Friday, 5 August 2016

शुभ मंगल सावधान!!!!


 दीड वर्षा पूर्वी १० एप्रिल २०१५ ला भानुप्रियाचे लग्न झाले, आणि एक वर्ष खूप मजेत आणि अर्थात पटकन गेले. एप्रिल मध्ये लग्न झाले, आणि त्यानंतर प्रत्येक सण वार साजरे करण्यात, मुलीचे आणि जावयांचे कौतुक करण्यात वर्ष झटपट गेले. कळले देखील नाही, आणि वर्षसण सुद्धा साजरा केला!  लग्नाच्या आठवणी अजून कालच लग्न झाल्या सारख्या आहेत. पुन्हा पुन्हा आठवावेत असे क्षण! आणि एकीकडे थोडं भावनाविवश व्हायला होतं पण सगळं व्यवस्थित पार पडलं ह्याचे समाधान आहे.

लग्न इतक्या झटपट ठरलं कि काय सांगू? चांगलंच आठवतंय मला कि ८ मार्च २०१६ ला मुलाकडच्यांचा फोन आला आणि लगेच बंगलोरला यायचे असा बेत झाला .आम्ही  गेलो, एकमेकांची प्राथमिक  पसंती झाली. आणि  आम्ही घरी नाशिकला परत येई  पर्यंत त्यांनी नाशिकला  येणार म्हणून कळवले देखील! मग काय? नुसती घाई झाली! आणि १३ तारखेला रविशंकर आणि त्यांचे वडील  आले,घर पाहिलं, पुन्हा एकवार भेटणं बोलणं झालं, आणि साखरपुडाच करायचा ठरलं! इतक्या झटपट!! तर मग घरची मंडळी जमली, भानूचे आजी आजोबा, काकू अशा महत्वाच्या लोकां समक्ष १४ तारखेला  साखरपुडा झाला!





 ।।  शुभम भवतु।।

 साखरपुड्यासाठी अंगठी खरेदी त्याच दिवशी संध्याकाळी झाली. आम्ही तिघे गेलो होतो अंगठी खरेदीला. खूप मजा आली. मला तर काही वेगळंच वाटतं होतं. म्हणजे भानूचं लग्न ठरलं? किती छान भावना होती ती!

 नवीन नवीन लग्न ठरलेली मुलगा आणि मुलगी एकत्र बघायला फार मजा वाटते! आपल्याला पण एकदम तरुण झाल्या सारखं वाटतं! खरंच ! मंत्रमुग्ध वातावरण होतं तेंव्हा! ते दोघे तर भारावलेले होतेच, माझी पण मनाची अवस्था वेगळीच होती!  थोडी हुरहूर, काळजी, आणि डोळ्या समोर एक्दम लग्न दिसायला लागलं ! म्हणजे घाई गडबड, तयारी, आमंत्रणं , लग्नाची तयारी, कपडे, दागिने, हॉल, काही विचारू नका!

पण  सगळ्यात सुंदर भावना होती ती म्हणजे जेंव्हा रविशंकरनी मला आई म्हणून संबोधलं तेंव्हा! मनात एक वेगळीच आनंदाची, ममतेची लहर तरंगून गेली ! कारण अभिषेकच्या  तोंडून मला आई हाक ऐकायला मिळाली नव्हतं. भानूची 'आई' हि हाक कानी होती. त्यामुळे त्या दिवशी मनाच्या एका खोल कप्प्यातली इच्छा पूर्ण झाली ! मला खूप आनंद झाला! आनंदाने डोळ्यात आलेले अश्रू मी हिमतीने मागे ढकलले आणि येणाऱ्या नवीन वाटचालीसाठी  सज्ज झाले!

घरी परत आलो, पुरणपोळीचा बेत होता. सगळ्यांची जेवणं झाली, ते दोघे हॉटेल वर परत गेले आणि मग थोडी उसंत मिळाली!  घडलं ते पूर्णपणे पुन्हा मनाशी उजळणी केली आणि मग...... आम्ही तिघे  एकदम  सरसावलो  आणि  लग्नाच्या तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे झोप येणारच नव्हती! आनंदामुळे!

आणि लग्नाची तारीख ठरली १० एप्रिल! म्हणजे बरोबर ३ आठवडे होते फक्त! तर मग घेतलं पेन आणि डायरी आणि दुसऱ्या दिवशी पासूनचे नियोजन सुरु झाले!





No comments:

Post a Comment