Monday, 5 August 2013

SHITAAVARUN BHATAACHI PARIKSHA

 समर्थ म्हणतात ….
"येक शीत चांचपावे ' म्हणिजे वर्म पडे ठावे'
तैसे थोडे अनुभवे ' बहुत जाणावे"

आपण  म्हणतो की शितावारून भाताची परीक्षा होते,  ह्या  ओवीत तेच  सांगितले आहे.थोड्या अनुभवाने   देखील बरेच कही जाणता येते. स्वयंपाकाचे पण हेच मर्म आहे. तुम्ही किती जास्त घटक पदार्थ वापरले,किती महागडे घटक घातलेत,किंवा किती exotic म्हणतो तसे घटक वापरलेत, ह्यापेक्षा, तुम्ही आहे त्या सामग्रीमधून,कोणता  पदार्थ बनवता आणि तो किती रुचकर,स्वादिष्ट,आणि सर्वात म्हत्वाच किती पोषक बनवता ह्याला महत्व आहे !

माणूस आधी डोळ्यांनी खातो,मग तोंडानी! असं  म्हणतात ते  खर आहे. डोळ्यातून तो आस्वाद मनात शिरतो, आणि मनाला भावला, तर मग खाऊन आस्वाद घेतला जातो.  त्यामुळे,कितीही कमी पदार्थ असले,तरी प्लेट मध्ये वाढताना  त्यांची रचना नेत्र सुखद हवी, आणि अनेक स्वाद त्यातून मिळायला हवेत.

म्हणजे तिखट_गोड , असा combo असावा. किंवा पदार्थांची रंगसंगती साधावी, म्हणजे लाल रस्सा आणि हिरवी किंवा रंगीत कोशिंबीर. पदार्थांचा  आकार देखील एकमेकांना पूरक असावा, म्हणजे चौकोनी शंकरपाळे आणि गोल लाडू, किंवा प्लेट मध्ये   पसरलेला चिवडा  आणि गुलाबजाम किंवा बर्फी. त्यामुळे होत काय कि साधीशीच डीश, पण appealing ,tempting,वाटते, आणि स्वादिष्ट असेल तर लगेच गट्टम होतेच! आणि स्वाद जरी उन्नीस बीस असला तरी आपण घातलेली माया दिसते आणि पदार्थ पटकन खाल्ले जातात, हा माझा अनुभव आहे ,तसाच  अनेकांचा असणारच !


सांज्याची पोळी,अळूची भाजी !

काल सांज्याची पोळी केली होती, सोबत अळूच फदफद (हा अळूच्या भाजी साठीचा खास  नाशिकचा शब्द!), काकडीची कोशिंबीर, वरणभात (तो तर हवाच!), छान बेत जमला होता. कसं  आहे,आपण कितीही पंचपक्वान्न बनवली ,तरी,  जोपर्यंत पानात वरणभाताची मूद पडत नाही तोपर्यंत पान पूर्णच वाटत नाही!असो.

सांज्याची पोळी अगदी सोपी आहे करायला.  म्हणजे पुरणपोळी करायला  वेळ नसेल किंवा करून कंटाळा आला तर हि पोळी अगदी पटकन होते. साखर घालून रव्याचा करतो तो   ' शिरा', आणि गूळ घालून करतो तो 'सांजा'.

सांज्याची पोळी:

१ वाटी रवा  २ tbsp तुपावर चांगला लालसर  भाजून घ्यावा. १ ते १ १/ ३ वाटी गूळ १ वाटी पाण्यात विरघळून घ्यावा, आणि  रवा गरम असतानाच हे गरम पाणी हळू हळू  ओतावं, लागले तर थोडे आणखीन  पाणी घालावे, आणि शिरा बनवून घ्यावा. स्वादा साठी वेलची पूड आणि जायफळ पूड घालावी. हा शिरा कोरडाच  राहिला पाहिजे.

आता साधी पोळीची कणिक मळून , त्याची छोटी गोळी घ्यावी, त्याची चपटी पुरी करावी,थोडं  तूप लावून,कणिक भुरभुरावी. त्यानंतर सांजा  भरून, उंडा बंद करून, थोडा आटा लावीत, हळूहळू पातळ पोळी लाटावी, आणि तूप किंवा तेल न घालता भाजून घ्यावी. वाढताना पुन्हा गरम करून तूप घालून खरपूस भाजावी.(ह्या पोळ्या करून ठेवता येतात, आणि प्रवासाला पण न्यायला सोयीच्या आहेत.



     

No comments:

Post a Comment