Wednesday, 14 May 2014

निसर्गाचे अनेक चमत्कार !


आज सकाळी आंब्याच्या झाडाकडे बघता बघता, मला अचानक एक घरट दिसलं!! इतकं  छान वाटलं ते घरट पाहून ! आणि जवळ जाऊन डोकावून पहिल तर त्यात पक्षाने अंड पण दिलं होतं !! लगेच फोटो काढला आणि माझ्या ब्लॉग वर टाकला! बघा किती कुशलतेनं घरट बांधतात पक्षी !!

साधं गवताच्या काड्या पण गोल सुरक्षित घरट , आणि त्यात उबेसाठी कापूस, पंखांचे तुकडे ! वाह ! मानलं ह्या पक्ष्याला!!

असाच चिमणीच्या घरट्याचा आभास निर्माण करणारी चाटची रेसिपी …. 

बटाटे किसून घ्यावेत, १ वाटी बटाटा कीस  असेल,तर १ टेबलस्पून कॉर्नफ्लोर आणि थोडे मीठ घालून, घट्ट  मळून घ्यावे. चहाच्या स्टील च्या गाळणीला आतून हा लगदा गोल  लावून,दाबून बसवावा. तसाच गरम तेलात  सोडून,खरपूस तळून घ्यावा. ही घरटी थंड   झाली, की त्यात भेळ, किंवा मिक्स्ड बॉईल्ड भाज्या, कॉर्न भेळ , असे कोणतेही फिलिंग भरून द्यावे. उन्हाळ्यासाठी उत्तम डिश आहे.

आज दुपारी ठीक १२ वाजून ३० मिनिटांनी बाहेर सुर्य उजेडात उ भे राहिले असता, आपली सावली आपल्या पायाच्या खाली दिसणार होती . म्हणून उठून  गेले,पहिलं  आणि खरच तसचं दिसलं ! हा खगोलशास्त्रीय चमत्कार! हे लहानपणी देखील आमच्या वडिलांनी दाखवल्याचं चांगलं आठवतंय! 

३_४ दिवसां पूर्वी आकाशात मंगळ आणि शनि हे ग्रह दिसले. ह्यातला शनी उघड्या डोळ्याने सहसा दिसत नाही, आणि तो पृथ्वीच्या अगदी जवळ होता , म्हणून हा चमत्कार बघून आनंद वाटला . तसं धुमकेतू पण बघितला आहे, फार exciting moment असतो तो पण, कारण काही क्षणातच  धुमकेतू नाहीसा होतो !! 

आणखीन थोडे आंबा महात्म्य

चाणक्य, कौटिल्य , विष्णुगुप्त , ही सर्व नवे कुणाची ? अर्थात अर्थशास्त्रावर 'कौटिल्य अर्थशास्त्र ' ह्या महान ग्रंथाचे लेखक चाणक्य!  त्यांची ही कथा म्हणजे आजच्या लूटमारी करणाऱ्या मंडळींना कानउघडणी किंवा डोळे उघडणी म्हणता येईल. आजकाल दुसऱ्या च्या जीवावर आपले कल्याण करण्याकडे कल व वाढलेला दिसतो. म्हणजे फुकट जे जे घेत येईल, ते ते घ्यावे, आपल्या खिशाला चाट न  लावता, दुसऱ्याच्या खिशातून कसे लुटता येईल हे बघितले जाते. फार भयंकर परिस्थिती आहे ही फुकटेपणाची .

तर कौटिल्य जेंव्हा ह्या वरील ग्रंथाचे लेखन करीत  होते,त्या वेळची ही गोष्ट आहे. एक रात्री समईच्या उजेडात लिखाण करीत बसले असता, एक विद्वान त्यांच्या सोबत काही महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्या साठी आले असता, चाणक्य यांनी त्यांस बसायला सांगितले. त्यांचे लेखन  झाले,तसे त्यांनी समोरची समई विझवली, आणि दुसरी  समई लावली . तेंव्हा त्या विद्वानांना  आश्चर्य वाटले आणि ते विचारते झाले  की, असे करण्याचे काय कारण ?

चाणक्य म्हणाले, 'मी अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहितो आहे, तो मी  माझ्या राजा साठी लिहित आहे, आणि ह्या कामासाठी मला राजाने ही समई आणि तेल दिले आहे. हे सर्व हे राजकार्या साठीच वापरतो. तुम्ही माझ्या कडे दुसऱ्या कामासाठी आलेले आहात, जे राजकार्य नाही. म्हणून मी ही समई विझवली, आणि माझी समई लावली. ह्यातली वात आणि तेल माझ्या खर्चाने आणले आहे. '

विद्वान म्हणाले 'एवढ्याश्या खर्चाने राजाला काही नुकसान होणार का ? त्यांची समई तेल तुम्ही व्यक्तिगत कामासाठी वापरलेत हे त्यांना कळणार आहे का ? आणि कळले तरी ते तुम्हाला काही म्हणतील का ? मग हे सर्व कशा साठी ?'

तेंव्हा चाणक्य उत्तरले,' प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने असा विचार केला तर खर्च आकाशाला भिडायला वेळ नाही   लागणार. आणि राजाला जरी माझे वागणे कळले नाही तरी माझ्या मनाला कळणारच की ! माझ्या मनाला हा राजद्रोह वाटतो. मग मी असे का वागावे ?' विद्वान खजील झाले!

असो, खूप बोधामृत झाले आता जरा शांत बसून मस्त थंडगार पन्ह प्यावं,  हो ना ?

पन्ह्यासाठी कैरीचा   गर
हे पन्हे  करण्या साठी : मस्त हिरव्यागार कैऱ्या आणल्या, उकडून घेतल्या, गर काढला . १ वाटी   गराला २ वाट्या साखर  घालून,मिक्स करून रात्रभर ठेवून दिले.  सकाळी मिक्सर मधून  फिरवून घेतला, त्यामुळे त्यात रेषा किंवा गुठळ्या रहात नाहीत. शेवटी वेलची  पूड,केशर पूड घातली , आणि बॉटल मध्ये ठेवून दिले.

आंबा पन्हे
आता पाहिजे तेंव्हा हा गर, पाणी, आणि बर्फ घातला, की गारेगार पन्हे  तयार !बाजारात मिळणाऱ्या बाटलीबंद  पन्ह्याला ह्या घरी  केलेल्या पन्ह्याची सर नाहीच येणार !

Thursday, 8 May 2014

आंबेच आंबे चोहीकडे !

बाबा : 'बाळू, खर खर सांग, ही शंभरची नोट कुठून  आणलीस ?खर सांग नाहीतर मार खाशील.'
बाळू : 'बाबा, गल्लीत पडली होती . तुम्हाला खोटं वाटत असेल, तर बघून या.  एक माणूस अजूनही नोट शोधतोय!!'

हा! हा! हा! किती प्रामाणिक मुलगा  आहे नाही ?
असो,तर आपल्या आंबा पुराणातले पुढचे दृश्य पहा …
आंब्याचे ताजे लोणचे

 काय ? लोणचं पाहून तोंडाला पाणी सुटल नां ? कालच कैरीचं ताजं , चालू चालू लोणचं केलं . कैऱ्या यायला लागल्या पासून दुसऱ्यांदा केलं !
लोणच्याचा तयार मसाला, थोडे जास्त  तिखट,मीठ, आणि वरून फोडणी थंड करून घातली, की लोणचं तयार! पण थोडे   विनेगर  घातले,तर खार सुटायला मदत होते.
डाळ  ढोकळी  हा पदार्थ संध्याकाळी झटपट होण्यासारखा आहे. कालच केला आणि अक्षरशः  चट झाला  मिनिटातच!

 आधी १/२ वाटी कणिक, १/४ वाटी बेसन,मीठ, तिखट, हळद , ओवा, कोथिंबीर घालून घट्ट मळून घ्यावी..

तुरीची डाळ  शिजवून घ्यावी. तेल गरम करून ,  त्यात मोहरी, जिरे,  हिंग,कढीपत्ता,  लाल सुकी मिरची घालून,  नंतर डाळ घालावी. पाणी घालुन थोडी पात्तळ करून घ्यावे. तिखट, मीठ, गोडा  मसाला,गुळ , चिंच कोळ आणि कोथिंबीर घालून उकळू द्यावे .

वरील कणकीची एक मोठी  पोळी लाटून,  शंकरपाळे कापून उकळत्या   आमटीत हळू हळू टाकीत जावे .  ही फळं शिजली की वरती येतात . मग आमटी बंद करून,  वरून तूप घालून थोडी कोथिंबीर पेरून गरम गरम खावी .
भाता  सोबत छान लागतात.

असो, आता पुन्हा दुसरा एखादा आंब्याचा पदार्थ सुचला की लगेच बनवणार, आणि ब्लॉग वर टाकणार!

Wednesday, 7 May 2014

वांगी पुराण

नुकतीच रामनवमी आणि पाठोपाठ हनुमान जयंती देखील साजरी केली गेली, तेंव्हा त्या निमित्ताने  समर्थ रामदासांची एक कथा वाचनात आली ती सांगावीशी वाटते ….

एक ब्राह्मण समर्थाचा शिष्य होता , आणि समर्थां बरोबरच रहात असे. त्याला वाटले  होते,शिष्य  झाले,म्हणजे  मठात आरामात राहायला मिळेल, आणि  काम पण करायला लागणार नाही! पण समर्थांना  माणसांची पारख होतीच, पण ते अंतर्ज्ञानी होते, त्यांनी  ब्राह्मणाची चाल ओळखली. आळशी आणि निरुद्योगी माणसांचा समर्थांना राग यायचा.
मग, समर्थ त्याला आपल्या बरोबर   नेऊ लागले, आणि मग हा ब्राह्मण कंटाळला. गुरूबद्दलची आस्था कमी  झाली,आणि तो तिथून निघून प. पु. निगडीकर स्वामींकडे आला आणि अनुग्रह द्या असे म्हणून मागे लागला. स्वामींनी  विचारले, 'तू  ह्या पूर्वी कुणाचा अनुग्रह घेतला  होतास का ?'  तेंव्हा ब्राह्मण म्हणाला , 'होय,मी समर्थ रामदासांचा अनुग्रह घेतला होता , पण मला तिथे बरे वाटले नाही, म्हणून निघून आलो. '
स्वामी त्याला म्हणाले  की,तू समर्थांकडे  जा, आणि तुझा अनुग्रह परत  करून ये. ब्राह्मण समर्थांकडे गेला, आणि अनुग्रह परत घ्या असे म्हणाला . समर्थ म्हणाले, 'पाण्याची एक चूळ   भर,आणि त्या समोरच्या खडकावर टाक म्हणजे अनुग्रह परत घेतल्या सारखे होईल.'
ब्राह्मणाने चूळ  खडकावर टाकली, त्याच क्षणी त्याच ठिकाणी रामाच्या त्रयोदशाक्षरी मंत्राची, म्हणजेच 'श्री राम जय राम जय जय राम ' ही अक्षरे उमटली, आणि त्याच क्षणी ब्राह्मणाची वाचा देखील गेली ! त्याची ही दयनीय अवस्था पाहून निगडीकर स्वामी पुन्हा त्याला घेऊन समर्थांकडे  गेले,आणि त्याची वाचा परत येऊ द्या म्हणून विनंती केली. समर्थांनी ब्राह्मणाला त्या ख्द्कावरची   उमटलेली अक्षरे जिभेने चाटायला सांगितली . आणि काय आश्चर्य… ब्राह्मणाची  गेलेली वाचा त्याला परत मिळाली !!!

 ही कहाणी उंब्रजच्या मारुती मठातील घडलेली आहे, आणि ह्या मारुतीला गेले, तर हा खडक पहायला मिळेल.

असो,  माझाही किस्सा सांगण्यासारखा आहे. मी पूर्वी म्हणजे साधारण २५ वर्षां पूर्वी पर्यंत वांग्याची भाजी अजिबात खायची नाही. एकदा  माझ्या आजोबा आणि आजी बरोबर सज्जनगडावर जाण्याचा  आला. त्या दिवशी दर्शन झाल्या  नंतर,आम्ही प्रसादाचे जेवण घेण्यासाठी  बसलो, तर काय ? जेवणात भात, वांग्याची भाजी आणि पोळी !! आली का पंचाईत ? माझ्या एका बाजूला  आजोबा आणि एका बाजूला आजी बसले होते, आणि पानात  काही टाकायचं नाही हा   दंडक अंगवळणी पडलेला ! मग काय, खाल्ली भाजी आणि खर सांगते, तेंव्हा पासून  वांग्याची   भाजी खायला लागले!!

सांगायचं कारण हे की आज वांग्याची रसभाजी केली, छान  जमली म्हणून तुमच्या सोबत शेअर केला हा किस्सा.  सांगलीची फेमस वांगी मिळाली  त्याची भाजी कशी केली तर ही रेसिपी …

३ छोटी वांगी, २ छोटे बटाटे देठ न तोडता, +असे कापे मारून   पाण्यात ठेवा.
मसाला करण्यासाठी:  १ मोठा कांदा तेलावर brown करून घ्या ,लगेच त्यातच ५ ते ६ लसूण  पाकळ्या  परतून घ्या , २ सुक्या मिरच्या पण परतून घ्या, १/४ वाटी सुकं खोबरं  भाजून घ्या, २ टेबलस्पून तीळ भाजून घ्या,  हे  सर्व वाटून पेस्ट बनवून, वांग्यात भरून   घ्या.
 तेल गरम करून,थोडा  हिंग, मोहरी, थोडे मेथी दाणे आणि लाल तिखट घाला.  त्यात ही वांगी आणि बटाटे  सोडून,परतून, घ्या. नंतर पाणी घालून शिजू द्या. थोडी  मसाला पेस्ट   घाला, पूर्ण शिजले, की त्यात,१ टेबलस्पून   गोडा  मसाला, किंवा काळा मसाला, २ चमचे तिखट ,   २ टेबलस्पून गूळ , १ टीस्पून चिंच कोळ ,२ टेबलस्पून दाण्याचे कूट , कोथिंबीर घालुन सर्व्ह करा भाकरी किंवा   पोळी सोबत.

ह्यात ओलं खोबरं देखील  घालता येते.

आता मस्त  वांग्याच्या भाजी पोळीवर ….तोपर्यन्त भेटूयात !!!

Tuesday, 6 May 2014

आला रे आला ---फळांचा राजा ! आंबा महोत्सव सुरु झाला !

'[आंबा पिकतो, रस गळतो,
कोकणचा राजा बाई   झिम्मा खेळतो !!!'

उन्हाळा सुरु झाल्या झाल्या आठवण होते कैऱ्या , आंबा, फणस, ह्या वस्तूंची! मस्त हिरवी गार कैरीची फोड  तिखट, मीठ लावून खायची…… वाह तोंडाला पाणी सुटतच की नाही ?
आणि आंबा  कोणताही चालतो,…   म्हणजे चोखून खायला रायावळा , आमरस करायला पायरी , किंवा  फोडी करून खायला, आणि राजाधिराज,  खरी रसनेची तृप्ती करणारा हापूस आंबा!   वाह वा ! मला स्वतःला हापूस आणि फक्त हापूसच आवडतो  बर का ,  काय असेल ते असो.

पूर्ण मोसमात एकदाच पोटभर हापूस आंबा ,खाल्ला, की मी परत आंब्याकडे बघणार देखील नाही!  ही आपली गम्मत बर का,  कारण पुन्हा दुकानात हापूस आंबा  दिसणार,तो मला खुणावणार, आणि मग मी जादू केल्या सारखी दुकानातून आंबा विकत घेणार , आणि पुन्हा ताव मारून खाणार!!

परवाच गुळांबा  केला आणि दर वर्षी  प्रमाणे, माझ्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या!
आंब्याचा राजा _ हापूस
मामाकडे सुट्टीत रहायला जायचो, तेंव्हा मोठ्या  मामाने आंब्यांची भली मोठी अढी रचलेली असायची ! आणि धाकटा मामा म्हणायचा , ' खा लेको, किती आंबे खाता ते खां!' तेंव्हा ह्या वाक्याचं  खूप हसू यायचं, पण आता उरल्यात फक्त आठवणी!  पण ती आठवण  जरी झाली, तरी मी मनाने त्या वाड्यातल्या  पोहोचते, आणि ती रचलेली अढी मनाने  पाहते, वास  घेते, आणि खाते सुद्धा!! म्हणून असेल कदाचित मला फक्त हापूसच मनापासून आवडतो !

आणि पाठोपाठ आठवतो तो मामीच्या हातचा गुळांबा ! वाह! असा गुळांबा पुन्हा  होणे नाही, खरच !

कच्च्या कैरीचा गुळांबा
 म्हणजे पोहून वगैरे यायचं , आणि मग जेवायला बसायचं… मस्तपैकी गुळांबा  घ्यायचा,वरती भरपूर साजूक तूप ओतायचं,( हो,हो, ओतायचं म्हणजे चक्क ओतायचं  बर !) आणि पोळी बरोबर खायचा हा गुळांबा! म्हणजे पोळीसाठी गुळांबा, का गुळांब्या साठी पोळी, का तुपासाठी गुळांबा, का गुळांब्यासाठी तूप हेच समजेनासं होत!!

 दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी गुळांबा केला,  आणि तो मस्त झाला !   असो, तर ह्या गुळांब्याची ही गोड रेसिपी …

गुळांबा :

१ वाटी कैरीचा कीस पातेलीत घेवून,झाकण न ठेवता ३ ते ४ मिनिटे शिजू द्यायचा ,  नंतर कीस हाताला मऊ  लागला, की त्यात १ १/२ ते २ वाट्या गूळ  घालायचा, नीट  ढवळून पातळ  पाक बनेपर्यंत बारीक gas वर शिजू द्यायचा. ३ ते ४ मिनिटे लागतात. शेवटी २ लवंगा टाकायच्या . पाक भरपूर हवा, घट्टसर पण पळीने वाढता येण्यासारखा  झाला पाहिजे.

कैरीची एक खास चटणी उत्तर भारतात प्रसिद्ध  आहे.

कैरीची चटणी

 ही कैरी चटणी    करण्या साठी, १ वाटी पाणी कढईत  उकळत ठेवावे . त्यात १ टीस्पून आलं   पेस्ट,१ टीस्पून लसूण  पेस्ट, २ सुक्या मिरचीचे  तुकडे,आणि १ वाटी किसलेला कांदा घालावा. थोडे आटल्यावर १ वाटी कैरीचा कीस  शिजू घावे. शेवटी १ tsp  तिखट, १/२ tsp मीठ, २  tsp साखर, १ tsp भाजलेल्या बडीशेपेची पूड, १/२ tsp तळलेल्या मेथी दाण्याची पूड, आणि १/२ tsp विनेगर  घालून gas  बंद करावा . नंतर १/२ tsp  acetic  acid  घालून, नीट  मिक्स करून, प्लेट टेस्ट करून नंतर बाटलीत भरून ठेवावी.
हा आंबा महोत्सव असाच  आणखीन बरेच दिवस चालणार आहे, त्यामुळे नवीन नवीन रेसिपीज येतच राहतील … Enjoy  the mangoes  to your heart's  content !!

Sunday, 27 April 2014

आवडीचा बेत _ म्हणून आनंद !

समर्थांचे एक वचन आहे ,
'आळसे  राहिला विचार ,  आळसे  बुडाला  आचार। 
आळसे  नव्हे पाठांतर,   काही केल्या । '
खरच, कधी कधी इतका आळस   येतो, काही करू नये  असं  वाटतं, पण लगेच डोळ्यां समोर दिवसभराची काम दिसायला लागतात, आपल्यावर अवलंबून असलेली इतर मंडळी दिसतात आणि एकदम मनातून आळस  वगैरे पळून जातो आणि आपण कामाला लागतो!!

आज  साधा पण आमचा सर्वांचा आवडता इडली डोसा सांभारचा बेत केला होता. सगळा बेत मस्त जमला आणि ताव मारून नंतर ब्लॉग  लिहायला बसले.
इडली सांभार आणि मोलागापोडी चटणी

पण गरम गरम डोसे खायची  औरच  असते बर का! म्हणजे दोन तीन डोसे बनवून, प्लेट मध्ये  घ्यायचे,त्यावर गरम गरम सांभार ओतायचं ., वरून मोलगापोडी  चटणी घालायची, मस्तपैकी तूप टाकायचं , आणि  हाताने डोसा ओरपायचा!  हे खर सुख!!
म्हणजे इडली चटणी सांभार थोडे साहेबी पद्धतीने म्हणजे काट्या  चमच्याने वगैरे   खावे, पण डोसा सांभार मात्र भारतीय  पद्धतीनेच खावा, हे  समीकरण माझ्या डोक्यात आहे बर का!
असो, प्रत्येकाची आपापली आवड निवड असतेच की. महत्वाचं  काय असतं , की समोर आलेले अन्न हे पूर्ण ब्रम्ह समजून खावे, ताटात आवश्यकते पेक्षा जास्त अन्न वाढून घेऊ नये, आणि प्रसन्न  चित्ताने  भोजन करावे, म्हणजे मग अंगी लागते,  आणि त्या अन्नदात्याला  विसरू नये, उलट, जेवणा नंतर त्याचे आभार मानावेत म्हणून, ताटाला हाताने नमस्कार करायची पद्धत आहे ती पुन्हा रुजू द्या! जुने संस्कार पुन्हा नव्याने रुजणे गरजेचे झाले आहे. 'अन्नदाता सुखी भव '  असे देखील म्हणण्याची पद्धत आहे, त्याला कारण ज्यांनी हे अन्न बनवून  वाढले,त्या सर्वांना सुखी ,ठेव अशी परमेश्वरापाशी प्रार्थना करणे हा उद्देश होय .

काल आणखीन एक आवडता पदार्थ केला होता, माझ्या आत्याचा हातखंडा असलेल्या गुळपापडीच्या वड्या! मला  जाम आवडतात ह्या वड्या …
गूळ पापडी च्या वड्या
१ वाटी साधी कणिक, किंवा जाडसर दळलेली कणिक, १/२ वाटी तुपावर खरपूस भाजून घ्यावी .  १ १/२ वाटी  गूळ आणि १/२ वाटी पाणी घालून, दोन तारी पाक तयार करावा आणि गरम पाक, गरम कणकेत घालून, gas वरून खाली काढून , नीट  ढवळून  घ्यावे,आणि थोडी  घालावी. तूप लावलेल्या थाळीत सेट करावे. वड्या  ,पाडून घ्याव्यात.  की सर्व्ह करव्यात.  हवे असल्यास,  वेलची पूड  घालावी, आणि आवडत असल्यास, वरून खसखस भुरभुरावी. 
       

Thursday, 17 April 2014

MOODS AND FOODS

'I  hate my moods,
They never ask permission before they change!'

हा! हा !हा !  असो, jokes apart , मूड्स म्हणजे भयंकर गोष्ट आहे! कधी बदलतील काही नेम नाही! म्हणजे खरच आपली  परवानगी न घेताच बदलतात. पण  स्वतः वर थोडा ताबा ठेवला तर ह्या मूड्सच्या
अनियमितपणा वर काबू करता येतो   हे नक्की.

बेसिक केक  विथ truffle sauce

काल  एक साधा केक बनवला होता . केक पण छान जमून आला होता . संध्याकाळी एक friend आला आणि त्याने माझ्या केकसाठी truffle sauce बनवून दिलं , आणि आम्ही केक sauce ने decorate केला, कापला आणि एन्जॉय केला! वाह! मजा आली कारण मला हा sauce येत नव्हता, तो मला काल शिकायला मिळाला ! तर गरम गरम पास्ता आणि त्यानंतर हा truffle केक!  मूड एकदम  मस्त  झाला! म्हणजे बघा एखादी छोटीशीच  गोष्ट , पण त्या गोष्टीने आपल्यातली एखादी रिकामी जागा एकदम चमकून गेली, उजळून गेली तर किती छान मूड  होतो न ?

कधी कधी एखादी डिश किंवा आत्ताचा   विषय घ्यायचा  झाला तर एखादे  दिवशी केक फसला, तर माझा मूड पार खराब होऊन जातो . माझा मूड चांगला असेल, तेंव्हा मी केक करायला घेते, आणि मग केक बघून माझा मूड एकदम छान !  ! म्हणजे मूड भी खुश  ! और पेट भी खुश !

 तेंव्हा,लक्षात ठेवा मूड ठीक करायचा  असेल,तर चांगलं चुंगल खा, प्या आणि मस्त रहा!