Sunday, 7 August 2016

आता लगीन घाई झाली हो!!!

 तर लग्नाची गोष्ट पुढे.....
८ एप्रिल रोजी आमच्या घरी ग्राहमखाचं पूजन झालं, देवांना लग्नासाठी शुभाशिर्वाद देण्याचं आमंत्रण दिलं आणि दारी  लग्नाचा मंडप पडला! व्याही आले, सोबतच घरातील सर्व मंडळी आली आणि पूजेत सहभागी होऊन, प्रसादाचे भोजन करून गेले.  त्या दिवशी सर्वांची थोडी जुजबी तोंड ओळख झाली. रेणू सचिन आणि मृणाल विक्रम मुलां सोबत आले होते. रेणू सचिन आणि मुले तर ऑस्ट्रलिया होऊन आले होते त्यांच्या भावाच्या लग्नाला. खूप ;छान वाटलं त्या दिवशी. सर्वांनी हौसेने   बांगड्या भरल्या,मेंदी लावून घेतली, खूप धमाल आली! पण विशेष म्हणजे मला काहीच दडपण नाही आलं! कारण आपण कुणाला आपल्याहून वेगळं समजलं, की त्याच्या सरबराईचे दडपण  येते. पण एकदा ही सर्व मंडळी आपलीच आहेत, एक्सटेंडेड फॅमिली आहेत असे मानले की मग आपल्या घरचेच होतात ते.

मग ९ तारखेला सकाळी  हळदीच्या  आणि लग्नाच्या बारीक सारीक जमवाजमवीला , तयारीला वेग आला . आई  बाबा ,प्रमोदिनी, अश्विनी   घरी होते. मग संध्याकाळी...
'पिवळ्या पिवळ्या हळदीने ... खुलवा गोऱ्या रंगला!'
हळद लावा अंगाला बाई हळद लावा अंगाला"
असे  म्हणत,कौतुकाने,मायेने आणि डोळ्यांच्या ओल्या कडा पुसत  भानुप्रियाला हळद लावून, सुवासिक तेल आणि उटणं लावून न्हाऊ माखू घातली, आणि नवरी पिवळी पिवळी झाली, लग्नाला सज्ज झाली!   मनात अनेक गाणी तरळून गेली!
"नवराई माझी लाडाची लाडाची ग..
अप्सरा जणू इंद्राची इंद्राची ग!" आणि अशी अनेक!

आता लेक  लाडकी ह्या घरची होणार होती सून त्या घरची! अनेक वर्षां पासून  संस्कारांची, विचारांची, आनंदाची, आणि जीवन जगण्याबाबतच्या कले  विषयी जे काही मला सांगता आलं ती विचारांची शिदोरी तिला सोबत दिली होती ह्या विश्वासाने कि ह्यातील थोडे थोडे लागेल तसे ती  आपल्या आयुष्यात वापरेल, आणि आयुष्य समृद्ध करेल,स्वतःचे आणि घरातील सर्वांचे.

रात्र गप्पा मारण्यात घालवली आणि पहाटे उठून, आवरून, देवांना नमस्कार करून, लग्नासाठी वऱ्हाड  गाडीत बसलं, शुभ संकेताचा नारळ फोडला, आणि हॉटेल कडे प्रस्थान ठेवलं!      


No comments:

Post a Comment