Thursday, 19 September 2013

BAPPALA NIROP AANI LAVKAR YENYACHI PRARTHANA!

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
'गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!' किंवा 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!' असे म्हणत भक्तांनी त्यांच्या लाडक्या   बाप्पाला साश्रू नयनांनी, प्रेमाने निरोप  दिला, आणि  काल काही घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जना बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली,

गेल्या आठ दहा दिवसांपासूनची   धावपळ संपली, आणि  routine सुरु झाले! दहा दिवसांचा गणेशोत्सव पार पडला, त्यामुळे खूप  मोठे  काम   झाल्यासारखे वाटते आहे. त्याचे  खूप समाधान भरून राहिले आहे  हे नक्की.
गेले तीन चार  दिवस मंडळी गणपती देखावे बघण्यासाठी बाहेर पडत होती. पाउस असून देखील उत्साह दांडगा होता. मोठ्या प्रमाणात गर्दी होते, आणि लोकं गणपतींची आरास, देखावे   बघत बघत हिंडताना दिसत होते. आणि रात्र रात्र गणपती बघायचे म्हणजे खाणे पिणे ओघानेच आले! मग चणे, फुटणे, पॉपकॉर्न, आईस्क्रीम, भेळ, नुडल्स, असे अनेक पदार्थांचा आस्वाद घेत घेत, मुलांचे फुगे, पिपाणी, चॉकलेटचे हट्ट पुरवत पाहटे पहाटे घरी जायचं! पूर्वीचे दिवस आठवले, ग्रुपनी केलेली धमाल मस्ती मजा वेगळीच होती.  आता मात्र ह्या गोंधळाचा कंटाळा येतो, गर्दी नकोशी   वाटते. त्यापेक्षा, घरी बसून TV वर गणपतींचे देखावे, मिरवणूक, विसर्जन सोहळा बघणे सोयींचे आणि आनंदाचे   वाटते!

 खव्याची पोळी
 परवा खव्याच्या पोळ्या केल्या होत्या,  टेस्टी झाल्या होत्या!

खव्याच्या पोळ्या करण्यासाठी, १ वाटी खवा परतून घ्यावा. थंड करून त्यात ३/४ वाटी पिठी साखर,१ टीस्पून  इलायची पावडर, आणि थोडा (२ छोटे चमचे) मैदा/तांदुळाचे पीठ मिक्स  करावी. साधी पोळीची कणिक माळून घ्यावी. त्याची छोटी पोळी करून, त्यात फिलिंग भरून उंडा बंद करावा. पोळी लाटून तव्यावर भाजावी. सर्व्ह करतांना, पोळी  तूप घालून खरपूस भाजून द्यावी.
दुसरी पद्धत म्हणजे दोन छोट्या पोळ्या करून, एका पोळीवरतूप लावून, फिलिंग पसरून , दुसरी पोळी  ठेवावी, कडेने बंद करावे, आणि पोळी लाटून घ्यावी.

बऱ्याच पोळ्या करून ठेवल्यास बिनतुपाच्या भाजून foil मध्ये ठेवाव्यात. सर्व्ह करतांना तूप  लावावे .

Saturday, 14 September 2013

GANAPATI BAPPA MORYA! PUDHCHYA VARSHI LAVAKAR YAA!

काल दुपारी गौरींना, आणि बाप्पाला दहीभात, भाजीपोळीचा साधासाच नैवेद्य दाखवून, संध्याकाळी घरच्या  गणपती बाप्पाचे विसाजन केले. बाप्पाला निरोप देतांना, ' गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!' किंवा 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!' असं  म्हणत म्हणत संपूर्ण घरातून बाप्पाला फिरवून, घरा भोवती फेरी मारून, नंतर बादलीत बाप्पाचे विसर्जन केले, तेंव्हा खरच डोळ्यात पाणी येतं, आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणतांना तोंडातून शब्द फुटत  नाहीसे होतात.

 बाप्पाची शाडू मातीची मूर्ती आणली, आणि घरीच बादलीत विसर्जन केले. ह्याचे बरेच फायदे आहेत….  एक तर, शहर हद्दीत गर्दीत जाण्याचा त्रास वाचतो, दुसरं  म्हणजे, नदीच्या काठी जाऊन , प्रदूषित पाण्यातले प्रदूषण वाढवण्याचे पाप होत नाही,  तिसरं म्हणजे,  शाडूच्या मातीमुळे पर्यावरणाला पूरक असे विसर्जन होते. चौथा फायदा हा की, बादलीत विसर्जन करून दोन चार दिवसांनी ही माती बागेत खत आणि बाप्पाचा आशीर्वाद म्हणून पसरून देवून, बागेची देखभाल पण Eco _ friendly पद्धतीने करता येते.
 बाप्पाला शिधा म्हणून दहीपोहे आणि कान्होले होते.
बाप्पाचा शिधा_ कान्होले आणि दहीपोहे

विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्याच्या स्रोतां जवळ, खडकांवर, गणपतीच्या प्लास्टर ऑफ पेरिसच्या छोट्यामोठ्या मूर्ती भंगलेल्या अवस्थेत इतस्तः  पडलेल्या आढळतात, त्यांच्या भोवती निर्माल्य, कचरा, आणि अनेक प्रदूषित वस्तू अडकलेल्या आढळतात, तेंव्हा अत्यंत दुःख होतं, मनाला क्लेश होतो. एक विचारावेसे वाटते, आपण  इतक्या श्रद्धेने, प्रेमाने ज्या बाप्पाची  प्राणप्रतिष्ठा केली, दहा दिवस त्याच्या आरती, पूजनात लीन होतो , त्याच बाप्पाला असे विसर्जन करून हालत केलेली आपल्याला पटते? मनाला रुचते?  पाहूयात की असे वेडेवाकडे पडलेल्या त्या बाप्पाला काय वाटत असेल? आपल्याला कुणी असे वरून नदीत फेकून दिले, लोटून दिले, नदीच्या किनारी कचऱ्यात फेकले तर आपल्याला कसे वाटेल? मग विचार  करा,त्या \विघ्नहर्त्याला  किती क्लेश, किती दुःख होत असेल ते. हा 'विनायक' असा 'विदारक' अवस्थेत पडलेला  अनेकांना वाईट वाटतं, पण ह्यात आपण एकटे  फारसं  काही करू  शकणार नाही, हे प्रत्येकाला माहित असतं, आणि ही लाचारीची भावना, त्या विदारक दृश्यापेक्षा अनेक पटींनी जास्त क्लेशकारक असते .

तेंव्हा ही लाचारीची, अगतिकतेची बोच थोडी कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या परीने शाडूची मूर्ती घरीच विसर्जित करून, त्याचे आशीर्वाद मागतो एवढेच! प्रत्येकाने एक छोटीशी सुरुवात केली, तरी बरच काही होऊ शकतं!            

Thursday, 12 September 2013

.VASASI VYAPAK RUPE TU STHUL SUKSHMI!

महालक्ष्मी
"जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
  वससी व्यापकरुपे तू स्थूल सूक्ष्मी द्य देवी जय देवी।।"

महालाक्ष्मींचे पूजन  झाले, गौरींना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला, पुरणाची आरती झाली, मन अगदी प्रसन्न झाले!
 
आजचा नैवेद्य खासच होता … कटाची आमटी, सोळा भाज्यांची मिक्स भाजी, पुरणपोळी,खव्याची पोळी, कारंजी, शेवयाची  खीर,खुरचंदवडी, तीन चटण्या, पोळी, पापड कुरडई, वरण, भात  मस्त तुपाची धार! बस! नैवेद्याचे ताट  बघूनच पोट भरलं!खरचं!

नैवेद्यासाठी  सर्व  पदार्थातील तिखट, मीठ, इतर जिन्नस  अंदाजानेच टाकायचे असतात , चव घेता येत नाही, त्यामुळे स्वयंपाक करताना खूप जागरूक राहावं  लागतं।  अर्थात,जितके जास्त पदार्थ तितके ताट खुलून दिसते!  आणि एवढा स्वयंपाक करून, जेंव्हा नैवेद्य दाखवून होतो, तेंव्हा अगदी समाधान वाटतं! सगळं  नीट  झाल्याचं  समाधान!

 सोळा भाज्यांची मिक्स भाजी करण्या साठी दोडका, भोपळा,भेंडी, फ्लोवर, गवारी, बटाटा, गिलका, दुधी , गाजर, वालपापडी, बीन्स, तोंडली, तुरा, पडवळ, कारले, कोबी, सुरण अशा सोळा भाज्या चिरून घ्याव्यात. तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, घालून नंतर भाज्या घालून  घ्याव्यात. पूर्ण शिजल्या नंतर, त्यात मीठ, गोडामसाला,  कोथिंबीर,नारळ चव आणि लिंबू पिळून सर्व्ह करावी.  हवे असल्यास, नारळाचे काप लावून सर्व्ह करावी.    

सोळा भाज्यांची मिक्स भाजी

आज बाप्पांकडे   बघत होते, तेंव्हा वाटलं  ते  खुश दिसत होते! आज गौरींची भेट झाल्यामुळे ते  आनंदात असणारच  ना! उद्या बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली, तसं  मन उदास व्हायला लागतं , पण पुढल्या वर्षी लवकर येणार ह्याचा आनंद मनात घेवूनच,  त्यांच्या  दहीपोहे, कान्होले  असलेल्या शिध्याची , निरोपाची तयारी करायची लगबग सुरु होईल!

आजच काही छोटी मुलं एक वाक्य म्हणतांना ऐकलं,
'Vodafone Samsung
गणपती  बाप्पा Handsome!'
वा! मुलांनी मुलांच्या परीने बाप्पाचे वर्णन केले! मला  हसायला आले ते वाक्य ऐकून. हे हसू असचं  सर्वांच्या ओठांवर राहो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना!  एका प्रसिद्ध गाण्याच्या ओळी आठवतायत,


'तुझ्या कृपेचा हात मस्तकी।  पायी तव, मम चिंता।  
प्रथम तुला वंदितो कृपाळा।  गजानना, गणराया।।'          



Wednesday, 11 September 2013

GAURI AVAHAN, PUJAN, AANI HALDIKUNKVACHA ANAND!

डॉलर:  'सून राहा है ना तू?'

रुपया : 'रो रहा हूँ मैं''

 रुपयाची घसरण अजुन चालूच आहे!  गणपती बाप्पा, एवढी  घसरण थांबव रे बाबा! अणि किती घसरणार?  अवमूल्यन होणार? अणि किती ढासळणार पत? थांबवा हे सगळं.

 असो,आल्या आल्या त्या बाप्पाला गाऱ्हाणी तरी किती सांगणार आहोत? गेल्या दोन दिवसात इतकी गाऱ्हाणी सांगून झालीत, की शेवटी बाप्पा भक्तांना म्हणतायत, 'अरे, दर  वर्षी तेच तेच गाऱ्हाणं काय  सांगतोस? पेट्रोल दरवाढ, महागाई, भ्रष्टाचार, खराब रस्ते  वगैरे वगैरे?'

आता ह्या मागण्यांबाबत बाप्पांच्या हातात काही आहे असं वाटत नाही.  तो तरी काय करणार? मला तरी वाटतय की  तो म्हणतोय, तुम्हीच  निस्तरा हा घोळ!

आज गौरींचे, महालक्ष्मीचे आगमन! गृहिणींची लगबग चालू असते गौरींच्या  आगमनाची,पुजेची, नैवेद्याची, गौरींचे सजावटीची! गौरी म्हणजे माहेरवाशिणी असे मानले जाते. त्या तीन दिवस राहतात. त्यांच्या बरोबर त्यांची बाळे पण असतात, म्हणजे लेकुरवाळ्या माहेरवाशिणी … आज त्यांचे आगमन, म्हणजे गौरी आवाहन, उद्या त्यांचे साग्रसंगीत  पूजन आणि पंचपक्वान्न नैवेद्य. आणि  त्यांना निरोप देणे म्हणजे विसर्जन.

राजस पुरी (पाकातल्या पुऱ्या )
सकाळी गौरी आवाहनाला मी गणपतीला पाकातल्या पुऱ्या, किंवा राजसपुरी चा नैवेद्य केला होता. माहेरवाशीण  घरी  आली,की त्या दिवशी  प्रवासाने शिणलेली असते, म्हणून तिला साधसच  जेवण, म्हणजे पालेभाजी,  भाकरी, चटणी, असा नैवेद्य असतो.
 
भाजी भाकरी चटणी
 
दुसऱ्या दिवशी पुरणाची आरती करतात, पंचपक्वान्नांचे  जेवणाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सवाष्णींना हळदी कुंकवाला बोलावले जाते, माहेरवाशिणींची ओटी भरली जाते, आणि गप्पा गोष्टी करून, आनंदाने एकमेकींचा निरोप घेतला जातो.
    ह्या गौरी पूजनाच्या दिवशी सजवलेल्या उभ्याच्या गौरी ज्यांनी बघितल्या असतील, त्यांना हा अनुभव आला असेल, की त्या संध्याकाळी गौरींच्या मुखावर खूप तेज चढलेलं वाटतं,आणि ते जाणवतं!त्या संध्याकाळी खरचं  त्याचं रूप न्याहाळण्याचा मोह होतो! इतक्या त्या लोभस दिसतात!

आणि माहेरचा दोन घटकेचा पाहुणचार घेऊन, तृप्त होऊन, ह्या माहेरवाशिणी पुन्हा सासरला जायला सज्ज होतात. खूप उदास  वाटतं  अशा निरोपाच्या  वेळी , मन  भरून येतं. ह्या दिवशी गौरींना कान्होला (पुरणाची विशिष्ट पद्धतीने मुडपून  केलेली कारंजी) , दहीभात असा नैवेद्य असतो. ह्या मागे कारण असं  की, प्रवास करणार तर भोजन हलकं हवं.

सर्व गोष्टीं मध्ये आपल्याच रोजच्या वागण्या,  बोलण्या, खाण्याचे पडसाद उमटतात असे नाही वाटतं?उद्या गौरी विसर्जना बरोबरच  विसर्जन होणार. तोपर्यंत बाप्पाचा, गौरींचा भरपूर पाहुणचार करायचा आहे!

          

Tuesday, 10 September 2013

BAPPANCHE AAGAMAN AANI GANESHOTSAVACHI DHOOM!

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया!
काल गणेशचतुर्थीच्या शुभ दिवशी श्री गजाननाचे 'गणपती बाप्पा   मोरया!' च्या घोषात,  ढोल ताशांच्या तालावर , लेशीम, झांजांच्या गजरात, नाचत नाचत आगमन झाले! खूप आनंद होतो बाप्पा आले की!  मी तर अगदी भारावून जाते!
वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी सम प्रभ! निविघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा!
गणेशाची प्रतिष्ठापना झाली, की मग धूम उडते ती नैवेद्याची! सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अशा चारही वेळा वेगळा वेगळा नैवेद्य दाखवायचा, म्हणजे नैवेद्याची मालिकाच लागते! मी गौरी  विसर्जना पर्यंत ह्या नैवेद्यासाठी मेनू plan करते, म्हणजे मग तयारी जय्यत, आणि स्वयंपाक झटपट होतो! सार्वजनिक गणपती मंडळाच्या आरतीला पण  जायचे असते , त्यामुळे सगळा दिवस धावपळीत, आणि मजेत जातो!

काल विधिवत पूजा झाल्या नंतर, बाप्पाला पंचखाद्य आणि फळांचा नैवेद्य होता. दुपारच्या जेवणात  बटाटा भाजी, आमटी,  पोळी,कोशिंबीर, आणि तळलेले मोदक.

तळलेले ओल्या नारळाचे मोदक

बेसन लाडू आणि चण्याच्या डाळीचे वडे

संध्याकाळच्या आरतीला चण्याच्या डाळीचे वडे  आणि बेसनाचे लाडू. आणि रात्री जेवणाच्या नैवेद्याला फ्लावरची भाजी, पोळी आणि उकडीचे मोदक.

ओल्या नारळाच्या करंज्या
आज  ऋषी पंचमी आहे.  आज सकाळी करंजीचा नैवेद्य होता. ह्या दिवशी हमखास केली जाते ती भाजी आणि हातसडीच्या तांदुळाचा भात. (हातसडीचा म्हणजे unpolished rice, तो नाही  मिळाला, तर brown rice वापरावा.)

ऋषीपंचमीचा भात:    तुपावर १ छोटा चमचा  जिरे, २ ते ३ हिरवी मिरची घालून, नंतर लाल भोपळा, दुधी भोपळा, आणि अंबाडीची भाजी मिळून १ वाटी भाजी घालून परतावी. नंतर धुवून, निथळत ठेवलेला १ वाटी हातसडीचा तांदूळ घालून परतावा. २ ते २ १/२ वाट्या गरम पाणी घालून भात मऊ शिजवावा.शेवटी १/२ वाटी टोमेटोच्या फोडी,  मीठ घालून, लिंबू रस, कोथिंबीर घालून, दह्या सोबत सर्व्ह करावे.

ऋषिपंचमीची भाजी:  पडवळ, दोडका, सुरण, बटाटा, रताळी, लाल भोपळा, दुधी भोपळा, कच्ची केळी   अशा सर्व भाज्या मिळून  १ वाटी घेवून, शिजवून घ्याव्यात. मीठ, हिरवी मिरची ठेचा, चिंच, गूळ, घालून नीट  हलवून घ्यावे.  ,तुपात जिरे, हिंग घालून वरून फोडणी ओतावी. नारळाचा चव, कोथिंबीर घालून वाढावे.

उद्या ज्येष्ठा गौरींचे आवाहन, परवा गौरी पूजन, आणि मग गौरी गणपतीचे विसर्जन! अजून भरपूर नैवेद्य आहेत, सवाष्णींना जेवण आहे, त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आहे! हा आनंद असाच राहावा, हीच बाप्पाला प्रार्थना!

Sunday, 8 September 2013

HARITALIKA PUJAN AANI.. VEDH GANAPATI BAPPA CHYA AGAMANACHE!


गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

 उद्या पासून १० दिवस गणेशोत्सवाची धूम राहणार! आज 'हरितालिका पूजन' म्हणजे  महिलांसाठी  खास श्रद्धेचा आणि पूजेचा दिवस! हिमालयाची पुत्री पार्वती. वडिलांनी  विष्णुंशी ठरवलेला विवाह मान्य नाही, म्हणून पार्वतीला तिची सखी पळवून अरण्यात नेते, आणि तिथे पार्वती  महादेवा साठी तप करते., त्यांना प्रसन्न करते, त्यांच्यासारखे तपस्वी आणि विरागी जीवन जगावे ह्यासाठी त्यांच्याशीच लग्न व्हावे ही इच्छा व्यक्त करते.  महादेव 'तथास्तु' म्हणून आशीर्वाद देतात. त्यानंतर हिमालय पार्वतीच्या चिंतेत तिला शोधत अरण्यात येतात, तिची शिवांशी  लग्नाची इच्छा ऐकतात, मान्य करतात, आणि शिव पार्वतीचा विवाह संपन्न होतो. तर 'हरिता' म्हणजे जिला पळवून नेली ती, आणि 'आली' म्हणजे सखी. शिवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीला तिची सखी घेवून गेली, म्हणून पार्वतीला 'हरितालिका' म्हणतात.

हरितालिका आणि शिवपूजन
इच्छित वरप्राप्तीसाठी कुमारिका हे व्रत पाच वर्ष करतात, आणि पाचव्या वर्षी उद्यापन करतात. ह्या आदिशक्तीच्या  रूपांचे पूजन , त्यासोबतच महादेवाचे पूजन करणे म्हणजेच हरितालिका पूजन. स्त्रिया, मुली संपूर्ण दिवस उपवास करतात, आणि सकाळी पार्वतीला नैवेद्य दाखवून, आरती करून उपवास सोडतात.

शिव पार्वती हे समस्त जगताचे माता आणि पिता आहेत. त्यांचा गृहस्थाश्रम हा आदर्श मानला जातो. त्यांचे वैराग्य अति उच्च कोटीचे आहे. म्हणजेच सुखी आणि संपन्न गृहस्थाश्रम हा सुखी आणि संपन्न समाजाचा आधार आहे, आणि आपण त्यांच्या गोष्टीमधून   काही बोध घेतला पाहिजे हे खरे.
  
"आपुले शक्तीनुसार।   पुजावा परमेश्वर।
परंतु पुजू नये हा विचार।   कोठेची नाही ।।"

ह्या ओवीतून समर्थांनी एकंदरच देव आणि भक्ती ह्याबाबत सोपी मीमांसा केली आहे. 'भाव तिथे देव' म्हणतात ना!  पण बहुतेक वेळा माणसं  नुसतं म्हणतात असं, आणि त्याच वेळी देव शोधत सर्वदूर भटकत राहतात!  म्हणून समर्थ सांगतात की, आपल्या मनातील भावभक्तीनुसार, आपल्या शक्तीनुसार देव पुजावा, पण देव पुजुच नये , असा विचार कुठेच आढळत नाही. आपल्या शक्तीनुसार, आपल्याला भावणाऱ्या मार्गाने भक्ती करावी. समर्थांनी नवविधा भक्ती सांगितलेलीच आहे (ह्यात भक्तीचे नऊ मार्ग सांगितलेले आहेत.)  दुसरा कुणी काय वा कशी भक्ती करतो, ह्यावर  आपला मार्ग ठरवू नये.

आता उपवासाला सारखी खिचडी करून  कंटाळा आला असेल तर, ही उपवासाची मिसळ ('मिसळ' म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटलं  ना? पण ही ती मिसळ  नव्हे बर का!) करून खाऊन बघाच!

उपवासाची मिसळ:  बटाटे उकडून छोटे छोटे  हातानीच करावेत , म्हणजे ओबडधोबड होतात. तूप गरम करून,  ठेचा, किंवा हिरवी मिरचीचे तुकडे घालावेत,, बटाट्याचे तुकडे घालून  परतावेत. भरपूर पाणी घालून उकळून घ्यावे. तिखट, मीठ, जिरेपूड,दाणेकूट, कोथिंबीर, खोबरं घालून दाट  करावे. सर्व्ह करतांना, डिश मध्ये उपवासाचा चिवडा ठेवून, त्यावर हा रस्सा ओतावा. वरून दाणे, वेफर्स, कोथिंबीर, आणि लिंबू पिळून द्यावे.

काही गोड खावेसे वाटले तर, हा वरईचा शिरा (भगर पण म्हणतात) करून पहा …।

वरईचा शिरा:  तूप गरम करून, त्यावर १ वाटी  वरई परतून छान  भाजून घ्यावी. वरई परतली, की २ वाट्या गरम पाणी घालावे, आणि नीट ढवळून, झाकण ठेवावे. ३ ते ५ मिनिटांनी त्यात १/२ वाटी गूळ किंवा साखर घालावी. झाकून नीट शिजू द्यावे. शेवटी वेलचीपूड, २ चमचे दुधात मिसळून पिवळा किंवा केशरी रंग, ड्राय  फ्रुट्स, थोडेसे तूप, आणि चारोळ्या घालून   सर्व्ह करावा.

आता 'गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!'  म्हणत बाप्पाचे स्वागत करायचे!      

Thursday, 5 September 2013

ASHI PITHI SUREKH BAI KARANJYA KARAVYA!

'पसेवरी वैरण घातले।  तांतडीने जाते वोडिले।।
तेणे पीठ बारिक आले।  हे तो घडेना।। '

समर्थांनी ह्या ओवीतुन आपल्याला  महत्वाचा संदेश दिला आहे. 'पसाभर' म्हणजे 'मूठभर ' पेक्षा जास्त धान्य जात्यात घातले,  जात्याचा  खूंटा जोराने ओढला, तर त्यातून बारीक़ पीठ येणार नाही, तर भरडच येईल.म्हणजे असे, की, हळूहळू, एका लयीत, जातं ओढून, प्रमाणात, म्हणजे एका वेळी फक्त मूठभरच धान्य त्यात  घातले, तर, पीठ बारीक  निघते, आणि  भाकरी देखील मऊसूत होते! 

 म्हणजे, कोणतीही गोष्ट, कोणतीही कला, कौशल्य, कशाचेही ज्ञान, हे त्या गोष्टीचा पाठपुरावा योग्य प्रमाणात, धीराने, चिकाटीने, सातत्याने आणि  प्रामाणिक प्रयत्नांनी केला, तरच ते ज्ञान आपल्याला आत्मसात करता येते. आणि असे लाभलेले ज्ञान हे चिरंतन राहते, पक्के असते.  ह्या ज्ञानाच्या बळावर केलेले कार्य देखील उत्तम होते. त्यातून प्रसिद्धी, मानमरातब मिळतोच,  पण त्यापलीकडे एक उत्तम व्यक्तिमत्व घडते!

जातं
आता ह्या जात्यावर पीठ काढायचं म्हणजे फार धीराच, चिकाटीच , आणि वेळखाऊ  काम आहे बर! पण पूर्वीच्या काळी बायकांना करायला तर लागायचं! मग त्या कामात  जीव कसा रमवायचा? तर, ओव्या म्हणत म्हणत जात्यावर हात  चालवत राहायचं!

'अरे संसार संसार।  जसा तवा चुल्यावर।।
आधी हाताले चटके। तेंव्हा मिळते भाकर।।'

 अशा, संथ लयीत, मधुर आवाजात, सहज सोप्या शब्दात आयुष्याचा गाभा, सार  उलगडून सांगणाऱ्या ओव्या म्हणत म्हणत, जात्यावर पीठ काढायचं, म्हणजे मग ओव्यांच्या संथ लयी प्रमाणेच, जात्याचा खुंटा देखील संथ लयीतच ओढला जातो, आणि बारीक पीठ तर मिळतचं , पण एक सुंदर, सुरेल संगीतही तयार होतं! (हे दृश्य ज्यांनी बघितलय, अनुभवलय, त्यांना डोळ्यासमोर चित्र आल्याशिवाय  राहणार नाही!)

'पहिली माझी ओवी गं!
जात्यावर दोघीजणी असतात, तेंव्हा कष्टामुळे शरीराला व्यायाम होतो, गप्पा मारीत काम होते, म्हणजे मनाला विरंगुळा मिळतो. शिवाय,ओव्यांतून,  गाण्यातून,मनोरंजन करणारे,   जीवन जगण्याचे, काही शहाणपणाचे, काही बोध करून देणारे संदेश  देखील मिळतात, एकमेकींचा सहवास मिळतो, चार एकांताचे क्षण सुद्धा  विनासायास  मिळतात, त्यातून मनं  जुळतात!

पहिली माझी ओवी ग।   वाहिली एकाला। ।
पार्वतीच्या लेकाला।  गणेश  देवाला। ।

म्हणजे, मी  नेहमी ह्या ब्लॉग मध्ये म्हणते तसं,शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक   स्तरावर आरोग्य जपले जाते,  कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागतो, शिवाय, बऱ्याच  जणी  हे काम करीत असल्या, तर सामाजिक बांधिलकीही जपली जाणार! आणि महत्वाचं म्हणजे, पिठावर लक्ष केंद्रित झाल्यामुळे, उत्तम दर्जाचं पीठ मिळतं, ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळला जाऊन आर्थिक बाजू   भक्कम राहते ते वेगळच!

असं पीठ मिळाल्यावर, एखाद्या सुवासिनीच्या तोंडी आपोआपच शब्द येतील,
'असं जातं  सुरेख बाई, सपीठी काढावी! 
अशी पीठी सुरेख बाई ,करंज्या कराव्या !
अशा करंज्या सुरेख बाई, माहेरी धाडाव्या! '

करंजी
 असो, तर जात्यावारचे पीठ नाही तर नाही, पण उत्तम दर्जाचे रवा  आणि मैदा मिळाले, तर नारळाचे सारण घालून, करंज्या बनवून माहेरी नाही धाडता आल्या, तरी खायला कराव्यात!
    

Wednesday, 4 September 2013

RANJAK KAHANI 'BAILPOLYACHI'



एका दैनिकात आलेली ही कथा माझ्या वाचनात आली, म्हणून  ती  आपल्या सर्वांबरोबर   share करते आहे.

एकदा देवांचा दरबार भरला होता, आणी त्यांची वाहने, म्हणजे गणपतीचा उंदीर, सरस्वतीचे वाहन मोर, विष्णूचे गरुड, आणि महादेवाचा नंदी, असे सगळे बाहेर देवांची प्रतीक्षा करीत होते. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या, आणि प्रत्येक जण आपल्या मालकाची स्तुती करीत होता.

महादेवाचा नंदी
नंदी म्हणाला, 'माझे मालक तापट आहेत, त्यांची सर्वांना भिती  वाटते, पण मी त्यांचा लाडका आहे,  म्हणून मग काही काम असले की,  सगळे जण मलाच विचारतात. माझे विशेष महत्व आहे.' नारदमुनी सर्व काही ऐकत होते, आणि त्यांना कळले  की, नंदीला अतिशय गर्व झाला आहे, आणि त्याच्या गर्वाचे हरण  हे केलेच पाहिजे.

ऋषी नारदमुनी
काही  दिवसांनी नारद महादेवाला भेटायला गेले. तेंव्हा महादेव ध्यानस्थ बसले होते. हे पाहून नारद नंदीला  म्हणाले, 'महादेव तर ध्यानाला बसलेत. त्यांची समाधी भंगली, तर ते कोपतील. तेंव्हा तूच माझे काम करू शकतोस.' हे ऐकून नंदी गर्वाने फुलला. त्याने नारदांना काम विचारले. तशी नारद म्हणाले, मी महादेवांना भेटायला आलो  होतो, आणि हे पांढरे फुल आणले होते त्यांच्यासाठी. पण ह्याचा वास मला तरी थोडा उग्र वाटला. तेंव्हा तूच एकदा वास घेऊन सांग, हे फुल महादेवांना द्यावे का ते.' नंदी  गर्वाने आणखीनच फुगला. त्याने फुलाचा वास घेतला मात्र, त्याच्या नाकात हुळहुळले, आणि त्याला जोरात शिंक आली. शिंकेच्या जोरामुळे त्याची शेपूट जोरात हलली, आणि त्याचा फटका महादेवांना बसला! महादेवाची समाधी भंगली, म्हणून ते कोपले, नंदीवर रागावले! त्यांनी नंदीला शाप  दिला, 'आयुष्यभर पृथ्वीवरच्या लोकांकडून तुला असेच फटके खायला लागतील, आणि तुझ्या नाकात कायम वेसण घातले जाईल.'

हे ऐकून नंदी  घाबरला, आणि त्याने देवांची माफी मागितली, पण महादेव काही ऐकेनात. तेंव्हा मग  नारद मध्ये  पडले, आणि  त्यांनी सांगितले की, ' नंदीचे गर्वहरण करण्यासाठीच मी ही चाल खेळली होती. तेंव्हा त्याला उःशाप द्यावा. ' महादेवांनी त्याला सांगितले, ' माझ्या देवळात माझे दर्शन घेण्याआधी भक्त तुझे दर्शन घेतील आणि मगच आत येतील. तसेच, वर्षातून एकदा लोक तुझी पूजा करतील, त्या दिवशी तुला फटके मारणार नाहीत, तर,  तुला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतील. ' तेंव्हा पासून, श्रावणी अमावास्येला 'बैलपोळा' सण  साजरा करतात.  त्या दिवशी बैलांना नटवून, सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते, त्यांना कामाला जुंपले जात नाही, फटके मारले जात नाहीत., आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हा  सण  शेतकरी वर्गासाठी खास महत्वाचा आहे.
बैलपोळा


पुरणपोळी करतांना १०० ग्रॅम  चण्याची डाळ शिजवून घ्यावी.नंतर त्यात ७५ ग्रॅम गूळ किंवा   साखर घालून नीट शिजवावे. पुरणयंत्रातून किंवा स्टीलच्या बारीक जाळीच्या गाळणीतून गाळून  घ्यावे. थंड करून, त्यात वेलचीपूड, जायफळपूड  घालून मिक्स करावे.
१ कप कणिक  आणि १/४ कप मैदा,  थोडेसे मीठ, तेल घालून सैलसर मळून घेवून थोड्या वेळ ठेवावी.  नंतर छोटी गोळी बनवून, त्यात पुरण भरून, पोळी लाटावी, आणि तव्यावर  भाजून घ्यावी.तूप घालून सर्व्ह करावी.

दुसरी पद्धत अशी की,  वरील कणकीच्या  दोन लाट्या घेवून, दोन छोट्या पोळ्या लाटाव्यात. एकावर थोडे तेल आणि कोरडी कणिक भुरभुरावी, पुरणाचा गोळा नीट पसरावा, दुसरी पोळी वरून ठेवून,  कडा बंद कराव्यात. पोळी लाटून, भाजावी.

पुरणपोळी
तिसऱ्या पद्धतीत, फक्त मैदा,मीठ आणि तेल घालून सैलसर मळून पोळी करावी.