेली आहे की ज्याचे नाव ते! जोधपूरला संपूर्ण मार्केट मीच रिकामं केलं होतं बहुधा!! कपडे, दुपट्टे...काही विचारू नका! त्या सर्व सामानाचं ओझं उचलतांना माझी आणि निशांतची अक्षरशः दमछाक झाली होती! बिचारा! बठींडाला गेलो होतो, तिथेही तेच! रोज प्रमोदिनी बरोबर बाहेर गेलं, की येतांना काय काय घेऊन येऊ ह्या विचारानं आई हैराण व्हायची! वाढता वाढता वाढे...भेदिले शून्य मांडला... ह्या न्यायानं सुटकेस वाढायच्या आणि सोबतच माझा आनंद! खरेदी म्हणजे एक प्रक्रिया आहे... म्हणजे आधी यादी बनवायची, मग बाजारात जायचं, खरेदी करायची आणि घरी आल्यावर लक्षात येतं की आपल्या यादीपेक्षा कैक पटींनी जास्त खरेदी झाली आहे! कमी खरेदी झाली तर मला चुकल्या सारखं वाटतं! जाता जाता, सहज केलेल्या खरेदीचा मला जास्त आनंद होतो! shopping हे प्रवासासारखे आहे... ही प्रक्रिया एन्जॉय करायची, आणि त्याचं अंतिम ध्येय म्हणजे आपण त्या सर्व वस्तूंचा घेतलेला पुरेपूर उपभोग, किंवा आपल्या प्रियजनांना भेट म्हणून दिलेल्या वस्तूंची आठवण! तामिळनाडूच्या ट्रीपमध्ये ‘पलानी’ हे श्री कार्तिकेयाचे पुजाक्षेत्र आहे तिथे गेले होते. दर्शन झाल्यावर, मार्केट मधून फिरतांना सुरुवातीला काहीच खरेदी करण्यासारखं मिळत नव्हतं म्हणून थोडी हिरमुसले होते... आणि अचानक माझी नजर मोराच डिझाईन असलेल्या विविध रंगी  कॉटनच्या साड्यांवर पडली... लाल, निळा, हिरवा... सापडलं! तर मोर हा कार्तिकेयाचे वाहन असल्यामुळे त्या साड्यांवर मोर होते! स्वतःसाठी एक साडी निवडली आणि अगदी माफक दरात साडी मिळाल्याच्या आनंदात गेस्टरूमवर आले. सकाळी परत निघतांना आणखीन काही साड्या घेतल्याच...काहीच खरेदी नाही केली असं नको व्हायला..नाही का?
कळण्याची भाकरी आणि वांग्याचे भरीत ही जळगावची खासियत! ही भाकरी तिथल्या उष्ण हवेमध्ये शरीराला थंडावा देते. मी बऱ्याच वेळा ही भाकरी केली आहे. जळगाव जरी जिल्ह्याचं ठिकाण असलं, तरी व्यापार आणि राजकारण ह्या भोवती दुनिया फिरतांना दिसते. जीवनमान सुधारण्यासाठी कुणी फारकाही करीत नाही.
बुलडाणा सारख्या छोट्या जिल्ह्यात सुध्दा मला खरेदीला बऱ्याच वस्तू मिळाल्या...लोणची, पापड, चटण्या वगैरे. इथला आर्थिक डोलारा प्रामुख्यानं शेतीवर आधारित आहे, पण दुष्काळ, राजकारण्यांचं दुर्लक्ष, काम करून जीवनमान उंचावण्याबाबतची उदासीनता ह्यामुळे तिथे आर्थिक प्रगती होतांना दिसत नाही. पण आश्चर्य म्हणजे बुलडाण्यात मला एक छोटसं सुपर मार्केट आणि वरच्या मजल्यावर एक AC थिएटर सापडलं! ‘सुपर मार्केट’ मध्ये shopping केली आणि थिएटरला जाऊन पिक्चर बघितला! डोळे आणि कान उघडे ठेऊन मोकळ्या मनानं मिळेल त्या गोष्टींचा आस्वाद घेतला, तर असे अनेक आश्चर्याचे धक्के अनपेक्षितपणे बसतात!
रत्नागिरीला कोकण मेवा खूप खाल्ला आणि भरपूर खरेदी पण केली! आंबा, फणस, केळी, नारळ, सुपारी, कोकम आणि बरंच काही कोकणातून येतं. त्यामुळे इथली बाजारपेठ कायम गजबजलेली असते. अनेक खाद्यपदार्थ घरगुती आणि चांगल्या प्रतीचे असतात, मागणी पण भरपूर असते. पण झेपेल तेवढ करायचं ह्या विचारसरणीमुळे त्यांची पूर्ण क्षमता वापरली जात नाही आणि आर्थिक प्रगती पाहिजे तशी होत नाही.
लखनौ मध्ये मी दोन वर्ष तिथल्या प्रसिध्द कॉटनच्या चिकनवर्कच्या साड्या आणि ड्रेस मटेरीअल पुण्यात आणून विकले होते... चांगला फायदा झाला होता! मी लखनौला गेल्यानंतर पहिल्यांदा ‘अमिनाबाद मार्केट’ पाहिलं आणि हरखूनच गेले! छोट्या छोट्या गल्ल्यांचं हे मार्केट. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या डिझाईनच्या चिकन वर्कच्या कपड्यांनी भरलेली छोटी छोटी दुकानं! इथला व्यापार खूप तेजीत असतो, शिवाय वुलनचे स्वेटर, नक्षीकाम केलेल्या सुंदर शाली... कलाकारी लाजवाब! तेज उन्हाळा आणि कडाक्याची थंडी त्यामुळे प्रत्येकाला परवडेल अशा किमतीत कपडा मिळतो इथे! पहिल्यांदा सायकलरिक्षात बसले...( तशी मथुरेला बसलेली आहे पूर्वी...! )कारण टपावर बसलेल्या लोकांसकट गच्च भरलेली बस हे आपण प्रवास करायचं वाहन नव्हे! आधी त्या बिचाऱ्या रिक्षावाल्याची कीव आली.. माणसं वाहून न्यायची आणि त्याची किंमत? फक्त ३० रुपये canttonment पासून अमिनाबाद मार्केट पर्यंत! ज्याचे आपल्याकडे असते तर रिक्षावाल्याने उर्मटपणे वागून देखील १०० रुपये घेतले असते! बरं रिक्षावाला म्हातारा, अशक्त... कपडे फाटलेले...ठीगळ लावलेले... त्याची रिक्षा पण तितकीच किंबहुना त्याहूनही म्हातारी... आपण बसलो की उन्हाळा असेल तर मागे घडी असलेली छत्री पुढे आपल्या डोक्यावर ओढणार... ही छत्री देखील तितकीच वयोवृध्द.... झाकते कमी आणि उघडंच जास्त पाडते... ह्याच्या जीर्ण होत चाललेल्या रिक्षाला हॉर्न नसल्यामुळे तो जोरात ओरडून ओरडून पुढच्यांना सावध करीत रिक्षा ओढणार....बरं ह्याच्या वाट्याला गिऱ्हाईक कसे येणार? जाडजूड महिला, पुरुष, त्यांची तितकीच वांड मुलं आणि जोडीला भरपूर सामान... आणि हे एवढं ओझं व्हायचं त्याच्या भाड्यासाठी घासाघीस, ओरडाआरडा करून पैसे कमी करून मग निघणार... रिक्षावाल्याची पण मजबुरी... घेतो लोकांना... चढावावर रिक्षा ओढून नेतांना झालेली त्याची दमछाक मी स्वतः बघितली आहे... पण ही मंडळी? ढिम्म गोळे असल्यासारखे आपल्याच मस्तीत, गप्पा मारीत, हसत बसलेली असतात... अर्थात त्याचंही बरोबर आहे म्हणा.. रोज मरे त्याला कोण रडे? नाईलाजास्त्व अशा रिक्षात बसायला लागल्यामुळे त्याला थोडे जास्तच पैसे द्यायचे नेहमी!
ह्या रिक्षाच्या एकूण तब्येतीवरून त्याच्या मालकाच्या सामाजिक उंची आणि आर्थिक स्थितीची कल्पना करता येते. त्यामुळे काही रिक्षा एकदम नव्या नवरीसारख्या मस्त नटलेल्या, सजलेल्या! संध्याकाळसाठी बाजूनी छोटे छोटे लाईट्स लावलेले, चमकणारा रेडियम, लोकांना सावध करण्यासाठी भोपू किंवा ट्रिंग..ट्रिंग...बेल! उत्तम प्रतीची चमकणाऱ्या कापडाची छत्री, मऊ गादी, आरामदायक सीट वगैरे वगैरे... आणि अशी रिक्षा चालवणारा रांगडा गडी! एकदम मस्तीत! रंगेल अंदाजमध्ये! तोंडात रंगलेलं पान आणि ओठावर हिंदी गाणी!!
ह्याच बाजारात मी जेंव्हा पहिल्यांदा हातगाडीवर स्वेटर, शाली ५० ५० रुपयांना विकतांना पाहिलं, मी अवाकच झाले! इतक्या स्वस्त? मग विचार आला की damage piece असतील, खराब झालेले असतील... ह्याचा शोध घेण्यासाठी माझी पावलं आपोआप गाडीकडे वळली... पाहिलं तर चांगले स्वेटर, कार्डीगन शाली होत्या!  उत्तरेत ह्यापूर्वी कधीच राहिलो नव्हतो, त्यामुळे गरम कपड्यांचा stock अजिबातच नाही आमच्याकडे! मी एवढी थंडी फतेहगढला काही दिवस अनुभवली होती...जास्त नाही...  इथे त्याहून जास्त थंडी अनुभवत होते... धुकं...दाट आणि  जमिनीला टेकलेलं! त्यामुळे गरम कपड्यांच्या शोधात बाजारात गेले होते! मग काय? मी एकदम खुश! ५० नी १०० रुपयांचे स्वेटर, शाली, टोप्या वगैरे सामानाची खरेदी केली आणि नाचतच घरी आले! पण थंडीची मजा लखनौ, सांबा मध्ये खूप अनुभवली! थंडीत बाहेर उन्हात शेकत, चहा आणि नमकीन खात, गप्पा मारीत बसायचं! वाह! दुपारचं जेवण उन्हात, आणि रात्रीचं जेवण  शेकोटीजवळ.....
लखनौ नवाबी थाटासाठी प्रसिध्द असल्यामुळे सुकामेवा, मिठाईची रेलचेल होती! काही दुकानं उत्तम दर्जाच्या मिठाईसाठी प्रसिध्द होती जसे ‘छप्पन भोग’ त्यांच्या खाण्यापिण्यात, आदरातिथ्यात नवाबी तेहजीब अजूनही असर करून आहे. सर्वसाधारणपणे इथली लोकं आदरपूर्वक, नम्र बोलणारी आणि सहकार्य करणारी आहेत. अगदी चहाच्या दुकानात गोड बोलुन, गिऱ्हाईक आकर्षित करतील! दुकानात खरेदीसाठी गेलं, तर उन्हाळ्यात थंड लिंबूपाणी आणि थंडीत गरम गरम चहा देतील!  निघतांना पण छोट्या छोट्या खान्यांत अनेक प्रकारचे मुखवास, सुकामेवा भरून ठेवलेला सुबक नक्षीकाम केलेला डबा पुढे करतील! माणूस खुश! पुन्हा पुढच्या वेळी दुकानात नक्की येणार आणि आणखीन खरेदी करणार! अर्थात सगळंच काही छान चाललंय असं नाही... कारीगर गरीब राहतात, मिळेल त्या किमतीला कला विकतात आणि त्यांच्या कलेला दसपट भाव आकारून शेठ श्रीमंत होतांना दिसतात.... त्यामुळे ही तफावत सगळीकडे दिसून येते....
बंगलोर एकदम वेगळं... इथली संस्कृती, खानपान, उद्योग- व्यवसाय, लोकांचे आचार-विचार सगळं वेगळं! ब्राह्मण वर्चस्व असलेली संस्कृती...त्यामुळे शहरभर मंदिरांचे साम्राज्य! एकूण मंडळी धार्मिक,  भाविक, श्रध्दाळू...कर्मठ म्हटलं तरी चालेल! कॉर्पोरेट क्षेत्रातला अधिकारी असो, मजूर असो, कष्टकरी असो, ऑफिसला जाणारा कर्मचारी असो... बहुतेक मंडळी कपाळावर ‘पुटु’ लावल्या शिवाय घरातून बाहेर पडणार नाहीत!  सकाळी ६ वाजता छोटी हॉटेल्स, खाण्याचे stalls गिऱ्हाईकांचे स्वागत करायला सज्ज असतात! ही मंडळी पण अदबशीर आणि सेवातत्पर असतात! पूजाअर्चा करून, देवघरात फुलांच्या माळा, अगरबत्ती, दिवा लावून मालक गल्ल्यावर बसलेला असतो! हॉटेल स्वच्छ, चकचकीत! रांगोळी सुध्दा काढलेली पाहायला मिळते दुकानांसमोर! आता मध्यंतरी नेल्लोरला गेले होते तेंव्हा पोंगल होता... बाजारपेठेत दुकानं सजली होती, पण विशेष म्हणजे अनेक दुकानां समोर, पारंपारिक पध्दतीनं चूल पेटवून, त्यावर मोठ्या हंड्यात ‘पोंगल’ शिजायला ठेवलं होतं! दुपारी कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त अनेक गिऱ्हाईकांना हा ‘पोंगल’ वाटला जातो! हे करण्यासाठी पैशांपेक्षा आपली संस्कृती जपण्याचा अट्टाहास दिसून येतो... त्यामागची भावना आणि श्रध्दा जपण्याचे संस्कार भुरळ पडून जातात!
जम्मू जवळचं सांबा हे लष्कराच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आणि सीमेपासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर असल्याने महत्वाचे ठिकाण.... आतंकवादी हमले, बॉम्बिंग, घातपाती कारवाया हे सगळं रोजचच आहे तिथे... लोकं आपल्या रोजच्या कामात गर्क असले तरी अतिशय सावधपणाने वावरतांना दिसतात.... आम्हाला खाजगी वाहन वापरायची बंदी होती, त्यामुळे मी मोटरसायकल वापरली नाही. कुठेही जायचं असेल तर फक्त सरकारी गाडीतून, दोन सशस्त्र सैनिक घेऊनच जावं लागायचं! मला सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण कोणताही पर्याय नव्हता त्यामुळे मग सवय झाली! अर्थात, इतक्या तंग वातावरणात सुध्दा तिथल्या छोट्याशा बाजारात मला खरेदीला भरपूर वाव मिळाला ना! इथे कपडा खूप स्वस्त आणि कलाकुसर पण मोहून टाकणारी! शिवाय, नियमितपणे जम्मू, पठाणकोट, चंडीगढ अशा अनेक ठिकाणी मोठ्या बाजारपेठेत जाऊन भरपूर खरेदी केली! सुकामेवा, गरम कपडे, शाली... मिठाई...काही विचारू नका! बाजारात फिरलं ना, की आपण त्या गर्दीत, त्या माणसांत एक होऊन जातो! शिवाय एक सकारात्मक ऊर्जा असते अशा गजबजलेल्या ठिकाणी की मन प्रसन्न होतं,.. इथल्या महिलांना मेकअप, कपडे, दागिने घालून फिरायची जात्याच आवड आहे आणि त्यामुळे त्यांच्या पहाडी व्यक्तित्वाला आणखीन धार येते! कलाकुसरीची कामं आणि व्यापारातही महिला आघाडीवर आहेत बरं! त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता आलेली दिसते.     
देवाच्या कृपेने आमचा दोन वर्षांचा कार्यकाळ शांततेत, आणि सुखरूप पार पडला, आणि भानुप्रियाची १२ वी झाल्यामुळे आम्ही दोघी नाशिकला कायमचं रहायला आलो! भानूच्या बाबांची शेवटची पोस्टिंग शिमल्याला झाली आणि ते तिकडे जॉईन झाले...
मला माणसांचं निरीक्षण करायला भारी आवडतं! आपापल्या कामात व्यस्त असलेली माणसं, त्यांची चाल, त्यांचे हावभाव, त्यांच्या लकबी, त्यांचा पेहराव, त्यांची मानसिक जडण घडण, त्याचे विचार, त्याचं बोलणं....ह्या सर्वातून त्या परिसराची ओळख होते नक्की! बाजार, सिनेमा थिएटर, एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी, बँक,पोस्ट ऑफिस आणि इतर अनेक कार्यालयात मला माणसांचे निरीक्षण करायला, त्यांच्या हालचालींवरून त्यांच्या मनाचा वेध घ्यायला, त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करायला आवडतं... सकारात्मक ऊर्जा मिळण्याचे आणि वेळ सत्कारणी लावण्याचे माझे विरंगुळ्याचे काम आहे हे! आपल्या देशात आपण एक नागरिक, एक माणूस म्हणून खूप कमी हसतो असा निष्कर्ष काढलेला मी ऐकलाय आणि वाचलंय पण... आपण लोकं बहुतांशी खूप उर्मट, रागीट आणि असंवेदनशील आहोत...  बहुसंख्य माणसांच्या मनात इतकं दुःख ,यातना, वेदना, राग, द्वेष, भिती, वैफल्य आणि एकूणच जीवनाविषयी कटुता भरलेली आहे, की आपण प्रेम, आदर, अनुकंपा, शिष्टाचार आणि सभ्यता विसरत चाललो आहोत... आपण आपला आनंद साजरा करीत असतांनाच कुणा गरजूची गरज भागवून त्याच्या चेहऱ्यावर हसू आणायला विसरतो ... ह्याउलट, अशी अनेक लोकं आहेत जी सदैव हसतमुखाने आयुष्याच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत त्यांच्यावर विजय मिळवत रहातात! त्यांच्या डोळ्यातली चमक आणि चेहऱ्यावरचं हसू त्यांच्या ‘जगणं’ सुंदर आणि अर्थपूर्ण करण्याची उर्मी आणि त्यांच्या आशावादाचं द्योतक असतं!
एकदा नाशिकच्या घरासमोरून जाणाऱ्या एका वृध्द आजींशी बोलत होते. मी त्यांना घरात बोलावलं. त्या आल्या, खूप गप्पा मारल्या. मी त्यांना काय घेता विचारलं...चहा, कॉफी, सरबत,, काहीतरी...त्यांनी नाजूक प्रकृतीमुळे ह्यातले काहीच घेत नाही असे सांगितले, पण मी माझा आग्रह चालूच ठेवल्यामुळे त्या आज्जींना हसू आलं! त्यांनी कपभर कोमट दूध दे म्हणून सांगितलं! घरात आलेल्या पाहुण्याचा काहीतरी पाहुणचार करता आला ह्याचाच मला आनंद झाला!
मला मुलं आवडतात! अगदी नवजात शिशु पासून मोठ्या मुलांपर्यंत कुणाच्यातही मिसळू शकते. त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांचे लाड करायचे, खाऊ द्यायचा, खेळ खेळायचे, कधी कधी पार्टी द्यायची आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं मोठ्ठ हसू बघायचं! त्यांच्यात मिसळून पुन्हा त्यांच्या सारखं लहान होता येतं, हसता येतं, खेळता येतं! त्यांच्या निष्पाप मनातल्या गुजगोष्टी ऐकून, कधी कधी काहीतरी मिळवण्यासाठी केलेली धिटाई, शिष्टाई बघून खूप आनंद होतो. कधी कधी तर मलाच काहीतरी नवीन शिकायला मिळतं! टीपकागदासारखं सगळं आत्मसात करून, पाहिजे तेंव्हा आठवून त्याचा उपयोग करणारी त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता मला मोहून टाकते! अहंकार नाही, कशाची, कुणाची आणि कसलीही भिती म्हणून नाही! त्यांच्या अखंड बडबडीनं आणि खळाळणाऱ्या हसण्याने मी काहीवेळ तरी तणाव चिंतामुक्त होते! ही अनमोल भेट फक्त लहानग्यांकडूनच मिळते!
घोडे आणि डॉग्स बद्दल मला अत्यंत प्रेम वाटतं! डॉग्सचा मनमिळाऊ स्वभाव, निर्व्याज्य प्रेम देण्याची दैवी शक्ति, त्यांची चतुराई आणि तेज बुद्धी मला फार आवडते. वेगळ्या आवश्यकता असणाऱ्या लोकांची सहायता करण्यासाठी प्रशिक्षित friendly डॉग्सची खूप मदत होते. ह्या मित्रांसोबत वेळ मजेत जातो, विरंगुळा होतो आणि थोड्या वेळासाठी ताण तणाव विसरून माणूस पुन्हा ताजा तवाना होतो! घोड्यांची ऐट, त्यांचा जोश, मस्तानी चाल, राजस वर्तन आणि अमर्याद ताकत वाखाणण्यासारखी असते! त्यांचा शाही दिमाख बघताच भुरळ पाडतो! कधीतरी घोड्यांसोबत वेळ घालवायला मिळेल अशी एक इच्छा बकेट लिस्ट मध्ये आहे....
अंतरीची मी खवैय्या आहे. मला स्वयंपाक करायला, बेकिंग करायला आवडतं, पण विविध पदार्थ खायला जास्त आवडतं! कुठेही गेले तर नेहमीचेच पदार्थ न खाता, काहीतरी वेगळं, स्थानिक पदार्थ शोधून ते खाते. मला टेबल डेकोरेशन करायला आवडतं. प्रत्येक पार्टी किंवा कार्यक्रमात काहीतरी वेगळं करायचं असा माझा आग्रह असायचा. m.k. singh नी मला हे सुरुवातीला दाखवून दिलं होतं की मेस मधून किंवा आर्मीच्या खानसाम्याकडून कितीही जेवण बनवून घेतलं, तरी आपली स्वतःची बनवलेली एक तरी dish असावी... signature dish! कोशिंबीर, चटणी, पुडिंग, काहीतरी ‘हटके’... आमच्या घरच्या पार्टीमध्ये मुलांसाठी खास आमंत्रण असायचं! त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असायची...snacks, ड्रिंक्स, जेवण आणि कधी चोकोलेट, काही छोटेसे गिफ्ट... त्या छोट्या पाहुण्यांना खूप आनंद व्हायचा...त्यांना स्पेशल वाटलं पाहिजे! इथे माझ्या घरी पण माझ्या छोट्या दोस्तांची gang आहे... ते येतात, मस्ती करतात, नाचगाणी, board games, पत्ते खेळतात, पुस्तकं वाचतात, गोष्टी ऐकतात, आणि त्यांच्या आवडीचा खाऊ त्यांना मिळतोच! माझ्याकडे इतके रमतात की घरी जायला काचकूच करतात... आम्ही पार्टी पण करतो. कधी कधी सगळे आपापल्या घरून dish आणतात, कधी इथे छोटं cafeteria आहे तिथे जातो! त्यांच्यासोबत राहिलं की मला पण नवी उर्जा मिळते!
बेकिंग आवडतं.... कधी केक बिघडला तर मन खट्टू होते आणि पुढचा चांगला केक बनेपर्यंत जीवाला चैन पडत नाही... विश्लेषण करते, काय चुकलं ते शोधायचा प्रयत्न करते... आणि केक चांगला, मनासारखा झाला तर आनंदाच्या भरात तो खातही नाही...नुसती बघत बसते! केक चांगला होणं महत्वाचं!
रव्याच्या लाडवाचा एकतारी पाक मला सुरुवातीला जमायचा नाही...पण कालांतराने जमला! पुरणपोळी आणि उकडीच्या मोदकांची हीच कथा... अनेक वेळा अपयश पचवून, निराश होऊन पुन्हा मनानं उचल खायची, पुन्हा हे पदार्थ बनवायचे... ज्या दिवशी त्या पदार्थाचा ‘आत्मा’ किंवा ‘गमक’ सापडला की आपला पदार्थ उत्तमच होणार हे आईकडूनच शिकले आणि भानूला पण हीच शिकवण दिली! स्वयंपाक असो, इतर कुठलीही कला असो, कोणतंही काम असो.... हेच तत्व लागू पडतं! भानुप्रिया आणि  रविशंकरच्या साखरपुड्याच्या अदल्या दिवशी आम्ही shopping करून आल्यानंतर मी फटाफट  पुरणपोळ्या केल्या आणि इतक्या छान झाल्या काय सांगू? अगदी मऊ... लुसलुशीत.... ह्या पोळ्या मीच केल्यात ह्यावर माझाच विश्वासच बसेना! ध्येयपूर्तीसाठी काहीतरी प्रेरणा हवी असते...तसं पण पाहुण्यांसाठी काही करायचे तर आपण थोडे जास्ती कष्ट घेतोच ना? मग होणारे जावई पहिल्यांदाच जेवणार म्हटल्यावर एकदम स्फूर्ती आली आणि आपोआप पदार्थ चांगला बनला! पण मी जर काही बरा स्वयंपाक करीत असेन, तर त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती भानुप्रिया आहे! पौष्टिक आणि परिपूर्ण आहाराकडे माझं असलेलं लक्ष, सुदृढ आयुष्यासाठी चांगल्या नियमांचे पालन काटेकोरपणे झाल्याची खात्री करणं आणि आरोग्याची कोणतीही समस्या आली तर तातडीनं त्याचं निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करणं हे घरातील सर्वांसाठी आवश्यक होतं. त्यामुळे पानात जे काही वाढलं आहे ते सर्व नखरे न करता खायचं, ताटात काहीही टाकायचं नाही, वाया घालवायचं नाही हे नियम आम्ही दोघींनी काटेकोरपणे पाळले....हे सगळं दादा, माई, आजी, आई आणि बाबांकडूनच तर शिकले आणि पुढे शिकवले! दादा आणि नंतर बाबांचा नियम होता... आधी उरलेले अन्न सर्वांच्या पानात वाढायचं, आणि मग ताजं जेवण वाढायचं! हे थोडसं नवलंच होतं कारण त्याकाळी पुरुष मंडळींना अन्न ताजं आणि गरम वाढायचं, आणि शिळ अन्न बायकांनी संपवायचं असा संकेत असायचा .... किती जुलूम? पण आमची मंडळी खूप पुरोगामी विचारांची होती! त्यासाठी ह्यासार्वांची मी ऋणी आहे! ‘वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे..’ हा श्लोक म्हटल्याशिवाय जेवायला सुरुवात करायची नाही हा दंडक तेंव्हा जाचक वाटला, तरी तो नियम डोक्यात मनात पक्का बसलाय.. जरी हल्ली मी तो पाळत नाही... अन्नाचा अवमान करायचा नाही हा संस्कार मला नेहमीच उपयोगाला येतो... ऑस्ट्रेलियाच्या मुक्कामात मी देशविदेशातल्या अनेक खाद्यपदर्थांचा आस्वाद घेतला! किंबहुना माझा तिकडे जातांना अजेंडा पक्का होता... पाहिलं आपल्या लोकांना भेटायचं, दुसरं जे जे शक्य आहे ते ते पदार्थ खायचे!
एका stall वर ‘kurtosh’ नावाचा कुरकुरीत hungarian पदार्थ खात होते. तिथे ह्याच देशातून आलेले दोन गृहस्थ ह्या पदार्थाचा आस्वाद घेत होते. मी सहज बोलायला सुरुवात केली... त्यांनी त्या पदार्थाचा परिचय करून दिला. मी भारतातून आली आहे म्हटल्यावर आश्चर्य म्हणजे त्यांचा आपल्या देशाचा, इथल्या चालू राजकीय घडामोडींचा अभ्यास दांडगा होता आणि आपल्या विद्यमान पंतप्रधान श्री. मोदी ह्यांच्या बाबत गौरवोद्गार काढले! मला त्याक्षणी भारतीय असल्याचा अभिमान वाटला! परक्या देशात, दुसऱ्या परक्या देशातल्या नागरिकाकडून आपल्या देशाबद्दलचे कौतुक! मी पहिल्यांदाच असा अनुभव घेत होते!!
पुढे चहाच्या दुकानात गेले, आणि जगभरातल्या चहाच्या अनेक प्रकारांमध्ये ‘इंडिअन मसाला चाय’ असं नाव वाचलं...आणि थबकले! पाऊलं आपोआप दुकानाकडे वळली...चहाची ऑर्डर दिली आणि दुकानदाराशी गप्पा मारायला सुरुवात केली... त्यानं विचारलं तुम्ही इंडिया तून आलात काय? मी हो म्हणत, चहाचे घोट घायायला सुरुवात केली... मस्त चहा! खुश! त्या संध्याकाळी हवा एकदम मस्त होती ती आणखीन जादुई झाली!
टीव्ही शो मध्ये आपल्या पाककृती करून दाखवायचा मोका आम्हाला दोघींना मिळाला तो एक अनोखा अनुभव होता! आधी फोन, मग माझ्या रेसिपी बाबत झालेली चर्चा, आणि फाईनली... त्या दिवशीचे घरी केलेले शुटिंग! ती सगळी प्रक्रिया म्हणजे ध्यानी मनी नसतांना, सहजच पूर्ण झालेलं स्वप्न! शोच्या anchor आणि त्यांची टीमनी आम्हाला छान सहकार्य केलं.. आम्हाला दोघींना फार आनंद झाला! मी SNDT मध्ये असतांना FTII मध्ये अनेक वेळा शूटिंग बघायला गेले आहे. मला ह्या सगळ्यात खूप रस आहे आणि खूप उत्सुकता असते बारकावे बघायची. नेल्लोरला पण मी प्रमोदिनी बरोबर जितेंद्रचे शूटिंग बघितले आहे. खलनायक मदन पुरी ह्यांना मी साड्यांच्या दुकानातून साड्या घ्यायला मदत केली होती, त्यानंतर ते आपल्या घरी पण आले होते नेल्लोरला! नाशिकला आल्यापासून मी नाटकाला जाते तेंव्हा पण मला कलाकार मंडळींना भेटायची संधी मिळते... म्हणजे मी नाटकानंतर थोडा वेळ तिथेच थांबते... कुणी ना कुणी तरी भेटतच! मोका मिळतो तेंव्हा ग्रीन रूम मध्ये जाऊन कलाकारांना भेटते! मजा येते! कलाकार म्हणून न बघता, त्यांच्यातला माणूस कसा आहे हे बघायची मला फार उत्सुकता असते, ती अशी पूर्ण होते!
हिंदी channel साठी केलेला कुकरी शो तर आणखीनच छान! मुंबईला त्यांच्या स्टुडीओमध्ये जाऊन हा एपिसोड शूट केल्यामुळे मला सेटवर काय चालते, काम कसे चालते, कामाची धावपळ, वेळेत आणि उत्तमप्रकारे शूट संपवण्याची घाई, आपल्याला पडद्यावर भुरळ घालणारे मोहक चित्र निर्माण करतांना पडद्यामागे किती कष्ट, यातायात आहे ते first hand अनुभवायला मिळाले!! आई बाबा माझ्या बरोबर होते! शेफना भेटून, गप्पा मारून, त्यांच्या सोबत presentation करून खूप अनुभव मिळाला! आयुष्यात एकेकदाच मिळणारे हे अनुभव! आता एखाद्या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणून जायची इच्छा ‘बकेट लिस्ट’ मध्ये आहे... बघू कधी पूर्ण होते...
आता मी मुक्तपणे आयुष्य जगायचं ठरवलं आहे! म्हणजे घाई गडबड नाही... एक एक क्षण मनमोकळेपणाने जगायचा... दिवसभराचं कामाचं नियोजन नाही, धावपळ नाही, पुढच्या पुढे कामं मार्गी लावायची धांदल नाही...निवांत! सकाळी फिरायला जायचं, नंतर घरातली कामं हातावेगळी करत असतांनाच अधूनमधून  भानुप्रियाशी फोनवर गप्पा, रुद्रांशची खबरबात घ्यायची, tab वर गेम्स खेळायचे, मनात रुंजी घालणारी आणि गतकाळाच्या आठवणीत नेणारी जुनी गाणी ऐकायची...आणि अर्थात, जमेल तेंव्हा आवडीचं नाटक, कार्यक्रम किंवा एखादा छान सिनेमा बघायला जायचं! मागच्या वर्षी मला एका शाळेत, त्यांच्या सेवाभावी संस्थेतर्फे झालेल्या पाककला स्पर्धेच्या निमित्ताने परीक्षक म्हणून बोलावले होते. मला खूप आनंद वाटला कारण तिथे नवीन लोकांशी ओळख झाली, नवीन गोष्टी बघायला, शिकायला मिळतात! नवीन वातावरणात गेलं की आपलं मन प्रसन्न होतं, ताजंतवानं वाटतं! माझं मत आणि माझ्या विचारांना किंमत आहे ही भावना खुप सुखावणारी आणि प्रेरणादायी असते! तिथे आता दोन तीनदा गेले आहे!
घरातली मंडळी, मित्रमैत्रिणीं, आप्तेष्ट ह्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आज कितीतरी मध्यम खुली झाली आहेत! त्यामुळे social media वर एकमेकांबरोबर गप्पा मारण्यात, ख्यालीखुशाली विचारण्यात, एकमेकांकडची बातमी देण्या घेण्यात भरपूर वेळ जातो! जुने स्नेही सापडतात तेंव्हा खूप आनंद होतो! संपर्काची सोपी मध्यमं नव्हती त्यामुळे एकमेकांचा संपर्क तुटल्यासारखा झाला होता तो पुन्हा प्रस्थापित झाला आहे. ही ह्या सर्व नवीन माध्यमांची देणगी आहे! ही माध्यमं म्हणजे माहिती आणि करमणुकीचा वाहता झरा आहेत! ह्यात वहात गेलं तर वेळेचं भान रहात नाहीच आणि व्यसन लागतं!
ह्या ४ वर्षात मला आई बाबांबरोबर रहायला वेळ मिळाला. हडपसरला गेलं की फिरायला जाणं, बाजारहाट, सिनेमा बघायला जाणं, आम्ही सगळे असलो की पार्टी होतेच! घरातून सतत फिरणारी त्यांची मुलं, नातवंड हा त्यांच्यासाठी आनंद असतो! आजही सतत बिझी असतात दोघेही...काही ना काही चालू असतं! फार थोड्या लोकांना मिळतं असं परिपूर्ण  आयुष्यातलं हे निवांत, शांत पर्व!
भानुप्रियाच्या लग्नानंतर मी आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघायला सुरुवात केली... पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं... सर्व कर्तव्य पार पाडली होती... दरम्यान बऱ्याच भावनिक आघातातून स्वतःला बाहेर काढलं होतं... आता सगळं ओझं उतरून द्यायचं ठरवलं... सर्व गोष्टीकडे, माणसांकडे आणि नात्याकडे थोडं त्रयस्त भूमिकेतून बघायला सुरुवात केली...जुन्या संकल्पांना झुगारून, नवीन, मला सोयीच्या असलेल्या संकल्पना अमलात आणायला सुरुवात केली... आयुष्याची बेरीज, वजाबाकी, balance sheet बघायला सुरुवात करायची होती... स्वतःच्या तब्येतीकडे, एकूण संतुलन ठेवण्यासाठी स्वतःला अंतर्मुख करू लागले आहे... जमतंय... एकदा एखाद्या मुद्द्यावरून मन पूर्णपणे हटवलं की मग तो मुद्दा मनाला यातना देऊ शकत नाही... आलेला क्षण निवांतपणे जगण्याचा ठाम निश्चय केला आहे... आवडीच्या गोष्टी निर्भीडपणे करायची हिम्मत दाखवली आहे..आतापर्यंत मी अत्यंत तन्मयतेने ज्या गोष्टी केल्या होत्या त्या सोडून द्यायचं ठरवलं कारण आता त्याचं महत्व वाटत नाहीसं झालं होतं..म्हणजे त्याच्या बेडीत अडकून पडायचं काही कारण उरलं नव्हतं... १० दिवसांचा गणेशोत्सव हा त्यातलाच एक मोठा सण! बंगलोरला भानुप्रियासाठी गणपती बसवायला सुरुवात केली. सगळे सण पारंपारिक पध्दतीनं साजरे करायचे भानुसाठी..तिला आपल्या संस्कृतीची, धार्मिक परंपरांची ओळख व्हावी म्हणून... ह्या सगळ्याचा तिला आता उपयोग होतोय! गौरी विसर्जनापर्यंत ५ ६ दिवस आमच्याकडे रोज आरतीला कुणी ना कुणी पाहुणे असायचे! खूप जय्यत तयारी करायची मी ह्या सणासाठी... खूप काम असायचं, पण अनेकांना प्रसाद आणि अल्पोपहार देण्याचं पुण्य आम्हाला लाभलं हे आमचं भाग्य! सांबा मध्ये तर एक वर्षी आमच्या सरदारजी खानसाम्याने मी शिकवल्या प्रमाणे, ओल्या नारळाचे सारण भरून तळणीचे जवळजवळ ५०० मोदक ६ दिवसात बनवले होते! कारण जो कुणी प्रसाद घ्यायचा, त्याला मोदकाची आठवण व्हायचीच!
नाशिकला आल्यावर मी ह्या उत्सवात थोडी आणखीन भर घातली... गणेशोत्सव सुरु व्हायच्या आधी आणि त्या ६ दिवसात मी एकदम बिझी असायचे... सकाळची आरती, दुपारचं जेवण, संध्याकाळची आरती आणि रात्रीचं जेवण असे चारही वेळेला मी वेगवेगळा प्रसाद बनवायची!  सहा दिवसांचा मेनू कागदावर लिहून त्याप्रमाणे तयारी एक आठवडा आधीच सुरु व्हायची... भाज्या, फळ, इतर साहित्य... जय्यत तयारी असायची! ५ सवाष्णींना ओटी आणि त्यांच्या नवऱ्यांना शिधा द्यायची. दिवसभर कुणी दारात आलं कि त्याला काही ना काही प्रसाद मिळायचा! विशेष म्हणजे कधीही प्रसादाची कमतरता आली नाही! पण हे इतर वेळेला पण लागू आहे. कुणी आलं, आणि माझ्याकडे द्यायला काहीच नाही असं कधी होत नाहे. क्वचित प्रसंगी पाहुण्यांना द्यायला आज काही नाहीये असं वाटलं, की माझं डोकं भरधाव धावायला लागतं... आणि थोड्याच वेळात काहीतरी अल्पोपहार तयार असतो! पाहुणा खुश आणि मी पण!
भानुप्रियाचं लग्न होईपर्यंत मी चैत्री पाडव्या पासून होळीपर्यंत सर्व सणवार मी आनंदानं आणि श्रद्धेनं साजरे केले आहेत. तिचं लग्न झालं आणि मी जेंव्हा ह्या नव्या वाटेवर चालायचा निर्धार केला तेंव्हा मी ह्या सर्व धार्मिक कर्मकांडांना पूर्णविराम द्यायचा ठरवलं! माझं मन अगदी भरून पावलं होतं...तर वर्षभरात सर्व सणांचं आणि उपवासांचं उद्यापन करायचा संकल्प करून तो बाप्पाच्या आशिर्वादाने सिद्धीस नेला! ह्या सर्व प्रक्रियेतून मला माझी सर्व कर्तव्य केल्याचं पूर्ण समाधान मिळालं आहे! आता कशाचीही अपेक्षा नाही, कसलेही मागणे नाही, मनात कोणतीही इच्छा नाही! मनात खोलवर एक प्रकारची निरव शांतता पाप्त झाली आहे! आजकाल मला भजन कीर्तन प्रवचन अशा कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात कोणताही रस वाटत नाही. म्हणजे आधी पण फारसा नव्हता पण जितकं गरजेचं होतं तितकं करायची. पण देवावरची श्रद्धा मात्र आजही तेवढीच दृढ आहे! श्रद्धेचा आणि या कर्मकांडांचा तसा काही फारसा संबंध नाही असं आपलं मला वाटतं. आईकडे बघून तरी हीच गोष्ट माझ्या मनावर कोरून राहिली.
आता मी एकदम मोकळी आहे, बंधमुक्त आहे... मुक्तपणे खावं, हिंडावं फिरावं, आणि आपल्या आनंदासाठी एखादं ड्रिंक देखील घ्यावं! शारीरिक, भावनिक, मानसिक आणि धार्मिक स्तरावर मुक्त वाटतंय! तरी सुध्दा सावध राहणं फार गरजेचं वाटतं!
मला मिळालेली चौकट कदाचित आकारानं छोटी होती, त्यामुळे कर्तृत्व म्हणायला असं काही नसलं तरी कुणाचंही वाईट न करता, प्रामाणिकपणाने, यथा शक्ति यथा मति, माझ्या वाट्याला आलेलं आयुष्य जसं मिळालं तसं भोगलं! बरंच काही मिळवलं, बरंच काही गमावलं...  चौकटीत भरले गेलेले काही नावडते रंग नजरेआड करून, यथा शक्ति, यथा मति माझ्यापाशी असलेले सर्व रंग मुक्तपणे उधळून ही चौकट रंगांनी भरण्याचा प्रयत्न केला आहे! अजूनही रंग असेच येत राहतील आणि चौकट अशीच रंगतच जाईल!
“मैं जिंदगीका साथ निभाता चला गया|
हर फिक्र को धुंएंमें उडाता चला गया|”
कधी आयुष्य कंटाळवाण, निरस, एकाकी किंवा डबक्यासारखं वाटायला लागलं, तर स्वतःला काही काळ सगळ्यापासून मुक्त करून, एकांतात, आलेल्या समस्येकडे तटस्थपणे बघा, विश्लेषण करा, शांत राहून, आपल्या अंतर्मनात जाऊन बघा... नवीन वाट सापडेल, नवी दिशा सापडेल... नवा उजेड दिसेल!
माझ्या मनात जे काही होतं ते सर्व सांगितलंय... आता काही सांगण्यासारखं राहिलं नाही! मुक्त, शांत आणि सुखी वाटतंय!
आई बाबांचा ६१ वा म्हणजे लग्नाचा हीरकमहोत्सव आप्तेष्टांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला! इथून पुढे आई बाबांचे आशीर्वाद आणि माझ्या कुटुंबियांच्या सदिच्छा सदैव पाठीशी राहोत!
आयुष्य आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा बरंच काही देतं असतं!  बाप्पाच्या आशिर्वादाने ह्या आशेवर निरंतर रंगांची उधळण होत राहो ही प्रार्थना!!!     
  
 
                             

                                                                      
                            
                        

                                                       
 
     
          
           
                                                                                                                  
                  







                                           
  

No comments:

Post a Comment