Saturday, 22 July 2017

आम्ही किल्लेदार!

किल्ला करणे हा अनेक जणांचा दिवाळीतला सगळ्यात मजेदार आणि माझा देखील आवडता कार्यक्रम आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण मिळून किल्ला बनवतात. त्यासाठी दगड, माती, विटा आणि इतर साहित्य गोळा करणे, त्यातून किल्याला आकार देणे, मातीचे लेप देऊन, अहळीव किंवा धन्य पेरून किल्ला सज्ज करणे ह्या सर्वांतून खरेतर काम करणाऱ्यांच्यात एकोपा, समन्वय, तन्मयता साधणे  आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेतून आनंद मिळवणे हा ह्या केलेल्या सर्व परिश्रमाचा मानबिंदूच! ह्यानंतर सर्वांनी केलेले कौतुक म्हणजे श्रमसाफल्यच आणि नव्या उमेदीने पुढे  जाण्याचे जणू इंधनच.

किल्ला करतांना किल्याचे बुरुज, तटबंदी, दिंडीदरवाजे, किल्ल्या  भोवतीची  मोट आणि किल्याची सर्व बाजूंनी केलेली सुरक्षा व्यवस्था हे सर्व महत्वाचे पैलू. ह्यानंतर किल्यावरील मंदिरे, तोफखाना, बारुदखाना, नगारखाना, पाण्याचे साठे, धान्यकोठारे अशा अनेक महत्वाच्या जागा योग्य सजावटीतून तयार करणे हे येते. किल्ल्याच्या  पायथ्याशी वसलेले गाव दाखवणे हा देखील महत्वाचे पैलू आहे. गावात त्यावेळच्या गोष्टी म्हणजे मंदिर, बाजार, उद्यान, घरे, शेती, शिवाय गावात अनेक प्रकारची कामे करणारे म्हणजे बारा बलुतेदार दाखवणे , गाय, बैल इतर जनावरे, प्राणी, पक्षी हे सर्व कल्पकतेने सजवणे हे खुप  आव्हानात्मक ठरते.

ह्या किल्याची शोभा वाढवतात ते मावळे , शेतकरी, भिल्ल आणि जंगलातील हिस्त्र श्वापदे. ढोल, ताशे, नगरे वाजवणारे, बाजारातील लोक, गावातील वस्ती व उद्योग दाखवणारी माणसे. आणि ह्या सर्व सजावटीचा मानबिंदू म्हणजे शिवाजी महाराजांची सिंहासनावरची  अतिशय रेखीव मूर्ती आणि त्यांच्या आजुबाजूला तैनात दरबारी मंडळी! ह्या उच्चासनावर बसून किल्ला व गावाचे निरीक्षण करणारे महाराज हा देखावा पहाता पाहता किल्ल्यासमोर चार पाच तास असेच तल्लीन होऊन निघून जातात. संध्याकाळी किल्ला सजवून, रोषणाई करून असं एकटक पाहण्यातला आनंद सांगून नाही समजणार. त्यासाठी ह्या सर्वांतून जायला हवे, ते सर्व अनुभवायला हवे!

कालमानानुसार किल्यावरील सजावट बदलली. खेडी जाऊन तिथे शहरी व्यवस्थेचे दर्शन घडायला लागले. दिवे, रेल्वे, गाड्या, विमाने, विमानतळ, इत्यादी दाखवली जाऊ लागली. रिमोटकंट्रोलने त्यांना चालना देऊन एक वेगळेच विश्व निर्माण केले जाऊ लागले. थोडक्यात,, जुन्या_नव्या संकल्पनांचा संगम घडवून, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून किल्याला एक आधुनिक झगमगाटाचे स्वरूप देण्यात  येत आहे. तेही तितकेच लोभस व मनमोहक आहे ह्यात शंका नाही.

माझ्या लहानपणी वाड्यात रहात असतांना किल्ला बनवण्याच्या कामात सहभाग असल्याने ती गोडी मनात उत्पन्न झाली. वाड्यातून fla मध्ये t स्थलांतर झाले आणि बराचसा काळ  किल्ला मनाच्या कोपऱ्यातच राहिला. जेंव्हा  अनेक वर्षांनी पुन्हा स्वतःच्या मुलीसाठी किल्ला करायला सुरुवात केली तेंव्हा जुने सर्व काही आठवले आणि प्रत्येक वर्षी अधिक चांगला किल्ला करता येऊ लागला.

दरवेळी किल्याची नवीन संकल्पना ठरवणे, एकसमान सूत्र ठरवून मातीच्या व लाकडाच्या खेळण्यांची रचना करणे व या खेळण्यांसाठी पुण्याच्या कुंभार बाजारात पायपीट करणे... ... सर्व काही कालच घडल्यासारखे वाटते आहे. ही खेळणी अजूनही मनाला भुरळ घालतात. त्यामुळे खेळण्यांची हौस तशी भागलीच नाहीये, कारण किल्ला करण्यातला आनंदच अवर्णनीय आहे.

किल्ला करून दमणूक होते हे खरे. दिवाळीच्या शेवटी असे वाटते, आता पुन्हा किल्ला करणे नको! पण, दिवाळीची चाहूल लागली की लगेच मनात उत्साहाची एक लकेर दौडून जाते, आणि पुन्हा नव्या कल्पना लढविण्यासाठी डोक्यात विचारचक्रे सुरु होतात!

अनेक वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर राहून  सुध्दा प्रयेक सण जसा पारंपारिक पध्दतीने साजरा केला, इतर प्रांतीय लोकांनाही तो आनंद दिला, सणांची महती दिली आणि कौतुक मिळवले, तसेच किल्ला केल्यानंतर प्रत्येक  दिवशी येणाऱ्या पाहुण्यांना फराळापेक्षा जास्त उत्सुकता असलेला किल्ला दाखवणे, त्यातले बारकावे सांगून समजावणे, फराळापेक्षाही गोड वाटायचे!आणि शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगतांना मन अभिमानाने भरून यायचे!

पुष्कळदा मराठी माणसेच आपली संस्कृती, सण , उत्सव साजरे  करायला व इतर प्रांतीयांना सहभागी करून घ्यायला थोडे संकोचतातच, पण मी मात्र ह्या सर्व गोष्टी आवर्जून दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आणि ह्यामुळेच आम्हाला पुन्हा आपल्या प्रदेशात वास्तव्याला आल्यानंतर इथल्या वातावरणात लगेच सामील होता आलं.. हे पहिले की वाटते, "ह्याचसाठी केला होता अट्टाहास!"

दिवाळीच्या फराळ आणि फटाक्यांबरोबरच संपते ती किल्ल्याची साथ...... शेवटी शिवाजी राजांच्या  स्मृतीला अभिवादन करून शेवटचे दिवशी किल्ला उतरवतो तेंव्हा खरच गणपती बाप्पाचे विसर्जन करतांना वाटते तशी हुरहूर लागते! 

Friday, 21 July 2017

ध्यान धारणा मंत्रोच्चार.... आणि स्वत्वाचा शोध!

सर्वसाधारणपणाने ध्यानसाधनेने साधक आपले ह्या विश्वातले त्याचे स्थान अथवा अस्तित्व शोधण्याचा  करीत  असतो. चिंतनातून माणूस आपले ईश्वररूपी विश्वाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. आपल्या भोवतालच्या परिचित व्यक्ती नेहमी एक गोष्ट सांगतात, ती म्हणजे ध्यान साधना कशी  करायची,का करायची... 

ध्यान साधना खालील  प्रमाणे  करावी....

१)  शिथिल होणे म्हणजे relaxation.
 आपल्या  शारीरिक हालचालींवर  लक्ष ठेवणे. सोबतच  श्वासावर लक्ष केंद्रित करणे.शरीराला शिथिल करावे, तसेच श्वास नियंत्रित करून ध्यानासाठी सज्ज व्हावे.

२) मंत्रांचा उच्चार करणे.
एखाद्या मंत्राचा पुनरुच्चार  करीत राहणे. सोबतच मंत्राचा कालावधी निश्चित करणे. म्हणजे  मंत्राचे एक आवर्तन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रोच्चारामध्ये  एक शिस्तबद्ध शांतता राखणे.  आणि  मंत्रोच्चारण किती  वेळासाठी करायचे हेही निश्चित करायचे.

३)मंत्राचा अर्थ  समजून घेणे.
आपण म्हणत असलेल्या मंत्राचा पूर्ण आणि सम्पूर्ण अर्थ, त्यातला गर्भित अर्थ, आणि त्या मंत्राने गाठायचे उद्दिष्ट ह्या सर्वांचा विचार आपण मंत्र म्हणतांना करायचा असतो.

४)सद्सद्  विवेकबुद्धी जागृत करणे.
ह्या विश्वातील प्रत्येक जीव वा वस्तू ही अणू पासून तयार झाली आहे. ह्या श्रुंखलेत  मी कुठे व  कुठल्या स्थानावर आहे हे माहित करून घेणे, म्हणजेच विवेक. आपल्या यःकिंचित स्थानाची  झाली की माणसात विवेकबुद्धी जागृत होते. अशा प्रकारच्या विचारांची साखळी तयार होते, आणि मग मनुष्य  राग,लोभ,मद, द्वेष, दुःख, मत्सर ह्या षड्रिपूंवर नियंत्रण ठेवण्यास शिकतो. आपल्या अस्तित्वाचे कारण, आणि आपले योगदान ह्याचे ज्ञान प्राप्त होताच त्या व्यक्तीमध्ये मानसिक  वृद्धी होते.

५) स्वत्वाचा शोध घेणे...
आपल्याला काय माहित आहे ह्यापेक्षा काय माहित नाही ह्याची जाणीव होणे फार महत्वाचे आहे.  आणि मग  पुढची पायरी म्हणजे जे माहित नाही त्याचा शोध घेणे!.म्हणजेच 'स्वत्वाचा' शोध घेणे!  

Wednesday, 19 October 2016

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आम्ही शिलेदार!!


बऱ्याच दिवसांच्या खण्डानंतर लिहायला मिळाले.' आंतरजाल ' अहो म्हणजे इंटरनेट सेवेत मध्यंतरी खंड पडला होता, त्यामुळे काही लिहिता  आले नाही. पण मग ते ५ ते ६ दिवस फार मजेत गेले हो! मला आधी वाटलं की अरे बापरे आता काय करायचं? पण म्हणतात ना, necessity is the mother of invention तसंच काहीसं झालं बघा!मोबाईलवरती गेम नाही, गूगल नाही,, टॅबलेट, लॅपटॉप, मोबाईल अशी  सारी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आवाज न करता, स्वस्थ पडून होती! नाही म्हटलं तरी अधून मधून नजर टाकायचे...वेड्या आशेवर की झालं असेल नेट सुरु तर? एक दोन दिवस खूप बेचैन होते, भानुप्रिया आणि घरात सर्वांनीच आनंद व्यक्त केला! माझा गेम खेळण्याचा वेळ वाचला म्हणून! असो.. करू द्या त्यांना टिंगलटवाळी... पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात ते उगीच नाही!!! पण मग नंतर नंतर नादच सोडून एन्जॉय करायचं ठरवलं!  मग काय... मनसोक्त गप्पा मारल्या, मैत्रिणीं सोबत मॉल मध्ये भटकंती केली,खाओपियो... मजा करो! पुस्तकं धूळ खात पडली होती, त्यांवरची धूळ झटकून पुस्तकं वाचून काढली! पण seriously, खूप छान वाटलं काही दिवस इंटरनेट शिवाय काढले ते!

ह्याच दरम्यान हेही लक्षात आले की आपण टेक्नॉलॉजीचा वापर करता करता, त्या टेक्नॉलॉजीच्या किती आहारी गेलो आहोत ते... आत्ता आत्ता मोबाईल आले, ह्या दशकात इतर अनेक संदेशाची साधने आली, दूर गेलेली नाती जवळ येऊ लागली... जवळची नाती आणखीन जवळ आणि घट्ट व्हायला लागली! टपाल कार्ड, चिट्ठी, सर्व काही कालबाह्य झालं, आणि वाट पाहणं संपलं! क्षणात एखादा निरोप, संदेश, फोटो,व्हिडीओ, एखादी मनीची व्यथा, आनंद किंवा मधेच विरंगुळा म्हणून एखादा खुसखुशीत विनोद सर्व काही दुसऱ्या पर्यंत पोहोचतं!

 आता प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे, आणि आता तर बोलण्यासाठी पैसे पडणार नाहीत अशी सेवा उपलब्ध होत आहे, मग काय? माणसाला आणखीन काय हवे? आपल्याकडे म्हणजे भारतीयांना  तसंही बोलायला आवडतं! म्हणजे माणूस मागतो एक डोळा, देव देतो दोन! तसेच काहीसे झाले आहे! असो,  अशी सेवा देणारे खूप प्रगती करोत, सम्पन्न होवोत, आम्हालाही सम्पन्नता येवो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना!

अर्थात अशा व्यत्ययामुळे आर्थिक किंवा इतर काही  नुकसान होते, पण ह्या टेक्नॉलॉजीच्या जाळ्यातून सुटका मात्र नाही... जायचा मार्ग आहे, न परतीचा मार्ग तितकासा सुगम्य नाही. पण कधीतरी, थोडा वेळ, काही तास, काही दिवस ह्या उपकरणां पासून मुक्त राहून बघावं हे मात्र नक्की! खूप मजा येते! मन शांत, स्थिर, प्रसन्न करायचा रामबाण उपाय तर आहेच, पण  थोडा वेळ स्वतःला शोधण्याची,  अंतर्मनाशी संवाद घडण्याची पण सुवर्णसंधी असते!   

Saturday, 8 October 2016

यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते? ३


तिसरी पातळी म्हणजे समाजात मान्यता, प्रतिष्ठा मिळणे. जसजसा मानसन्मान वाढतो तसतसा तो माणूस जास्त प्रतिष्ठित  बनत जातो. ह्या  सर्व पातळ्यांवर जेंव्हा यश मिळवतो, तेंव्हाच पुढच्या पातळीवर त्याची कसोटी लागते. अध्यात्मिक किंवा पारमार्थिक कल्याण करून घेणे ही चौथी  पातळी होय. अशा वेळी मनुष्याची जिज्ञासूवृत्ती जागी होते आणि तो नवनवीन क्षेत्रांची, ज्ञानाची दालने उघडून आपल्या  समाधानासाठी  रस  घेतो तो यशस्वी म्हणता येईल. . अनेक वर्षांच्या सहवासातून जोडलेले ऋणानुबंध  जपायचे,नवीन  जोडायचे, स्वतःसाठी म्हणून  काही गोष्टी करायच्या आणि न वापरलेल्या क्षमतांना पंख देऊन नवीन भरारी घ्यायची . अध्यात्मिक समाधान  म्हणजे कित्येकदा वैराग्य स्वीकारून दूर डोंगरावर निघून जाणे वगैरे समजले जाते. पण हे   पूर्णपणे सत्य नव्हे. आपले आयुष्य यथार्थपणे जगल्यानंतर कुणावर भार होण्यापेक्षा लहानांना किंवा प्रज्ञावंतांना ओळखून त्यांना ह्याच  दुनियेतल्या प्रापंचिक, आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी योग्य  मार्गदर्शन करून स्वतः अलिप्तपणे त्यांची भरारी बघणे आणि   समाधान मिळवणे ही अध्यात्मिक पातळीवरची  यशाची खरी ओळख आहे. असे जो करतो तो यशस्वी होतो. इथेच आपल्या अंतर्मनाचीदेखील ओळख माणसाला होते हे नक्कीच. ह्यातूनच वैराग्यभाव उदयास येतो.

स्वतःशी प्रामाणिक रहाणे, निर्भयतेने  निर्णय घेणे व अमलात आणणे आणि माणुसकीचा झरा सदैव मनात वाहता ठेवणे हे महत्वाचे आहे. ह्या सर्वातूनच एक यशस्वी व्यक्तिमत्व उदयाला येते. संवेदनशील मनाने नवनवीन विकल्प शोधून समाधान मिळविणे हीच स्वतःच्या सुखाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.

प्रत्येक पातळीवर आपल्या वाट्याला येत असलेल्या असंख्य संधींमधून  योग्य मार्गाने, योग्य संधीचा फायदा घेऊन त्या पातळीवरच्या गरजा भागविण्यासाठी क्षमता असली पाहिजे. प्रापंचिक गरजांपासून अध्यात्मिक गरजांपर्यंत सर्व गरजांना योग्य वेळी, योग्य तेवढेच प्राधान्य देऊन भागवल्या, तर कमीत कमी वेळ आणि कमीत कमी श्रम खर्ची पडतील, आणि इतर काही गोष्टी करायला, काही  छंद जोपासायला वेळ मिळेल.

 परंतु,जीवनातल्या कोणत्याही पातळीवर जो भगवंताला विसरत नाही, त्याला कधीच अपयश येणार नाही. परंतु, एरवी कधीच भगवंताचे समरण केले नाही आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी, यातनांमध्ये त्याचे समरण केले तर काय   उपयोग? "सौ चुहे खाकर बिल्ली हजको चली", किंवा "करून सवरून दमले, आणि देवपूजेला लागले"असे होऊ  नये,ह्यासाठी विवेक हवा आणि तारतम्य हवे.

तेंव्हा, ह्या चारही पातळ्यांवर ज्याने समाधान मिळवले व दिले, सुखाची देवाण_घेवाण पण केली त्यालाच एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' म्हणता येईल.

  । समाप्त।   
.

Wednesday, 5 October 2016

यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते?... २




कित्येक वेळा आपण ज्याला यश म्हणत असतो ते इतरांच्या दृष्टीने अपयश असते. जे सत्ताधीश असतात ते सत्ता मिळवतात आपल्या सुखासाठी. परंतु ही सत्ता आल्यानंतर मात्र, ती हातातून कधी निसटून जाईल ह्या विवंचनेत त्यांची सुखशांती केंव्हाच भांग होते आणि मग शिल्लक राहते ती सत्ता टिकवण्यासाठीची अव्याहत आणि कित्येकदा केविलवाणी धडपड. ज्यांच्याकडे अतिजास्त प्रमाणात सम्पत्ती असते त्यांचे  पण अनेकदा असेच होते. ही सम्पत्ती टिकवण्यासाठी, वाढविण्यासाठी, सतत झटतात, सुखाची व चैनीची साधने निर्माण करतात, पण त्यांचा उपभोग घ्यायला वेळ मात्र मिळत नाही.

अर्थात, सगळायच यशस्वी लोकांच्या बाबतीत असे  होते असे मात्र मुळीच नाही. अनेक मंडळी कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारीचा समतोल राखताना दिसतात. त्याच बरोबर सामाजिक, आर्थिक आघाडीवर देखील यश सम्पादन करतात. वयाने, अनुभवाने सिद्ध झाल्यानंतर अध्यात्मिक दृष्टींनी देखील पुढील पिढीस मार्गदर्शन करतांना दिसतात.  कारण,अध्यात्मिक दृष्टीने यशस्वी होणे म्हणजे वैराग्य पत्करून निघून जाणे नव्हे, तर निःसंग वृत्तीने, विवेकाने, पुढच्यांना ह्याच जगातील त्यांच्या  प्रापंचिक,व्यावसायिक, सामाजिक, आर्थिक आघाड्या सांभाळण्याची शक्ती प्रदान करणे व अनेक नवीन कार्य सिद्धीस नेणे हे होय. यासाठी कालपरत्वे आलेल्या ज्ञानाने, कौशल्याने आणि वय व अनुभवाने जे ऋणानुबंध जोडलेले असतात त्यांचा वापर करून आपल्या स्वत्वाची नवीन ओळख करून आंतरिक समाधान मिळवता येते.

तेंव्हा, ह्या सर्वांचा उहापोह करतांना हे लक्षात येते की यशस्वी व्यक्तिमत्वाचे काही निकष आहेत आणि व्यक्तिमत्वाची पारख ह्या निकषांच्या आधारावर करावी लागेल. यशस्वी व्यक्तिमत्वासाठी त्या व्यक्तीच्या पूर्वायुष्यात घडलेल्या अनेक स्थित्यंतराचा अंदाज घेतल्यास असे दिसते की यशाची परिभाषा, यशाचे मोजमाप हे प्रत्येक वेळेस बदलत असते. मनुष्याच्या अनेक पातळ्यांवर अनेक गरजा असतात.

पहिल्या पातळीवर असतात प्राथमिक गरजा, म्हणजे पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा आणि शारीरिक सुख. हे सर्व पुरेशा प्रमाणात व योग्य मार्गाने मिळाले की मनुष्य सुखी होतो. या सर्वांसाठी लागणारे आर्थिक बळ माणसाला लाभले की तो यशस्वी म्हणायचा.

नंतरची पातळी आहे ती मानसिक भूक. ही मानसिक भूक भागवली तर मनुष्य सुखी होत, यशस्वी होतो. प्रेम, वात्सल्यभाव, मैत्री इत्यादींची इच्छा पूर्ण होणे हे यशस्वी व्यक्तिमत्व घडणीत महत्वाचे आहे.

ह्या दोन्ही   पातळींवरील सुबत्तेमुळे तो आपली स्वतःची एक ओळख बनवतो आणि समाजात स्वतःचे स्थान बनवतो.


Tuesday, 4 October 2016

यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते?1





 आजपासून मी माझ्या ब्लॉगचे टायटल बदलून,'SPICE  N  SLICE OF LIFE ' ठेवले आहे. आयुष्यात रोज येणारे नवनवीन विचार, नवीन प्रेरणा, नवीन संकल्प घेऊन रोज काहीतरी लिहायचं असं ठरवलं आणि नवीन सुरुवात केली आहे.

 २००४ साली बंगलोरला असतांना माझा एक लेख महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक अंकात छापूनही आला होता, आणि त्याला त्या विषयातलं पाहिलं पारितोषिकही मिळालं होतं. तो लेख मला स्वतःला पण फार आवडतो.  आमच्या नाशिकच्या 'गावकरी' वृत्तपत्रात किल्ल्यांवर लिहिला होता तो लेख  पण मला फार आवडतो. तर मला वाटलं म्हणून मी तो लेख पुन्हा ह्या ब्लॉगवर टाकत आहे. क्रमशः असेल..

विषय होता 'यशस्वी  निकष कोणते?

जगातल्या अनेक सुप्रसिद्ध, ख्यातनाम आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अनेक पटींनी ऐश्वर्यसम्पन्न अशा व्यक्तींना पहिले की त्यांच्याबद्दल मनात एक अप्रूप निर्माण होते. त्यांच्याबद्दल लिहिलेल्या ,बोललेल्या, व सांगितल्या जाणाऱ्या  बातमीवर आपण कान टवकारतो, लक्षपूर्वक वाचतो व मनात साठवतो. ह्या अशा गुणसंपन्न, ऐश्वर्यसम्पन्न व्यक्ती एवढ्या यशस्वी कशा व का होतात? त्यांना पावलापावलावर मिळणारे यश, कौतुक पहिले की आपल्याला पण त्यांच्यासारखेच काही कार्य करून यशस्वी होण्याची इच्छा होते. पण शेवटी यशाचे मोजमाप काय? यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते? हे समजून घेणे आवश्यक आहे.

अनेक मोठ्या क्रांतींचे जनक जे क्रांतिवीर, मोठमोठे राजकीय नेते,प्रतिथयश उद्योजक, खेळाडू, सिने नाट्य जगातील दिग्गज कलावंत या सर्वांच्या आयुष्यात त्यांनी जे उत्तुंग यश मिळवलेले दिसते, ते इतर अनेक गोष्टींचे बलिदान देऊनच. परंतु या यशामागे त्या   व्यक्तींनी सोसलेल्या हालअपेष्टा, त्यांनी उमेदवारीच्या काळात सोसलेले टक्केटोणपे, त्यांच्या शत्रूंच्या कटकारस्थानांचे किस्से या सर्वांचा आपल्याला अनेक वेळा विसर पडतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती गोष्ट प्राप्त होत नाही आणि असे मनोरथ सिद्ध होत असताना त्या व्यक्तींना कधी प्रापंचिक, सामाजिक तर कधी सांपत्तिक त्याग करावा लागतो. शारिरीक  सुखविलासांवर देखील पाणी सोडावे लागते, तेंव्हा त्यांना हे मोहवून टाकणारे यश मिळते.

 क्रमशः 

Monday, 3 October 2016

नवरात्रोत्सव... नवरंगांचा!!!



' या देवी सर्वभूतेषु,शक्तिरूपेण संस्थिता।
शांतिरूपेण संस्थिता| बुद्धिरूपेण संस्थिता|
श्रद्धारूपेण संस्थिता| मातृरुपेण  संस्थिता||
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै  नमः ||'
 
नवरात्रीची धामधूम  ,तिसरी माळआजची... देवीचा जागर, गोंधळ, विविध रूपांनी नटलेल्या देवीची, आदिमायेची पूजा होते , रास गरबा खेळून रात्र जागवली जाते,  उत्तरेत अनेक  ठिकाणी' जगराता'  म्हणजे  देवीचा गोंधळ, भजन, कीर्तन असा  रात्रभर जागर होतो.  नऊ दिवसांचे, उठता बसतानाचे असे उपवास करून देवीला प्रसन्न केले जाते. देवीच्या अनेक रूपांत कुणाला कुठले रूप आवडते  कुणाला कुठले! प्रत्येकजण आपल्याला  भावलेल्या  रूपाची यथोचित, यथासांग, यथामति पूजन अर्चन करीत असतो.
रास गरबा

ह्या भक्तीच्या उधळणीत खरे रंग भरले जातात ते गरब्याच्या रंगांनी! रात्र रंगते तसा  गरबा फुलतो! ढोलाच्या तालावर टिपऱ्यांचे ठेके धरीत फेर धरून सुंदर नृत्य करणारी मंडळी बघितली की मन प्रसन्न होतं ! मला मुळीच नाचत येत नाही त्यामुळे मी नेहमीच प्रेक्षक! आर्मी मध्ये देखील इतकी  वर्षे काढली, प्रत्येक कामात पुढे पडणारी माझी पाऊले, डान्स फ्लोर वर जायची वेळ झाली की मात्र मागे  पडायची,आजही तेच आहे! पार्टी मध्ये सगळीकडे गप्पा मारीत फिरणार, ,तंबोला खेळणार, गेम्समध्ये हिरीरीने भाग घेणार, बक्षीसही जिंकणार, पण....  डान्सची वेळ झाली की,हळूहळू व्हेन्यूच्या मागच्या भागाकडे सटकणार!  आपल्याला बघू नये असे बसणार!!!! कशालाही न घाबरणारी, कुठल्याही आव्हानाला न डगमगता सामोरी जाणारी मी.... डान्स म्हटला की अगदी 'भिगी बिल्ली' होते! भानुप्रियानी मला डान्स शिकवण्याचे अनेक असफल प्रयत्न केले, आणि मग नाद सोडून दिला! हसू येत माझं मलाच कधी कधी. पण छान, बहारदार नृत्य सादर झालेलं मला  आवडतं! नाचातल्या खाचाखोचा चांगल्या उमगतात, पण नाच मात्र करू शकत नाही! (इतरांच्या तालावर नाचायला तर मला मुळीच येतही नाही, जमतही नाही, आणि पटत तर मुळीच नाही!) मला ताल, सूर, लयीची ओळख आहे, गाणं ,मला  आवडतं! मी स्वतः पण विरंगुळा म्हणून सतत गाणी म्हणत असतेच, पण कोणत्याही भाषेत एखादे सुमधुर गाणे ऐकायला मिळाले, तर मनाला खूप प्रसन्न वाटतं! पण कोणत्याही कलेचा अवमान केलेला मला रुचत नाही. उगीच आपलं करायचं म्हणून.. हे मला रुचत नाही.

मी आता आमच्या घराजवळ जो  नवरात्रीसाठी मांडव टाकलाय, तिथे बघते ना... दोन  मोठे  गोल फेर असतात.. एका फेरातली माणसं  उजवीकडून डावीकडे आणि दुसऱ्या गोलातली डावीकडून उजवीकडे ... , मुलं , माणसं , बायका येतात, अगदी नटून थटून, सुंदर सुंदर कपडे, मेकअप वगैरे वगैरे.... पण, गरबा कसा खेळायचा?  लोकांनी एकमेकांना टिपऱयांवर ठेका द्यायचा, पुढे जायचं, पुढच्याला टिपरीचा ठेका द्यायचा, पुढे जायचं! गाणी एक्दम ढिनच्यॅक लागलेली असतात, पण ही सर्व मंडळी अगदी हळूहळू, स्लो मोशन मध्ये फिरत असतात... म्हणजे ठेका हा शरीराच्या हालचालीत कुठेच नाही! एकदम संथ! इतकं बोअर होतं  की  काय सांगू! असं तासांच्या  चालतं...  मस्त,ठसकेबाज गरबा कुठेच दिसत नाही. म्हणूनच मघाशी म्हटलं तसं , उगीच आपलं खेळायचं म्हणून खेळायचं, झालं. असो, तर  नवरात्रोत्सव,भक्तीने, आनंदाने जल्लोषाने साजरा करूया...  चला!!!