Saturday, 22 July 2017

आभार प्रदर्शन...प्रदर्शन?

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेगवेगळ्या वेळी 'धन्यवाद!', 'thank you!', 'शुक्रिया!' हे आभार प्रदर्शन करणारे शब्द वापरतांना आढळतात. पण बहुतेकवेळा तो एक निर्विकार सोपस्कार झालेला दिसतो. ह्या शब्दांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उच्चारामुळे त्याचा गर्भित अर्थ कुठेतरी हरवून जाऊन फक्त यांत्रिकपणा उरलेला वाटतो. हृदयापासून आलेल्या कृतज्ञतेला 'धन्यवाद' ह्या शब्दातून साकार करणे हे मूळ ध्येयच हरवल्यासारखे झाले आहे, अशी मनातून व्यक्त  झालेली कृतज्ञता क्वचितच अनुभवायला मिळते. अशी कृतज्ञता व्यक्त करण्याची ना आज कुणाला गरज भासते, ना कोणी असा विचार देखील करतो.

खरतर कृतज्ञता ही काही इतर भावनांसारखीच भावना नाहीये, तर त्याहूनही काही जास्त आहे. कृतज्ञता हा एक मुलभूत दृष्टीकोन आहे आणि त्यापेक्षाही जीवन जगण्याची शैलीच मानता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, सुखी, समृध्द, सकारात्मक आणि निरामय जीवनाची सूत्रीच म्हणता येईल. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या एका अनुभूतीमध्ये प्रेम, जिव्हाळा,दिलासा, आशा, करूणा, विनय, आनंद आणि विश्वास ह्यासारख्या सकारात्मक भावनांचा साक्षात्कार करण्याची शक्ति आहे.  खऱ्या आभार प्रदर्शनातून देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही निर्मळ आणि अपार आनंदाची अनुभूती होते. अगदी पैशांच्या मोबदल्यात होणाऱ्या सेवांच्य देवाण घेवाणीत देखील, मनापासून दिलेले धन्यवाद हे काही क्षण आनंद आणि उत्साह देऊन जातात, हे अनुभव घेण्याजोगे आहे,
कृतज्ञतेचा दृष्टीकोन ठेवल्याने आपल्याला ह्या भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन जीवनाचा खरा अर्थ गवसायला मदतच होते.

ज्यांचा विचार सुध्दा केला जात नाही, किंवा ज्यांना नेहमी गृहीत धरले जाते, अशा अनेक छोट्या छोटया अशीर्वादांचा साक्षात्कार होतो, तेंव्हा ह्या सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची मनाची तयारी होते. तेंव्हा लक्षात येते की, प्रेमळ जोडीदार, माया करणारे आई_वडील, गुणी अपत्ये, साथ देणारे सोबती , एक यशस्वी आणि समाधानी कारकीर्द अशी वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीने आशीर्वादांची वेगवेगळी रूपे असतात. पण बहुतेक लोकांना ह्या आशीर्वादांच्या अस्तित्वाचेच भान नसते. ह्यांचे महत्व तेंव्हा कळते जेंव्हा त्याचं लोप होतो, नाश होतो . आणि तेंव्हा खरतर वेळ निघून गेलेली असते, आणि मग खंत उरते ती आपल्या विचारांच्या कोतेपणाची......

तेंव्हा, चांगल्या किंवा वाईट  काळात देखील कुक्ठ्ल्यातरी चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता मनात ठेवली, म्हणजे जीवनात वर्तमानात सुख मिळतेच, शिवाय भूतकाळाचा पश्चात्ताप करावा लागत नाही आणि भविष्याची अनिश्चितता भेडसावत नाही.

मानवी जीवनाचे वरदान मिळाले ह्या भावनेला एक चमत्कार म्हणावा कि त्या निराकार निर्मात्याने ह्या अद् भूत  निर्मितीला दिलेली स्वीकृती म्हणावी, कि त्या अफाट शक्तीला, त्या ब्रह्माला स्मरून तिला शरण  जावे, अशा अनेक भावना व्यक्त करण्यासाठी 'धन्यवाद' हा शब्द गहिरे रंग भरून जातो हे निश्चित!

तेंव्हा आपल्याला मिळालेल्या ह्या जीवनाच्या देणगीबाबत कृतज्ञता व्यक्त करून आयुष्याची परिमाणे बदलतांना पहा आणि आनंद व उत्साह द्विगुणीत करा! 

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete